नामांतराचे ऐतिहासिक आंदोलन

उज्वल कुमार भारतीय
भारतीय संविधानाचे निर्माते विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९५० मध्ये औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालयाची स्थापना करून शैक्षणिकदृष्टया मागासलेल्या मराठवाड्यात उच्चशिक्षणाची सर्वप्रथम सुरुवात केली.मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी,हा त्या मागील बाबासाहेबांचा उदात्त हेतू होता.आणि हा हेतू साध्य होऊन मराठवाड्यात बाबासाहेबांनी ज्ञानगंगा आणून,लाखो विद्यार्थ्यांना शिक्षित करून त्यांच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणले. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे शैक्षणिक क्षेत्रातील अतुल्य योगदान लक्षात घेवून त्यांच्या कार्यप्रति कृतज्ञता म्हणून महाराष्ट्र विधानसभेत २७ जुलै १९७८ रोजी मराठवाडा विद्यापीठाचे ‘ डॉ.बाबासाहे आंबेडकर विद्यापीठ ‘ असे नामांतर करण्याचा ठराव पारित करण्यात आला.सामाजिक समतेची,परिवर्तनाची ही एक नवीन सुरुवात होती.परंतु सवर्णांनी या नामांतराला प्रखर विरोध केला.यातून संपूर्ण मराठवाड्यात नामांतराचे समर्थक असलेले दलित आणि नामांतर विरोधक असलेले सवर्ण असा संघर्ष निर्माण झाला.नामांतराच्या समर्थनार्थ आंबेडकरवादी जनता आपली अस्मिता जपण्यासाठी रस्त्यावर उतरली.दलित पँथरचा या आंदोलनातील आक्रमक सहभाग ऐतिहासिक ठरला.नामांतराच्या आंदोलनातून अनेक आंबेडकरी नेत्यांचा उदय झाला.दलितां सोबत पुरोगामी विचाराच्या सर्वजातीय कार्यकर्त्या,नेत्यांच्या सहभागातून या आंदोलनास व्यापकता आली.महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन तर प्रखर आंदोलने झालीच या शिवाय आग्रा,दिल्ली,बंगलोर,हैद्राबाद येथे ही नामांतरासाठी आंदोलने झाली,मोर्चे निघाले.पोचिराम कांबळे,गौतम वाघमारे,जनार्धन मवाडे,गोविंद भुरेवार,दिलीप रामटेके,चंदर कांबळे,नारायण गायकवाड,शरद पाटोळे,रोशन बोरकर,प्रतिभा तायडे,सुहासीनी बनसोडे यांच्यासारख्या लढवय्या असंख्य आंबेडकरवाद्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले.दलीत पँथर या लढावू संघटनेने नामांतराचे आंदोलन आणखी आक्रमक बनविले.औरंगाबाद परिसरात गंगाधर गाडे यांनी नामांतराचे आंदोलन सतत धगधगते ठेवले.रिपब्लिकन सरसेनानी जोगेंद्र कवाडे सर यांनी नागपूर येथून काढलेला लॉंगमार्च मधील जनतेचा आक्रमक उत्स्फूर्त प्रतिसाद या आंदोलनातील मैलाचा दगड ठरला.सर्व आंबेडकरी जनता, नेते,कार्यकर्ते यांच्या सातत्यपूर्ण आंदोलनातून १४ जानेवारी १९९४ रोजी मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर झाले आणि ‘ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ ‘ असे नाव दिमाखात विद्यापीठाच्या कमानीवरती झळकले.आंबेडकरवाद्यानी सातत्यपूर्ण एकजुटीय संघर्षातून हा विजय साकारला होता.नामांतर लढ्याची निष्पत्ती म्हणून या लढ्यात शहीद झालेल्या पोचीराम कांबळे यांच्या मरणोत्तर आनंदाला व्यक्त करताना भीमशाहिर,गीतकार प्रभाकर पोखरीकर म्हणतात,
थडग्यातुन उठून पोचीराम नाचला !
आई,सांग त्या साऱ्यांना जयभीम पोहचला !!
नामांतराचे आंदोलन म्हणजे आंबेडकरवाद्यांच्या अस्मिता,शौर्य,लढावूवृत्ती आणि बाणेदारपणाचा इतिहास आहे.या यशस्वी आंदोलनाच्या फलश्रुतीबद्दल एका आंबेडकरी भीमशाहिराने आपल्या गीतात म्हंटले आहे ,
' सोन्या-मोत्याची ती अक्षर-बाबासाहेब आंबेडकर,
हृदयाचा घेती ठाव !
काय खुलुनी दिसतंय राव,या कमानीवरती नावं!!
अशा या विजयी आंदोलनाचा जाज्वल्य इतिहास असणाऱ्या ३१ व्या नामांतर दिना निमित्य नामांतर शहिदांना भावपूर्ण आदरांजली !
@उज्वलकुमार भारतीय.
छ्त्रपती संभाजीनगर.
नामांतरदिनचिरायू_होवो
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत