तेवढ्यापुरता ब्राह्मणी वृत्तीचा कठोर निषेध

छत्रपती शिवाजीमहाराज, स्वराज्यरक्षक संभाजीराजे, राजर्षी शाहू यांच्याविषयी बदनामीकारक वक्तव्य केले म्हणून तेवढ्यापुरता ब्राह्मणी वृत्तीचा कठोर निषेध करणारे तमाम मराठा आणि बहुजन आयुष्यभर ब्राह्मणी संस्कृती प्राणपणाने जपतात. ब्राह्मणी वृत्तीचा निषेध करण्याची संधी त्यांना (काल मिळाली तशी) वर्षातून अधूनमधून कधीतरी मिळते, पण ब्राह्मणी संस्कृतीची जोपासना करण्याची संधी मात्र त्यांना वर्षभर मिळत असते आणि त्या संधीचं ते न चुकता सोनं करतात. लग्नात ब्राह्मणाला बोलावतात. पूजेला ब्राह्मणाला बोलावतात. अंत्यविधीला ब्राह्मणाला बोलावतात. आणखी कशाकशाला ब्राह्मणाला बोलावतात. ज्यांच्या मनात छत्रपती शिवाजीमहाराज, संभाजीमहाराज, शाहूमहाराज यांच्याबद्दल मूलतःच तिरस्कार आहे त्यांनाच श्रद्धापूर्वक निमंत्रण देऊन त्यांच्याचकडून आपल्या घरातली पवित्र कार्ये करून घेतात. त्यांच्याचकडून आपल्या प्रिय मुलांची आणि मुलींची नावं काय ठेवायची हे ठरवतात. त्यांच्याचकडून जन्मकुंडल्या काढतात. त्यांच्याचकडून लग्नाच्या तारखा फायनल करतात. त्यांच्याचकडून वास्तुशांती करून घेतात. त्यांच्याचकडून आपल्या प्रिय पूर्वजांचे श्राद्ध पार पाडतात.
अशा तऱ्हेने बहुजनांना तुच्छ लेखणाऱ्या ब्राह्मणी संस्कृतीची जोपासना खुद्द बहुजनच अतीव श्रद्धेने करत आहेत. त्यातून ब्राह्मणी संस्कृतीही जिवंत राहते आहे आणि त्यायोगे बहुजन महापुरुषांबद्दल द्वेषभावना बाळगणारी ब्राह्मणी वृत्तीही जिवंत राहते आहे.
प्रसंग घडला की तेवढ्यापुरता ब्राह्मणी वृत्तीचा निषेध करणे, हा तात्पुरता उपाय आहे. ब्राह्मणी संस्कृतीला कायमचा रामराम करणे, हा कायमचा ईलाज आहे. अखेरचा हा तुला दंडवत, अशी गर्जना करणे, हाच अखेरचा मार्ग आहे.
या अखेरच्या दंडवताची तारीख ठरवा. तीच मराठ्यांच्या आणि एकूणच बहुजनांच्या मुक्तीची तारीख असेल.
✍️ संदीप सारंग
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत