डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि फॅसिझमचे अरिष्ट

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन विशेषांकात प्रकाशित लेख
————+++————-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मला त्यांच्या कार्याविषयी लिहिण्यासाठी ‘सामाजिक क्रांतीचे प्रेरणास्रोत परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ हा विषय देण्यात आला आहे. या विषयाला मी किती न्याय देऊ शकेल, याची मला स्वत:ला खात्री नाही. या विषयात काही शब्द आहेत. त्याप्रमाणे मी काही डॉ. बाबासाहेबांचा भक्त नाही. मी त्यांचा अंधभक्त नाही, हे मी कबूल करतो. मी त्यांनी घालून दिलेल्या वैचारिक चौकटीचा विचार करीत समाजात घडणार्या घटनांकडे पाहात असतो. अनेकांना ते पटो अथवा न पटो, मी माझ्या सार्वजनिक जीवनाही ती चौकट ठरविलेली आहे. डॉ. बाबासाहेब आपल्यातून जाऊन तब्बल ६८ वर्षे झाली आहेत. या ६८ वर्षांत जग बरेच बदललेले आहे. जगात कुलीन वर्गाने दलित, शोषित, आदिवासी, अल्पसंख्यांक, अमेरिकन-आफ्रिकन, बराकुमीन, बाएकजियाँग, कामगार, गरीब आदी समाजाच्या तळावरील विभिन्न ‘सबआल्टर्न’ बहुसंख्यांक लोकांवर, प्रतिक्रांती करून विजय मिळवलेला आहे. ही प्रतिक्रांती २०१४मध्ये भारतात झाली असून दलित-बहुजन लोकांना कुलीन वर्गाच्या हिंदुराष्ट्रात जगावे लागत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या ‘भारतीय राज्यघटने’तील आरक्षण आणि इतर सवलतींचा लाभ घेऊन एक वर्ग हिंदुराष्ट्रावाद्यांच्या कुलीन वर्गात समाविष्ट झाला आहे. ही बाब लक्षात घेऊन या लेखाची मांडणी करण्याचा प्रयत्न करतो.
कोणताही महापुरूष हे परिस्थितीचे अपत्य असते. ज्या काळात, ज्या परिस्थितीत तो वाढतो, त्या परिस्थितीचे तत्कालीन विचार प्रवाहाचा त्याच्यावर संस्कार होणे अटळ असते. त्याला साक्रेटीसपासून तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत कोणीही अपवाद नाही. केवळ बाबासाहेब वाचून आंबेडकरवाद मांडण्याचा प्रयत्न एकांगी आणि अभिनिवेशी स्वरूपाचा होण्याचा धोका आहे. म्हणून तो तत्कालीन सर्व विचारांच्या पार्श्वभूमीवर मांडला गेला पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पूर्वास्पृश्य म्हणजे आजचे बौद्ध आणि इतर अस्पृश्य जाती यांच्या प्रश्नाकडे राजकीय प्रश्न म्हणून पाहिले होते. या अस्पृश्य जाती इतर सवर्ण हिंदू समाजापासून पूर्णपणे वेगळ्या आहेत, असे त्यांनी १९५३मधील एका अपूर्ण निबंधात मांडलेले आहे. अस्पृश्य हे इतर हिंदू समाजापेक्षा अल्पसंख्यांक असून ज्या प्रमाणे देशात अल्पसंख्य समाजाला जीवन जगण्यासाठी काही विशेष अधिकार दिले जातात, त्याप्रमाणे १९१९मध्ये डॉ. बाबासाहेबांनी साऊथबरो कमिशनपुढे अस्पृश्य समाजासाठी राजकीय मागण्या केल्या होत्या. या राजकीय मागण्या आधी केल्या असल्या तरी त्यांना सामाजिक क्रांतीशिवाय राजकीय क्रांती यशस्वी होणे शक्य नसल्याचे पूर्ण माहिती होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वत:च म्हणतात, की ‘बुद्धाने केलेल्या धार्मिक व सामाजिक सुधारणेनंतर चंद्रगुप्ताने राजकीय क्रांती केली. महाराष्ट्रात संतांनी धार्मिक व सामाजिक सुधारणा केल्यानंतरच शिवाजीने राज्यक्रांती केली. गुरूगोविंदसिंगांच्या शिखाच्या राज्यक्रांतीअगोदर गुरूनानक यांनी धार्मिक- सामाजिक क्रांती केली होती.’ हे, ज्याप्रमाणे युराेपमध्ये प्रबोधनयुगातील रेनेन्सा, रिफॉर्मेशन आणि एन्लाईटमेंट घडून आले, तेच भारतातही करावे लागेल, असे सांगणारे आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड चवदार तळ्याचा सत्याग्रह १९२७मध्ये केला होता. या सत्याग्रहाकडे एक सामाजिक चळवळ म्हणून पाहिजे जाते. परंतु त्या सत्याग्रहास्थळी केलेल्या भाषणात, त्यांनी या सत्याग्रहाची तुलना फ्रेंच राज्यक्रांतीशी केली होती. त्यावेळी डॉ. बाबासाहेब म्हणाले होते, की ‘या फ्रेंच राष्ट्रीय सभेचे महत्त्व व तिच्या तत्वांची महती कळण्याकरिता त्या काळची फ्रेंच समाजाची परिस्थिती ध्यानात घेतली पाहिजे. आपला हा हिंदू समाज वर्णाश्रम धर्मावर रचण्यात आला आहे, हे आपणा सर्वांस विदित आहे. तशाच प्रकारची वर्णाश्रमव्यवस्था फ्रान्स देशामध्येही सन १७८९साली होती. हिंदू समाजाप्रमाणे फ्रेंच समाजातही ब्राह्मण वर्ण होता, व क्षत्रिय वर्णही होता. मात्र फ्रेंच समाजामध्ये वैश्य, शूद्र व अतिशूद्र असे तीन निरनिराळे वर्ण न करता तिघांचा मिळून एकच तृतीय वर्ण करण्यात आला होता. हा फरक अगदी गौण आहे….आजच्या आपल्या सभेत व फ्रान्समधील व्हाईसराय मुक्कामी ता. ५ मे सन १७८९ रोजी भरलेल्या फ्रेंच लोकांच्या क्रांतीकारक राष्ट्रीय सभेंत मोठे साम्य आहे’, असे सांगून त्यांनी फ्रान्समध्ये काढण्यात आलेल्या जाहीरनाम्यातील स्वातंत्र, समता आणि बंधुता या तीन अधिकाराबाबत सविस्तर माहिती दिली. यावरून आपणास कळते की, सामाजिक चळवळ हे शोषित – पीडितांचे राजकीय हत्यार असते. सामाजिक चळवळ ही मानवी हक्क मिळविण्यासाठी केली जाते. तो एक प्रकारे राजकीय हुंकार असतो.
फ्रेंच राज्यक्रांतीच्या जाहीरनाम्यात १७ कलमे होती. त्यातील एक कलम म्हणजे ‘सर्व माणसे जन्मत: समान दर्जाची आहेत; व ती मरेपर्यंत समान दर्जाचीच राहतील. लोकहिताकारणेच त्यांच्या दर्जात अंतर करता येईल. येरवी, त्यांचा समान दर्जा तसाच कायम राहिला पाहिजे.’ या कलमाचा आधार घेऊन डॉ. आंबेडकर म्हणतात, की ‘आजच्या या आपल्या सभेने (महाडची सभा) या फ्रेंच राष्ट्रीय सभेची प्रतिमा आपल्या डोळ्यापुढे ठेविली पाहिजे, असे मला वाटते व तिने जो मार्ग फ्रेंच राष्ट्राच्या संवर्धनासाठी आखून ठेवला व जो मार्ग सर्व सुधारलेल्या राष्ट्रांनी मान्य केला, तोच मार्ग हिंदू समाजाच्या संवर्धनासाठी या सभेने आखला पाहिजे व बेटीबंदीपासून भेटीबंदीपर्यंत वर्णाश्रमाच्या चौकटीचे हे खिळे उडवून हिंदू समाजाचा एक वर्ण केला पाहिजे. त्याशिवाय अस्पृश्यता जाणार नाही व समताही प्रस्थापित होणार नाही.’
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चवदार तळे सत्याग्रह आणि तेथेच मनुस्मृती दहन केले. त्याच प्रमाणे नाशिकमध्ये काळाराम मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह पाच वर्षे चालविला. परंतु हिंदू समाज बदलण्यास तयार नसल्याचे दिसून आल्यावर १९३६साली त्यांनी येवला येथे ‘हिंदू म्हणून जन्मलो असलो तरी, हिंदू म्हणून मरणार नाही’, अशी भीमगर्जना केली होती. पुढे ती घोषणा त्यांनी १९५६ रोजी प्रत्यक्षात उतरविल्याचे सर्व जगाने पाहिले आहे. हे धर्मांतरदेखील सर्व माणसे समान दर्जाची आहेत, सर्वांना समान हक्क मिळवण्याचा आणि त्याचा उपयोग करण्याचा अधिकार असल्याचे दाखवून देण्याकरिता करण्यात आले होते. डॉ. आंबेडकर यांच्या जीवनातील सर्व संघर्ष माणसा-माणसांत भेद करणार्या जाती व्यवस्थेला जमिनीखाली गाडण्यासाठी होता. जाती व्यवस्थेचे निर्मूलन करण्यासाठी त्यांचा महात्मा गांधी यांच्याशी महान संघर्ष झाला. त्यानंतरच्या पुढील काळात म. गांधी यांना जाती व्यवस्था निर्मूलनाचा समावेश आपल्या चळवळीत करावा लागला. डॉ. बाबासाहेब यांच्या प्रखर बुद्धिवादाचा प्रभाव व शक्ती महात्मा गांधी यांनी ओळखली होती. त्यामुळे त्यांनी यापुढे आंतरजातीय विवाह म्हणजे वधू किंवा वरापैकी एक जण अस्पृश्य समाजाचा असेल, त्याच विवाह सोहळ्याला उपस्थित राहण्याचा निर्णय घेतला होता. डॉ. बाबासाहेब यांनी म. गांधी यांच्यासारख्या सनातनी आणि कर्मठ हिंदू व्यक्तीला आरपार बदलले होते. डॉ. बाबासाहेब यांचा माणसे बदलण्यावर विश्वास होता. ते हिंदू धर्मग्रंथातील वर्णाश्रम धर्म, मनुस्मृतीतील सर्व स्त्रिया, शूद्र व अतिशूद्र समाजावर गुलामी लादणारे कायदे आणि जाती व्यवस्थेला धर्मग्रंथांनी प्राप्त करून दिलेला नैतिक आधार मोडून काढण्याच्या बाजूने होते. ते हिंदू व्यक्तीच्या विरोधात नव्हते. ते व्यक्ती आणि प्रवृत्तीमध्ये फरक करीत असत. व्यक्ती आणि प्रवृत्ती या दोन वेगळ्या गोष्टी असतात, यावर त्यांचा विश्वास होता. ते ब्राह्मण्यवादाला प्रवृत्ती मानत असत.
आज २०२४मध्ये धर्मांतरीत बौद्धांमध्ये बरीच प्रगती झालेली दिसते. या बौद्धांमध्ये शासकीय नोकरीच्या माध्यमातून आलेल्या आर्थिक सुबत्तेमुळे मध्यमवर्गाची निर्मिती झाली आहे. या मध्यम वर्गातूनच अत्यल्प असा उद्योजकांचा वर्ग निर्माण झाला आहे. हे दोन्ही वर्ग सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले दिसतात. परंतु त्यांचे सामाजिक कार्य हे सभा, संमेलने, परिषदा घेणे, मोठ-मोठे कार्यक्रमांचे आयोजन करणे आणि त्यात तास-तासभर भाषणे करणे असे सर्वत्र दिसून येते. हे सर्व कृतिशून्य वांझोट्या चर्चा असतात. या भाषणांना कृती कार्यक्रमाची जाेड देणे आवश्यक आहे. समाजावरील अन्याय, अत्याचार दूर हाेऊन समाजाला विकास मार्गावर घेऊन जाणाऱ्या कृती करण्याची गरज आहे. प्रत्यक्षात, शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये राहणारे गरीब बौद्ध आणि ग्रामीण भागातील गावांमध्ये ५-१० घरांची वस्ती असलेले बौद्ध यांच्यापुढे सामाजिक विषमता अनेक अडचणी निर्माण करीत असते. त्यांना जातीय अत्याचाराचे चटके सहन करावे लागतात. या ९० टक्के वर्गाला जाती निर्मूलनाची आजही गरज आहे. त्याच वेळी विकसित झालेल्या मध्यमवर्गीय बौद्धांनी जाती निर्मूलनाची चळवळ सोडून दिली आहे. ३० वर्षांपूर्वीपर्यंत होणार्या जातीअंत परिषदा आता बाद करण्यात आलेल्या आहेत. मध्यमवर्गीय बौद्धांच्या संवदेना प्रस्थापित अभिजनासारख्या, कुलीन वर्गासारख्या तयार झाल्या आहेत. मध्यमवर्गीयांना ‘दलित’ हे संबोधन अपमानजनक वाटते. प्रत्यक्षात जातीव्यवस्थेचे निर्मूलन झाले नसल्याने ओबीसीपासून सर्वच हिंदू या मध्यमवर्गीय बौद्धांनादेखील ‘दलित’ नव्हे, तर त्यापेक्षाही हीन दृष्टीची वागणूक देत असतात. हा एक स्वतंत्र विषय आहे. धर्मांतरीत बौद्धांपैकी ९० टक्के समाज आजही दलित पातळीवरचे जीवन जगत आहे. परंतु मध्यमवर्गीय बौद्धांचे प्राधान्यक्रम बदलेले आहेत, या वर्गाच्या समस्या, त्यांचे प्रश्न बदलले आहेत. त्यांना संघर्ष, वाद नको आहे. इतर हिंदूंप्रमाणे या मध्यमवर्गीय बौद्धांना बडेजावपणा दाखवायला खूप आवडते. या मध्यमवर्गीय समूहाचे हे प्रमुख लक्षण बनले आहे. जागतिक पातळीवर मध्यमवर्गामध्ये असलेल्या सर्व प्रकारच्या वाईट प्रवृत्तींचा आणि दिशाहीनतेचा शिरकाव मध्यमवर्गीय बाैद्धांमध्ये झाला आहे. काही मध्यमवर्गीय बाैद्ध व्यक्ती, कार्यकर्ते आंबेडकरी चळवळीला दिशा देण्याचा प्रयत्न करून आपली याेग्य भूमिका पार पाडतात. मात्र, त्यांना मुर्खात काढले जाते. बहुसंख्य मध्यमवर्गीय बाैद्ध हे भांडवलशाहीने निर्माण केलेल्या चंगळवादात गुरफटत चालले आहेत. त्यामुळे त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जातीनिर्मूलनाची चळवळ सोडून दिली आहे.
डॉ. बाबासाहेब हे केवळ सामाजिक विषमतेच्या विरोधातच नव्हे, तर ते सर्वच प्रकारच्या गुलामगिरीविरोधात होते. मागील काही वर्षांत मध्यमवर्गीय बौद्धांमध्ये आंबेडकरवादी राजकारणाच्या नावाखाली फॅसिझम फोफावू लागला आहे. ही खूप विरोधाभासी परिस्थिती आहे. परंतु हे सत्य आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेली चळवळ समाजात स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय या मूल्यांची प्रस्थापना करण्याचे उद्दिष्ट पुढे घेऊन जात होती. मात्र, त्या समतावादी आणि फॅसिझम-ब्राह्मणवादविरोधी चळवळीचे चक्र काही स्वार्थी नेत्यांनी उलटे फिरवणे सुरू केले आहे. त्याला आंबेडकरवादी तरूण बळी पडू लागले आहेत. हे तरुण राजकीयदृष्ट्या भोळे आहेत. त्यामुळे त्यांची दिशाभूल करून त्यांचा वापर राजकीय नेते आपल्या स्वार्थासाठी करीत असतात.
इटलीचा मुसोलिनी आणि जर्मनीचा हिटलर यांनी फॅसिझम व हुकूमशाही आपापल्या देशांवर लादली होती. हे दोघेही लोकशाहीचा गैरफायदा घेऊन आणि लोकांची दिशाभूल करून सत्तेवर आले होते. काळ्या डगलेवाल्यांची संघटना बांधणाऱ्या फॅसिस्ट मुसाेेलिनीला भेटण्यासाठी आरएसएसचे पितामह बॅरि. मुंजे इटलीला जाऊन आले हाेते. हुकूमशहा हिटलर स्वत:ला समाजवादी असल्याचे लोकांपुढे भासवत होता. त्याने सत्ता-संपत्तीहीन गरीब, अल्पसंख्यांक ज्यू लोकांना बहुसंख्यांक समाजाचा आणि देशाचा शत्रू म्हणून ख्रिश्चन लोकांपुढे उभे केले होते. खोट्या गोष्टींचा प्रोपगंडा करून ख्रिश्चन समाजामध्ये अल्पसंख्यांक ज्यू लोकांबाबत द्वेष निर्माण केला होता. यामध्ये प्रोपगंडातील झुंडीच्या मानसशास्त्राचा पद्धतशीरपणे आणि कावेबाजपणाने वापर करून हिटलरने बहुसंख्यांक ख्रिश्चन लोकांचे मेंदू ताब्यात घेतले होते. या हिटलरने लोकशाहीवादी देशांविरूद्ध दुसरे महायुद्ध पुकारले, तेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हिटलरचा धिक्कार केला होता. मुंबई आकाशवाणीवरून दि. ९ नोव्हेंबर १९४२ रोजी भाषण करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, ‘नाझी तत्त्वज्ञान हे भारतीय स्वातंत्र्याला व मुक्ततेला फार मोठे आव्हान आहे. यासाठी भारतीयांना नाझीशी युद्ध करणे आत्यंतिक गरजेचे आहे. हे युद्ध नाझी व्यवस्था आणि जुनी समाजव्यवस्था यांच्याविरूद्ध असले पाहिजे. युद्धावर होणारा खर्च आणि बलिदान यांची नुकसान भरपाई स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यावर आधारलेली नवी समाजव्यवस्था निर्माण केल्यामुळेच होऊ शकते.’
डॉ. बाबासाहेबांनी हिटलरच्या फॅसिझम विरोधात युद्ध पुकारले होते. त्याच वेळी स्वतःला त्यांचे अनुयायी म्हणवणारे रामदास आठवले, जोगेंद्र कवाडे, सुलेखा कुंभारे, चिराग पासवान, जीतनराम मांझी हे भारतातील फॅसिस्ट व ब्राह्मणवादी भाजप आणि आरएसएसला सामील झाले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदुत्वाला आणि हिंदुराष्ट्रवादाला भारतावरील फार मोठे संकट मानले होते. त्याच हिंदुत्ववादी राजकारणाला मजबूत करण्याचे काम हे दलाली खाणारे नेते करीत आहेत. ते निर्लज्जपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा निळा झेंडा निवडणूक प्रचारात आरएसएसच्या भगव्या झेंड्यासोबत नाचवत असतात. त्यातून ते बौद्ध, दलित जनतेची घोर फसवणूक करीत आहेत. आठवले, कवाडे यांनी नालायकपणाचा कळस गाठला आहे. आठवले, कवाडे, कुंभारे उघडपणे आरएसएसला सामील झाले असताना वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी, स्वतंत्र राजकारण उभे करण्याच्या नावाखाली, राजकीयदृष्ट्या भाेळ्या कार्यकर्त्यांची दिशाभूल चालविली आहे. या दिशाहीन कार्यकर्त्यांनी आंबेडकरवादी बुद्धिजीवींच्या घरापुढे आंदोलन करून त्यांच्यात दहशत निर्माण केली. समाजात दहशत पसरविणे हे फॅसिझमचे प्रमुख लक्षण आहे. दहशतीच्या माध्यमातून विरोधकांची दडपणूक केली जाते. फॅसिझमला विरोधक नको असतात. फॅसिझमला विचार करणारे बुद्धिजीवी शत्रू वाटत असतात. आंबेडकरवादी बुद्धिजीवी हे कथित आंबेडकरवादी नेत्यांची आणि या बाेलघेड्या नेत्यांच्या समाजद्राेही राजकीय धाेरणांचा विराेध करीत असल्याने, खास करून वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी आंबेडकरवादी बुद्धिजीवीना शत्रू क्रमांक एक घाेेषित केले आहे. त्यांच्यात दहशत निर्माण करण्यात आलेली आहे. त्यामुळे हे बुद्धिजीवी एवढे घाबरलेले आहेत, की त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या समाजद्रोही राजकारणावर बोलणेदेखील बंद केले आहे.
१९८४मध्ये आंबेडकरवादाच्या नावाने भारिप-बहुजन महासंघ उर्फ वंचित बहुजन आघाडीने आपल्या राजकारणाची सुरुवात केली होती. हा राजकीय पक्ष आता फुले-आंबेडकरवादाऐवजी फॅसिझमच्या मार्गाने चालला आहे. फॅसिस्टांप्रमाणे प्रकाश आंबेडकर यांचे भाषण, बाेलणे, कागदावरील धाेरण अत्यंत आकर्षक आहे. पण हे बोलणे फसवे आहे. त्या भरवशावर ते आंबेडकरवादी तरुणांना भुरळ घालून आपल्या नादी लावतात. पुराेगामी लाेक प्रकाश आंबेडकर यांच्या त्याच बाेलण्यावर भाळले हाेते. पण हा कावेबाजपणा अनेकांनी ओळखला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाखाली पसरवलेला फॅसिझम आंबेडकरवादी कार्यकर्त्यांमध्ये फोफावतो आहे. आधी आंबेडकरवादी कार्यकर्त्यांचे रूपांतर शहाणपणा वा विवेक गमावलेल्या भक्तांमध्ये करण्यात आले. हे भक्त आता फ्रिंज एलिमेंटमध्ये रुपांतरित झाले आहेत. या फ्रिंज एलिमेंटनी, लंपेन वर्गाने बुद्धिजीवींमध्ये दहशत निर्माण केली आहे. ही दलित, शोषित, पीडितांच्या राजकारणाचा फार मोठी शोकांतिका म्हणावी लागले. आंबेडकरवादाच्या नावाने चालणार्या राजकारणात जेव्हा फॅसिझमचा वापर केला जातो, कार्यकर्त्यांना हिंसक झुंडीमध्ये परावर्तीत केले जाते, तेव्हा ती समाजाकरिता अत्यंत घातक गोष्ट असते. एकदा का फॅसिझमचा सार्वत्रिक वापर सुरू केला की, दलित, शोषित, पीडितांना स्वत:वरील अन्यायाविरोधात सामाजिक न्याय मागण्याचा नैतिक अधिकार राहात नाही. आमच्यावर अन्याय केला जात आहे, असा टाहो फोडायची संवैधानिक नैतिकता शिल्लक राहात नाही. सत्ताधारी वर्ग अशा लोकांबद्दल गुंड, देशविघातक असल्याचा प्रचार करतो. त्यांची बदनामी करतो. हे आंबेडकरवादावर येऊ घातलेले फार घातक संकट आहे. कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकर उघडपणे फॅसिझम आणि हुकूमशाहीच्या विरोधात आणि लाेकशाहीचे समर्थक हाेते. एकीकडे फॅसिस्ट आरएसएसचे हिंदुराष्ट्राच्या नावाखाली ब्राह्मणीराष्ट्राचे महासंकट देशावर आले आहे, त्याला पराभूत करण्यासाठी आंबेडकरवाद्यांना व्यूहरचना करायची आहे, तर दुसरीकडे आंबेडकरवादी तरुणांमध्ये फॅसिझम फोफावत आहे.
-मिलिंद कीर्ती, नागपूर
९४०५३२५०४८
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत