
“दिवसाचे चार प्रहर टळल्यानंतर सिवा कैदेतून पळून गेला.. हजार लोकांचे पहारे असतानाही. नेमके कोणत्या वेळी, कशाप्रकारे, कुणाचे पहारे असताना तो पळाला याविषयी आम्हाला काहीही कल्पना नाही. काही काळाने असा अंदाज लावण्यात आला, की मिठाईसाठी आतबाहेर करणाऱ्या एखाद्या पेटाऱ्यामध्ये बसून पळून गेला असण्याची शक्यता आहे. (मूळ वाक्य – यो वेंकी पट्यारा की आमदरफ्त भी सो पट्यारा मे बैठ निकल्यो) दुपारपर्यंत कुमार (रामसिंग) यांना दरबारात येण्याबाबत मनाई आणि मनसब काढून घेतल्याची बातमी समजली..”
3 सप्टेंबर 1666, परकालदास, आग्रा.
छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून कसे निसटले असावेत, याविषयीची माहिती देणारा सर्वात पहिला ऐतिहासिक उल्लेख.. यामध्ये सांगण्यात आलेली शक्यता, शिवाजी महाराज पेटाऱ्यामध्ये बसून निसटले असावेत.
“मग एके दिवशी राजा आणि राजपुत्र एकाच पेटाऱ्यामध्ये बसले. पुढे मागे पेटारे करून मधील पेटाऱ्यामध्ये बसून चालले. ते वेळी साज सर्व उतरून, हिरोजी फर्जंद यास घालून आपले पलंगावरी निजावला..”
सभासद बखर, छत्रपती राजाराम महाराज यांच्या आज्ञेने कृष्णाजी अनंत सभासद याने रचलेले शिवकालीन विश्वसनीय साधन.
“त्याच रात्री शिवाजीने दोन पेटारे मोकळे केले. एकमध्ये स्वतः बसून दुसऱ्यामध्ये स्वतःच्या मुलाला बसवले. आपला विश्वासू साथीदार हिरोजी फर्जंद यास आपल्या जागी निजवले. आणि हे दोन्ही पेटाऱ्यामध्ये बसून तिथून निघून गेले..”
भीमसेन सक्सेना, औरंगजेबाच्या दरबारातील एक इतिहासकार ज्याने तारिखे दिलकशा नामक ग्रंथ लिहिला.
औरंगजेबाचे अधिकृत चरित्र समजल्या जाणाऱ्या आलमगीरनामा मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी वेशांतर करून स्वतःची सुटका करून घेतली, असा उल्लेख वाचावयास मिळतो. औरंगजेबाच्या दरबाराचे अखबारमध्ये सुद्धा वेशांतर करून गेले असण्याचीच शक्यता वर्तवली आहे.
“शिवाजी आणि त्याच्या सोबत असलेल्या लोकांना आम्ही नरवर घाटी येथे अडवले असता, त्यांनी स्वतःकडे असलेले बादशहाच्या सहीशिक्क्याचे दस्तक आम्हाला दाखवले..”
बल्लू शाह आणि रण सिंह यांचे कल्याणदास याला पत्र, 26 ऑगस्ट 1666.
मुळात छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून नक्की कसे निसटले, पेटाऱ्यामध्ये बसून निसटले की वेशांतर करून याविषयी ठामपणे काहीही सांगता येत नाही. कारण, ही घटना ज्यांनी पाहिली, अनुभवली, ऐकली किंवा चर्चा केली त्या सर्वांनी केवळ अंदाजच व्यक्त केले आहेत.
अशा परिस्थितीत राहुल सोलापूरकर सांगतात, शिवाजी महाराज लाच देऊन आग्र्याहून सुटले.
हरकत नाही. इतिहासात काही गोष्टी वर खाली होतात, संदर्भ पुढे मागे होतात. ते आपण पुन्हा दुरुस्त करतो. त्यामुळे ही गोष्ट आपण समजून घेऊ शकतो. या माध्यमातून पुन्हा एकदा इतिहासाची चर्चा होते, घटनांची चर्चा होते. ही एक चांगली बाजू म्हणुया..
पण आज राहुल सोलापूरकर यांनी माफीचा व्हिडिओ प्रसारित केला. शिवाजी महाराजांनी लाच देऊन सुटका केली, यात लाच हा शब्द वापरल्याने कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर माफी मागतो असा एकंदर त्यांचा सूर होता. पण ते त्यांच्या वक्तव्यावर ठाम आहेत..
त्यांच्या एक गोष्ट लक्षातच येत नाहीये, की लाच या शब्दाशी काहीही घेणं देणं नाही..
तुम्ही सांगताना, शिवाजी महाराज लाच देऊन सुटले याचे पुरावे आहेत असे सांगतात, त्याच्याशी आहे..
इतिहासात जे घडलेच नाही ते ठामपणे सांगून तसे पुरावे माझ्याकडे आहेत असा दावा करत आहेत, इतिहास चुकीचा सांगत आहेत त्याच्याशी आहे.
छत्रपती शिवाजी महाराज कसे सुटले, तर निश्चितच स्वतःच्या बुद्धीचातुर्यावर..
भलेही ते पेटाऱ्यामध्ये बसून असेल, वेशांतर करून असेल किंवा अजून कसंही..
पण त्यांच्या सुटकेमध्ये कसल्याही प्रकारे लाच दिल्यामुळे मंत्र्यांनी मदत केली, असे उल्लेख नाहीत तर ही नवी मांडणी करण्याची गरजच काय?
कुठल्या मोहसीन खान किंवा मोईन खानने सहीशिक्क्याचे दस्तक महाराजांना दिले होते?
औरंगजेबाची कोणती बायको या प्रकरणात सहभागी होती?
या गोष्टींना त्यांनी अगदी ठामपणे माझ्याकडे पुरावे आहेत म्हणून छाती बडवून घेतलीये..
आजच्या माफीच्या व्हिडिओ मध्ये त्यांनी केवळ लाच या शब्दासाठी माफी मागितली.. पण जो खोटा इतिहास, खोटी मांडणी केली त्यासाठी मात्र “माझ्याकडे पुरावे आहेत, हे पुरावे आहेत ते पुरावे आहेत पण त्याविषयी मी बोलणार नाही” असले निव्वळ बालिश आणि निरर्थक दावे केलेत..
आम्हाला माफी ह्या वक्तव्यासाठी हवी आहे.. चुकीचा इतिहास छाती ठोकपणे मांडतात, त्यासाठी हवी आहे..
लोकांकडून कायम करण्यात येणाऱ्या चुकीच्या वक्तव्यामुळे आपलाच इतिहास वादग्रस्त विषय म्हणून पाहिला जातो. हे थांबायला हवं..
निदान आपण ज्या गोष्टीविषयी बोलतो, ते एकदा तपासून घ्यायला हवं..
संदर्भ चुकणे, पुढे मागे होणे या गोष्टी सांभाळून घेता येतील..
पण इतिहास चुकीचा सांगूनसुद्धा गिरे तो भी टांग उपर असेल तर अशांना दुर्लक्षित करणे चुकीचेच आहे.
- केतन कैलास पुरी.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत