दिन विशेषमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसामाजिक / सांस्कृतिक

वामनराव गोडबोले अनुल्लेखित द्रष्टा !!

व्यवस्थेच्या पाशातून पूर्णतः मुक्त होण्याची कृती, सहा दशकाआधी नागपूर शहरात घडली. स्थळ होते दीक्षाभूमी ! हे स्थळ निवडण्याचे संपूर्ण श्रेय वामनराव गोडबोले या द्रष्ट्या माणसाला जाते. त्यामुळे ते आदरणीय ठरावे !

दीक्षाभूमी हे स्थळ उगाच ठरले नाही. प्रचंड ताणतणाव व रोमांचकता दडली आहे. धम्मदीक्षेच्या सात दिवस आधीपर्यंत तिढा कायम होता. ही जागा की ती जागा ? शेवटी बाबासाहेबांचा अंतिम शब्द आला. सर्वांनी सुस्कारा सोडला. तो अंतिम शब्द ८ आक्टोबरला पत्ररुपाने पोहचला. तेव्हा धम्मचक्र प्रवर्तनाला केवळ सात दिवस उरले होते.

झाले असे, धम्मदीक्षेचा सोहळा बाबासाहेबांनी वामनरावांवर (गोडबोले) सोपविला. वामनराव तेव्हा भारतीय बौध्दजन समिती, नागपूर शाखेचे चिटणीस होते. तेव्हा ते रेल्वेत गार्ड होते. बाबासाहेबांशी बऱ्यापैकी ओळख होती. बौध्दजन समितीची स्थापना बाबासाहेबांनी केलेली ! तेव्हा शेड्युल्ड कास्ट फेडरेशन हीही कार्यरत होती.

त्यावेळी मध्यप्रदेश होते. नागपूर ही राजधानी होती. राज्यशासन नागपुरातच ! धम्मदीक्षा कुठे घ्यायची ? वामनराव जागा शोधायला निघाले. शोधमोहिमेत त्यांना दीक्षाभूमीची जागा आवडली. ते गवती मैदान होते. आजूबाजूला वीज व रहदारीची सोय होती. शिवाय परिसर मोकळा होता. ५-६ लाख लोक सहज बसतील हे दिसत होते. वामनरावांनी जागा मनात पक्की केली.

नंतर जागेची मालकी शोधली. जागा नझूलकडे निघाली. वापरासाठी माताकचेरीला (व्हॅक्सिन इन्स्टिट्यूट) दिली होती. माताकचेरीने ती ‘चराई’ साठी सुरक्षित ठेवलेली ! वामनरावांनी जागा वापराचे शासकीय सोपस्कार पूरे केले.

दरम्यान, नगरसेवक आकांत माटे यांनी स्वतःच्या मालकीची ५ एकर शेतजमीन धम्मदीक्षेसाठी दान करण्याची इच्छा दर्शविली. ही बाब लक्षणीय होती. मुद्दा एवढाच की ही शेतजमीन नागपुरातील बाभुळखेडा येथे होती. वामनराव या शेतजमीनीवर धम्मदीक्षा घेण्याच्या मताचे नव्हते. त्यांना माताकचेरीचे मैदान सर्व दृष्टीने योग्य वाटत होते.

नवा तिढा उभा झाला. दानातील जमीन की सरकारी जमीन ? तिढा दिल्लीत पोहचला. तेव्हाच शेड्युल्ड कास्ट फेडरेशनच्या अ.भार. कार्यकारिणीची बैठक दिल्लीला होती. सर्व नेते दिल्लीत होते. अनेक ताणतणावात हाही ताण बाबासाहेबांवर होता. त्यांनी १ आक्टोबरला (५६) गोडबोलेंना तार केली. ‘कम इमिजिएटली अलांग वीथ माटे’. (त्यानुसार गोडबोले व माटे दिल्लीला गेले)

या तिढ्यात, बाबासाहेबांनी त्यांचा विश्वासू भ. स. गायकवाड (हे बौध्दजन समिती, मुंबईचे चिटणीस होते) यांना नागपुरात पाठविले. गायकवाड हे ३ आक्टोबरला नागपुरात पोहचले. त्यांनी दोन्ही जागा पाहिल्या. त्याच दिवशी बाबांना पत्र टाकले. बाबांना ते पत्र ५ ला मिळाले.

गायकवाड पत्रात लिहितात, … ‘आज दि. ३-१०-१९५६ रोजी ११ वाजता नागपूरला पोहोचलो. सभा मंडपाची जागा प्रत्यक्ष पाहिली. मु़ंबईतील नरेपार्कच्या तिप्पट जागा भव्य आणि प्रशस्त आहे. पाण्याची, विजेच्या दिव्यांची, रस्त्याची वैगरे रहदारीची सोय चांगली आहे. सभामंडपात तीन लाख लोक सहज राहतील इतका तो मोठा आहे.सध्या त्याचे काम चालू आहे.
दुसरी जागा (श्री माटे यांची अपुरी) गैरसोयीची आहे. वरीलपैकी एकही सोय त्या जागेवर करता येणे शक्य नाही.
तरी कृपा करून वरील जागा पसंत करण्याची विनंती आहे’.

घटना वेगाने घडत गेल्या. बाबासाहेबांनी ५ आक्टोबरलाच पत्र लिहून अंतिम निर्णय दिला. ते पत्र गोडबोलेंना ८ आक्टोबरला मिळाले.
बाबासाहेब पत्रात लिहितात …
My dear Godbole,
I have finally decided that the land that you have selected not Mates should not be changed and you continue your work on the same place. The programme will begin on the 12th and may continue till the 16th. I shall send you a programme for each day which you should print and distribute.

आता कोणताच मुद्दा उरलेला नव्हता. मात्र, केवळ सात दिवस हाताशी होते.

म्हणून या महत्तमाची आठवण होते.
१ जानेवारी २०२३ ला वामनराव गोडबोले यांची जन्मशताब्दी झाली.
आयुष्यभर ते अविवाहित राहीले.
३ मे २००६ ला वयाच्या ८४ व्या वर्षी
धम्मकार्य करता करता वामनरावांचे शांतीवन (चिंचोली) येथे निधन झाले.
अशा या द्रष्ट्या वामनराव गोडबोले यांना विनम्र नमन !

० रणजित मेश्राम

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!