दिन विशेषदेशभीम जयंती 2024महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

बाबासाहेबांचे यशस्वी राज्य-कारण

पी आर सोनवणे (पुणे)

राष्ट्रनिर्माते महामानव, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त सर्व भारतीय जनतेस अनेक हार्दिक शुभेच्छा! बाबासाहेबांचे महान कार्य विविधतेने नटलेले आहे. त्याचे सामाजिक, आर्थिक, राज्य-नैतिक, सांकृतिक, धार्मिक, शास्त्रीय, तत्त्वज्ञान, महिलांचे हक्क-अधिकार, कामगार कल्याण, संविधानिक मानव विकास, शास्वत विकास, कायदा, कल्याणकारी राज्य-राष्ट्र व्यवस्था असे अनेक महत्वपूर्ण पैलू आहेत. परंतु त्यांच्या सर्व कार्याचे निश्चित असे उद्दिष्ट आहे. ते म्हणजे न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुभाव या तत्वप्रणालीवर आधारित समाज आणि राष्ट्राची निर्मिती करणे. आधुनिक भारतात ‘राष्ट्र’ ही संकल्पना महात्मा ज्योतीराव फुले यांनी मांडली. त्यांनी सांगितल्याप्रमाणे सर्व समाजघटक व विशेषतः शोषित घटक असे सर्व लोक विद्वान करणे, विचार करण्यास लायक होणे व सर्व सारखे ‘एकमय’ लोक होणे महत्वाचे आहे. त्याशिवाय राष्ट्र (Nation) बनू शकत नाही. अर्थात, सर्व समाज घटकात असणारी एकात्मतेची भावना म्हणजेच राष्ट्र! आम्ही भारताचे लोक ही भावना संविधानिक लोकशाही मार्गाने वृद्धींगत करण्यासाठी कटिबद्ध आहोत. वास्तविक, राष्ट्रनिर्माण ही सातत्यपूर्ण चालणारी, गतिमान अशी प्रक्रिया आहे. न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व हा या प्रक्रियेचा दिशा व मार्गदर्शक आधार आहे.

बाबासाहेबांनी अनेक वेळा स्पष्ट केले आहे की स्वातंत्र्य, समता, बंधुभाव हे आपले उद्दिष्ट आहे. यासंबंधी काही संदर्भ या चौकटीत दिले आहेत.

  • ०३ ऑक्टोबर १९५४, ऑल इंडिया रेडिओवर ‘माझ्या जीवनाचे तत्वज्ञान’ या विषयावर बाबासाहेबांनी केलेले भाषण
  • २२ डिसेंबर, १९५२ रोजी पुण्यातील न्यायालयात देशातील अनेक कायदेतज्ञ, न्यायाधीश, वकील, लोकशाहीचे अभ्यासक इ. बुद्धीजीवी वर्गासमोर बाबासाहेबांनी लोकशाही या विषयावर केलेले लिखित भाषण
  • १९५६ ला भारतीय जनतेस लिहिलेले खुले पत्र. यात बाबासाहेबांनी जनतेला लोकशाहीची व्याख्या देखील समजून सांगितली.
  • २५ नोहेंबर, १९४९ रोजी संविधान सभेस भारतीय जनतेच्यावतीने संविधान सादर करताना केलेले समारोपाचे भाषण
  • भारतीय संविधानाची उद्देशिका
  • ऑक्टोबर १९५६, धम्मचक्र प्रवर्तन केले त्यावेळी बाबासाहेबांनी व्यक्त केलेले विचार
  • धम्मचक्र प्रवर्तन केल्यानंतर मी धम्म का स्वीकारला या विषयासंबधी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदा, माध्यमातून बुद्धीजीवी वर्गास माहिती देताना (१९५६)
  • स्टेट्स अँङ मायनोरिटीज या आपल्या ग्रंथरुपी संविधान प्ररुपात (१९४५)
  • स्टेट्स अँङ मायनोरिटीज हे संविधान सभेस निवेदन म्हणून सादर करताना (१९४७)
  • १९ मार्च १९४० रोजी स्वतंत्र मजूर पक्षातर्फे एक समारंभ पत्रक काढण्यात आले त्या पत्रकात
  • १३ फेब्रुवारी १९३८ रोजी रेल्वे कामगार परिषदेस संबोधित करताना
  • १९३६ लाहोर कॉन्फरन्ससाठी तयार केलेल्या लिखित भाषणात. हे भाषण जातीव्यवस्थेचे निर्मूलन (Annihilation of Caste) या गाजलेल्या पुस्तक स्वरुपात उपलब्ध आहे.
  • १९ मार्च १९२७ महाड येथील विराट सभेत

असे कितीतरी संदर्भ उपलब्ध आहेत ज्यात बाबासाहेब वारंवार सांगतात की स्वातंत्र्य, समता, बंधुत्व ही आपली उद्दिष्टे आहेत. भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेत ही विचारधारा अधोरेखित केली आहे. संविधानाचे शिल्पकार डॉ. आंबेडकर हे कल्याणकारी अर्थशास्त्र, सार्वजनिक वित्त व्यवस्था, राज-नैतिक अर्थशास्त्र तसेच लोकशाही व्यवस्थेचे जगातील एक सर्वश्रेठ विद्वान आहेत.

संविधान लागू झाल्यानंतर लोकशाही या विषयावर प्रबोधन करण्यासाठी बाबासाहेबांनी भारतीय जनतेस उद्देशून एक खुले पत्र लिहिले. त्यामध्ये लोकशाहीची व्याख्या सांगितली आहे. “रक्तपाताशिवाय अर्थात शांततेच्या मार्गाने जनतेच्या आर्थिक आणि सामाजिक जीवनात अमुलाग्र परिवर्तन घडविणारी शासन-प्रशासन व्यवस्था व पद्धती म्हणजेच लोकशाही होय.”

२१ व्या शतकात संसदीय लोकशाही व्यवस्था बळकट करण्यासाठी आपल्याला बाबासाहेबांचे यशस्वी राज्य-राष्ट्रकारण समजून घ्यावे लागेल. त्यांनी वेळोवेळी अवलंब केलेल्या पद्धती विचारात घ्याव्या लागतील. या लेखात बाबासाहेबांनी विकसित केलेल्या दोन पद्धती आपण थोडक्यात पाहू या. यातील एक आहे प्रभावी प्रशिक्षण व्यवस्था व दुसरी आहे प्रबोधन माध्यम व्यवस्था. बाबासाहेबांनी राज्य-कारण प्रशिक्षण व्यवस्था भारतात इंग्रज असताना, इंग्रज भारत सोडून जात असताना व स्वातंत्र्य मिळून प्रजासत्ताक भारतात संविधान लागू झाल्यावर अश्या तीन वेळा राबविली. सुरुवातीस डिप्रेस्ड क्लास इन्स्टिट्यूट, विद्यार्थी संसद व ट्रेनिंग स्कूल फॉर एंट्रन्स टू पॉलीटिक्स हे ते तीन प्रयोग होते. राष्ट्रनिर्माण प्रक्रिया गतिमान करण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्ष व द ऑल इंडिया शेड्युल कास्ट फेडरेशन च्या माध्यमातून राष्ट्रीय पातळीवर अत्यंत यशस्वी राजकारण केले. स्वतंत्र मजूर पक्षाचा, पहिल्याच निवडणुकीचा जाहीरनामा, राष्ट्रनिर्माण प्रक्रियेचे महत्त्व अधोरेखित करतो. डिप्रेस्ड क्लास इन्स्टिट्यूटचा मोठा फायदा स्वतंत्र मजूर पक्षास झाला. विद्यार्थी, युवक-युवतींनी राज्य-कारण करावे यासाठी विद्यार्थी संसद महत्त्वाची होती. याची प्रेरणा घेवून देशातील वेगवेगळ्या शहरात फुले शाहू आंबेडकर विचारांच्या युवा वर्गाने हा उपक्रम राबविला. पुढे संविधान लागू होवून सहा वर्षांनंतर १९५६ साली बाबासाहेबांनी ट्रेनिंग स्कूल फॉर एंट्रन्स टू पॉलीटिक्स चा अभ्यासक्रम आराखडा बनविला. ते स्वत: धम्माचक्र प्रवर्तन कार्यात व्यस्त असल्याने त्यांनी आपल्या योजनेनुसार मा. रेगे यांना सविस्तर पत्र लिहून ट्रेनिंग स्कूलचे कार्य सुरु करण्यास सांगितले. १९५६ च्या डिसेंबर मध्ये बाबासाहेब या ट्रेनिंग स्कूल साठी स्वत: मार्गदर्शन करणार होते. परंतु ६ डिसेंबर १९५६ ला बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाले व हे कार्य हवे तसे पुढे जावू शकले नाही. भारतीय लोकशाहीसाठी ते कार्य आजच्या संदर्भात विकसित करून पुढे घेवून जाणे काळाची गरज आहे. बाबासाहेबांच्या यशस्वी राज्य-कारणासंबधी दुसरी महत्वाची बाब म्हणजे राज्य-कारण प्रबोधन माध्यम व्यवस्था.
यशस्वी राज्य-कारणासाठी बाबासाहेबांची प्रसार माध्यमे:
राष्ट्रनिर्माण ही सातत्यपूर्ण, निरंतर, गतिमान प्रक्रिया असल्याने या प्रक्रियेचे प्रबोधन साधन म्हणून माध्यमांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रसार माध्यमाचे महत्व सांगताना बाबासाहेब म्हणतात की, ‘वृत्तपत्र’ हे आधुनिक लोकशाही व्यवस्थेत श्रेयस्कर सरकारचा मूलभूत आधार आहे. ते लोक-शिक्षणाचे एक महत्वपूर्ण साधन आहे. संसदीय लोकशाहीत कोणत्याही सामाजिक, राजकीय संघटनेची यशस्वी वाटचाल होण्यासाठी ज्या अनेक बाबी आवश्यक असतात; या सर्व गोष्टीपैकी स्वतःचे संस्थात्मक, सुसंगठीत, एकात्मिक, अत्याधुनिक प्रसार-माध्यम व्यवस्था विकसित करणे ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे.

बाबासाहेबांनी मूकनायक (१९२०), बहिष्कृत भारत (१९२७), जनता (१९३०), प्रबुद्ध भारत (१९५६) इ. वृत्तपत्रांची निर्मिती केली हे आपण जाणतो. परंतु राजकीय पक्ष संघटनेचे महत्त्वाचे अखिल भारतीय अंग म्हणून “People’s Herald” या इंग्रजी साप्ताहिका विषयी आपणास विशेष माहिती नाही. हे साप्ताहिक बाबासाहेबांच्या मार्गदर्शनात बंगाल प्रांतातील त्यांचे सहकारी चालवित होते. संपादक म्हणून सन्माननीय पी. सी. डे यांनी जबाबदारी स्वीकारली होती. या वृत्तपत्राचे ३ जानेवारी १९४५ ला बाबासाहेबांच्या हस्ते, मोठया समारंभपूर्वक उद्घाटन करण्यात आले होते. कार्यालयीन पत्ता: १-२ सीताराम घोष मार्ग, कलकत्ता येथून हे वृत्तपत्र प्रकाशित होत असे. त्याचवेळी हे साप्ताहिक सुरू करण्यामागची कारणमिमांसा सुस्पष्ट केलेली होती. “People’s Herald” या साप्ताहिकाचा, लवकरच उदयास येणाऱ्या नवभारतात होणारा प्रकाशन उद्देश अशा प्रकारे स्पष्ट करण्यात आला होता की, हे वृत्तपत्र समाजाच्या भावना, विधिसंगत आकांशा, तक्रारी व मागण्या यावर आवाज उठवण्यासाठी तसेच भारतासमोरील वर्तमान समस्या आणि भविष्यातील भारतीय राज्यांची संरचना; याकडे पाहण्याची दृष्टी विकसित करणे इ. कारणांमुळे आपल्या राजकीय पक्ष संघटनेचे अखिल भारतीय अंग म्हणून सुरु करण्यात आले. [Ref. People’s Herald, dated 10th January, 1945, Dr. Babasaheb Ambedkar Writings and speeches Vol. 17, part 3, page 346] डॉ बाबासाहेब आंबेडकर बंगाल प्रांतातील खुलना व जस्सोर या मतदारसंघातून; काँग्रेसने त्यांच्या विरोधात सर्वप्रकारचे षडयंत्र करून देखील; संविधान सभेवर मोठ्या मताधिक्याने निवडून गेले होते. बाबासाहेबांनी लढविलेल्या या अतिमहत्वाच्या निवडणूकीतील यशात या वृत्तपत्राची खुप महत्वाची भूमिका आहे.

बाबासाहेबांनी People’s Heralds च्या उद्घाटन प्रसंगी सल्ला दिला होता की, वृत्तपत्राने मतदारांना केवळ शिक्षित करणेच नव्हे तर मतदारांनी निवडून दिलेले प्रतिनिधी मतदारांप्रती कसे समर्पित होते, तसेच त्यांनी त्यांचे कर्तव्य व्यवस्थितपणे बजावले की नाही व कुठलेही गैरवर्तन केले नाही हे पहावे. जर People’s Heralds हे वर्तमानपत्र आपल्या जागेचा काही भाग; विविध विधिमंडळातील आपल्या सदस्यांचे वर्तन लोकांना सांगण्यासाठी, त्यांनी सभागृहात हे का केले वा त्यांनी ते का केले नाही याचे वार्तांकन करण्यासाठी देऊ केले तर आपल्या विधानसभा सदस्यांच्या वर्तनामध्ये मोठया सुधारणा होतील याबद्दल माझ्या मनात संकोच नाही. तसेच त्यामुळे आपल्या समाजाला कलंक आणणारी सद्याची बजबजपुरी थांबेल. जे आपल्या राजकीय जीवनात चुकीच्या मार्गाने गेले आहेत त्यांचे परिमार्जन करण्यासाठी एक मोठे साधन म्हणून मी हा पेपर पहात आहे. [संदर्भ: डॉ बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड १७ , भाग ३, पृष्ठ ३४८ ]
People’s Heralds संदर्भात वृत्तपत्राचे महत्त्व विशद करताना बाबासाहेब सांगतात की, “सध्याच्या युगात वर्तमानपत्राचे अत्यंत महत्त्व आहे. आपापल्या पक्षांचा प्रचार करण्याकरिता इतर पक्ष हजारो रुपये खर्च करून वर्तमानपत्रे चालवितात. जनतेपुढे आपली राजकीय आणि नैतिक बाजू मांडण्यासाठी व त्याचप्रमाणे आपण निवडून दिलेल्या प्रतिनिधींच्या कार्याची माहिती देण्यासाठी वर्तमानपत्रांची आवश्यकता आहे. आपल्या चळवळीचा दृष्टिकोन मांडण्याकरिता आज आपणास प्रांतोप्रांती अनेक वर्तमानपत्रे पाहिजे आहेत.” [संदर्भ: डॉ बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड १८ , भाग २, पृष्ठ ४८६ ]

बाबासाहेबांच्या राज्य-राष्ट्रकारणाचे आजच्या संदर्भात महत्व:
आज संयुक्त राष्ट्रसंघाच्या माध्यमातून जगात सर्वत्र मानव विकास व शाश्वत विकास याची चर्चा सुरु आहे. आज मानव विकासा संबधी जे मापदंड जगात वापरले जातात ते व शाश्वत विकासचे सर्व उद्देश वापरले जातात ते सर्व भारतीय संविधानात २६ जानेवारी १९५०पासून अंतर्निहित आहेत. भारतीय संविधान, मानव विकास, शाश्वत विकास हे विषय समजून घेत असताना हे स्पष्ट होते की, भारतीय संविधान हे मानव विकास व शाश्वत विकास याचा जगातील सर्व श्रेष्ठ असा ‘सचेत’ दस्तावेज आहे. मानव विकास निर्देशांक चांगला असावा यासाठी जगभर कार्य सुरु आहे. या आधुनिक संकल्पनेचे जनक आहेत अमर्त्य सेन व पाकिस्तानचे मकबूल उल-हक. या विचारांनी प्रेरित वेल्फेअर इकॉनॉमिक्स या क्षेत्रात कार्य करणारे जागतिक किर्तीचे अनेक संशोधक कार्यरत आहेत. अमर्त्य सेन यांना जागतिक किर्तीचा नोबेल पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर अनेक मुलाखतीमधून त्यांनी वेळोवेळी सांगितले आहे की, भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे माझ्या सामाजिक आणि आर्थिक विचारांचे प्रेरणास्त्रोत आहेत. संयुक्त राष्ट्र संघाने एक श्‍वेत पत्रिका काढून असे घोषित केले आहे की, संयुक्त राष्ट्र संघाचे जे सदस्यदेश आपआपल्या देशात समता, स्वातंत्र्य बंधुता आणि न्याय या तत्वप्रणालीवर अधारित कल्याणकारी व्यवस्था स्थापित करण्यासाठी प्रयत्न करत आहेत अशा देशांच्या सोबत संयुक्त राष्ट्र संघ भक्कमपणे उभे राहील. म्हणजे भारतीय संविधानाची विचाराधारा आता केवळ भारतापुरती मर्यादित राहिलेली नसून ती संपूर्ण जगाची विचारधारा बनली आहे. १९५६ ला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा बौध्द धम्म स्वीकारला तेव्हा आंतरराष्ट्रीय पत्रकारांनी त्यांना प्रश्‍न विचारला होता की, तुम्ही बौध्द धम्मच का स्वीकारला? त्याचे उत्तर देतांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की, बौध्द धम्मात बंधुभाव आहे, समता आहे, न्याय आहे, स्वातंत्र्य आहे म्हणून मी बौध्द धम्माचा स्वीकार केला आहे. म्हणजे भारतीय संविधानात जो उद्देश समाविष्ट केला आहे तो उद्देश बौध्द धम्मातील आहे. भारतीय संविधान हे भारतीय संस्कृती, सभ्यता, सृजनशीलता, आजची आधुनिकता व उज्वल भविष्याची दृष्टी यांचा सुरेख संगम आहे. ही विचारधारा आमच्यासाठी प्रेरणेचा स्त्रोत आहे. आम्ही भारताचे लोक आमच्या संविधानाची उद्देशिका, विचारधारा, मुलभावना, नीतीमुल्ये, मार्गदर्शक तत्वे, कार्यक्रम इ. चे संवर्धन करण्यासाठी कटिबद्ध राहू! महामानवाच्या जयंतीनिमित्त हेच आमचे अभिवादन! सर्व भारतीय जनतेस बाबासाहेबांच्या जयंतीच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा!

जय भारत! जय भारताचे संघराज्य! जय राज्य-राष्ट्र! जय संविधान!

पी आर सोनवणे (पुणे)
लेखक राष्ट्रनिर्माण जन परिषदेचे संस्थापक अध्यक्ष तसेच लोकशाही संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेचे संयोजक आहेत.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!