
धनगर आरक्षण कृती समितीच्या अंदोलन प्रसंगी कार्यकर्त्याची डरकाळी
नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे
सरकारने धनगर समाजाला तात्काळ एसटीचे आरक्षण द्यावे अन्यथा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत सरकारला याचे गंभीर परीणाम भोगावे लागतील असा कनखर इशारा धनगर आरक्षण कृती समितीचे राम जवान सह कार्यकर्त्यांनी धनगर आरक्षण कृती समितीच्या वतीने इटकळ ता. तुळजापुर येथे राष्ट्रीय महामार्गावर आयोजित केलेल्या रास्ता रोको आंदोलन प्रसंगी देण्यात आला
धनगर समाजाला तात्काळ एस टी चे आरक्षण द्यावे या मागणीसाठी दि. १ ऑक्टोबर रोजी सकाळी ११:०० वा. धनगर आरक्षण कृती समितीच्या वतीने इटकळ ता. तुळजापुर येथे राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात तालुक्यातील धनगर समाज मेंढरासह मोठया संख्येने सहभागी झाला होता. यावेळी धनगर समाज बांधवांनी डोक्यावर पिवळी टोपी परीधान केल्याने महामार्गावर पिवळे वादळ आल्याचा भास निर्माण झाला होता. हा रास्ता रोको एक तासापेक्षा जास्त वेळ चालल्याने महामार्गाच्या दोन्ही बाजुला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.यावेळी महामार्गारून रुग्णवाहीका जात असतांना आंदोलन कर्त्यांनी रुग्णवाहिकेला जाण्यासाठी रस्ता मोकळा करुन दिला.
या आंदोलनात तालुक्यातील धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाला होता. सर्व पक्षाचे पदाधिकारी केवळ धनगर समाजासाठी पक्षाचे जोडे बाजुला ठेऊन या आंदोलनात सहभागी झाले होते.
यावेळी माजी जि. प. सदस्य गणेश सोनटक्के, दीपक घोडके, अरविंद घोडके, ॲड. आशिष सोनटक्के, सोमनाथ गुड्डे, ज्ञानेश्वर घोडके, बाळकृष्ण घोडके पाटील, निखिल घोडके, संजय घोडके, दादा भोपळे, अनिल बंडगर,अरविंद पाटील यांच्यासह अनेकांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सरकारवर सडकुण टीका केली. सरकारने तात्काळ धनगर समाजाला एसटीचे आरक्षण द्यावे अन्यथा धनगर समाज राज्यातील सरकार उलथवुन टाकेल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.
यावेळी बोलतांना राम जवान यांनी सर्वच राजकीय पक्षांनी आजपर्यंत धनगर समाजाचा विश्वासघात केला आहे. फक्त निवणुकी पुरते धनगर समाजाचा वापर करुन घेण्याचे काम राजकीय पक्षांनी केले आहे. मात्र आज ती परीस्थिती राहिली नाही आज आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज पेटुन उठला आहे. त्यामुळे सरकारने आता तात्काळ धनगर समाजाला एसटीचे आरक्षण द्यावे अन्यथा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत धनगर समाज सरकारला त्याची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही असे म्हटले आहे.
या आंदोलनात अप्पासाहेब पाटील, विजय श्रीनामे,सचिन घोडके, ज्ञानेश्वर घोडके, गजानन हळदे,शहाजी हाके, दयानंद चौरे, पद्माकर घोडके, शंकर पाटील, सुहास येडगे, विलास येडगे, अमर भाळे यांच्यासह संपुर्ण तालुक्यातुन धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे या आंदोलनात सहभागी झाला होता.यावेळी आंदोलनस्थळी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत