महाराष्ट्रात आधुनिक अनाजी पंत, खंडोजी खोपडे आणि बाजी घोरपडे यांचा शपथविधी ‘ई.व्ही.एम.’च्या कृपेने संपन्न.

ॲड. शीतल शामराव चव्हाण
गुजराती नफेखोर, दलाल आणि तडीपार गुंडाचे हस्तक झालेल्या महाराष्ट्रद्रोह्यांविरुद्ध लढायला निष्ठावंत मावळे सज्ज.
भारतीय लोकशाहीत मतदानाची औपचारिकता पार पाडली जात असली तरी निवडणूक प्रक्रियेवर वर्ण-जात, पैसा, वतनदार, जमीनदार, धनाढ्य शक्ती, प्रस्थापित राजकीय पक्ष व पुढाऱ्यांचा प्रचंड मोठा प्रभाव आहे. आता तर गुजराती रंगा-बिल्ला म्हणजेच गुजराती नफेखोर दलाल आणि तडीपार गुंड जोडगळी दिल्लीच्या तख्तावर बसलेली आहे. त्यामूळे सबंध देशावर गुलामीचे सावट पसरले आहे. ह्या अंधकारातून बाहेर पडायला धर्म, वर्ग, वर्ण भेदाच्या बंधनात अडकलेली तथाकथित संसदीय लोकशाही असमर्थ ठरते की काय अशी शंका जनमानसात निर्माण होवू लागली आहे. कारण या संसदीय लोकशाहीचा कणा असलेली निवडणूक प्रक्रियाच या शक्तीने भ्रष्ट करुन टाकलेली आहे.
मध्ययुगात तत्कालीन राजेशाहीच्या मर्यादा उल्लंघून राजेशाहीतही लोकशाहीच्या संकल्पनेची बीजे पेरणारी स्वराज्याची क्रांती महाराष्ट्रात घडली. या क्रांतीचे जनक जिजाऊ, शहाजी, शिवबा होते. या क्रांतीसाठी महाराष्ट्रातील अठरापगड जातींसह मुस्लिम व पठाण मावळ्यांनीसुद्धा आपल्या रक्ताचे पाट वाहीले. ही क्रांती केवळ परकीय मुसलमान सत्तेच्या शोषणाविरुद्ध नव्हती तर या क्रांतीच्या पोटात याच देशातील वर्ण-जात विषमतेला हादरा देणारी आग धगधगत होती. म्हणूनच या क्रांतीने मुघल सत्तेला जेवढे जेरीस आणले त्याहूनही ज्यादा इथल्या मनुवादी परंपरेला बेचिराख केले. शेकडो वर्षांचे आपले धर्माधिष्ठित वर्चस्व धोक्यात आल्याने महाराष्ट्रातील ब्राह्मणी, सरंजामी शक्तीने दिल्लीतल्या मुघल सत्तेशी सौदा करुन स्वराज्यद्रोह केला. स्वराज्याच्या विरोधात कोटीचंडी यज्ञ करणे, शहाजीराजांना धोकाधडी करुन आदिलशहाकरवी अटक करवणे, शिवरायांचा राज्याभिषेक नाकारणे, शिवराय आणि संभाजीराजे यांचेवर विषप्रयोग करणे, शिवरायांच्या घरातच गृहयुद्ध पेटवणे, शिवराय-शंभूराजे यांच्यात वितुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न करणे आणि हरतऱ्हेने समता रुजवणाऱ्या स्वराज्याला धुळीस मिळवण्याची कारस्थानं तत्कालीन स्वराज्यद्रोह्यांनी केली. पण शिवराय, शंभूराजे आणि मावळे त्याला पुरुन उरले. पुढे स्वराज्याची दोन शकले पडल्यानंतर पेशवाईने साताऱ्याची सुत्रे हाती घेतली. स्वराज्यात रुजवलेली समतेची बीजं जाळून विषमतेची पेरणी केली. त्या विषमतेला गाडण्यासाठी भीमा-कोरेगाव येथे बहाद्दर मावळे लढले. पेशवाईने आपल्या अय्याशीने आणि धर्ममार्तंडांच्या आहारी जावून स्वराज्याचे पानीपत केले.
पेशवाईत बोकाळलेल्या विषमतेला तडा देत आधुनिक काळात स्वराज्यातील समतेच्या मूल्यांना पुनर्जीवित करण्यासाठी फुले, शाहू, आंबेडकरांनी, सावित्री, फातिमा, रमाईने मोठा लढा उभारला, संघर्ष व त्याग केला. त्याचे फलित म्हणून संविधानाचे, कायद्याचे राज्य निर्माण झाले. पण या संविधानाच्या, कायद्याच्या राज्यातही वर्ण-जात, वर्ग आणि लिंग विषमतेचे वीष कालवून आधुनिक पेशवाई ढवळाढवळ करीत राहिली.
सन २०१४ ला नागपूरच्या रेशीमबागेतील विषमतावादी किड्यांची घाण खावून वाढलेली पैदास दिल्लीच्या गादीवर विराजमान झाली. दिल्लीत नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्र असे सांगत महाराष्ट्राच्या गादीवर आधुनिक अनाजी पंतांना बसवण्यात आले. मग या आधुनिक अनाजी पंताने शिवरायांची व जिजाऊंची बदनामी करणाऱ्या तथाकथित शिवशाहीरास ‘महाराष्ट्र भूषण’ देवू केला, मराठा आरक्षणाच्या कायद्याला आपल्या भाडोत्रीकरवी आव्हान देवून ढवळाढवळ केली, मराठा-ओबीसी वाद पेटवला, महाराष्ट्रातील पक्ष फोडले आणि आधुनिक खंडोजी खोपडे व बाजी घोरपडे जन्मास घातले, महाराष्ट्राच्या राजकारणात खोकेसंकृती आणली. दिल्लीत बसलेल्या गुजराती नफेखोर आणि तडीपार गुंडाची पुरेपुर साथ घेवून महाराष्ट्रावर गुजराती उद्योगपतींचे अतिक्रमण केले. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवले. एवढे करुन भागले नाही म्हणून की काय महाराष्ट्राच्या मातीतले दोन रत्न छ. शिवराय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी नरेंद्र मोदींची तुलना करणारी पुस्तके या देशद्रोही शक्तींनी आपल्या भक्तांकरवी लिहून घेतली. छ. शिवराय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची वेशभूषा परिधान केलेल्या व्यक्तींना प्रचारासाठी दारोदार फिरवले. अत्यंत निकृष्ट दर्जाचे छ. शिवरायांच्या पुतळ्याचे काम करवून घेवून पुतळा कोसळण्याच्या घटनेस हेच देशद्रोही, महाराष्ट्रद्रोही जबाबदार ठरले.
आपण जो हैदोस महाराष्ट्रात आणि देशात घातला आहे त्याने त्रस्त झालेली आणि आधीच ४०० पार चा फुगा फोडून लढण्यास सज्ज झालेली जनता आता आपल्याला याच मातीत गाडणार याचा स्पष्ट अंदाज आल्याने अनाजी पंताने गुजराती नफेखोर दलाल, गुंड यांच्या सहाय्याने आधी ‘लाडकी बहीण’सारख्या योजनांची पुंगी वाजवली. नंतर त्यानेही काही भागत नाही हे कळून चुकल्यावर महाराष्ट्रात चक्क ‘ई. व्ही. एम’च मॅनेज केले.
सबंध महाराष्ट्रात भाजप, खोकेबहाद्दर यांच्याविरोधात प्रचंड संतापाची लाट असताना निवडणूकांचा निकाल मात्र त्यांच्याच बाजूने एकतर्फी लागल्याने महाराष्ट्रात सुतक पडल्यासारखी शांतता निर्माण झाली. सर्वत्र ‘ई. व्ही. एम.’ बद्दल शंका व संशयाच्या चर्चांना उधाण आले. माळशिरसमधील मारकडवाडी या गावात लोकवर्गणीतून पुन्हा एकदा ‘बॅलेट पेपर’वर मतदानाचा प्रयोग करण्याचे गावकऱ्यांनी नियोजन केले. पण हा प्रयोग झाला तर आपले पितळ उघडे पडेल या भितीने हा प्रयोग पोलिस बळाने दाबण्यात आला.
अखेर महाराष्ट्रात गुजराती नफेखोर उद्योगपतींचे दलाल आणि तडीपार गुंडासमोर झुकणाऱ्या आधुनिक अनाजीपंत, खंडोजी खोपडे आणि बाजी घोरपड्यांनी ‘ई. व्ही. एम’च्या कृपेने आपला शपथविधी शाही थाटात उरकला. एकेकाळी मंत्राने फसवणूक करणारे आता यंत्राने फसवणूक करीत आहेत याची प्रचिती तमाम मराठी जनाला आली.
महाराष्ट्राच्या मातीला गनीमी काव्याची शिकवण शिवरायांनी दिलेली आहे. कधी समोरुन लढायचे तर कधी चकमा देत शत्रूला फसवायचे याचा नीट नेम करण्याची कुवत मराठी माणसात आहे. त्यामूळे आम्ही महाराष्ट्राला फसवण्यात यशस्वी झालो आहोत या भ्रमात महाराष्ट्रद्रोह्यांनी राहू नये. या निमित्ताने मराठी माणसाच्या मनातील सुप्त झालेल्या लढवय्येपणाला ललकारण्याचे काम तुम्ही केलेले आहे. हा मराठी बाणा संसदीय राजकारणातील तुमच्या कारस्थानांच्या तटबंदी तोडून तुमचा कधी कोथळा काढेल याचा नेम नाही. शेवटी स्वराज्यद्रोही अनाजी पंताला हात्तीच्या पायी देणारा, खंडोजी खोपड्याची खोपडी उडवणारा आणि बाजी घोरपड्याची गर्दन छाटणारा वारसा या मातीला हे आहे हे ध्यानी असू द्यावे. तिकडे तुमचा शपथविधी संपन्न झाला आणि इकडे निष्ठावंत मराठी मावळे लढण्यास सज्ज झाले आहेत.
© ॲड. शीतल शामराव चव्हाण
(मो. 9921657346)
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत