कारल कडू असत. यात नवल ते काय ?

वसंत कासारे.
कारल कडू असत. 😄 यात नवल ते काय ? पण कारल तुपात तळा अथवा साखरेच्या पाकात घोळा. त्याचा कडवटपणा काही केल्या समूळ नष्ट होत नाही.😄 यातही काहीच आश्चर्य नाही. हे असच एक सत्य आहे जे सत्य आम्ही स्विकारायला तयार नाही. ते सत्य अस,
मनुवाद आम्हा बौध्दांच्यातला आज सत्तर वर्ष होत असतानाही जाता जात नाही. जर आम्ही बौध्द धम्म स्विकारलेला आहे तर मग आम्हा बौध्दांच्यातला मनुवाद नष्ट होण क्रमप्राप्त होत. पण तस काहीच दिसत नाही. ज्या सत्यावर तथागत बुध्दांचा धम्म उभा आहे त्या सत्यालाचआम्ही नाकारतो. ज्या प्रज्ञा ,शिल ,करुणेवर बुध्दांनी धम्माचा निकोप निर्मळ मार्ग बनविला ती प्रज्ञा शिल करुणा आमच्या मनात रुजलीच नाही. ज्या काम , क्रोध, द्वेष, मद, मोह, मत्सरावर तथागत गौतम बुध्दांनी विजय मिळवला त्या काम, क्रोध, द्वेष, मद, मोह, मत्सराने आम्ही बाधीत आहोत.
समता, बंधुता, मैत्री, आमच्यात औषधाला सापडत नाही. तथागत बुध्दांनी सांगितल वैराने वैर वाढत. आम्ही वैरान वागतो. मग आम्ही बौध्द कसे ?
माझा एक बौध्द मित्र म्हणाला, कासारे, आमच्या गावात मी एकटाच शुध्द बुध्द आहे. मी पंशिलाच आचरण करतो. सत्य बोलतो सत्यान वागतो. तथागत बुध्दांच्या धम्म नितीन जीवन जगतो. मी कुणासोबतही वैरान वागत नाही. कट कारस्थान करीत नाही. कोणतही कर्मकांड करीत नाही. माझ्या अंगावर कोणताही टिळा नाही, गंडा दोरा नाही. माझ्या घरात एकही देवांचा फोटो नाही. मी म्हंटल छान. अभिनंदन तुझ. मग मी त्याला विचारल , काय रे तुमच्या गावात कोणती धम्म संघटना आहे ? तर म्हणाला चार. मला अपेक्षित होत, तो उत्तर देईल दोन. पण त्याने उत्तर दिल चार संघटना आहेत. मग मी विचारल , अरे मग या चारही संघटना एकत्र येऊन काम करतात का ? तर म्हणाला नाही. आमच्या गावात चार वेगवेगळ्या जयंत्या होतात महामानव डाॕ. बाबासाहेब आंबेडकरांच्या. गावात तीन विहार आहेत. चौथ होण्याच्या तयारीत आहे. एक संघटना दुस-या संघटनेच्या कार्यक्रमाला जात नाही की एकमेकांना बोलवत नाही. खूप चढाओढ चालते. मग मी विचारल , मित्रा तू खरा बौध्द आहे म्हणतोस , मग या चारही संघटना तुला सन्मानान, मैत्री बंधुत्व भावनेन वागवतात का ? तर म्हणाला , नाही मित्रा. मला तर या चारही संघटना वाळीत टाकल्या सारख्या वागवतात. एका संघटनेन बोलवल कार्यक्रमाला तर दुसरीला राग येतो. तोंडावर काहीच बोलत नाही मला. पण आपापसात निर्णय घेतात की याला कुणीही कार्यक्रमाला बोलवायच नाही.
मग मी विचारल, का ? अस का करतात ? तर म्हणाला मी आपल्या समाजातील विकृत गोष्टींवर टिका करतो. चुका काढतो . कुणाच्या घरात देव आहेत तर काही लोक सरळ सरळ बैठकीचा टिळा लावत आहेत. काहींच्या पायात काळा दोरा आहे तर काही अंधश्रध्दाळू आहेत. काही लोक पद प्रतिष्ठा आणि मानपानासाठी सामदामदंडभेद नितीचा वापर करतात. अशा लोकांवर मी टिका करतो. म्हणून.
मग मी विचारल, मित्रा मग तुला यांचा खूप राग येत असेल ना ? तर म्हणाला , नाही कासारे. मला यांचा राग येत नाही. मला यांची किव येते. अरे सत्तर वर्ष होत आली आपण बौध्द झाल्याला. आणि अजून आम्ही बौध्दांसारखे वागत नाही ! नुसते पांढरे कपडे घातले म्हणजे आम्ही बौध्द होत नाही. घरातले देव काढले , बाबासाहेब आणि बुध्द घरात मांडून त्यांना पुजले म्हणजे आपण बौध्द होत नाही. कर्मकांड सोडले म्हणजे आम्ही बौध्द होत नाही. तर या बरोबर आम्ही माणसासारखे वागले पाहिजे. आपापसातला द्वेष वैर संपवला पाहिजे. समाज हिताच्या भावनेन तळमळीन बोलणारांचा द्वेष केला नाही पाहिजे. जर तुमच्यात चांगल्या माणसांबद्दल द्वेष असेल . तुम्ही एकमेकांमध्ये वैर जपत असाल, सामदामदंडभेद नितीचा वापर करीत असाल तर तुमच्यातला मनुवाद गेलेला नाही. आमच्या भल्या भल्या पांढरे कपडे घालून मिरवणा-यांच्या मनात आजही हा मनुवाद तसाच कार्यरत आहे. म्हणून आम्ही बौध्द झालो. पण बुध्द नाही. बुध्द होण महत्वाच आहे. त्या साठीच धम्म प्रशिक्षणाची गरज आहे. प्रवचनातून माणस बुध्द होताना दिसत नाही. .
मी त्या मित्राला म्हंटल, मित्रा तुला मानाचा जयभीम. 🙏 खरच तू समाजाच्या नासूर रोगावर आज औषधच सांगितलस. आपल्या समाजातील लोकांच्या मनातला हा द्वेष, वैर, मोह, रुपी सामदामदंडभेद नितीचा मनुवाद जोवर जात नाही. तोवर आपला समाज बुध्द होऊन नेक होणार नाही. आणि नेक होणार नाही तोवर एक सुध्दा होणार नाही.
मित्रा चल आपण आता या विषयावर काम करू. करूदेत आपला द्वेष. समजूदेत आपल्याला वैरी. आपण समस्त मानवतेवर प्रेम करू. 🙏
जयभीम.
नमो बुध्दाय.
(वसंत कासारे.)
(8087480221)
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत