संस्कृत कुणाची मात्रुभाषा नव्हती !

लेखक – श्रीकांत शेट्ये यांचे पुस्तकातून घेतलेला उतारा.
भाग-१
तथागत भगवान गौतम बुध्द यांनी प्रथम राजे लोकांना धम्म दीक्षा दिली, अन् मग ते तळागाळातील लोकांपर्यंत पोहचले. तथागत भगवान गौतम बुद्ध यांनी लोक भाषेचा म्हणजे पाली अथवा मागधी भाषेचा वापर करुन धम्म प्रचार केला म्हणून त्यांना यश मिळाले अस विद्यार्थ्यांना शिकविल जातं. असं शिकविण्यासाठी जी पाठ्यपुस्तके तयार करण्यात आली त्यात तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या काळात संस्कृत भाषेला प्रतिष्ठा होती. अन् समाजात तिचा सर्वाधिक लोक वापर करीत होते. असा वापर करणिरे लोक हे प्रतिष्टीत होते.
भारतीय शिक्षण खात्याने खोडसाळपणा करण्यात जो बेशरमपणा दाखविला आहे त्याला जगात तोड नाही. बुद्ध काळच नव्हे तर मौर्यानंतर सत्ताधारण करणार्या ब्राह्मणी राजवटीत सुध्दा संस्कृत भाषा ही लोकांच्या दैनंदिन व्यवहाराची अथवा राज्यकारभाराची भाषा नव्हती. तशी असती तर त्या काळातील संस्कृत भाषेतले शिलालेख उपलब्ध झाले असते. पण तसा एकही शिलालेख अथवा नाणेलेख उपलब्ध झालेला नाही. ब्राह्मणी राजवटी पूर्वीच्या मौर्य राजवटीतील अनेक राजांचे ब्राह्यी लिपीतील, पाली भाषेतील सातवाहनांचे महाराष्ट्री भाषेतील कोरीव लेख (इ.स.पूर्व काळातील) प्रत्यक्षात लेण्यामधून दिसुन येत आहेत. तसा इ.स. च्या १५० या वर्षांपर्यंत लिहीलेला शिलालेख उपलब्ध नाही. इ.स.पूर्व १८७ नंतर शुंगानी जो अश्वमेध केला त्या वेळी अश्वमेधाने मार्गदर्शन करणार्या पतंजली याला फर्मान काढावे लागले की, “यज्ञदीक्षा घेतलेल्या कालखंडात तरी यज्ञकत्याने संस्कृत मधून बोलत रहावे यावरुन हे स्पष्ट दिसते की, इ.स.पुर्व १८७ मध्ये सार्माज्य बळकावणार्या ब्राह्मण समाजाला सुध्दा संस्कृत भाषा अवगत नव्हती. आपले नित्याचे व्यवहार ते प्राकृत मधूनच करीत.
नाटककार कालीदास हा भटाळलेल्या चौथ्या शतकानंतर गुप्त राजवटी मधला त्याच्या नाटकात काय किंवा अन्य नाटकात काय ? काय दिसते ? तर राजा, प्रधान या सारखी मुख्य पात्रे तेवढीच संस्कृत बोलतात. राणी, अन्य दुय्यम अधिकाराची पात्रे व सेवक वर्ग व सर्व स्त्रिया या प्राकृत बोलतात. अशा स्त्रियांमध्ये महाराणी सीता असो, द्रौपदी असो, कुंती असो किंवा उर्वशी, धारीणी मालविका, शकुंतला असोत ! या पैकी कुठलीही राजपत्नी संस्कृत बोलत नाही. ज्यांना आपण संस्कृत नाटक म्हणतो ती नाटके पूर्णपणे संस्कृत भाषेत लिहिलेली नसतात. त्यातील नायिका राणी असो वा दासी असो ती प्राकृतातच बोलणार. तिच गोष्ट ज्यांना राजपद अथवा राजगुरू सारख अथवा अमात्य, न्यायाधीश या सारखं पद नाही त्यांचे बाबत. ज्यांना अशी पदे नाहीत ती पात्रे सुध्दा प्राकृतातून बोलतात.
उत्तराम चरित्र अथवा मालती माधव ही नाटके आठव्या शतकातल्या भवभूती नामक कविची. त्यांच्या नाटकातुन सुध्दा हाच प्रकार ! असा प्रकार का ? ही गोष्ट शालेय पुस्तके लिहिणार्या पंडितांना माहित नव्हती असं म्हणता येणार नाही. अन्य समाजातील लोकांचा संस्कृत भाषेशी परिचय नाही ही गोष्ट या बनेल पंडितांना माहीत असल्यामुळे संस्कृत ही लोकव्यवहाराची भाषा नव्हती ही गोष्ट सहज दिसून येण्यासारखी गोष्ट आहे म्हणून या वस्तुस्थितीची त्यांनी वाच्यता केली नाही.
क्रमशः
सोनू कांताबाई ईश्वरदासजी कांबळे
वर्धा
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत