महाराष्ट्राच्या राजकारणातील वंचितांचा प्रवास आणि आव्हाने

विलास तेलंग, वणी
2024 च्या लोकसभा निवडणुकीत सारेच पक्ष भाजपाला हरवण्यासाठी आपली सारी शक्ती पणाला लावत आहे.भाजपा तसाही आतून हरलेला आहे आणि मोदीच भाजपाला हरवत आहे आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तेवढेच एकाकी लढत आहे.त्यामुळे 144 कोटी लोकसंख्येत मोदी एकटाच सर्व शक्तिमान आहे हे जे भाजपाला वाटत आहे आणि मोदी या एकट्या व्यक्तीच्या भरोषावर सत्ता मिळवण्याचे स्वप्न भाजपा पाहत आहे तो फुगा लवकरच फुटेल यात काही शंका नाही.परंतु यात भाजपचा पूर ओसरत आहे.विरोधी पक्षांची प्रतिमा मलीन करण्याच्या या खेळात भाजपाचीच प्रतिमा मलीन होत आहे आणि भाजपचे वस्त्रहरण भाजप नेते त्यांच्या शिवराळ भाषेने करीत आहे.म्हणून 2024 च्या या निवडणुकीत रिपब्लिकन पक्ष आणि त्याचे राजकारण हेही कोणत्या बिंदूवर आहे
हे लक्षात घेणं जरुरीचे होवून बसले आहे.भारतीय महाराष्ट्रात रिपब्लिकन पक्षाची कायम काँग्रेस सोबत युती असायची आणि या युतीत गवई यांना अमरावती लोकसभा तर आठवले यांना शिर्डी किंवा दक्षिण मुंबई अशी प्रत्येकी एक सीट देवून संपूर्ण महाराष्ट्रातील रिपब्लिकन मतदार काँग्रेसला मतदान करायचा ही रिपब्लिकन राजकारणाची मोठी उपलब्धी आहे.यात रिपब्लिकन उमेदवार युतीत असतांनाही एक ते दोन अपवाद सोडता कधीच निवडून गेला नाही. परंतु रिपब्लिकन मतदारांना काँग्रेसला मतदान करायची इतकी सवय जडली की आता युती असो वा नसो काँग्रेसला मतदान हे ठरलेलं असते.महत्त्वाचे म्हणजे युतीतील रिपब्लिकन उमेदवार पाडण्याचेच प्रकार काँग्रेसने केले आणि मग मोठ्या मुश्किलीने विधानपरीषदेवर 1 किंवा समाजकल्याण मंत्री असे एक खाते देवून रिपब्लिकन राजकारणाची बोळवण केल्या जात असे.पुढे पुढे तर काँग्रेसने इतके हाल केले की लोकसभा निवडणुकीत गवईला काँग्रेसने राष्ट्रवादीकडे 1 जागा मागायला पाठवले तर राष्ट्रवादीने आठवले यांना काँग्रेसकडे पाठविले.यात रिपब्लिकन राजकारणाचा जो छळ मांडला गेला त्याला सीमा राहिली नाही आणि रिपब्लिकन राजकारण कायम लाचारीच राहिलं आणि ते कायम संपवलं गेलं.या सर्व रिपब्लिकन राजकारणाच्या सौदेबाजित बुद्ध आंबेडकरी समाज पूर्णतः भरडला गेला. रिपब्लिकन उमेदवाराला मतदान करण्याची महाराष्ट्रातील लोकांची मनापासून इच्छा असायची पण एकही उमेदवार निवडणुकीच्या मैदानात नसायचा अशी अवस्था होती. लोकांमध्ये त्या वेळेला सर्वत्र एकच चर्चा असायची की रिपब्लिकन उमेदवार नाही तर मतदान करायचं कोणाला?रिपब्लिकन नेतृत्वावर लोकं चीड व्यक्त करत होते.आपला संताप व्यक्त करीत होते. असा खेळ सर्वत्र सुरु असताना पुढे रिपब्लिकन राजकारण आणि मतदार हे संपूर्ण काँग्रेसमय झाले आणि रिपब्लिकन राजकारणाचे अस्तित्व संपले.या नंतर अलीकडे तर इतकी अवकळा आली की रिपब्लिकन पुढारी आठवले,कवाडे हे भाजपच्या तंबूत दाखल झाले तर अस्तित्वहीन झालेला खोरिपा हा काँग्रेसचा बिन बुलाये मेहमान आहे.लाचारीचे सर्व रेकॉर्ड रिपब्लिकन पक्षाने आणि त्यांच्या पुढाऱ्यांनी तोडले आहे.या अशा विषम आणि प्रतिकूल परिस्थितीत ऍड.बाळासाहेब आंबेडकर हे downtrodden चे/depressed classes चे सन्मान आणि स्वाभिमानी राजकारण अथक परिश्रमाने उभे करीत आहेत हे 2014,2019 आणि आता 2024 ला आपण सर्वच बघत आहोत.ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांनी 2014 आणि 2019 ला महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी लोकसभेचे उमेदवार उभे केले आणि रिपब्लिकन मतदारांना मतदान करण्याची संधी मिळाली आणि महाराष्ट्राच्या राजकारणात पूर्वी भारिप बहुजन महासंघ आणि आता वंचित बहुजन आघाडीच्या रूपात एक सशक्त पर्याय म्हणून निर्माण केला आहे.लोकांनी कधी नव्हे इतके मतदान केले आणि 2019 ला 44 लाख मतदान मिळाले.लोकसभा निवडणूक 2024 ला महाराष्ट्रात सर्वत्र वंचित बहुजन आघाडीचीच चर्चा मोठ्या प्रमाणात चालली असताना त्याचा जबरदस्त फटका महाविकास आघाडीला बसणार याचे स्पष्ट संकेत दिसत होते.त्यासोबतच भाजप या लोकसभा निवडणुकीत राम मंदिराचा मुद्दा आधार बनवू पाहते.परंतु लोकं धर्माच्या राजकारणाला कंटाळले आहेत.त्यामुळे निवडणुकीतील राम मंदिराचा मुद्दा निष्प्रभ ठरला आहे.एवढेच नव्हे तर राम मंदिराची हवाच निघून गेली आहे. देशाच्या राजकारणात इलेकट्रोरोल बॉण्ड,दिल्लीत आणि इतरही ठिकाणी शेतकऱ्यांची चाललेली आंदोलन,2014 ते 2024 पर्यंत 12 कोटी लोकांचे गेलेले रोजगार, चीन ची देशातील घुसखोरी, जातीय हिंसाचारात जळत असलेले मणिपूर,स्मार्ट इंडियाची फसवी घोषणा, बेरोजगारी,महागाई, शिक्षण,आरोग्य आणि रेल्वेचे खाजगीकरण,मराठा आरक्षण, धनगर आरक्षण,ओबीसी आरक्षण,वेगळा विदर्भाची मागणी,कर्मचारी भरती बंद करून कॉन्ट्रॅक्ट भरतीवरील कर्मचारी भरती, कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन बंद,भांडवलदार वर्गाची कर्जमाफी, अग्निविर योजना,NRC, द्वेषाचं राजकारण हे सर्व मुद्दे या 2024 च्या लोकसभा निवडणुकीतील महत्त्वाचे मुद्दे ठरले असल्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढली आहे आणि भाजपची क्रेझ जनमानसातून हळूहळू कमी होत आहे.या सोबतच भाजपा नेत्यांनी संविधान बदलण्यासाठी 400 पार ची केलेली घोषणा त्यांच्या चांगलीच अंगलट आली आहे.पक्ष फोडून सत्ता बळकवनारा पक्ष अशीच प्रतिमा भाजपची बनलेली आहे.एवढेच नव्हे तर संविधान विरोधी घेतलेल्या भूमिकेमुळे आणि सातत्याने मीडिया मधून 1500 जुने कायदे बदलणार अशी मोठ मोठ्याने गाजावाजा करत केलेली घोषणा यामुळे जनमानस भाजपा विरोधी गेले आहे.भरीस भर म्हणून इतर पक्षातून आयात केलेल्या जवळपास 116 नेत्यांना वाटलेल्या लोकसभा तिकीट हा चर्चेचा विषय बनला असून भाजपा कडे उमेदवारच नाही या चर्चेने जोर पकडला आहे आणि म्हणून फार तर 170 ते 200 जागा भाजपाला मिळतील असे चित्र दिसतेय.एकंदरीत भाजपा हा जसा Back foot वर गेला आहे त्याच प्रमाणे प्रधानमंत्री मोदी यांचीही क्रेझ धूसर झाली आहे. महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीतून दूर लोटत आणि ठरवून भाजपची B टीम म्हणून चालवलेला प्रचार हा त्यांच्याही चांगलाच अंगलट आला आहे.त्यामुळे महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीचा सर्वत्र बोलबाला होता आणि तो अजूनही आहे.म्हणून वंचित बहुजन आघाडीला मायनस करण्यासाठी नवनवे षडयंत्र जन्मास घातले गेले ते नजरेआड करता येणार नाही.ते षडयंत्र म्हणजे वंचित बहुजन आघाडी विरोधी चालवलेला अपप्रचार होय. 1.सर्वात प्रथम मीडियाने वंचित बहुजन आघाडीचा भाजपची B team म्हणत नेहमी प्रमाणे केलेला प्रचार.2.महाविकास आघाडीने B टीम म्हणत चालवलेला अपप्रचार.3.फुले शाहू आंबेडकरवादी कवी,साहित्यिक आणि विचारवंत यांनी वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत न गेल्यास सर्व समाजाला घेवून महाविकास आघाडी सोबत जाण्याचा घेतलेला निर्णय.4.” निर्भय बनो ” या अभियानातून ऍड.असीम सरोदे, पत्रकार निखील वागळे, विश्वंभर चौधरी यांनी वंचित बहुजन आघाडी विरोधी B टीम म्हणत चालवलेला अपप्रचार.5.शेवटचा हल्ला म्हणून तुषार गांधी यांचा झालेला वापर आणि सोबतच श्याम मानव, डॉ.भालचंद्र मुणगेकर,डॉ.रावसाहेब कसबे,सुनील खोब्रागडे,उत्तम कांबळे यांनी वंचित बहुजन आघाडीला मते देणं म्हणजे भाजपाला फायदा आणि भाजपाला जिंकवंण आहे असे केलेले आरोप. परंतु वंचित बहुजन आघाडी आणि ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात चालवलेल्या बदनामीच्या मोहिमेत सर्वात आधी अलगद अडकले ते सो कॉल्ड फुले शाहू आंबेडकरवादी म्हणवून घेणारे आणि त्यानंतर हळूहळू इतरही जे स्वतःला पुरोगामी, परिवर्तनवादी म्हणवून घेणारे. यात सर्वात मजेची गोष्ट अशी की निवडणुकीची घोषणा होण्याच्या 4 ते 6 महिने आधी निरंजन टकले यांनी राबवलेली मोहिम ज्यात भाजपाला हरवण्यासाठी महाविकास आघाडी नाही झाली तरी चालते परंतु मतदारांची आघाडी करू असे म्हणत अगदी मतदारांना भुरळ टाकत रचलेला डाव. खरं तर हे सर्व मतदार टकले कुठे घेवून जाणार होते हे आता उघडच झाले आहे.परंतु यात ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांनी भाजपच्या विरोधात सर्वात प्रखर आणि सुस्पस्ट अशी भूमिका घेत भाजपचे जे वाभाडे काढले ते 2014 पासूनच आणि त्याच वेळेला ही निवडणूक म्हणजे संविधान आणि लोकशाही मानणारे आणि मनुस्मृती मानणारे यांच्यातील लढाई असल्याचे सांगितले आणि तिच भूमिका 2019 ला ही ऍड.बाळासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या वंचित बहुजन आघाडीची कायम होती.एवढेच नव्हे तर 2024 लाही संविधान आणि लोकशाही वाचविण्यासाठी सर्वांनी एकत्रित येवून भाजपा विरोधी आघाडी बनविली पाहिजे अशी स्पष्ट आणि पारदर्शी भूमिका ऍड.बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी यांनी घेतली आहे तशी भूमिका महाविकास आघाडीला घेता आली नाही हेच महाविकास आघाडीचे अपयश आहे.परंतु महाविकास आघाडीला वंचित बहुजन आघाडीचा प्रवेश महाविकास आघाडीत मान्य नव्हता.म्हणून शेवटपर्यंत झुलवत ठेवायचे आणि मग घराबाहेर काढायचे आणि वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत यायचेच नव्हते अशी बोंब ठोकायची हे महाविकास आघाडी/काँग्रेस यांची बदनामीच्या राजकारणाचे एक सूत्र आहे.सरंजामी,भांडवलवादी,जात वर्ण वर्चस्ववादी राजकारण हे काँग्रेस/राष्ट्रवादी आणि एकूणच महाविकास आघाडीच्या राजकारणाचे सूत्र राहिलेले आहे.त्यामुळे रिपब्लिकन राजकारण आणि रिपब्लिकन पुढारी त्यांनी राजकारणातून बाद केले आणि सत्ता ही काँग्रेस/राष्ट्रवादीने मूठभर लोकांच्या भल्यासाठी /169 जात धन दांडग्यांच्या कल्याणासाठी राबविली आणि सत्तेला रखेल म्हणून घरातच ठेवलं.ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांना राजकारणातून कायम संपवण्याचे काँग्रेस/राष्ट्रवादी यांचे मनसुभे चाणाक्ष आणि बुद्धिमान असलेल्या ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांनी लवकरच जाणले आणि ओळखले.म्हणूनच ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांनी आपल्या आजोबांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे माणसाच्या सन्मान आणि स्वाभिमानाचे जे राजकारण आहे ते पुढे रेटले आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातुन सर्वहारा शोषित समुहाचे सन्मान आणि स्वाभिमानाचे राजकारण आकारास आले.त्यामुळे महाराष्ट्रातील दलित,आदिवासी,भटका विमुक्त समाज,ओबीसी,धार्मिक अल्पसंख्यांक – मुस्लिम , ख्रिश्चन,बौद्ध, जैन आणि शेतकरी,शेतमजुर,मजुर,कष्टकरी, कामगार,सुशिक्षित बेरोजगार तरुण तरुणी आणि कर्मचारी हे सारेच ऍड.बाळासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या वंचित बहुजन आघाडीकडे वेगाने वळत आहेत. महाविकास आघाडीतील सारेच घटक पक्ष हे अस्तित्वाची लढत आहेत तसेच महायुतीतील घटक पक्ष शिंदेसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार हेही अस्तित्वाचीच लढाई लढत आहेत.त्यामुळे महाराष्ट्रात भाजपा आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यातच खरी लढत आहे तर या लढतीत महाविकास आघाडी कुठेच नव्हती.म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या बदनामीचे एकामागुन एक असे नवनवे षडयंत्र होत आहेत आणि ते सारे षडयंत्र फोल ठरत आहेत.2024 च्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आपल्या प्रचार प्रसार तंत्राने भाजपचे प्लॅन उद्ध्वस्त करीत आहे.भाजपाला रक्तबंबाळ केले आहे त्यामुळे भाजपच्या गोटात प्रचंड अस्वस्थता पसरली आहे तर महाविकास आघाडी स्पर्धेत येण्यासाठी धडपडत आहे. अशा परिस्थितीत फुले शाहू आंबेडकरवादी आणि पुरोगामी , परिवर्तनवादी म्हणवून घेणाऱ्यांनी संविधान आणि लोकशाही यांच्या रक्षणासाठी आणि संवर्धनासाठी ऍड.बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या सोबत ठामपणे खंबीरपणे उभे राहिले तर महाराष्ट्राच्या राजकारणाचे चित्र बदलू शकते. विशेषतः आंबेडकरवादी कवी,साहित्यिक,विचारवंत म्हणवून घेणाऱ्यांनी या लढाईत ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत जाणे गरजेचे आहे नाहीतर वंचितांच्या सन्मान आणि स्वाभिमानी चळवळीची हत्या करीत आहोत अशीच नोंद इतिहास घेईल हे या निमित्ताने लक्षात घेणं आवश्यक आहे.
—- विलास तेलंग, वणी.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत