महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसंपादकीय

“आता तरी धार्मिक उन्माद थांबेल काय?”

अरुण निकम.
9323249487.
मुंबई.

नुकताच भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने बिलकिस बानो सामुहिक बलात्कार व तिच्या घरातील अन्य 7 लोकांची निर्घृण हत्या केल्या प्रकरणी, (त्यात तिच्या 3 वर्षांच्या मुलीचा समावेश आहे.) शिक्षा कमी करण्याचा गुजरात सरकारचा निर्णय रद्दबातल ठरवून सर्व 11 आरोपींची जन्मठेपेची शिक्षा कायम केल्याचा निर्णय दिला आहे. ज्या गुजरात राज्यात जातीय सलोखा शेवटच्या घटका मोजून केव्हाच गतप्राण झाला आहे. ज्या राज्यात थेट हिंदुत्वाचे धडे शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करून “हिंदू राष्ट्रवाद” रुजविण्याचा कमाल प्रयत्न होतो, त्या गुजरात राज्यातील न्यायालयाने शिक्षा ठोठावलेले जात्यंध गुन्हेगार, उर्वरित शिक्षा भोगण्यासाठी स्वतःहून अटक करून घेतील. ही भाबडी समजूत आहे. कोर्ट निकाल येण्यापूर्वीच ते सर्व अकरा आरोपी फरार झाले आहेत. त्यांना अटक करणे हे सर्वस्वी गुजरात सरकारच्या इच्छा शक्तीवर अवलंबुन आहे. ह्या निर्णयामुळे देशभर खळबळ माजून चर्चेला उधाण आले आहे.
नेमके हे प्रकरण काय आहे?, ते का घडले? याबद्दल जाणून घेऊ या.
दिनांक 27/02/2002 रोजी
अयोध्यावरुन कारसेवक साबरमती
एक्सप्रेसने येतांना, गोध्रा येथे गाडीच्या डब्याला आग लावली. त्यात 58 कारसेवक मृत्युमुखी पडले तर अनेक जण आगीने होरपळले. हा हल्ला मुस्लिम समुदायाने घडवून आणल्याचे समजताच, गुजरातमध्ये मुसलमानांच्या विरोधात दंगल भडकली. त्यात 800 मुसलमान आणि 254 हिंदूंचे बळी गेले.
ह्याच काळात 03/03/2002 रोजी बिल्किस बानोच्या राहत्या घरावर तीस चाळीस लोकांच्या जमावाने हातात तलवारी व काठ्या घेऊन हल्ला केला. त्यावेळी ती पाच महिन्यांची गरोदर होती. तरी देखील ह्या वासनांध जनावरांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. तिच्या तीन वर्षाच्या कोवळ्या मुलीला जमिनीवर आपटून ठार मारले. मुलीसह कुटुंबातील सात लोकांची
निर्घृण हत्या केली. कुटुंबातील इतर सहा सदस्य जीव मुठीत घेऊन पळाले.
म्हणुन ते वाचले. बलात्कारानंतर ती तीन तास बेशुद्ध पडून होती. नंतर तिने एका जमादाराला गाठून लिमखेडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या प्रकरणाची सुनावणी मुंबईतील विशेष सि. बि.आय. न्यायालयात होऊन 2008 मध्ये अकरा आरोपीं वरील आरोप सिद्ध होऊन त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.
त्याविरुद्ध उच्च न्यायालय, मुंबई येथे अपील करण्यात आले. तिथे देखील अकरा जणांची जन्मठेपेची शिक्षा कायम केली गेली.
नंतरच्या काळात आरोपी राधेश्याम शाहने शिक्षा माफी साठी याचिका दाखल केली. न्यायालयाने याबाबत गुजरात सरकारला निर्णय घेण्याचे निर्देश दिले. त्यानुसार गुजरात सरकारने एक समिती गठीत केली. या समितीने दोषींची शिक्षा कमी करून त्यांची तुरुंगातून सुटका केली.
त्याविरुद्ध बिल्कीस
बानोने पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
धाव घेतली. त्यावर निर्णय देतांना सर्वोच्च न्यायालयाने सर्व अकरा आरोपींची जन्मठेपेची शिक्षा कायम करून दोन आठवड्याच्या कालावधीत त्यांनी स्वतःला अटक करून घ्यावी.
असा निकाल नुकताच दिला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने पुढे असेही नमूद केले आहे की, मुंबई उच्च न्यायालया
ने निकाल दिला असल्यामुळे गुजरात सरकारने मुंबई उच्च न्यायालय आणि महाराष्ट्र शासन ह्यांच्याशी सल्ला मसलत करून निर्णय घेणे अपेक्षित होते. परंतु तसे काहीही न करता एकतर्फी शिक्षा कमी करण्याबाबत निकाल देण्याचा गुजरात सरकारला अधिकार नसल्याचे नमूद करीत सर्व अकरा आरोपींची जन्मठेपेची शिक्षा कायम केली आहे.
धर्मांधता, मग ती कोणत्याही धर्माची असो, किती क्रूर, निष्ठुर, व जनावराला ही लाजवेल अशी हीन कृती माणसाकडून घडवून आणते. तेव्हा आपण मानवतेचे गोडवे गाणार्‍या, सर्व धर्म समभाव जोपासणाऱ्या, बंधुभावाच्या खोट्या जगात वावरत असल्याची तीव्र जाणीव होते. जगामध्ये विविध धर्मांची, पंथाची निर्मितीच मुळात माणसाने माणसाशी कशाप्रकारे नीतिमान, निरामय आणि सात्विक जिवन जगावे. अशी शिकवण देत झाली आहे. हे आपण विसरतो आहोत. धर्माचा वापर झुंडशाही, दांडगाई, आणि इतर धर्मियांवर कुरघोडी करण्यासाठी केला जात आहे. खरे तर हे सर्व धर्मविरोधी आहे.
कोणताही धर्म एकमेकांचा दूस्वास,
कुरघोडी, जबरदस्ती, हत्या, जाळपोळ, आणि दंगली करण्याची
शिकवण देत नाही. आणि आपण धर्माच्याच नावाखाली ह्या सर्व गोष्टी करून अविश्वासाचे, भयभीत, तणावाचे, असंतुलित वातावरण तयार करून देशाच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम करण्यास हातभार लावतो. हे आपल्या कुणाच्याच कसे लक्षात येत नाही.
मंदिर, मस्जिद हा मुळातच धार्मिक वाद होता की सत्ता संपादनासाठी खेळली गेलेली राजकिय खेळी, हा प्रश्न आता कालातीत झाला आहे. काहीका असे ना, सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्या नुसार आता मंदिर उभे राहिले आहे. भविष्यात निवाड्यानुसार निर्देशित जागेवर मस्जिद ही उभी राहील. परंतु त्यामुळे दुभंगलेली मनं कधी आणि कशी सांधली जातील?,अलगाव वादाला कधी माती मिळेल?, आपापसातील अविश्वास लोप पाऊन
विश्वासाचे, भाईचाऱ्याचे, आणि एक दुसर्‍याच्या धर्माचा आदर, सन्मान करण्याचे वातावरण तयार करण्याचे काम आपल्याला सर्वांना मिळून करावे लागेल. असे जर झाले तर खर्या अर्थाने आपल्या मूलभूत समस्यांकडे आपले लक्ष जाऊन त्याच्या निराकरणाचा मार्ग दिसेल.

जयभीम.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!