दिन विशेषदेश-विदेशमहाराष्ट्रमुख्यपान
महाराणी ताराराणी स्मृतिदिनानिमित्त लेख…

ताराबाई रामराणी । भद्रकाली कोपली ।
डॉ.श्रीमंत कोकाटे
महाराणी छत्रपती ताराराणी यांची निश्चित जन्म तारीख उपलब्ध नाही. त्यांचा जन्म 1674 सालचा असावा, असे अभ्यासकांचे मत आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सालात त्यांचा जन्म झालेला असावा. छत्रपती शिवाजी महाराजांचे अत्यंत शूर, कर्तृत्ववान, निष्ठावान असे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या त्या कन्या होत. तर शिवाजीपुत्र छत्रपती राजाराम महाराज यांच्या त्या महाराणी होत.
छत्रपती ताराराणी यांचे बालपण लढाया, राजकीय घडामोडी, स्वराज्य निर्मिती, संघर्ष यामध्ये गेले, त्यामुळे स्वाभाविकच वडिलांकडून त्यांना लष्करी शिक्षण मिळाले. त्या बालपणापासूनच युद्धकला राजनीतीमध्ये निपुण होत्या. छत्रपती शिवाजीराजांच्या राज्याभिषेकानंतरचा कालखंड त्यांच्या बालमनावर कोरला होता. छत्रपती संभाजीराजे, पती छत्रपती राजाराम महाराज आणि वडील हंबीरराव मोहिते यांच्या शौर्याचे, पराक्रमाचे, त्यागाचे, निर्भीडपणाचे बाळकडू त्यांना मिळाले होते. त्यांनी रायगडापासून जिंजीपर्यंत असा खडतर प्रवास जीव धोक्यात घालून केला.
पती छत्रपती राजाराम महाराजांच्या अकाली मृत्यूनंतर स्वराज्याची जबाबदारी त्यांच्यावरती आली.याप्रसंगी त्यांचे वय फक्त २५ वर्षे होते. छत्रपती शाहू महाराज मोगलांच्या छावणीत होते. त्यामुळे त्यांनी पुत्र बाल शिवाजीला (दुसरे) गादीवरती बसवून स्वतः राज्यकारभार हाती घेतला. घोड्यावर बसून त्यांनी रणांगण गाजवले, तलवार चालविली. मोगल बादशहा औरंगजेबाने ताराराणीच्या शौर्याचा, पराक्रमाचा चांगलाच धसका घेतला होता. ताराराणी यांच्या आक्रमक धोरणामुळे मुगल सम्राट औरंगजेब बादशहाची काय अवस्था झाली, याचे वर्णन समकालीन कवी पुढीलप्रमाणे करतो.
दिल्ली झाली दीनवाणी। दिल्लीशाचे गेले पाणी।
ताराबाई रामराणी। भद्रकाली कोपली।।
रामराणी भद्रकाली। रणरंगी क्रुद्ध झाली।
प्रलयाची वेळ आली। मुगल हो सांभाळ।
ताराराणीच्या पराक्रमाने औरंगजेब बादशाहा देखील खचला. त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली. त्यांचे शौर्य पाहून मोगलांसाठी प्रलय आला म्हणजे मोगलांच्या अधोगतीला सुरुवात झाली.असे तो कवी म्हणतो. छत्रपती शिवाजी महाराज राजाराम महाराजांच्या जन्म प्रसंगी म्हणाले होते "हा माझा मुलगा पालथा जन्मला, तो दिल्लीची पातशाही पालथी घालेल" छत्रपती शिवाजी महाराजांचे हे उद्गार त्यांच्या सुनबाई आणि राजाराम महाराजांच्या महाराणी ताराबाई यांनी खरे करून दाखविले. त्यांनी मोगलशाही खिळखिळी केली.
औरंगजेब हा सतराव्या शतकातील जगातील सगळ्यात मोठा साम्राज्यवादी होता. तसाच तो क्रूर, कपटी, पातळयंत्री, धर्मांध आणि धूर्त होता. त्याने वडिलांचा, भावांचा, मुलांचा छळ केला. त्याने अनेक साधुसंतांचा मारले. त्याचे अर्ध्या आशिया खंडावरती राज्य होते. त्याचा वार्षिक महसूल सुमारे 50 कोटी होता. त्यावेळेस छत्रपती ताराराणींचा वार्षिक महसूल फक्त 1 कोटी होता, अशा औरंगजेबाविरुद्ध ताराराणी सुमारे सात वर्ष निकराने लढल्या आणि त्याला महाराष्ट्राच्या मातीत गाडले.
छत्रपती ताराराणी यांचा प्रचंड दरारा होता. त्यामुळे पेशव्यांना कोल्हापूर गादीकडे हस्तक्षेप करता आला नाही. शाहू महाराजांच्या सुटकेनंतर ताराराणी आणि शाहू महाराज यांच्यामध्ये संघर्ष सुरू झाला. तरीदेखील शाहू महाराजांनी आपल्या या चुलतीला मातेप्रमाणे मानून त्यांचा आदर, सन्मान आणि सांभाळ केला. पुत्र शिवाजी (दुसरा) यांच्या अकाली निधनानंतर कोल्हापूर गादीची सर्व सूत्रे राजसबाईपुत्र संभाजी (दुसरा) यांच्या हाती गेली. 13 एप्रिल 1731 रोजी वारणेचा तह झाला आणि त्या तहानंतर ताराराणी सातारला शाहू महाराजांच्याकडे आल्या. शाहू महाराजांनी त्यांना मातेप्रमाणे सांभाळले.
ताराराणी अत्यंत महत्वकांक्षी होत्या. त्यांच्याकडे दांडगी राजकीय इच्छाशक्ती होती. स्त्री असल्याचा कोणताही न्यूनगंड त्यांनी आयुष्यात कधीही बाळगला नाही. त्यांचा प्रशासनावरती वचक होता. त्या स्वतः उत्तम राज्यकर्त्या होत्या. त्या अत्यंत धोरणी, मुत्सद्दी आणि शौर्यशाली होत्या. त्यांनी शाहू महाराजांना राज्यकारभारामध्ये मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य केले. शाहू महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांनी आपला नातू रामराजे यांना सातारच्या गाडीवरती बसविले.
महाराणी ताराराणी आणि पेशव्यांमध्ये मोठा संघर्ष होता. पेशव्यांचा कपटीपणा त्यांनी ओळखला होता. त्यामुळे त्यांनी नेहमी पेशव्यांविरुद्ध भूमिका घेतली. ताराराणी आणि नानासाहेब पेशवे यांच्यामध्ये मोठा संघर्ष होता. पेशव्यांचे धोरण त्यांना पसंत नव्हते.
महाराणी ताराराणी यांच्या जीवनामध्ये अनेक संकटे आली. वयाच्या पंचविसाव्या वर्षी त्यांना वैधव्य आले. त्या सती गेल्या नाहीत. वैधव्याने खचून न जाता त्यांनी निर्भीडपणे राज्यकारभार केला. मोगलांबरोबरच अंतर्गत शत्रूचा त्यांनी बंदोबस्त केला. ताराराणी संकटसमयी लढणाऱ्या होत्या, रडणाऱ्या नव्हत्या. जिजाऊमासाहेब, छत्रपती शिवाजीराजे, सरसेनापती हंबीरराव मोहिते, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज यांचा शौर्यशाली वारसा त्यांनी पुढे चालविला.
छत्रपती ताराराणी यांचे जीवनचरित्र सतत सर्वांना प्रेरणा देणारे आहे. स्त्रीसुद्धा हिंमतवान असते, कर्तृत्ववान असते, बुद्धिमान असते, शौर्यशाली असते, हे ताराराणी यांनी जगाला दाखवून दिले. वंशाला दिवा फक्त मुलगाच असतो असे नव्हे, तर मुलगीसुद्धा वंशाला दिवा असते, हे ताराराणी यांनी दाखवून दिले. शिवकाळात पुरुषाप्रमाणे स्त्रियादेखील घोड्यावर बसून रणांगण गाजवणार्या, तलवार चालविणाऱ्या होत्या, हे ताराराणी यांनी दाखवून दिले. छत्रपतींच्या घराण्यांमध्ये धर्मसंस्कृतीच्या नावाखाली स्त्रियांना राजवाड्यामध्ये बंदिस्त केले जात नव्हते, तर त्यांना राज्यकारभार आणि लढायांचे स्वातंत्र्य दिले जात होते, हे स्पष्ट होते.
14 जानेवारी 1761 च्या पानिपतावरील लढाईत पेशव्यांच्या पराभवाची बातमी ऐकून ताराराणी म्हणाल्या "बर झालं पेशवाई बुडाली". पेशव्यांची ध्येयधोरणे महाराणी ताराराणी यांना मान्य नव्हती. त्यांनी उघडपणे पेशव्यांच्याविरुद्ध भूमिका घेतली. स्वराज्याच्या विरोधात जाणाऱ्या लोकांचा त्यांनी कधी मुलाहिजा बाळगला नाही. त्या निर्भिड होत्या, तशाच सडेतोड देखील होत्या.
महाराणी ताराराणी यांना 87 वर्षाचे प्रदीर्घ आयुष्य लाभले. 9 डिसेंबर 1761 रोजी त्यांचा मृत्यू झाला. शिवाजी महाराज ते रामराजे हा मराठ्यांचा इतिहास पाहिलेल्या त्या अत्यंत अनुभवी राजनीतिज्ञ होत्या. त्या आपल्यासाठी शौर्याचा, पराक्रमाचा, स्वाभिमानाचा, निर्भिडपणाचा वारसा देऊन गेल्या. स्वराज्याचे संवर्धन आणि संरक्षण करणाऱ्या छत्रपती महाराणी ताराराणी यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन !
-डॉ.श्रीमंत कोकाटे
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत