देशमहाराष्ट्रमुख्यपानराजकीय

हो सके तो अभी से इन्कलाब पैदा कर!!

सुभाषचंद्र सोनार,

          हो सके तो अभी से इन्कलाब पैदा कर!!
      (सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष स्थापना दिवस)

         बहे जमीं पे तेरा लहू तो गम न कर,
         इसी जमीं से महकते गुलाब पैदा कर!
         तू इन्कलाब की आमद का इंतजार न देख,
         हो सके तो अभी से इन्कलाब पैदा कर!!
                                       - मजाज लखनवी

अर्थात :
क्रांतिसाठी भूमीवर सांडावं लागलं रक्त तर हळहळ करु नकोस! रक्ताने सिंचित भूमीवरच गुलाब उगव! तू क्रांतीच्या आगमनाची वाट पाहू नकोस!! शक्य असेल तर लगेच क्रांतीची मशाल हाती घे!!!

         'शपा' तथा कॉम्रेड शरद् पाटील हे स्वस्थ बसून क्रांतीची प्रतीक्षा करणारे व,

         जब भी चाहेंगे जमाने को बदल डालेंगे,
         सिर्फ कहने के लिए बात बड़ी है यारो!

         असं खयाली पुलावाचं स्वप्न बघणारे कॉम्रेड नव्हते. पायदळातले ते सामान्य सैनिक नव्हते तर बीनीचे शिलेदार होते. म्हणूनच जातवर्गस्रिदास्यांताच्या लढ्यास नकार देणाऱ्या माकप (मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष) चा राजीनामा देऊन बाहेर पडले व 'सकप' (सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष) ची त्यांनी स्थापना केली, ती १९७८ साली आजच्याच दिवशी.

■ कम्युनिस्ट पक्षाशी पक्षाशी मतभेद :
१९४६ ते १९७८ अशी तीन दशके ‘शपां’नी ‘माकप’ म्हणजे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात जीवनदानी कार्यकर्त्याची भूमिका बजावली.

         शपा हे विचारवंत कार्यकर्ता होते. मार्क्सवादाचे व्यासंगी अभ्यासक होते. मार्क्सवादाचा अभ्यास करताना त्यांच्या लक्षात आले की, मार्क्सची 'वर्गांत' व 'वर्गसंघर्षाची' संकल्पना भारताला लागू पडत नाही. कारण भारतीय समाज हा वर्गीय नव्हे तर जातीय समाज आहे.

         भारतात वर्गोदय इंग्रज राजवटीत झाला. पण त्याआधी प्राचीन काळापासून हजारो वर्षे भारतीय समाज हा जातीय समाज आहे. 

         तसेच बाबासाहेब आंबेडकर म्हणतात तसे भारतीय सर्वहारा हा फक्त 'आर्थिक सर्वहारा' नसून जातीय उतरंडीमुळे तो 'सामाजिक सर्वहारा' देखील आहे. व केवळ वर्ग नव्हे तर जात हे देखील त्याच्या शोषणाचे सनातन कारण आहे. परिणामी त्याच्या शोषणमुक्तीसाठी वर्गांताप्रमाणे जातिअंतासाठीही लढा लढावा लागेल.

         शपांचे हे विचार वर्गाला ब्रह्म मानणाऱ्या व 'जात देखील वर्गाच्या पोटातच असते' ही सार्वत्रिक श्रद्धा बाळगणाऱ्या सनातनी मार्क्सवाद्यांना गुस्ताखी वाटली.

■ तसवीर तेरी दिल मेरा बहला न सकेगी…
इतकेच नव्हे तर जातियवादी, कर्मठ बा. गं. टिळकांची तसबीर पक्ष कार्यालयांच्या भिंतींवर मार्क्स-एंगल्स-लेनीन सोबत लावणे हे विसंगत आहे. व जातिअंतासाठीचे आदर्श फुले-आंबेडकर असले पाहिजेत, बा. गं. टिळक नाहीत. मार्क्सवादाची टिळकांशी नव्हे तर फुले-आंबेडकरांच्या विचारांशी नाळ जोडली पाहिजे. शपांचे हे विचार ब्राह्मण्यग्रस्त कम्युनिस्ट नेतृत्वाला हलाहलासारखे वाटले.

■ तू भी गुलशन से निकाली जाएगी…
फुले-आंबेडकर या शुद्रातिशूद्रांना मार्क्सच्या पंक्तीत आणि पंगतीत बसविणे, या कल्पनेनेच मार्क्सवाद्यांच्या अढीखोर ब्राह्मणी नेतृत्वाच्या कपाळावर आठ्या उमटल्या. शपांचे हे विचार त्यांना पक्षाला बाटवणारे भयंकर विचार वाटले. शांतम् पापम्! शांतम् पापम्!! असे मनात पुटपुटत त्यांनी शपांची अडवणूक सुरु केली. उर्दू शायर जलील मानिकपुरींनी लिहिले आहे,

         गर यही तर्जे-फुगाँ है अंदलीब,
         तू भी गुलशन से निकाली जाएगी!

(तर्जे-फुगां = नाराजी व्यक्त करण्याची रीत, पद्धत, अंदलीब = बुलबुल पक्षी, गुलशन = बाग)

अर्थात :
हे बुलबुल पक्षा भले तुझा आवाज कितीही गोड असू देत, पण तू अशाच पद्धतीने प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध नाराजी व्यक्त करीत राहिलास, तर या बागेतून तुझी हद्दपारी अटळ आहे.

■ शपांचा ‘माकप’चा राजीनामा :
तेव्हा शपांच्या लक्षात आले की आता गुस्ताखी माफ नाही, आपली पक्षातून गच्छंती अटळ आहे. तेव्हा २७ जुलै १९७८ ला ‘माकप’चा राजीनामा देऊन ते स्वतःच ‘माकप’मधून बाहेर पडले. नंतर ‘माकप’ने त्यांना पक्षद्रोही ठरवून त्यांची पक्षातून हकालपट्टी केल्याचा फतवा जारी केला.

■ ‘सकप’ची स्थापना :
जातिव्यवस्थेविरुद्ध लढण्यास नकार देणाऱ्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा राजीनामा देऊन शपांनी जातवर्गस्रीदास्यांताच्या आपल्या स्वप्नपूर्तीसाठी ‘सकप’ची (सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष) १५ ऑक्टोबर १९७८ ला स्थापना केली. कॉम्रेड कुमार शिराळकर लिहितात,

         "१९७८ मध्ये पाटील यांनी सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष काढला. शहाद्याच्या कार्यकर्त्यांना पक्षाच्या अधिवेशनाला बोलाविले. कार्यक्रमाची सुरुवातच, ब्रिटिशपूर्व भारतात वर्ग नव्हते अशा अर्थाच्या विधानाने केली होती. अर्थात हे विधान म्हणजे पाटील यांच्या भारतीय इतिहासाच्या आकलनाचा एक अतिमहत्त्वाचा निष्कर्षच होता."

■ दुहेरी संघर्ष :
शपांचा दिवसा रस्त्यावर दलित, आदिवासी, भूमिहीनांचे लढे लढणे आणि रात्री पुस्तकांशी संघर्ष (वाचन, लेखन, चिंतन, मनन) असा दुहेरी संघर्ष सुरु झाला.

         दिवसा रस्त्यावर केलेल्या संघर्षांमुळे त्यांच्या साहित्याला अनुभवाचे परिमाण लाभले. त्यांचे ग्रंथ क्रांतिसाठीची आयुधं बनली. तर "पुस्तकांशी संघर्ष करता करता नव्हे, तर रस्त्यावर संघर्ष करता करता मला मरण यावे!" हे त्यांचे जीवन ध्येय बनले.

■ ‘माफुआ’ व सौत्रांतिक मार्क्सवादाची निर्मिती :
“तत्त्वज्ञानाचा अभाव (कोणत्याही) क्रांतीकारी प्रवाहाचा अस्तित्वहक्क काढून घेतो आणि कमीअधिक काळानंतर त्याला अपरिहार्य दिवाळखोरीची सजा फर्मावतो.”
– व्ही. आय. लेनिन

         कोणत्याही प‌क्ष, संघटनेची उभारणी तत्त्वज्ञानाच्या पायावर झाली पाहिजे. हे लेनिनने उद्धृत केले आहे. भारतीय सामाजिक क्रांतीसाठी फक्त मार्क्सवाद पुरेसा नाही, म्हणून शपांनी 'माफुआ' (मार्क्स, फुले, आंबेडकरवाद) ही तत्त्वज्ञानाची नवी विचारसृष्टी उभारली. व त्याआधारे जातवर्गस्रीदास्यांतासाठी प्रबोधन व लढा सुरु केला. कालांतराने  'माफुआ' च्याही मर्यादा दिसू लागताच त्यापासून 'दार्शनिक डिपार्चर' घेऊन मार्क्सवादाची बुद्ध व आचार्य दिग्नाग यांच्या तत्त्वज्ञानाशी सांगड घालून 'सौत्रांतिक मार्क्सवाद' या नवीन तत्त्वज्ञानाची उभारणी केली.

■ मुखपत्रही सुरु केले :
आपल्या पक्षाच्या विचारांच्या प्रचार- प्रसारासाठी ‘शपां’नी १० मार्च १९८२ ला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीदिनी ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ (समा) हे मासिकही सुरु केले.

■ ‘समा’ची प्रासंगिकता :
पुढे आर्थिक अडचणी व सकपतील फूटीमुळे ‘समा’ बंद पडले. सद्दी संपली की माणसाचीही रद्दी होते. वर्तमानपत्राची तर ते प्रसिद्व झाल्यानंतर काही तासातच रद्दी होते. तथापि ‘शपा’ आणि त्यांचे ‘समा’ याला अपवाद ठरले.

         शपांची 'बहुप्रवाही, ऐतिहासिक, भौतिकवादी, विधायक अन्वेषण पद्धती, 'जानेत' म्हणजे जाणीवनेणीवेन्वेषी तर्कशास्त्र व 'सौत्रांतिक मार्क्सवादी' या तत्त्वज्ञानाधारे मांडलेले विचार आजही प्रासंगिक व प्रेरणादायी आहेत. म्हणूनच तर समातील त्यांच्या अनेक लेखांवर पुस्तिका निघाल्या. आजही शपांचे अनुयायी, अभ्यासक समाचे जुने अंक मिळवून  संदर्भासाठी त्यांच्या झेरॉक्स काढून ते संग्रही ठेवतात.

         'माकप'मधून शपांनी केलेले सीमोल्लंघन ऐतिहासिक ठरले. परिवर्तनवादी चळवळीला त्याने वैचारिक आयुधं पुरविली. कार्यकर्त्यांना नवीन विचारदृष्टी दिली. एका क्रांतिकारी युगाचा आरंभ झाला.

– सुभाषचंद्र सोनार,

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!