१ मे – जागतिक कामगार दिन

मोडेल पण वाकणार नाही
कामगार हा औद्योगिक विकासाचा पाया आहे.या पार्श्वभूमीवर त्याचे जीवनमान सुधारणे काळाची गरज आहे.उद्योग जगतात त्याला खऱ्या अर्थाने औद्योगिक क्षेत्राचा कणा देखील म्हटले जाते.अत:त्याचे व त्याच्या कुटुंबियांचे अन्न- वस्त्र-निवारा,शिक्षण,रोजगार व आरोग्य हे मूलभूत प्रश्न मार्गी लावण्यासाठी लोकप्रतिनिधी,शासकीय यंत्रणा अन् कारखानदार(उद्योगपती)
यांनी संयुक्तरित्या सामाजिक बांधिलकीच्या नात्याने प्रयत्न करावेत,जेणेकरून त्यांचे जीवनमान उंचावेल.त्यातूनच त्यांचे जीवनदेखील तुमच्या -आमच्यासारखं सुखी, आनंदी व समृद्ध होऊ शकेल.
मित्रहो,१ मे हा दिवस साऱ्या विश्वात जागतिक कामगार दिन म्हणून पाळला जातो.पण कामगार दिन हा १ मे रोजीच कां पाळला जातो? बंधू भगिनींनो,त्यामागे एक हृदय हेलावून टाकणारा असा कामगारांच्या बलिदानाचा इतिहास आहे.अमेरिकेतील शिकागो* येथे कामगारांनी आपल्या कामाचा कालावधी आठ तासांचा व्हावा,या लक्षवेधी मागणीच्या पूर्ततेसाठी १मे १८८६ रोजी विराट मोर्चा काढला होता.
परंतु तत्कालीन अमेरिकन सरकारने हा मोर्चा बेकायदेशीर ठरवून त्यावर पोलिसांकरवी अमानुषपणे गोळीबार करविला.या कारवाईत असंख्य आंदोलनकारी कामगार धारातिर्थी पडले.या भ्याड घटनेचा साऱ्या जगतात धिक्कार करण्यात आला.पोलिसांच्या या राक्षसी कारवाईचा तीव्र शब्दात निषेधही करण्यात आला.या घटनेत हुतात्म्य पत्करलेल्या कामगारांचे पुण्यस्मरण विश्वातल्या कामगारांना सदैव होत रहावे,या उद्देशाने १ मे हा दिवस वैश्विकस्तरावर कामगार दिन म्हणून पाळण्यात येतो.
आजच्या दिनी शिकागो येथे धारातिर्थी पडलेल्या कामगार बांधवांना राज्यासह देशभर मानवंदना दिली जाते.या दिवशी कामगार व त्यांच्या मुला-मुलींसाठी स्नेहसंमेलनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात.उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कामगारांचा सार्वजनिकरित्या सत्कार केला जातो.शासकीय पातळीवर राज्य कामगार मंडळाच्यावतीने कामगारांसाठी राबविलेल्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती दिली जाते.कामगारांच्या पाल्यांचे शैक्षणिक भवितव्य घडविण्यावर समग्र चर्चा होत असते.थोडक्यात कामगार कल्याणासाठी ठोस उपाययोजना करण्यासंदर्भात संघटितपणे प्रयत्न केले जातात.
कामगार दिनाला उद्देशून संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण म्हणाले की,महाराष्ट्र हे श्रमिकांचे,कष्टकरींचे राज्य आहे.घाम गाळून, काबाडकष्ट करून आपली उपजीविका भागविणारी कामगार संस्कृती महाराष्ट्राला लाभली आहे.स्वाभिमान हा कामगारांचा स्थायीभाव, तर मोडेल पण वाकणार नाही,हा बाणा आहे.सांगण्याचे तात्पर्य म्हणजे कामगार हा औद्योगिक क्षेत्राचा पाठीचा कणा आहे,असे गौरोदगार चव्हाणसाहेबांनी काढले.
कामगार चळवळ अधिकाधिक बळकट करण्यासाठी कामगार संघटनांनी ठोस पावलं उचलावीत.कामगार संघटनांनी कामगारांना विश्वासात घेऊन त्यांचे जिव्हाळ्याचे प्रश्न समजून घ्यावेत.अन् त्या अनुषंगाने ते सोडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत.संघटनांनी छोट्या छोट्या गोष्टींसाठी आंदोलनाचा मार्ग न स्वीकारता,राज्य सरकारच्या कामगार व औद्योगिक विभागाशी तसेच कारखानदारांशी सामोपचाराने बोलणी करून प्रश्न मार्गी लावावेत.बहुतेक मागण्या मान्य झाल्या असतील तर,त्यावर समाधान मानावे अन् उर्वरित मागण्या मान्य पुढील काळात सामंजस्याचा भूमिकेतून विचारविनिमय करून सोडवून घ्याव्यात. केवळ अन् केवळ सरकारला धडा शिकविण्यासाठी संघटनांनी विनाकारण संपाचे हत्यार उपसू नये.कारण ताठर भूमिका घेतल्याने कामगार व त्यांच्या कुटुंबियांचे मोठं आर्थिक नुकसान होऊन अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.
माजी मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांच्या काळात कामगार नेते स्व.दत्ता सामंत यांच्या महत्त्वाकांक्षी अन् हटवादीवृत्तीमुळे तब्बल २८ महिने गिरणी कामगारांचा बेमुदत संप चालला.त्यामुळे हजारो कामगारांचे कुटुंब
देशोधडीला लागले.त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली.त्याची परिणती म्हणजे मुंबईतील कापड गिरण्या बंद पडल्या.कामगारांना अन् त्यांच्या पाल्यांना दोन वेळंच अन्न मिळविण्यासाठी अगरबत्या,मेणबत्या,कंगवे आदी तत्सम वस्तू विकण्यासाठी वणवण भटकावे लागले.भूतकाळातला हा कटू अनुभव लक्षात घेता,सरकार असो वा कामगार नेता..यांनी कुठल्याही परिस्थितीत ताठर भूमिका न घेता,कामगारांचे हित लक्षात घेत सामंजस्याची भूमिका घ्यावी,जेणेकरून कामगार व त्यांची कुटुंबे सुखी-समाधानी व सुरक्षित जीवन जगू शकतील.
आज कामगारांचा निवारा चा मूलभूत प्रश्न आ वासून उभा आहे.प्रत्येक कामगाराच्या डोक्यावर आपल्या मालकीचं छत असणं,हा त्याच्या न्याय्य हक्काचाच एक भाग आहे.या पार्श्वभूमीवर बंद पडलेल्या औद्योगिक वसाहतींच्या जागा विकण्याअगोदर तेथील कामगारांचे आधी पुनर्वसन व नंतर जमीन विक्री या तत्वाअंतर्गत पात्र कामगारांना घरकुलं मिळालीच पाहिजेत.गिरणी कामगारांसह घरकाम करणारे आणि बांधकाम कामगार यांच्यासाठीदेखील राज्य सरकारने काही ठोस योजना आखाव्यात.जेणेकरून त्यांचेही जीवन सुसह्य व आनंददायी होईल.
विविध औद्योगिक आस्थापनांमध्ये कार्यरत असलेल्या पात्र कामगारांनी राज्य सरकारच्या कामगार कल्याण कार्यालय मध्ये आपापल्या नावांची नोंदणी करून घ्यावी.ज्यातून त्यांच्या जॉबला कायद्याचे संरक्षण मिळेल,त्याबरोबरच अन्य सवलती-सुविधाही मिळू शकतील.प्रत्येक क्षेत्रातल्या कष्टकरी कामगारांचे अन्न -वस्त्र-निवारा,शिक्षण,
रोजगार व आरोग्यविषयक प्रश्न सोडविण्यासाठी केंद्र सरकार अन् राज्य सरकार यांनी संयुक्तपणे प्रयत्न करावेत,म्हणजे कामगार दिन साजरा करणं खऱ्या अर्थानं सार्थक होईल.त्याबरोबरच कामगारांच्या हितासाठी ठोस कायदे करणं,त्यांना आठ तासांची वेळमर्यादा निश्चित करणं म्हणजे हीच हुतात्म्य पत्करलेल्या जांबाज कामगारांना खरी मानवंदना ठरेल.कामगार एकजुटीला मराठी भूमिपुत्रांतर्फे मानाचा मुजरा! जागतिक कामगार दिनानिमित्त समस्त कामगार बंधू-भगिनींना हार्दिक शुभेच्छा! जय महाराष्ट्र!
लेखक – रणवीरसिंह राजपूत
गवर्नमेंट मीडिया,महाराष्ट्र शासन
(मो.न.९९२०६७४२१९)
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत