रमाई मातेची आज जयंती दैनिक जागृत भारत तर्फे माता रमाई यांना विनम्र विनम्र अभिवादन

थॉट्स ऑन पाकिस्तान हा ग्रंथ डॉ. बाबासाहेबांनी रमाईला अर्पण केलेला आहे.बाबासाहेबांनी रमाईबद्दल असे लिहिले आहे की रमाई(बाबासाहेब रमाईस रामू या नावाने हाक मारत असत.)नसती तर मी भीमाचा भीमराव व भीमरावचा बाबासाहेब होऊ शकलो नसतो. डॉ.बाबासाहेबांचे हे उद्गगार रमाईमातेची थोरवी स्पष्ट करणारे आहेत.
अत्यंत सोशिक ,प्रचंड कष्टाने व्यापलेले जीवन असा रमाईचा जीवनप्रवास आहे.बालपणातच आई व वडीलांच्या छत्रछायेला मुकलेली रमाई सासरी सुद्धा अनेक प्रिय जनांचे मृत्यू वादळ स्थितप्रज्ञपणे सोसते.पित्याची माया देणारे सासरे सुभेदार रामजी यांचा मृत्यू तर आभाळ ओझं देणारा होता. डॉ.बाबासाहेबांचे बंधू ,एक पुतण्या ,सावत्र आई यांचा मृत्यूयोग रमाईच्या आयुष्याला पोरकेपणाचे ओरखडे देणारा होता.स्वतःची तीन मुले व एकुलती एक कन्या इंदूच्या मृत्यूचे भयानक दाहक दुःख तर कल्पनेच्या पलीकडचे.बाबासाहेबांना अतिशय प्रिय असलेला राजरतन मृत्यू पावतो तेव्हा त्याच्या अंगावर झाकायला नवा कपडाही नव्हता.स्वतःचा पदर फाडून आई आपल्या काळजाच्या तुकड्यास त्या पटकुरात लपेटून टाकते हा प्रसंग किती काळीज पिळवटून टाकणारा असेल ते शब्दात नाही मांडता यायचे.
रमाईने दुःखदायक आयुष्याचा समर्थपणे सामना केला.बाबासाहेब हे दीन-दलितांचे अश्रू पुसण्यासाठी जन्माला आले आहेत.हे रमाईने ओळखले होते.त्यामुळे रमाईने स्वतःचे अश्रू बाबांना जाणवू दिले नाहीत शिवाय कौटुंबिक अडचणीही बाबासाहेबांसमोर येऊ दिल्या नाहीत.
डॉ.बाबासाहेब बॕरिस्टर होऊन परदेशातून भारतात आले तेव्हा मुंबई बंदरावर प्रचंड जनसमुदायाने त्यांचे स्वागत केले.त्यावेळी बाहेर जाता येईल अशी एखादी बऱ्यापैकी साडीही रमाईजवळ नव्हती.छत्रपती शाहू महाराजांनी एका सत्कार कार्यक्रमात बाबासाहेबांना घातलेला भरजरी फेटा घरात होता.रमाईने तो फेटा नेसूचे वस्त्र म्हणून अंगावर घातला व बाबासाहेबांच्या दर्शनासाठी रमाई मुंबई बंदराकडे चालती झाली.सर्व लोक बाबासाहेबांचा जयजयकार करत होते,कुणी चरणस्पर्श करत होते तर कुणी हस्तांदोलन करत होते.रमाईमाता मात्र पतीच्या वैभवाचे सुख एका कोपऱ्यात उभे साश्रु नयनांनी टिपत होती.लोकसमुदायाला आधी भेटू द्यावे आपण तर घरचे आहोत.सर्वांचे झाल्यावर भेटू ही रमाईची भूमिका.पतीच्या अनुपस्थितीत दुःखाचे चटके भोगलेली मातोश्री दुःखाचा पर्वतासमान एक एक आवंढा गिळून धीरादोत्तपणे उभं राहणं पसंद करते.
प्रियजनांचे मृत्यूयोग पाहणं जसं रमाईच्या भाळी होतं तसं आजारपणही पदराच्या एका कोपऱ्याला आजन्म बांधलेलं होतं.कुटुंबाचा गाढा हाकताना स्व प्रकृतीची हेळसांडच झाली होती.वयाच्या अवघ्या सदोतिसाव्या वर्षी मृत्यूने त्यांना गाठलेच.पहाडासारखे मजबूत असलेले बाबासाहेब हादरून गेले.आईबापाविना पोरकी असलेली रमा मृत्यूमयी दीनदलितांची माता रमाई झाली होती.
त्यागमूर्ती ,वात्सल्य सागर ,धीरादोत्त रमाई मातेस जयंती दिनी विनम्र अभिवादन.
कचरू चांभारे बीड.
9421384434
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत