डॉ. बाबासाहेब आंबेडकर आखाडयाचा ” अजिंक्य पहेलवान.

प्रा. डॉ.आर.जे. इंगोले
समाजाला उपदेश करतांना महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी असे म्हणतात की, “ मला विद्वान लोक नकोत तर, प्रामाणिक आणि निष्ठावान माणसे पाहिजेत. मी स्वत: शंभर ग्रैज्युवेट बरोबर आहे.” हे वाक्य आठवण्याचे कारण म्हणजे माझा वृत्तरत्न सम्राट मधील एक लेख वाचुन मला एका वाचकाचा फोन आला आणि असे फोन नेहमी येतात. तसा मी फोन उचलला आणि बोलायला सुरुवात केली. काही वेळेत समोर बोलणारा व्यक्ती हा एक लेखक आहे आणि त्यांच्या पुस्तकावर मी लिहावे अशी त्यांची अपेक्षा होती. मग मी त्यांना सांगितले की, “ तुमचे पुस्तक पाठवा आणि मग वाचून मी लिहाण्याचा प्रयत्न करतो.” तसा मी कांही साहित्याचा विद्यार्थी किंवा प्राध्यापक नाही. पण अनेक वाचक जेंव्हा फोन करतात तेंव्हा असे लक्षात आले की, आपण सुद्धा लिहू शकतो आणि याची सुरुवात २०११ पासून झाली. कधी कधी वाचक सुद्धा एक मोठे परिक्षक असतात. हे माझ्या लक्षात आले आहे. आणि मग मला रविंद्र बालारामजी टेंभूर्णे लिखित आंबेडकरी चळवळीतील वादळवारा “ बालारामजी टेंभूर्णे ” हा ग्रंथ मिळाला आणि दोन दिवसात वाचून काढला आणि एक महाराष्ट्रातील असे व्यक्तिमत्व जे आपल्या समाजापर्यन्त गेले पाहिजे. आणि त्यांच्या एकूण जीवनचरित्रातून एक अनमोल संदेश घेऊन समाज पुढे जाईल असे मला वाटले. ९० च्या दशकात मी महाविद्यालयीन जीवनात होतो आणि त्यावेळी जी एकूण सामाजिक परिस्थिती होती त्याचा एक जीवनपट समोर दिसला. आणि एखादा सामाजिक कार्यकर्ता किती प्रामाणिक आणि निष्ठावान असतो याचे एक दुर्मिळ उदाहरण आदरणीय भिमसैनिक म्हणून मला मा.बालारामजी टेंभूर्णे यांचा एक नविन परिचय या ग्रंथातून झाला. असे म्हणतात की, एखाद्या शारीरिक कसरत करणारा व्यक्ती किंवा त्याला आपण पहेलवान म्हणतो असा व्यक्ती हा शारीरिक मजबूत असतो पण बुद्धी आणि निष्ठा या मात्र त्याला कमी असतात आणि म्हणून समाजात एक म्हण तयार झाली आहे की, “ पहेलवान का भेजा घुटने मे होता है “ पण मा.बालारामजी टेंभूर्णे मात्र याला अपवाद ठरले आहेत. कारण जीवन जगत असताना एवढया सर्व क्षेत्रात काम करणे फार अवघड असते पण यांचे कार्य तर राजकीय, सामाजिक, धार्मिक अशा सर्वच क्षेत्रात आहे हे विशेष आहे. आणि हा सर्व ग्रंथ वाचत असताना अनेक असे प्रसंग आहेत की, ते सत्य वाटत नाहीत इतके ते रोमांचकारी आणि अविश्वसनीय वाटतात पण ते सत्य आहेत. कारण मा.बालारामजी टेंभूर्णे हे असे सच्चे आंबेडकरवादी आहेत की, असे वाटते की, “असा आंबेडकरवादी होणे नाही.” आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा एखादा कार्यकर्ता किती प्रामाणिक असू शकतो याचे एकमेव उदाहरण म्हणजे मा. बालारामजी टेंभूर्णे हे होय. आपल्या “ बुद्ध आणि त्यांचा धम्म ” या महान ग्रंथात एक विचार आहे की, समाजात चार प्रकारचे पुरुष असतात आणि यात दोन प्रकार हे समाजाला उपयोगी आहेत तर दोन प्रकार निरुपयोगी आहेत तो प्रसंग असा आहे. तथागतांनी पुरुषाचे चार प्रकार सांगितले आहेत. ०१) स्वत: साठी व इतरांसाठी न झटणारा ०२) स्वत:चे हित सोडून इतरांच्या हितासाठी झटणारा ०३) केवळ स्वत:चे हित पाहणारा आणि इतरांच्या हिताकडे दुर्लक्ष करणारा आणि ०४) स्वत:च्या आणि इतरांच्या हितासाठी झटणारा. यापैकी तथागत बुद्ध म्हणतात की, पहिल्या आणि तिसर्या प्रकारचे पुरुष हे समाजाच्या दृष्टीने निरुपयोगी असतात. दुसर्या प्रकारचे पुरुष चांगले असतात तर चौथ्या प्रकारचे पुरुष हे सर्वोत्तम असतात. याचा जर आपण विचार केला तर मा. बालारामजी टेंभूर्णे हे दुसर्या चांगल्या प्रकारच्या गटात येतात. आणि हे काम वाटते तेवढे सोपे नाही. म्हणजे आपल्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करून समाजासाठी काम करायचे याला कुटुंबाची सुद्धा साथ असावी लागते आणि यात त्यांची धम्मपत्नी सत्यभामाबाई या नांवाप्रमाणेच सत्यवादी ठरल्या यात शंका नाही. म्हणजे आपण पाहतो की, ९९ टक्के महिला या पैशाच्या लोभी असतात आणि माझा असा तर्क आहे की, बर्याच महिला या अनेक क्षेत्रात काम करणार्या पुरूषांना अनैतिक मार्गाने पैसे मिळवण्यास प्रवृत्त करतात. पण यात महिलाच पूर्ण दोषी आहेत असे नाही पण त्यांचा यात कांही प्रमाणात सहभाग असतो. पण सत्यभामाबाई या अशा आमिषाला कधी बळी पडल्या नाहीत. आणि बालारामजी टेंभूर्णे यांनी असे अनैतिक मार्गाने पैसे मिळवावे असे त्यांना कधीच वाटले नाही. याबबाबत एक १९५७ च्या निवडणुकीचा प्रसंग आहे की, वणी मतदारसंघाचा एक कोंग्रेस पक्षाचा उमेदवार होता राघोबा तेलंग आणि त्याचे पैसे वाटप करण्यासाठी त्याचा एक कार्यकर्ता पोपटलाल हा पैशाची थैली घेऊन आला त्यात हजारो रुपये होते आणि तो १५ दिवस तिथे राहिला. पण मा. बालारामजी टेंभूर्णे यांनी त्याला दाद दिली नाही. शेवटी कंटाळून त्याने असे म्हटले की, “ तुम्ही पैसे घेत नसाल तर वाहिनीकडे देतो.” परंतु पती-पत्नी यांना एकमेकाबद्दल एक विश्वास असतो आणि त्या पोपटलालला बालारामजी टेंभूर्णे म्हणाले, “ तू देऊन पहा ती सुद्धा घेणार नाही.” आणि तो कार्यकर्ता सत्यभामाबाईकडे पैसे देण्यासाठी आला, पण यांनी पैसे घेतले नाही. हा प्रसंग आपणास काय सांगतो की, एखाद्या सच्च्या कार्यकर्त्यास त्याचे सामाजिक कार्य करण्यासाठी त्यांचे घरचे लोक म्हणजे पत्नी ,मुले ,भाऊ हे सुद्धा सहभागी असले पाहिजे म्हणजे त्यांनी साथ दिली पाहिजे तरच ते सामाजिक कार्य पूर्णत्वास जाते. आपण अनेक प्रसंग पहिले असतील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील की, ज्यावेळी माता रमाई यांची मोठी साथ होती म्हणून बाबसाहेब त्यांचे कार्य करू शकले. म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर विदेशात यांचा अभ्यास करतांना अडचण येऊ नये म्हणून माता रमाई यांनी बाबासाहेबांना स्वत:च्या मुलाच्या मृत्युची बातमी सुद्धा दिली नाही. याला फार मोठे काळीज लागते. आणि गोलमेज परिषदेला जाताना ९ कोटी अस्पृश्य बांधवांचे हक्क आणि अधिकार सुरक्षित राहावे म्हणून या महामानवाला स्वत:च्या मुलाचा राजरत्न याचा मृतदेह सोडून विदेशात जावे लागले, याला सुद्धा फार मोठे काळीज लागते. आंबेडकरी चळवळीचे कार्य करण्यासाठी मा.बालारामजी टेंभूर्णे सारखे कार्यकर्ते कसे तयार होतात तर याला मा. यशवंत मनोहर यांच्या शब्दात सांगायचे तर ते एका ठिकाणी म्हणतात की, “ बाबासाहेबांचे डोके आपल्या डोक्यात ठेवावे असा विचार उच्च शिक्षित लोकांनी करावा.” आणि इथे तर मा. बालारामजी टेंभूर्णे हे तर फार उच्च शिक्षित सुद्धा नाहीत पण मग त्यांनी आपल्या डोक्यात सतत बाबासाहेब ठेवला होता. आणि त्यामुळे ते कधीच समाजाला बेईमान झाले नाही. याच संदर्भात पुढे मा. यशवंत मनोहर म्हणतात की, “ उच्च शिक्षित माणूस प्रामाणिक असला पाहिजे, आपल्या बॉस पुढे त्याचा कणा वाकला नाही पाहिजे, आपण कितीही मोठे झालो तरी बाबाहेब आंबेडकरांचे बोट सुटू नये तसे झाले तर हात लुळा पांगळा होईल. या हातातून माणूसकी घडणार नाही.” हे डॉ.यशवंत मनोहर यांचे भाषण आताचे आहे २०२२ मधले आहे. पण जेंव्हा कोणताही व्यक्ती हा एखाद्या महापुरुषाच्या विचाराशी प्रामाणिक असला तर कोणत्याही काळात त्याचे विचार आणि आचार समान असतात आणि तसेच झाले की, महाराष्ट्रातील एक थोर आंबेडकरी विचारवंत, लेखक आणि वक्ते यशवंत मनोहर यांचे विचार आणि मा. बालारामजी टेंभूर्णे यांचे वर्तन यात आपणास मोठे साम्य दिसत आहे. कारण बालारामजी टेंभूर्णे यांनी कधीच आंबेडकरी विचाराशी तडजोड केली नाही. प्रसंगी त्यांनी त्याकाळात असणार्या अनेक दिग्गज नेत्यांशी विरोध केला आहे. पण विरोध म्हणून विरोध नाही तर जो नेता आंबेडकरी विचार आणि चळवळ मागे नेतो त्याला विरोध हे तत्व संपूर्ण जीवनात पाळल्यामुळे आज ते एक समाजाला आदर्श ठरले आहेत.
महाराष्ट्रातील एक ख्यातनाम विचारवंत आणि लेखक मा. डॉ.यशवंत मनोहर आणि मा. बालारामजी टेंभूर्णे यांच्यात मला आणखी एक साम्य दिसते आणि ते म्हणजे या दोघांनाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीला जर कोणी अडथळा निर्माण करीत असेल तर खपवून घेत नाहीत. आणि म्हणून मा. बालारामजी टेंभूर्णे यांनी जो जो व्यक्ती आंबेडकरी चळवळीच्या मार्गात अडचण करेल त्याला माफ करायचे नाही असा त्यांचा नियम होता. एक प्रसंग आहे याचा ग्रंथातील, बॅरिस्टर खोब्रागडे आणि बाबूजी आवळे हे दोन गट जेंव्हा एकत्र आले त्यावेळी बालारामजी यांना आनंद झाला. परंतु बालारामजी यांनी आवळे यांचे नांव घेताच बॅरिस्टर खोब्रागडे यांनी आक्षेप घेतला यावर बालारामजी टेंभूर्णे प्रचंड चिडले आणि ते म्हणाले, “ तुम्ही बाबासाहेबांचे नांव न घेता जगून दाखवा.” आणि या सभेत माईक ओढाओढी झाली. बालारामजी यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सभात्याग करण्याचा आदेश दिला. सर्व लोक सभागृहाच्या बाहेर जाण्याचे तयारीत असतांनाच खोब्रागडे यांनी बालारामजी यांना बोलण्याची संधी दिली. अशा प्रकारे निष्ठेला ठेच पोहोचविणार्यांची ते कधीच गय करीत नव्हते. मग तो व्यक्ती कितीही मोठा का असेना. त्यावेळी बॅरिस्टर खोब्रागडे त्यावेळी राज्यसभेचे उपाध्यक्ष होते. आणि असे अनेक प्रसंग आहेत. म्हणजे शे.का.फेडरेशन या पक्षाला आपल्याच कोणी विरोध केला तरी बालारामजी त्याला विरोध करीत असत. मग तो व्यक्ती कितीही मोठा असेल तरी कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे त्यांच्यासाठी सर्वात मोठे आदर्श होते.आणि असे जेंव्हा एखादा व्यक्ती वर्तन करतो त्यावेळी आपण समजून घ्यावे की, हा सच्चा आंबेडकरवादी आहे. असाच प्रसंग प्रा. डॉ. यशवंत मनोहर यांचा आहे. त्यांनी आपल्या अनेक लेखक आणि विचारवंतांवर थेट हल्ला केला आहे. आर.एस.एस. च्या सामाजिक समरसता मंचच्या उदघाटनाला डॉ. गंगाधर पानतावणे गेले, प्रा. डॉ. भाऊ लोखंडे यांनी ओशोला बुद्धपुरुष म्हटले , २२ प्रतिज्ञा मला मान्य नाही म्हणणार्या लक्ष्मण मानेवर लिहले , भिमशक्ती शिवशक्ती या युतीचा पुरस्कार करणार्या डॉ. रावसाहेब कसबे यांच्यावर लिहले, भारत बौद्धमय करण्याचे स्वप्न गोयंकाच करू शकतात असे म्हणणार्या रा.सू. गवई यांच्यावर लिहले याबद्दल मा. यशवंत मनोहर म्हणतात की, “ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या गोष्टी नाकारल्या त्या गोष्टींना कोणी जवळ करू लागले की, मला फार यातना होतात. बांधीलकीला विरोध करणार्या आणि कलावादाची वकिली करणार्या प्रा. गंगाधर गाडगीळ आणि व्यंकटेश माडगूळकर यांच्यावर सुद्धा तेवढयाच परखडपणे लिहले. जिथे जिथे आंबेडकर निष्ठा अवमानली जाते जिथे कुठे तात्विक अंतर्विरोध मला दिसला तिथे तिथे मी लिहले. यामुळे मला कांही व्यक्तीगत नुकसान होते काय ? नाही माझे काहीही नुकसान होत नाही. पण लोकांचा राग ओढवून घेत मला तत्वाच्या ठाकुरकीसाठी लिहावे लागते. यामध्ये कोणाच्या आपमानाचा हेतु नव्हता तर आंबेडकरवादाच्या धम्माच्या तत्वाच्या सन्मानाचा हेतु होता. त्यावेळी संबधित माणसे रागावली. पण अचूक इतिहास माझ्या पाठीशी उभा राहील. याची मला निश्चित खात्री आहे.” (संदर्भ : महाबुद्ध डॉ.आंबेडकर, लेखक: डॉ.यशवंत मनोहार.) या वरील आशयाचा आपण विचार केला तर आपल्या लक्षात येईल की, एखादा विचारवंत असेल किंवा बालारामजी टेंभूर्णे सारखा सामाजिक, राजकीय कार्यकर्ता असेल तो आंबेडकर निष्ठा अपमानित झाल्यावर शांत बसणार नाही. आणि आज आपण पाहतो की, अनेक विचारवंत असतील किंवा सामाजिक राजकीय कार्यकर्ते असतील त्यांना थोडे आर्थिक आणि इतर लाभ मिळाले की, ते सर्व विसरून जातात. आणि म्हणून आज आपली एवढी सामाजिक घसरण झाली आहे. म्हणजे आंबेडकरी चळवळीत एखादा कार्यकर्ता किती प्रामाणिक असतो याचे दुसरे उदाहरण इतिहासात सापडणार नाही. त्याचा एक प्रसंग आहे की या ग्रंथात आहे की, एकदा पुसद येथील अण्णासाहेब खडसे, देशमुख व भाऊसाहेब कांबळे यवतमाळला बालारामजी टेंभूर्णे यांच्या घरी आले. जवळपास १०-१५ लोक होते चर्चेच्या ओघात खडसेसाहेब भाऊसाहेब कांबळे यांना म्हणाले, “ कांबळे तुमचे वय झाले आता तुम्ही कोंग्रेसमध्ये या.” तेंव्हा भाऊसाहेब कांबळे म्हणाले, “ खडसे, मी जिवंत आहे तोपर्यंत तरी नाही. मात्र मी मरण पावल्यावर माझी हाडे नेऊ शकता.” या प्रसंगी बालारामजी टेंभूर्णे म्हणाले, “ भाऊसाहेबांनी हाडे न्यायची परवानगी दिली, मी मात्र माझी हाडे सुद्धा नेऊ द्यायची परवानगी देणार नाही.” एवढी महामानव डॉ. बाबासाहेब यांच्यावर निष्ठा असणारा माणूस आपणास शोधून सुद्धा सापडणार नाही.
मा. रविंद्र बालारामजी टेंभूर्णे लिखित आंबेडकरी चळवळीतील वादळवारा “ बालारामजी टेंभूर्णे ” हा ग्रंथ आज आपल्या भारतीय समाजात आणि विशेषकरून आंबेडकरी समाजासाठी एक दिशादर्शक ग्रंथ ठरणार आहे. कारण आज आपणास समाजात सर्वत्र प्रामाणिकपणा, निष्ठा, कष्ट , त्याग आणि समर्पण या बाबीचा प्रचंड दुष्काळ पडला आहे. पण या गुणांची गरज आज जास्त आहे. आणि हा ग्रंथ म्हणजे एखाद्या कवीने केलेली कल्पना किंवा एखादी काल्पनिक साहित्यकृती नाही तर मा. बालारामजी टेंभूर्णे यांचा प्रचंड संघर्षाचा खडतर प्रवास आहे. तरी सुद्धा त्यांचे चिरंजीव मा. रविंद्र बालारामजी टेंभूर्णे यांना सर्व कागदपत्रे मिळाली नाहीत पण जे मिळाले त्यावर हा ग्रंथ तयार झाला आहे. बालारामजी टेंभूर्णे यांची कागदपत्राची लाकडी संदूक त्यांनी स्वत:च जाळली कारण त्यांना प्रसिद्धी पाहिजे नव्हती. पण जर संपूर्ण कागदपत्रे मिळाली असती तर १००० पानाचा एखादा संदर्भ ग्रंथ तयार झाला असता. पण आज जो ग्रंथ आहे तो आज सर्वांनी विकत घ्यावा, कारण आपल्या आजच्या पिढीला हा संघर्ष सांगितला पाहिजे. जो आज समाजाला दिशादर्शक आहे. काल्पनिक चित्रपट पाहण्यापेक्षा आजच्या पिढीला सत्य इतिहास सांगितला पाहिजे. आणि आज बालारामजी टेंभूर्णे यांची पुढील पिढी म्हणजे लेखक मा. रविंद्र बालारामजी टेंभूर्णे आणि योगानंद टेंभूर्णे यांनी सुद्धा पुढे वारसा चालवण्याचा यशस्वी प्रयत्न केला ही सुद्धा एक अभिमानाची बाब आहे. कारण आपण अनेक महापुरुषांचा इतिहास पहिला असेल की, एका पिढीनंतर पुढील पिढीला ते कार्य पुढे नेणे महाकठिण जाते. कारण मागील पिढीची लोक तुलना करतात आणि मग पुढील पिढीची दमछाक होते. लेखकाची या ग्रंथाची लेखनशैली ही एका अनुभवी लेखकाप्रमाणे ओघवती आणि प्रभावी आहे. त्यामुळे १९० पाने वाचायला मला दोनच दिवस लागले. आपल्या बहुजन समाजातील जास्तीत जास्त लोकांनी हा ग्रंथ विकत घेऊन त्याचा प्रसार आणि प्रचार करावा अशी मला एक छोटासा आंबेडकरी विचाराचा अनुयायी म्हणून समाजाकडून माफक अपेक्षा आहे. कारण जगाच्या इतिहासाचे आपण जर अवलोकन केले तर आपल्या लक्षात येईल की, कोणतेही मोठे बदल आणि सामाजिक परिवर्तन हे विचार करतात. आणि ते विचार समाजाला देण्याचे काम लेखक आणि विचारवंत सतत करीत असतात. पण गरज आहे त्या विचाराकडे आपल्या समाजाने लक्ष देण्याची आणि त्याचा प्रसार करण्याची हे लक्षात ठेवले पाहिजे. जगात अमेरिका सारखा बलाढय देश, पण जेंव्हा १९२९ ची महामंदी आली त्यावेळी केन्स सारख्या विचारवंताला अमेरिकेचा अध्यक्ष रुजवेल्ट यांना “ न्यूयार्क टाइम्स ” मध्ये पत्र लिहून महामंदीवर उपाय सुचवावे लागले की ही विचाराची ताकत आहे. केन्सने सांगितले की, सरकारने यात हस्तक्षेप करावा आणि तसे सरकारने धोरण राबविले अमेरिका या आर्थिक मंदीच्या संकटातून बाहेर आली हे सर्व जगाने पाहीले आहे. हा परिणाम विचारांचा आहे. आणि त्यामुळे विचार आणि विचारवंतच या जगातील अनेक समस्या आणि प्रश्नावर उपाययोजना सांगत असतात. कारण विचारवंतांना सामान्य लोकांपेक्षा थोडे जास्त समजते. म्हणून तर ते लेखक आणि विचारवंत असतात. कोणताही विचारवंत हा कोणत्या जाती आणि धर्माचा नसतो तर तो सर्व मानवी समाजाचे काही भले होईल का ? अशी तळमळ असणारा एक विचाराचा पाईक असतो. आणि त्यामुळे एखादा राजा किंवा आज राजकीय नेता हा त्याच्या देशात मोठा मानला जाईल पण एखादा विद्वान सर्व जगात मानला जातो. आज अनेक देशातील लोकांना बाबासाहेबांच्या विचारांची गरज वाटत आहे, त्यांच्या विचार आणि कार्याचा अभ्यास लोक करीत आहेत, त्यांच्या संविधांनाचा अभ्यास करीत आहेत आणि बाबासाहेबांची प्रेरणा घेऊन जगात अनेक देश लोकशाही शासन पद्धती अवलंब करीत आहेत, हा बाबासाहेबांच्या विचाराचा विजय आहे. म्हणूनच मा. बालारामजी टेंभूर्णे यांच्या सामाजिक कार्याला आणि त्यांनी आंबेडकरी चळवळ जीवंत ठेवण्यासाठी त्यांनी जे कार्य केले त्या कार्याला महाकवी वामनदादा कर्डक यांच्या गीतातील या ओळी अर्पण कराव्या असे मला वाटते. वामनदादा म्हणतात,
माणसा तुझे मी इथे गीत गावे , असे गीत गावे तुझे हित व्हावे ||धृ ||
असे गोड नाते तुझ्याशी जडावे, तुझ्या संकटाशी इथे मी लढावे ||१||
तुझ्या भुकेचे कोडे उलगडावे , तुझे दुख सारे गळूनी पडावे ||२||
एकाने हसावे लाखाने रडावे , असे विश्व आता इथे न उरावे ||३||
इथे सारे सारे नवे पेरताना , वामनापरी मी तुझे हात व्हावे ||४||
प्रा. डॉ.आर.जे. इंगोले
नाशिक (९४२३१८०८७६ )
ग्रंथाचे नांव : आंबेडकरी चळवळीतील वादळवारा “ बालारामजी टेंभूर्णे ” लेखक : रविंद्र बालारामजी टेंभूर्णे ( मोबा: ९८९०४९३१४५)
प्रकाशन : चेतक बुक्स पब्लिकेशन, पुणे
प्रकाशन वर्ष : २०२४
एकूण पृष्ठे : १९०
मूल्य : ३०० रुपये.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत