दिन विशेषदेशमहाराष्ट्रमुख्यपानराजकीयविचारपीठ

जर नोटबंदी यशस्वी झाली असती…

॥सण्डे स्पेशल॥६८॥

पारतंत्र्य काळात जनतेला आसमानी आणि सुलतानी आपत्तीना तोंड द्यावे लागत असे. स्वातंत्र्यानंतर सुलतानी आपत्तीपासून मुक्ती मिळाली आणि आसमानी आपत्तीची वारंवारिता कमी झाली.

जोवर सुशिक्षित, सूज्ञ, शहाणे राज्यकर्ते सत्तेवर येत राहिले. तोवर सुलतानी आपत्तीविषयी जनता अगदी निश्चिंत होती. पण २०१४ ला शिक्षणाचा मागमूस आणि सौजन्यशीलतेचा गंध नसलेल्या मोदींची देशात सुलतानशाही आली. आणि नामशेष झालेल्या सुलतानी आपत्तीचे देशाला भूकंपासारखे एकामागून एक झटके बसू लागले.

त्यात मोठ्या रिस्टर स्केलवर बसलेल्या नोटबंदीच्या सुलतानी झटक्याने, जनतेवर त्राहिमाम म्हणण्याची वेळ आणली तर प्रधानमंत्री मनमोहन सिंहानी मंदीच्या काळातही शाबूत ठेवलेली देशाच्या अर्थव्यवस्थेची घडी पार विसकटून टाकली. तरीही मोदी स्वतःवर उदबत्त्या ओवाळत राहिले आणि मिडिया त्यांचं गुणगान करीत राहिला.

नोटबंदीने देशाचं अपरिमित नुकसान होऊनही भक्तगण आणि मिडिया मोदींवर स्तुतीसुमनांचा आजही अविरत वर्षाव करीत आहेत. तेव्हा मी विचार करतो की नोटबंदी जर यशस्वी झाली असती, तर काय झाले असते? त्याविषयी मी मनात रेखाटलेलं कल्पनाचित्र आपणापुढे सादर करीत आहे.

  • दोन हजाराच्या नवीन नोटांवर मोदींची छवी झळकली असती आणि नोटेच्या मागे गांधींच्या दांडीयात्रेऐवजी माता हिराबेन यांचे बँकेच्या रांगेत उभे असलेले व ‘मां तुझे सलाम!’ अशा शीर्षकाचे चित्र दिसले असते.
  • संसदेच्या पाय-यांवर नतमस्तक मोदींचं कायमस्वरुपी शिल्प उभारण्यात येऊन, त्या गेटचं ‘मोदी गेट’ असं नामकरण करण्यात आलं असतं. हजार आणि पाचशेच्या नव्या नोटांवर ते शिल्पचित्र झळकलं असतं.
  • अर्थशास्राच्या नोबेल पुरस्कारासाठी गणंग सहका-यांनी मोदींच्या नावाची शिफारस केली आली असती. तर भक्तांनी मोदींना भारतरत्न देण्यासाठी आकांत केला असता.
  • देशातल्या विद्यापीठांनी डी.लिटचा मोदींवर अक्षरशः वर्षाव केला असता. तर अनेकांनी ‘मोदी आणि नोटबंदी’ विषयावर डॉक्टरेटसाठी विक्रमी संख्येने अर्ज केले असते.
  • देशविदेशातील विद्यापीठात मोदींना व्याख्यानासाठी निमंत्रणांवर निमंत्रणं आली असती. व चहा विकत असतानाच मला काळ्या पैशांवरचा हा जालिम इलाज कसा गवसला होता. हे त्यांनी रसभरीतपणे सांगितलं असतं.
  • अनेक भारतीय विद्यापीठांच्या अर्थशास्र विभागांमध्ये ‘मोदी अध्यासनांची’ स्थापना झाली असती. व नोटबंदीचा उपाय ही काळया पैशाला आळा घालणारी ‘मोदी थिअरी’ या नावाने अर्थशास्रात ओळखली गेली असती.
  • पत्रकार परिषद न घेणा-या मोदींनी, पत्रकार परिषदांचा दणका सुरु केला असता. मुलाखतींचा नया दौर सुरु झाला असता.
  • नोटबंदीच्या काळात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांचा गौरव करताना मोदींना पुन्हा कोरडा हुंदका दाटून आला असता.
  • नोटबंदीला विरोध करणा-या विरोधकांची दे माय धरणी ठाय अशी अवस्था झाली असती आणि सूज्ञ अर्थतज्ज्ञांची भक्तांनी उचलबांगडी करुन त्यांना वाघा बॉर्डरवर नेऊन सोडले असते.
  • अयोध्येत राम मंदिराआधी विष्णुचा अकरावा अवतार मोदींचं मंदिर उभं राहिलं असतं. मंदिराच्या सभामंडपात भिंतीवर जगभरातील नेत्यांना मोदींनी मारलेल्या मिठ्यांची मिठ्ठीचित्रे रंगवण्यात आली असती.
  • मोदींचे परमभक्त संबित पात्रांनी मोदी लिलामृत, मोदी चालीसा, मोदी सहस्रनाम, मोदी महात्म्य अशा अनेक पोथ्या लिहून काढल्या असत्या. भक्तगणांनी त्यांची पारायणं केली असती.
  • चरित्रकारांनी युगपुरुष, कालपुरुष, गुजराथचा फकीर, एका चहावाल्याने… अशा शीर्षकाची मोदी चरित्र लिहली असती. त्यातले वेचे पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्यात आले असते.
  • ८ नोव्हेंबर २०१६ पासून ‘मोदीनाम संवत्सर’ नामक नव्या कालगणनेला सुरुवात झाली असती. त्यादिवशी संसदेवर, विदेशातील भारतीय दूतावासांवर आणि देशभर गुढ्या उभारण्यात आल्या असत्या.
  • या वाहत्या गंगेत हात धुवून घ्यायला मुसंडी मारुन सिनेमावालेही पुढे सरसावले असते व नोटबंदीच्या घटनेवर आधारित चित्रपटांची घोषणा केली असती. त्यांची शीर्षके खालीलप्रमाणे असती.
  • मास्टरस्ट्रोक
  • काले धन के खिलाफ संघर्ष
  • ८ नवंबर २०१६
  • फकीर का करिश्मा
  • चौकीदार हो तो ऐसा त्या चित्रपटात गीतातून मोदी महिमेचे अपूर्व दर्शन घडले असते. त्याची झलक पहा जरा!

काले धन के खिलाफ, जब
चौकीदार ने छेड़ी लड़ाई।
मांओं ने दिए बेटे,
बहनों ने दिए भाई।

बैंको की कतार में,
खडे हो गए बहन, बेटी, लुगाई
काले धनवालो ने घबराकर
बहा दी, गंगा में काली कमाई।

गुजरात से आया था वो,
कोई चायवाला था वो।
पाकिस्तान को धमकाता था वो,
चीन को आंखें दिखाता था वो।
आतंकवादियों का दुश्मन था वो,
आम जनता का दोस्त था वो।

काली कमलीवाले तेरी अजब है माया,
भारत से उठ गया काले धन का साया।

चायवाले की चाय का कर्जा,
चुका पाएगा न कोई मिर्जा।

         चापलुसांनी चापलुसीचे आणखी कोणते विक्रम केले असते? याचा मी एकटाच कशाला ताण घेऊ! बाकी तुमच्या कल्पनाशक्तीवर सोडतो नि थांबतो.

रविवार : – सुभाषचंद्र सोनार,
दि. ०७.०४.२०१९ : राजगुरुनगर.
*

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!