
ज्याप्रमाणे हाताची पाचही बोटं सारखी नसली तरी ती एकाच हाताची एकजीव असलेली एकाच मेंदूच्या नियंत्रणातील असल्यामुळे मुठ बांधली तर एक शक्ती बनते, ज्या मूठ व हाताला अवांतर हात भिडण्याचे धाडस करणार नाहीत, उलट त्या हात व मुठीचे अनुसरणच करतील. एका संयुक्त कुटुंबातील वेगवेगळे गुण व मतं धारीत सदस्य एका रक्ताच्या ग्वाहीने कुटुंबाधिकारी आपल्या कुटुंबाला एक शक्ती म्हणून उभे करू शकतो, जीला अवांतर कुटुंबं शह देण्याचे धाडस करणार नाहीत, उलट त्या शक्तीचा आदर्श घेतील. एका धर्मातील वेगवेगळी मानसिकता धारीत लोकं धर्म नियंत्रण शक्तीच्या आदेशावर आपल्या धर्माच्या आचरणातून धर्म संघटन शक्ती बनवू शकतात, ज्याला अवांतर धर्म कमकुवत ठरविण्याचे अयशस्वी प्रयत्न करणार नाहीत, उलट आपल्या सध्याच्या धर्माला सोडून शक्ती ठरलेल्या धर्माचे अनुयायित्व स्वीकारतील.
देशातील प्रत्येक सामाजिक संघटना आपल्या स्तरावर धारीत समाजाला प्रबोधित व जागृत करून आर्थिक दृष्ट्या विकसित करून संघटित करू शकते, अशी शक्तीसंपन्न सामाजिक संघटना अवांतर कोणत्याही सामाजिक संघटनांकडून निरस्त होणे शक्य नाही, उलट त्या संघटनांचा धारीत समाज शक्तीसंपन्न असलेल्या सामाजिक संघटनेला आपल्या विकासाचे माध्यम ठरवून सदस्यत्व स्वीकारणार, हे निर्विवाद आहे. प्रत्येक देश आपल्या अंतर्गत वाद मिटवून देशातील सर्व लोकांना समता, स्वातंत्र्य देऊन बंधुभावनेच्या दिशेने मार्ग मोकळा होऊन न्यायिक व्यवस्था उभी करून एक शक्तिशाली ‘राष्ट्र’ उभे करू शकतो.
व्यक्ती, कुटुंब, देश, धर्म, आणि संघटन यांना मानवी सभ्यतेमध्ये विकसित होण्यासाठी प्रथम आपल्या स्तरावर तत्व व नियामक दृष्टीने कर्तव्यनिष्ठ बनून शक्तीसंपन्न ठरावे लागेल, तेव्हाच मानवी सभ्यतेचे अंतिम लक्ष्य म्हणून सर्व मानवाची 'एकच व्यवस्था' निर्माणाच्या दिशेने वाटचाल सुरू होईल. त्या दिशेने एक-एक टप्पा गाठणे शक्य झाल्यामुळे व्यक्ती, समाज, देश, धर्म, आणि संघटन हे वादमुक्त होण्यास समर्थ ठरतील. लोकहितवादी विचार जगात स्थानप्राप्त झालेला असून एका व्यक्तीच्या सुरक्षा आणि विकासाचा कायदा सर्वमान्यतेतून स्थायी झालेला आहे. या विचाराच्या अधिष्ठानावर एक समूह किंवा एक समाज हा आपल्या सुरक्षा आणि विकासासाठी देशाच्या सामाजिक व्यवस्थेमध्ये एकल शक्ती ठरू शकतो, त्याला अवांतर समूहांना आपल्या मतावर आनण्याचा किंवा त्यांच्या मतासोबत जाऊन सर्व समूहांची एकसंघशक्ती बनविण्याचा खडतर संघर्ष करण्याची आवश्यकता नाही. अशा खडतर संघर्षातून लोकांना, समाजाला साध्यप्राप्ती होत नाही तोपर्यंत वेगवेगळे समूह, धर्म-संप्रदाय आणि संघटना ह्या नव्याने निर्माण होत राहणारच आहेत, कारण आपल्या स्वभावानुसार मानव आपल्या विकासाला पर्याय शोधणारच आहे. ज्या समाजात अगोदरच सामाजिक, आर्थिक लोकतंत्र अस्तित्वात नाही त्या समाजात राजकीय लोकतंत्र जास्त काळ अबाधित राहू शकणार नाही, या सिद्धांताप्रमाणेच प्रत्येक समूह किंवा समाज हा आपल्या स्तरावर सुरक्षित आणि विकसित होत नाही तोपर्यंत अवांतर प्रत्येक समाजाला आपल्या मतासोबत एकताबध्द करण्याचा किंवा त्या समूहांच्या मतासोबत जाण्याचा प्रयत्न अयशस्वीच ठरणार आहे. राजकीय, आर्थिक निकषावर सुध्दा ही शक्ती बनणे शक्य नाही, कारण धार्मिक नियमाच्या अधिष्ठानावर हे सर्व समाज एकदुसऱ्यापासून विभक्त आहेत ते राजकीय, आर्थिक विषयावर विश्वास ठेवण्यापेक्षा धर्माच्या आश्वासनावरच जास्त विश्वास ठेवतील, कारण राजकारण आणि अर्थव्यवस्था ह्या यांत्रिक प्रणाली असून त्यावरील अर्हताप्राप्त अधिकारी ठरलेले लोकं शक्तीशालीच ठरतात, जे व्यक्ती म्हणून धर्म, वर्ग, समाज या वादांत जगत असल्यामुळे त्यांच्या इच्छेवर
व्यक्ती विश्वास ठेवणार नाही, परंतु धर्म ही ऐच्छिक, स्वतंत्र उपभोग्य व आचरण प्रणाली असून ती व्यक्ती विशेषाच्या हुकूमती इच्छांपासून मुक्त सुप्तावस्थेतील तत्वप्रणाली असल्यामुळे सर्व मानवांच्या आचरण व उपभोगासाठी मोकळी असते म्हणून ती विश्वासपात्र ठरते. विश्वास हे धर्माचे मूळ असून दोन व्यक्तींच्या दरम्यान असलेला नितीमुल्य धारीत धर्म जी व्यक्ती पालन करते, ती प्रामाणिक म्हणून विश्वासपात्र ठरते. अशाप्रकारे एका व्यक्तीचा दुसऱ्या व्यक्तीवर, एका समाजाच्या लोकांचा दुसऱ्या समाजाच्या लोकांवर, एका संघटनेतील लोकांचा दुसऱ्या संघटनेतील लोकांवर विश्वास बसणार, तेव्हा मानवी मतैक्य होऊ शकते.
सर्व धर्म, सर्व समाज, सर्व वर्ग एकताबध्द कां व कशासाठी व्हावे ? या प्रश्नाचे उत्तर हे 'त्या धर्मातील, त्या समाजातील, त्या वर्गातील सर्व लोकांना त्यांचे मानवी अधिकार मिळण्यासाठी आणि त्यांचा विकास व त्यांची सुरक्षा करण्यासाठी', असे असेल, तर कोणतीही राजकीय अर्थव्यवस्था यावर खरी उतरत नाही आणि भारतीय राजकीय लोकशाहीमध्ये असे कधी घडलेच नाही. ज्या काळात सर्व धर्मातील, सर्व समाजातील, सर्व वर्गातील लोकं आर्थिक दृष्ट्या संतृप्त होतील, तेव्हा वाद गळून पडतील. धर्मवाद, समाजवाद, वर्गवाद मिटणे म्हणजेच धर्म,समाज आणि वर्गांचे परकोट उध्वस्त होऊन सर्व मानव एकत्रित समूह बनणे होय.
आर्थिक दृष्टया संतृप्त समूह शारीरिक,मानसिक स्तरावर सुदृढ आणि स्थिर होऊन बुध्दीने विकसित होतील. स्वतंत्र असलेले शरीर, मन व बुध्दी ही व्यक्तिगत स्वातंत्र्याचा योग्य उपयोग करून सार्वजनिक विकासाचा मार्गच स्वीकारते, ज्यामधून कोणतीही वाद निर्मिती होत नाही.
आजच्या चळवळीचे ध्येय गुलामीतून मुक्तता आणि मानवी हक्कप्राप्ती हे असून एका वर्गातील वेगवेगळ्या जाती समूहांना या ध्येयावर एकत्र आणणे कठीण आहे. त्यांच्या गुलामीचा स्रोत धर्मात आहे म्हणून धर्मक्रांती होणे आवश्यक आहे. ज्या समूहाचे धर्म परिवर्तन झाले त्या समूहाने बहाल असलेल्या संविधानिक अधिकाराचा उपयोग आपल्या समाजाच्या सांघटणीक स्तरावर आपला आर्थिक विकास स्वतःच साधून स्वावलंबी बनावे, कारण लोकांचा आर्थिक विकास करून देण्याची शासक वर्गाची इच्छाच नसेल आणि राजकीय दृष्ट्या कोणताही समूह शासन स्तरावरून प्रतिनिधीत्वाचा वापर करून आपल्या समूहाचा सामाजिक, आर्थिक विकास घडवून आणू शकत नसेल, तर समूहासमोर आपला विकास स्वतःच साधने हाच एकमेव मार्ग उरतो, त्याचा अवलंब त्याला करावाच लागेल, अन्य दुसरा पर्याय नाही. अशा पद्धतीने विकसित झालेला एक समूह आपल्या स्तरावरून दुसऱ्या समूहासाठी विश्वासपात्र ठरू शकतो. या विश्वासातून अवांतर समूहांना सामाजीक, आर्थिक निकषावर एकत्र करून त्यांना सुध्दा स्वावलंबी बनवता येईल. अशाप्रकारे मानवी सभ्यतेचे लक्ष्य म्हणून 'सर्व मानव समाजाची एकच व्यवस्था' या मार्गातील हा पहिला टप्पा गाठला असे होईल.
विजय बी गवई
संस्थापक/अध्यक्ष
“सार्वभौम समाज समता संस्कार (S4)”
8805426493
दि. 15/11/2020.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत