देशदेश-विदेशमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसामाजिक / सांस्कृतिक

नव्या वाटा शोधताना….. बौद्ध संस्कार विधिंसंबंधी थोडे काही….

जुन्या काळात सात वर्षे पुर्ण झाल्यावर आपण इयत्ता पहिलीत प्रवेश घेत होतो. आणि दगडी पाटीवर पेन्सिलने अ आ इ ई लिहायला शिकत होतो. जेव्हा आपण पेन्सिलने पाटीवर लिहायला शिकत होतो तेव्हा आपले मोठे बहिण भाऊ वहीवर पेनने लिहीत होते. आणि ते पाहून आपल्याला वही आणि पेनाचे आकर्षण वाटत होते. असेच चौथीत गेल्यावर कम्पास पेटीचे आकर्षण वाटु लागे आणि गरज नसतानाही आपण आई वडीलांकडे कम्पास पेटीची मागणी करत असू. पण गम्मत अशी की कम्पास पेटीतील पट्टीशिवाय दुस-या कुठल्याही साहित्याचा उपयोग आपल्याला माहित नसे. इतकेच काय कम्पास, काटकोन, इ. साहित्याचा उपयोग कसा केला जातो हे सुद्धा आपल्याला माहित नसे. अगदी 8व्या, 9व्या इयत्तेत पोहोचेपर्यंत!!!

बौद्ध धम्माच्या बाबतीत आपण आजही काहीसे असेच चाचपडत आहोत असे म्हणावे लागेल. मी बौद्ध धम्माच्या संस्कार पाठासंबंधी बोलत आहे. 1950 सालि बोधिसत्व डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी श्रीलंकेत जाऊन, तेथे प्रचलीत संस्कार विधिंचे संकलन करून, ते पुस्तक रूपाने छापून आपली संस्कार विधिंची अडचण दुर केलेली आहे. तरीसुद्धा आपण त्यातील शब्दांविषयी संभ्रमित होऊन त्या सुत्त अथवा गाथा संस्कार विधीत घ्याव्या अथवा घेऊ नये या विषयी वेगवेगळी मते मांडत असतो.

आपली धार्मिक संस्था या विषयी वेळोवेळी निर्णय घेऊन कोणती सुत्ते आणि गाथा घ्याव्यात या विषयी आदेश पारीत करीत असते.

हे संस्कार विधी पालि भाषेत असल्याने आणि आपल्याकडे पालि भाषेचा फारसा प्रचार प्रसार नसल्याने, तसेच त्या संस्कार विधींचा मागचा पुढचा संदर्भ लक्षात घेत नसल्याने, केवळ त्यातील शब्द लक्षात घेऊन ब-याच वेळेस आपण त्यांना अंधश्रद्धेच्या अडगळीत टाकण्यास मागेपुढे पहात नाही. ब-याच वेळेस भाषेच्या उच्चाराच्या अडचणीमुळे अथवा पाठांतराच्या अडचणीमुळे बौद्धाचार्य त्या गाळून संस्कार विधी आटोपून घेण्याचा प्रयत्न करीत असतात.

आपण विज्ञानाधिष्ठीत बौद्ध धम्माचा पुरस्कार करीत असल्याने संस्कार पाठात येणारे स्वर्ग, नरक, ब्राह्मण या शब्दांना बुद्धांच्या उपदेशांचा संदर्भ लक्षात न घेता त्यावर आक्षेप घेत कधी कधी त्यात सोईनुसार बदल करीत असतो.

अशाप्रकारे आजपर्यंत आपण पत्तिदानासारख्या गाथा गाळलेल्या आहेत. सध्या करणीयमेत्तसुत्त, रतनसुत्त त्यांच्या कठीण उच्चारामुळे आणि पाठांतरास कठीण असल्याने गाळण्याची चर्चा सुरू आहे. विवाहाच्या वेळी वधुवरांकडून वदवून घ्यायची पालि भाषेतील कर्तव्ये सुद्धा अशीच बंद करण्यात आली आहेत.

पालि भाषेचा विद्यार्थी म्हणून मी या सुत्त आणि गाथांचा तसेच कर्तव्यांचा संदर्भ तिपिटकात शोधण्याचा प्रयत्न केला. आणि त्याचा शोध घेत असताना काही नव्या गोष्टी माझ्या लक्षात आल्या.

येथे मी पती-पत्नीची कर्तव्ये आणि पत्तिदान गाथा याविषयी चर्चा करणार आहे.

पहिल्यांदा मी विवाह प्रसंगी वधुवरांकडून वदवून घ्यावयाची पालि भाषेतील कर्तव्ये सांगणार आहे –

पतीची कर्तव्ये 1)सम्माननाय 2)अनवमाननाय 3)अनतिचरियाय 4)इस्सरियवोस्सगेन 5)अलंकारानुप्पदानेन

पत्नीची कर्तव्ये 1)सुसंविहित कम्मन्ता च होति 2)संगहितपरिजनाच 3)अनतिचारिनी च 4)सम्भतञ्च अनुरक्खति 5)दक्खा च होति अनलसा सब्बकिच्चेसु

वरील उपदेशात एका सर्वसामान्य गृहस्थाची आणि गृहीणीची कर्तव्ये सांगीतली आहेत. आणि तो भगवान बुद्धांनी सिगाल नावाच्या गृहपतीपुत्राला दिलेला उपदेश आहे.

भगवंतांचा हा उपदेश आपल्याला सुत्तपिटकातील दिघनिकाय या ग्रंथातील पाथिक वग्गातील सिंगाल सुत्तातील छद्दिसापटिच्छादनकण्डामध्ये वाचावयास मिळतो. पालि भाषेतील सुत्ताचा तो अंश आपल्या माहीतीसाठी जसाच्यातसा येथे देत आहे-

  1. “पञ्चहि खो, गहपतिपुत्त, ठानेहि सामिकेन पच्छिमा दिसा भरिया पच्चुपट्ठातब्बा — सम्माननाय अनवमाननाय [ अविमाननाय ] अनतिचरियाय इस्सरियवोस्सग्गेन अलङकारानुप्पदानेन. इमेहि खो, गहपतिपुत्त, पञ्चहि ठानेहि सामिकेन पच्छिमा दिसा भरिया पच्चुपट्ठिता पञ्चहि ठानेहि सामिकं अनुकम्पति — सुसंविहितकम्मन्ता च होति, सङगहितपरिजना [सुसङगहितपरिजना] च, अनतिचारिनी च, सम्भतञ्च अनुरक्खति, दक्खा च होति अनलसा सब्बकिच्चेसु. इमेहि खो, गहपतिपुत्त, पञ्चहि ठानेहि सामिकेन पच्छिमा दिसा भरिया पच्चुपट्ठिता इमेहि पञ्चहि ठानेहि सामिकं अनुकम्पति. एवमस्स एसा पच्छिमा दिसा पटिच्छन्ना होति खेमा अप्पटिभया.

सुत्तातील या भागाचा अर्थ असा होतो –

“हे गृहपतीपुत्रा, पतीने पत्नीला पश्चिम दिशा मानून पाच प्रकारे सेवा करावी. तीचा सन्मान करावा, तीचा अवमान करू नये, अनाचार करू नये, तीला अन्नधान्याने संतुष्ट ठेवावे, तीला अलंकारादि भूषणाने संतुष्ट ठेवावे.

हे गृहपतीपुत्रा, या पाच प्रकारे पतीने पत्नीला पश्चिम दिशा मानून तीची सेवा केल्यावर ती पाच प्रकारे पतीवर अनुकम्पा करते – घराची उत्तम व्यवस्था ठेवते, परिजनांची काळजी घेते, अनाचारापासून अलिप्त रहाते, पतीच्या संपत्तीचे रक्षण करते, घरकामात आळस न करता दक्ष राहते”.

हीच ती पतीची आणि पत्नीची कर्तव्ये आहेत, जी विवाह प्रसंगी वधुवरांकडून वदवून घेतली जात असत. त्याला प्रत्यक्ष भगवंतांच्या उपदेशाचा संदर्भ आहे. विवाहाच्या पुर्वसंध्येला जीथे हळदिसारखे कार्यक्रम आयोजित करून वेळ आणि पैसा उधळला जातो तीथे बौद्धाचार्य अशा प्रकारच्या बुद्ध उपदेशांचा आधार घेवून वधु-वरांना समुपदेशन करू शकतात. परंतु त्या कर्तव्यांना संस्कार विधितून सध्या बगल देण्यात आलेली आहे.

