दिन विशेषदेशमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

महाकुंभ मेळाव्यात मेल्याने स्वर्गप्राप्ती होते ?.

या दैववादी विचारधारेला बळकटी देणारे विधान पंतप्रधान मोदीजींनी सन २०२५ दिल्ली विधानसभा निवडणूका प्रचार सभेत केले आहे. त्यांनी प्रयागराज येथील महाकुंभ मेळाव्यात झालेल्या चेंगराचेंगरीत पायदळी तुडवून मेलेल्या श्रद्धाळू भक्तांसाठी पुण्यात्मा हा शब्द वापरतांना आरएसएस रुपी भाजपा केंद्र व उत्तरप्रदेश योगी राज्य सरकारची जवाबदारी झटकून टाकली आहे.

देशाचे पंतप्रधान या नात्याने शोकसंदेश न देता, भाजपा नेते म्हणून छातीवर कमळ चिन्ह धारण करुन दिल्ली विधानसभा निवडणूका प्रचारसभेतून शोक संदेश देतांना, दांभिकपणाचा कळस गाठतांना पायदळी चिरडून मेलेल्यांच्या परिवारांची सहानुभूती मिळवितांना, निवडणूका जिंकण्यासाठी मतांची बेगमी करणारी धुर्त खेळी केली आहे.

त्यांचीच री बागेश्वर धामचे महंत धिरेंद्र शास्त्री यांनी ओढून जे हिंदू महाकुंभ मेळाव्यात स्नान करणार नाहीत, ते राष्ट्रद्रोही आहेत. जे भाविक महाकुंभ मेळाव्यात चेंगराचेंगरीत तुडवून अत्यांतीक वेदनेने तळमळत मरण पावले. ते मरण पावले आहे असे न म्हणता, त्यांना मोक्ष प्राप्ती झाली असे म्हणावे. असे संवेदनाशुन्य खळबळजनक विधान केले आहे.

आपण सर्व महाराष्ट्रात जन्माला आलो याचा आपणास सार्थ अभिमान वाटला पाहिजे.

कारण महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेल्या संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर (पसयदान), संत गाडगे महाराज, संत तुकडोजी महाराज या संतांनी वैदिक हिंदू धर्मातील रुढी परंपरा, कर्मकांड, अंधश्रद्धा व पाखंडावर मर्मभेदी टिका करुन समाजात विवेकवादी, वैज्ञानिक दृष्टिकोन प्रवाहित करण्याचा प्रयत्न केला आहे.

तर कुळवाडीभुषण छत्रपती शिवाजी महाराजांनी दि.६.६.१६७४ रोजी रयतेचे राज्य म्हणजे स्वराज्य स्थापून ते कसे असावे? हे आपल्या अष्टावधानी कार्यकर्तुत्वाने दाखवून दिले आहे.

त्यांनी आपल्या सैन्यात सर्व जाती धर्माच्या मावळ्यांना सामावून घेतले. सर्वधर्म समभाव जोपासून त्यांच्या पराक्रमांना वाव देवून संन्मान केला होता.
अमावस्या हि अशुभ नसून शुभ असते. हे तिचा गनिमी कावा या युद्धकलेसाठी खुबीने, कौशल्याने वापर करुन सिद्ध केले होते. देवाधर्माधारित शुभ अशुभ सिद्धांताला नाकारले होते.

ब्राम्हण म्हणून कोण मुलाहीजा करतो असे देवाधर्माचे ठेकेदार असलेल्या वैदिक ब्राम्हणांना बाणेदारपणे ठणकावून सांगितले होते. त्यांचे देवाधर्माधारित मनुस्मृतीचे विशेषाधिकार नाकारले होते. स्त्रियांवरील अन्याय अत्याचार सहन केले जाणार नाहीत. असा निर्वाणीचा कडक इशारा देण्यासाठी बलत्कारी रांझाच्या पाटलास हातपाय तोडण्याची कठोर शिक्षा दिली होती. कल्याणच्या मुस्लीम सुभेदाराच्या सुनेस सन्मानाने परत पाठविले होते.

छत्रपती शाहू महाराजांनी कष्टकरी बहुजन समाजातील शुद्र अतिशुद्र वर्णियांच्या शैक्षणिक विकासाठी शाळा आणि वसतीगृहांची स्थापना केली होती. राज्याच्या एकूण महसूलापैकी २८% महसूल शिक्षणावर खर्च करणारा हा ऐकमेव राजा होवून गेला. शासन प्रशासनातील वैदिक ब्राम्हणांचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी दि.२६ जूलै १९०२ रोजी करवीर संस्थानातील नोक-यांमध्ये ब्राम्हणेतर मागासवर्गियांसाठी ५०% आरक्षण लागू करण्याचा कायदा करुन त्याची कठोरपणे अंमलबजावणी केली. वेदोक्त प्रकरणाद्वारे वैदिक ब्राम्हणांच्या देवाधर्माधारित अधिकारांना आव्हान देतांना स्वतंत्र धर्मपिठाची स्थापना करणारे क्रांतीकारी पाऊल टाकले. कष्टकरी बहुजन शेतकऱ्यांना शेतीसाठी शाश्वत सिंचनासाठी पाणी उपलब्ध व्हावे म्हणून दि.१८.२.१९०७ रोजी राधानगरी धरण बांधले. दळणवळणासाठी दि. २०.४.१८९१ रोजी रेल्वे सुरु केली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना परदेशी उच्च शिक्षणासाठी जाण्यास आणि वृत्तपत्र काढण्यासाठी बहुमोल आर्थिक मदत करुन प्रोत्साहन दिले. तसेच तेच यापुढे शुद्रातिशुद्रांचे नेते असतील असे दि.२०,२१ मार्च १९२० रोजी झालेल्या माणगाव परिषदेत जाहीर करुन आपल्या दूरदृष्टीचा आणि द्रष्ठेपणाचा परिचय दिला होता.

महात्मा जोतिबा फुले व सावित्रीमाई फुले यांनी दि.१.१.१८४८ रोजी पुण्यातील भिडे वाड्यात मुलींसाठी पहिली शाळा काढून स्त्री शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवली. देवाधर्माधारित वैदिक ब्राम्हणी शोषण व्यवस्थे विरोधात उघड बंड करुन दि.२४.९.१८७३ रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्यायाचा पुरस्कार करणाऱ्या आणि रयतेचे राज्य म्हणजे लोककल्याणकारी राज्याची संकल्पना असलेल्या भारतीय राज्यघटनेची रचना करुन क्रांतीचा मार्ग प्रशस्त केला.
भारतीय राष्ट्रीय ध्वज तिरंग्याच्या मध्यभागी निळ्या रंगात अशोक चक्र म्हणजेच बौद्ध धम्म चक्राची प्रस्थापना करुन चार सिंहाची प्रतिकृती राजमुद्रा म्हणून स्विकारली.

विशेषतः वैदिक हिंदू धर्मातील अतिशुद्र वर्णिय अस्पृश्यांना आत्मसंन्मानाने जगता यावे म्हणून सर्व धर्मांच्या अभ्यासांती दि.१४.१०. १९५६ रोजी नागपूर येथे भगवान बौद्धांच्या धम्माचा लाखो अनुयायांसह दिक्षा घेतांना विषमतावादी वैदिक हिंदू धर्माचा त्याग केला.

पापक्षालन करण्यासाठी, मोक्ष किंवा स्वर्गप्राप्तीसाठी वैदिक मंत्रोच्चारातील यज्ञात पशुबळी, कर्मकांड, अंधश्रद्धा नाकारणारा, वैज्ञानिक दृष्टिकोन असलेला, समताधिष्टित, वर्णजाती विरहीत, मानवी दुःखाचे निवारण करणारा, मानवी मनातील संचित काम, क्रोध, मध, मोह, मत्सर, तृष्णा या षडविकारांचे निराकरण करणारा, पंचशिलाचे पालन करणारा अष्टांगिक मार्ग असलेल्या भगवान बौद्धांच्या धम्माचा स्विकार केला.

आणि हिंदू म्हणून जन्मलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही. अशी दि.१३.१०. १९३५ रोजी येवला येथे केलेली भिष्म प्रतिज्ञा २३ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अंमलात आणली.

असे करतांना शेतकरी, शेतमजूर, कारागीर, कामगार या शुद्र, अतिशुद्र वर्णिय कष्टकरी बहुजन श्रमिकांच्या समृद्ध, संपन्न अशा मुळ श्रमण संस्कृती म्हणजे बौद्ध संस्कृतीचे पुनरुज्जीवन केले आहे.

प्रिय मित्रांनो !
आपण वैदिक, हिंदू धर्माधारित वैदिक तथा हिंदू संस्कृती आणि बौद्ध धम्म आधारित श्रमण तथा बौद्ध संस्कृतीचा तुलनात्मक सखोल अभ्यास करावा.

या भारत भूमीस सोने की चिडिया संबोधले गेले किंवा भारतात सोन्याचा धूर निघत होता ; तो कालखंड बौद्ध धम्माच्या राजवटीतील प्रियदर्शनी महान सम्राट अशोक सारख्या प्रजादक्ष बौद्ध धर्मिय राजांचा होता.
तेव्हा भारत भूमीत तक्षशिला, नालंदा, विक्रमशिला सारखे २३ विश्व विद्यापिठे होते. तेव्हा खोदलेल्या लेण्या, स्तूप, विहारे आजही त्या वैभवशाली समृद्ध अशा श्रमण तथा बौद्ध संस्कृतीची साक्ष देत उभी आहेत. तेव्हाचे अभियांत्रिकी तंत्रज्ञान, आर्किटेक किती उच्चप्रतीचे व प्रगत होते. हे दिसून येते.

त्यामध्ये भगवान बुद्धांचे ८४,००० उपदेश कोरुन लिपीबद्ध करण्यात आले होते.

अशी वैभवशाली, समृद्ध परंपरा असलेला बौद्ध धम्म व बौद्ध संस्कृती, वैदिक मनुवादी ब्राम्हण सेनापती पुष्यमित्र शुंग याने कपटाने सम्राट अशोकाचा नातू सम्राट बृहद्रथाची हत्या करुन, बौद्ध धम्म नष्ट करुन प्रतिक्रांती केली होती.

असे करतांना तत्कालीन मुळनिवासी कष्टकरी बहुजन पराभूतांचा समावेश शुद्र वर्णात करुन त्यांना शिक्षण व संपत्तीच्या अधिकारापासून वंचित केले होते.

याच पुर्वाश्रमीच्या बौद्ध धम्मीय शुद्र वर्णातील कष्टकरी बहुजन संतांनी वैदिक, ब्राम्हणी, सनातन, हिंदू धर्मातील सामाजिक विषमता, पाखंड, अंधश्रद्धांवर वेळोवेळी कठोर प्रहार केले होते.

संत तुकाराम म्हणतात, नाही मन निर्मळ, काय करील साबण.

गुरु रविदास म्हणतात, मन चंगा तो, कठोती मे गंगा.

कुंभ, अर्धकुंभ, महाकुंभ मेळाव्यात प्रयागराज येथे त्रिवेणी संगमावर किंवा त्र्यंबकेश्वर नाशिक, उज्जैन हरिद्वार येथे सिंहस्थ पर्वणीच्या दिवशी नदीत अमृत स्नान केल्याने सर्व पाप धुतले जावून मोक्ष मिळतो किंवा स्वर्ग प्राप्ती होते. हि एक अंधश्रद्धा किंवा थोतांड आहे.

जैसे कर्म करेगा वैसे फल देगा भगवान. या भगवत गीताच्या तत्त्वज्ञाना विरोधात देखील आहे.

वैदिक वाडःमयातील तत्वज्ञान परस्पर विरोधी आहे. त्यावरुन कष्टकरी बहुजन शुद्र अतिशुद्र वर्णियांचा बुद्धीभेद करण्यात येवून, त्यांचे शोषण करणारी विषमतावादी समाजव्यवस्था म्हणजे वैदिक संस्कृती तथा हिंदू संस्कृती होय.

वैदिक मनुवादी ब्राम्हणांच्या या विषमतावादी शोषणाधारित वैदिक, हिंदू धर्म आणि सांस्कृतिक हिंदूराष्ट्रवादापासून अखंड सावध राहणे आवश्यक आहे.

वर्णजातीश्रेष्ठत्ववादी ब्राम्हणांची शिखर संघटना आरएसएस रुपी भाजपाचे हिंदूत्व हे शेंडी, जानवे धारकांचे व शेटजी, भटजींच्या कोटकल्याणासाठी आहे. याची नोंद कष्टकरी बहुजन शुद्र वर्णिय एससी, एसटी,ओबीसी या मागासवर्गियांनी घेणे आवश्यक आहे.

या देवाधर्माधारित विषमतावादी शोषण व्यवस्थेपासून मुक्त होण्यासाठी देवाधर्माधारित कर्मकांड, अंधश्रद्धा, रुढी परंपरांना नाकारुन, आपल्यातील वर्ण जातीश्रेष्ठत्वाच्या अहगंडाला तिलांजली देवून, आपल्या समृद्ध संपन्न अशा मुळ बौद्ध धम्म आणि श्रमण म्हणजे बौद्ध संस्कृती कडे वाटचाल करु या.

संत तुकाराम महाराज आपल्या भोळ्या भाबड्या जनतेला सावधगिरीचा संदेश देतांना बजावतात कि,
जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा.

नंगचोट, पाखंडी, भंगोडी, गंजेडी, नशेडी, शस्त्रधारी, भगवे वस्त्रधारी साधू संतांपासून आणि त्यांचे स्तोम माजविणा-या हिंदूत्ववादी राजकारण्यांपासून अखंड सावध राहावे.

मनःपूर्वक धन्यवाद.
आप्पा वानखेडकर.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!