दिन विशेषदेशमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

कोरेगावच्या लढाईतील विजयानंतरचे मान-सन्मान

समाज माध्यमातून साभार

कोरेगावच्या लढाईत पराक्रम गाजविलेल्या बटालियनला ‘ग्रेनेडियर’ चा दर्जा गव्हर्नर जनरलच्या वतीने देण्यात आला. ७ फेब्रुवारी १८१८ रोजी या प्रसंगासंबंधी आदेश काढण्यात आला. पहिल्या रेजिमेंटच्या पहिल्या बटालियनला जो दर्जा देण्यात आलेला आहे तोच दर्जा पहिल्या रेजिमेंटच्या दुसऱ्या बटालियनला देण्यात येत असून त्यास गव्हर्नर जनरल कौन्सिल मान्यता देत आहे. यापुढे या दोन्ही बटालियनला ‘ फर्स्ट ग्रेनेडियर रेजिमेंट ‘ असे संबोधण्यात येईल. तसेच कोरेगाव युद्धाच्या शौर्याचे प्रत्येक म्हणून तेथील विजयस्तंभाचे मानचिन्ह ग्रेनेडियरच्या दुसऱ्या बटालियनच्या ध्वजावर अंकित करण्यात यावे, असेही स्पष्ट करण्यात आले. याशिवाय अधिकार व इतर व्यक्तींच्या नेमणुकीस मान्यता देण्यात येत आहे, असे आदेश काढले.

सेनापतीने या दुसऱ्या बटालियनच्या साहसपूर्ण कामगिरीबद्दल पुढील उद्गार काढलेले आहेत. ” पहिल्या रेजिमेंटच्या दुसऱ्या बटालियनने पूर्वीची सेवा आणि मिळवलेली प्रसिद्धी हाच या सैन्याचा, कोणत्याही परिस्थितीत विजय संपादन करण्याचे कौशल्य कसे असावे याचा पुरावा, कोरेगावच्या विजयाने सिद्ध केला आहे.”

बैथरामघाट छावणीच्या मुख्यालयाचे मार्किस हेस्टिंग्ज यांनी दिनांक १३ मार्च १८१८ रोजी असे लिहिले आहे की, कोरेगाव येथे झालेल्या कार्यवाहीचा अधिकृत तपशील मिळताच, तो बेंगाॅल आर्मीच्या आदेशामध्ये नमूद करावा. शिस्तबद्ध व एकजीवाने, अतिशय बलाढ्य असलेल्या सैन्याचा पराभव कसा करता येतो याचा एक आदर्श (पुरावा) इतरापुढे राहील.

‘बोर्ड ऑफ कंट्रोल’चे अध्यक्ष जॉर्ज कनिंग, दुसऱ्या ग्रिनेडियरने केलेल्या कामगिरीचे कौतुक करताना म्हणाले की, एका छोट्याशा वाटणाऱ्या या लढाईने बलाढ्य सैन्याला कसे नमविले हे उदाहरण इतरासाठी विशेष विचार करण्यासारखे आहे. कारण छोटा वाटणारा विजय नैपुण्याचा दृष्टीने बलाढ्य असाच आहे.

” लष्कराच्या इतिहासात कोरेगावच्या लढाईचा विजय म्हणजे शौर्य आणि पराक्रमाची गाथा असा आहे ” असे उद्गार जनरल स्मिथ यांनी या लढाई बाबत काढले आहेत. कॅप्टन स्टाॅटनचा या लढाईतील पराक्रमाबद्दल गौरव करण्यात येऊन १ जानेवारी १८२० रोजी ईस्ट इंडिया कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सनी मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर एल्फिन्स्टन यांच्या हस्ते समारंभपूर्वक शानदार तलवार भेट म्हणून दिली. ही शानदार तलवार ऑफिसर्स मेसमध्ये कॅप्टन स्टाॅटनच्या मान चिन्हासह ठेवलेली आहे. तसेच त्यांना मेजर या पदावर पदोन्नती देण्यात आली. या लढाईतील शिपाई सुखराम यास शौर्याबद्दल जमादार या पदावर बढती देण्यात आली. व इतर सर्व सैनिकांना ६ महिन्यांच्या वेतना इतकी ग्रॅच्युइटी तसेच त्यांना सेवानिवृत्तीचे फायदे मिळावेत म्हणून ज्यादा पाच वर्षे सेवा वाढवून देण्यात आली. या लढाईतील पुढे बराच काळ जिवंत असलेल्या सैनिकांना १८५१ मध्ये या लढाईतील त्यांच्या पराक्रमाबद्दल छातीवर गौरवचिन्ह लावण्यास पात्र ठरविण्यात आले.

सामाजिक जुलूम, अन्याय व अस्पृश्यता यांच्या विरोधात मूठभर महार सैनिकांनी पेशव्यांच्या सैन्याचा या लढाईत दारुण पराभव केला. पेशवाईच्या अत्याचारामुळे पेटून उठलेल्या महार सैनिकांच्या शौर्यबळावर इंग्रजांचा या ऐतिहासिक लढाईत विजय झाला. हा विजय म्हणजे अन्यायाच्या विरोधात मिळविलेला विजय आहे.

या लढाईत धारातीर्थी पडलेल्या व जखमी सैनिकांच्या स्मरणार्थ, त्यांच्या पराक्रमाची कीर्ती अजरामर राहावी म्हणून भीमा- कोरेगाव येथे नदीच्या काठी प्रशस्त मैदानावर, युद्धाची पहिली ठिणगी जेथे पडली त्या ठिकाणी, इंग्रजांनी भव्य असा स्तंभ उभारला आहे. २६ मार्च १८२१ रोजी या भव्य विजयस्तंभाचा पायाभरणी कार्यक्रम अत्यंत शानदार अशा सोहळ्याने झाला. बंदुकीच्या फैरी आणि तोफांची राजसलामी देण्यात आली. १८२२ मध्ये या विजयस्तंभाचे काम पूर्ण झाले. पूर्वी या विजय स्तंभाला ‘ महारस्तंभ ‘ असे नाव होते. हा विजयस्तंभ ६५ फूट उंच आहे. स्वतंत्र महार रेजिमेंटची उभारणी झाल्यानंतर १९४१ ते ४६ पर्यंत या विजय स्तंभाचे चिन्ह त्यांच्या कॅप बॅजवर गौरवाने घेण्यात आले होते. आणि महार रेजिमेंटचे सेंटर ( मुख्यालय) सागर (मध्य प्रदेश) येथे याच स्तंभाची प्रतिकृती ‘युद्धस्मारक’ म्हणून करण्यात आली आहे.

कोरेगावच्या लढाईतील वीर सैनिक हवालदार खंडोजी कुल्लोजी यांचेकडे या विजय स्तंभाची देखभाल करण्याचे कार्य विजयस्तंभाच्या पायाभरणी सोहळ्याच्या वेळी वंशपरंपरागत सोपविण्यात आले होते.

इतिहासात या ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाच्या लढाईतील मूठभर महार सैनिकांच्या पराक्रमाची यशोगाथा सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखी आहे. त्यामुळेच या विजयस्तंभावर महार सैनिकांच्या पराक्रमाबद्दल इंग्रजीत उद्बोधक वाक्य लिहिले आहे. One of the proudest triumph of the British Army in the East
( पूर्वेकडील देशात ब्रिटिश सैन्याला जे अनेक विजय मिळालेले आहेत, त्यामध्ये अतिशय गर्व बाळगण्यासारखा हा विजय आहे.)

या विजयस्तंभाच्या पूर्व आणि पश्चिम बाजूला इंग्रजी व मराठीत शौर्य गाजवून धारातीर्थी पडलेल्या वीर सैनिकांची नावे कोरण्यात आलेली आहेत. त्यात२२ महार, १६ मराठा, ८ रजपूत व इतर हिंदू, दोन मुस्लिम आणि एक ख्रिश्चन सैनिकाचा समावेश आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!