विधी संस्कारातून वगळण्यात आलेली दुसरी गाथा म्हणजे पत्तिदान गाथा होय.

पत्तिदान गाथा ही प्रामुख्याने अंतिम संस्काराच्यावेळी आणि पुण्यानुमोदनाच्या वेळी घेतली जात असे. सध्या ती बंद करण्यात आलेली आहे.

पुण्यानुमोदनालाच जलदान विधी असे देखील म्हटले जाते. जलदान विधी हा शब्द बहुधा पत्तिदान गाथा घेताना जे पाणी सोडले जात असे त्यामुळे अस्तित्वात आला असावा. परंतू येथे एका पात्रातून (तांब्याने किंवा पेल्याने) दुस-या पात्रात पाणी सोडणे हे केवळ प्रतिकात्मक आहे.

पुण्यानुमोदन म्हणजे आपल्या मृत नातेवाईकांच्या पुण्य कर्माचे अनुमोदन करणे किंवा त्यांना धन्यवाद देणे. या प्रसंगी भिक्खू संघाला दान दिल्यानंतर सुद्धा ते आपल्या दानाचे अनुमोदन करतात. अनुमोदन या शब्दाचा अर्थ स्विकार करणे, सहमती दर्शवणे, धन्यवाद देणे असा होतो.

येथे ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती ही की जेथे दान दिले जाते तेथे ही गाथा समर्पक आहे. परंतु जेथे दान दिले जात नसेल तरीही तेथे ही गाथा घेणे हे निरर्थक आहे.

मला इथे नमुद करावेसे वाटते की पत्तिदान म्हणजे जलदान नव्हे. पत्तिदान हा पालि शब्द पत्ति आणि दान अशा दोन शब्दांचा बनलेला आहे. यात पत्ति म्हणजे प्राप्ती आणि दान हा त्यातला दुसरा शब्द आहे. आपण प्राप्तिदान असा या शब्दाचा अर्थ लाऊ शकतो.

प्राप्ती कसली तर गृहस्थी मनुष्य जीवन जगत असताना जी काही दानादी कुशल कर्में करून पुण्य अर्जित करतो ती पुण्याची प्राप्ती. त्या पुण्य कर्मांचे मैत्री भावनेने आपल्या आप्तजनांना वितरण करणे म्हणजे प्राप्तिदान अर्थात पत्तिदान होय. याला पुण्य वितरण असे म्हणतात.

साधना करीत असताना अखील जगातील प्राणीमात्रांविषयी जी मेत्ता भावना व्यक्त केली जाते त्यातलाच हा संदर्भ आहे.

पत्तिदान गाथेत खालिल गाथा अंतर्भूत करण्यात आलेल्या आहेत.

इदं वो ञातिनं होतु, सुखिता होन्तु ञातयो.

उन्नमे उदकं वुठ्टं, यथा निन्नं पवत्तति.

एवमेव इतोदिन्नं, पेतानं उपकप्पति.

यथा वारिवहा पुरा, परिपूरेन्ति सागरं.

एवमेव इतोदिन्नं, पेतानं उपकप्पति.

इच्छितं पत्तितं तुय्हं खिप्पमेव समिज्झतु.

सब्बेपुरेन्तु चित्तसंकप्पा चन्दोपन्नरसो यथा.

आयुरारोगसम्पति, सग्गसम्पतिमेवच.

ततो निब्बाणसम्पति इमिना ते समिज्झतु.

अनिच्चवत संखारा उप्पाद वय धम्मिनो

उपजित्वा निरूज्झन्ति तेसं उपसमो सुखो.

कालकतानं अम्हाकं ञातिनं पुञ्ञत्थइमं भिक्खं भिक्खुसंघस्स देमं.

तिपिटकात वरील गाथांचा शोध घेतल्यास त्या एकाच सुत्तातील नसून वेगवेगळ्या सुत्तांतून संकलीत केलेल्या आहेत असे दिसून येते.

यातील पहिल्या कडव्यातील पाच ओळी ‘इदं वो ञातिनं. …..’ या सुत्तपिटकातील खुद्दकनिकायातील पेतवत्थु या ग्रंथातील उरगवग्गो, तिरोकुट्टपेतवत्थुमध्ये तसेच खुद्दकपाठातील तिरोकुट्टसुत्तामध्ये वाचावयास मिळतात.

अट्ठकथेनूसार भगवान बुद्ध जेव्हा ज्ञानप्राप्तिनंतर राजगृहात राजा बिम्बीसाराला भेटावयास आले तेव्हा बिम्बीसाराने भिक्खुसंघाला भोजनदान दिले. त्या रात्री राजाला अकुशल स्वप्ने पडली आणि तो अस्वस्थ झाला. दुस-यादिवशी राजाने ही गोष्ट बुद्धांना सांगीतली. तेव्हा बुद्धांनी राजाला सांगीतले की तू काल जे भोजनदान दिले त्याचे पुण्याचे वितरण तू तुझ्या पेतलोकातील आप्तांस केले नाहीस. म्हणून तूला भयकारक स्वप्ने पडली. म्हणून दुस-या दिवशी जेव्हा राजाने भिक्खू संघाला दान दिले तेव्हा बुद्धांच्या सांगण्यावरून या दानफळाने माझे मृत्यूपावलेले आप्तजन सुखी होवो असे म्हणाला (इदं वो ञातिनं….). अट्ठकथेत याला उपकथासुद्धा आली आहे. ती येथे देत नाही. तिरोकुट्ठ सुत्ताच्या अट्ठकथेतील हा संदर्भ विनयपिटकातील महावग्गाध्ये मात्र आलेला नाही. त्यात म्हटले आहे की राजाने सोन्याच्या झारीतून बुद्धांच्या हातावर पाणी सोडून वेळूवन दान केले.

मात्र खुद्दकपाठ अट्ठकथेत अंगुत्तर निकायातील – दसकनिपात, चतुत्थपण्णासकं, जाणुस्सोणिवग्गो, जाणुस्सोणिसुत्तं या सुत्ताचा संदर्भ देण्यात आला आहे. हा जाणुस्सोणि ब्राह्मण आणि बुद्ध यांच्यात झालेला संवाद आहे. या संवादावरून असे दिसून येते की बुद्धपुर्व काळात आपल्या मृत आप्तस्वकीयांसाठी दान पुण्य करण्याची प्रथा ब्राह्मण धर्मात प्रचलीत होती. जाणुस्सोणि ब्राह्मणाने बुद्धांना विचारले की आम्ही ब्राह्मण लोक आमच्या मृत नातेवाईकांना मिळावे म्हणून दान धर्म करतो. काय ते आमच्या मृत नातेवाईकांना मिळते? बुद्धांनी उत्तर दिले की निरय, तिरच्छान, असुर, मनुष्य, देव या योनितील लोकांना मिळत नाही कारण ते त्या त्या योनितील उपलब्ध साधनांनूसार जीवन यापन करतात. त्यांना असल्या दानाची आवश्यकता नाही. परंतू पेतयोनितील लोक परावलंबी असल्याने येथून त्यांचे जे आप्तजन देतात त्यावर ते जीवन यापन करतात. त्यामुळे त्यांना ते मिळते.

यात बुद्धांनी नमुद केले आहे की, जरी दान मृत आप्तजनांच्या सुखासाठी दिले जाते तरी दान दाता निष्फळ रहात नाही. तर त्याच्या कर्मानूसार तो ज्या ज्या योनित भवसंसरण करीत असतो तेथे तेथे त्याला या पुण्यकर्माच्या निमित्ताने सम्पन्नता लाभते. येथे संवादाचा विषय सोडला तर या उपदेशात बुद्धांनी मनुष्य जीवनात शील पालनाचे महत्व, कुशल कर्म, कर्मानूसार प्राण्यांनी सुगती अथवा दुर्गती, दानाचे महत्व स्पष्ट केले आहे.

आता आपण वरील गाथांच्या अर्थासंबंधी चर्चा करूयात.

आधिच म्हटल्याप्रमाणे पत्तिदान गाथा या कोणत्याही एकाच उपदेशातील नसून त्या वेगवेगळ्या उपदेशांतून आणि अट्ठकथांमधून निवडलेल्या आहेत. अट्ठकथांचा काळ हा चवथ्या पाचव्या शतकाचा मानला जातो त्यामुळे या निवडून तयार केलेल्या गाथांचा काळ हा त्यानंरचा मानला जाऊ शकतो.

यातील-

इदं वो ञातिनं होतु, सुखिता होन्तु ञातयो.

उन्नमे उदकं वुठ्टं, यथा निन्नं पवत्तति.

एवमेव इतोदिन्नं, पेतानं उपकप्पति.

यथा वारिवहा पुरा, परिपूरेन्ति सागरं.

एवमेव इतोदिन्नं, पेतानं उपकप्पति.

ही गाथा खुद्दकपाठ आणि पेतवत्थु या ग्रंथातील असल्याने मुळ तिपिटकातील आहे.

याचा अर्थ –

आप्तजनांसाठी दिलेल्या या दानाने, आप्तजन सुखी होवोत.

पावसाचे पाणी जसे वरून खाली वाहात जाते, त्याचप्रमाणे इथून दिलेले प्रेतांना प्राप्त होवो.

वाहणा-या नद्या जशा सागराला मिळतात, तसे इथून दिलेले प्रेतांना मिळो, असा होतो. आणि ही एक प्रतिकात्मक गाथा आहे.

या गाथांना अट्ठकथेनूसार बिम्बिसार राजाच्या दानकथेचा संदर्भ आहे.

पुण्यानुमोदन प्रसंगी मृताचे नातेवाईक भिक्खू संघाला भोजनादी दान देत या गाथा उच्चारून आपल्या या दानाने अर्जित पुण्य आपल्या मृत आप्तजनांना वितरीत करतो.

इथे एक गोष्ट लक्षात घ्यावी की, दिलेले दान हे आमच्या आप्तजनांना मिळो असे म्हटले असले तरी, प्रत्यक्ष दान भिक्खू संघाला दिले जाते आणि या दानाचे अनुमोदन भिक्खुसंघ त्यापुढील गाथेत करतो ते असे….

इच्छितं पत्तितं तुय्हं खिप्पमेव समिज्झतु.

सब्बेपुरेन्तु चित्तसंकप्पा चन्दोपन्नरसो यथा.

आयुरारोगसम्पति, सग्गसम्पतिमेवच.

ततो निब्बाणसम्पति इमिना ते समिज्झतु.

अट्ठकथेनूसार वरील पहिल्या गाथेत पच्चेकबुद्ध अधिष्टान करणा-या बोधिसत्वाचे अधिष्टान पुर्ण होवो असे आशीर्वचन देत आहेत.

मात्र पत्तिदान गाथेत ही गाथा दान देणा-या मृताच्या नातेवाइकांच्या दानाचे अनुमोदन करण्यासाठी भिक्खुसंघ उच्चारीत आहे.

त्याचा अर्थ असा –

तुमचे इच्छित तुम्हाला शिघ्रगतीने प्राप्त होवो. तुमच्या चित्तातले सर्व संकल्प पौर्णिमेच्या चन्द्राप्रमाणे पुर्ण होवोत.

आणि दुस-या गाथेचा अर्थ –

तुम्हाला आयुष्य, आरोग्य, स्वर्गादि संम्पत्ति तसेच निब्बाणसम्पति प्राप्त होवोत असा होतो.

यातील ‘आयुरारोग्यसम्पत्तिसग्गसम्पत्तिमेवच ततो निब्बाणसम्पति’ या शब्दांविषयी थोडीशी अधिक माहिती घेऊया.

पालि साहित्यात तीन प्रकारच्या सम्पत्ती सांगीतल्या आहेत, त्या म्हणजे मनुष्यसम्पत्ती, दिव्यसम्पत्ती, निब्बानसम्पत्ती.

यात आयुष्य, आरोग्य या श्रेष्ठ मनुष्य सम्पत्ती होत.

दिव्य सम्पत्ती म्हणजे कुशल कर्मांच्या योगाने प्राप्त होणा-या स्वर्गादी सुगती.

आणि तीसरी निर्वाण ही यातील सर्वश्रेष्ठ सम्पत्ती होय.

प्रस्तुत गाथेत दान दात्याच्या दानाचे अनुमोदन करताना, भिक्खुसंघ तुम्हाला या तीनही प्रकारच्या श्रेष्ठ संम्पत्ति प्राप्त होवोत असे आशिर्वचन उच्चारीत आहे.

यानंतर पुढील गाथा येते –

अनिच्चा वत सङखारा, उप्पादवयधम्मिनो.

उप्पज्जित्वा निरुज्झन्ति, तेसं वूपसमो सुखो”

हा बुद्धांचा मुळ उपदेश आहे. सर्व संस्कार अनित्य आहेत. उत्पन्न होणे आणि नाश पावणे हा त्यांचा स्वभाव आहे. जे उत्पन्न होऊन नाश पावणारे आहे त्यांचे उपशमन करणे सुखदायक आहे. असा त्याचा अर्थ आहे.

येथे मृत व्यक्तीच्या पुण्यानुमोदन प्रसंगी मृताच्या आप्तजनांना भिक्खुसंघ हा धम्मोपदेश देत आहेत.

आणि मग शेवटी मृताचे आप्तजन पुन्हा म्हणत आहेत –

कालकतानं आम्हाकं ञातिनं पुञ्ञत्थइमं भिक्खं भिक्खुसंघस्स देमं.

अर्थात आमच्या मृतपावलेल्या आप्तजनांच्या पुण्यप्राप्तिसाठी आम्ही हे दान (भिक्षा) भिक्खुसंघाला देत आहोत.

अशाप्रकारे ही पत्तिदान गाथा इथे पुर्ण होते.

गृहस्थी जीवन जगत असताना माणूस मनःशांतीच्या शोधात असतो. त्यात त्याला कधी कधी आप्तजनांच्या मृत्यू सारख्या भयंकर दु:खद प्रसंगाना सामोरे जावे लागते. अशा आप्तजनांच्या शोकातून मनाला उभारी देण्यासाठी त्या आप्तजनांच्या पुण्यकर्मांचे अनुमोदन करून त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचे पुण्यानुमोदन हे एक साधन आहे असे आपणास म्हणता येईल.

पुण्यानुमोदनाची ही प्रथा केवळ भारतातच अस्तित्वात आहे असे नव्हे तर श्रीलंका, चीन, जपान, तिबेट या सारख्या सर्वच बौद्ध देशात अस्तित्वात आहे.

विज्ञानावर आधारीत बौद्ध धम्म स्विकारताना बोधिसत्व डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी तिपिटकाला न नाकारता ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाच्या माध्यमातून तो विज्ञानवादी दृष्टीकोनातून नव्याने तपासून मांडला आहे.

मग भारतातील बौद्धांनी, त्यांनी जे सध्या बौद्ध रितीरिवाज म्हणून स्विकारले आहेत, परंतू त्यात त्यांना काही प्रमाणात अंधश्रद्धा वाटते, तरीही जगभरातील बौद्ध देशातसुद्धा ते प्रचलीत आहेत अशा रीतिरिवाजांना न नाकारता त्यांना विज्ञानवादी दृष्टीकोनातून तपासून त्यांची नव्याने मांडणी का करू नये?

समाजात मैत्री आणि करूणेची भावना रूजवण्यासाठी अशा प्रकारची दानादी पुण्य कर्मे करण्याच्या या प्रथा म्हणजे सिद्धांत आणि तो प्रत्यक्ष कृतीत उतरवण्यासाठी उपलब्ध केलेले क्षेत्र आहे असे का मानू नये?

आयु. किरण कृष्णा जाधव – एम.ए. – पालि (मुंबई विद्यापीठ)

केन्द्रिय शिक्षक – बी.एस.आय.

मो. 7887556729

संदर्भ –
१. दीघनिकाय – सिगालसुत्त
२. अंगुत्तरनिकाय, चतुत्थपण्णासकं, जाणुस्सोणिवग्गो
३. विनयपिटक – महावग्ग
४. खुद्दकनिकाय – खुद्दकपाठ, सुत्तनिपात, पेतवत्थु आणि त्यांच्या अट्ठकथा
५. Merit Transference in Sinhalese Buddhism : A case study of the interaction between Doctrine and Practice – By Richard Gombrich

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!