बुध्दधम्म आणि स्त्री

भारतीय बौद्ध महासभा:स्थिती आणि गती

विश्वास पवार
*9619989462
बुद्धधम्म आणि स्त्री,अशी मांडणी करीत असताना,बुध्दांचा स्त्री विषयक द्रुष्टीकोन समजून घेण्यापूर्वी, पिढ्यानपिढ्या स्त्रियांवर गुलाम म्हणून जगण्याची वेळ का आली?हे प्रथम समजून घेतले पाहिजे.एकेकाळच्या सिंधू संस्कृतीत राज्यकर्त्या म्हणून त्यांचा पुर्व इतिहास गौरवशाली होता,त्यांची बुध्दिमत्ता पुरूषांपेक्षा कमी नाही तर किंचित जास्तच आहे.आजही पहा एखादी संसारीक स्त्री उत्तम संसार करते.या अशा महागाईच्या जगात सुध्दा नवऱ्याच्या तूटपुंजा कमाईत काटकसरीने आपला परिवार नेटका ठेवणारी स्त्री आजही पहायला मिळते हे सत्य आहे. अंगुत्तर निकाय या ग्रंथात एके ठिकाणी भिक्खूंनी बुध्दांना प्रश्न विचारला होता की,” या जगात चक्रवर्ती राजा जेव्हा अस्तित्वात येतो तेव्हा काय होते?” यावर बुध्दाने त्यांना उत्तर दिले,”जेव्हा असा सम्राट अस्तित्वात येतो तेव्हा सात भंडारे अस्तित्वात येतात.रथ, हत्ती,घोडे,रत्ने,स्त्रिया,कुटुंबाचा शास्ता पिता आणि गदीचा वारसदार राजकुमार ही ती सात भंडारे होत.”
कुटुंबात मुलगी जन्मली तर त्या कुटुंबाने दु:ख न मानता आनंद मानावा.जी कुटुंबे कारभार स्त्रीच्या हातात देतात ती कुटुंबे विनाशापासून मुक्त होतात. स्त्री ही सात भंडारापैकी एक अत्यांत मौल्यवान भंडारा आहे,अशी स्त्री विषयक बुध्दांची मते होती.अशा अर्थाचा त्यांचा उज्वल भूतकाळ धर्ममार्तंड्यांनी त्यांच्या पुढे ठेवलाच नाही. उलट ब्राम्हणशास्त्राने असंख्य धर्मबंधने लदून स्त्रियांचा इतिहासच पुसून टाकला.आणि तीला गुलामगिरीची जाणीव म्हणून पतीला परमेश्वर मानायला लावल,एखाद्या पतीच्या बाहेरख्याली व्रुत्तीकडे दुर्लक्ष करून “सात जन्म हाच पती मिळू दे म्हणून वडाच्या झाडाभोवती फेरे मारावयस लावले,चूल आणि मूल मी बाईमाणूस माझी बुद्धी एवढ्याचपुरती असे घातकी विधान करणे तीच्या अंगवळणीच पडले.अशा बिकट आणि मरणयातनेच्या काळात सर्वप्रथम महाप्रज्ञावंत तथागत बुध्दाने स्त्रियांच्या व्यथांची दखल घेऊन त्यांच्या बंधमुक्तीचा मार्ग शोधला.यावरू बुध्दाच्या स्त्रीवर्गासंबधी भावना समजून न घेता बुद्ध स्त्रीजातीचा तिरस्कार व धिक्कार करीत असे असा आरोप केला असता बाबासाहेबांनी त्याचे केलेले खंडण खलीलप्रमाणे आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर “हिंदू स्त्रियांची उन्नती आणि अवनती” या लेखात म्हणतात,”
भिक्खूंच्या आधिपत्याखाली भिक्खूणींना बुध्दाने ठेवले, त्यामुळे एक मोठा सामाजिक गुन्हा केला, असे जे मानतात त्यांना बुध्दांनी स्त्रीवर्गात संन्यासदीक्षा घेण्याची मुभा दिली,हे त्यांचे समाजक्रांतिकारक क्रुत्य होय,याची जाणीव झालेली नसावी.त्या काळात ब्राह्मणी धर्म स्त्रियांना ज्ञानार्जन करण्यास मुभा देत नव्हता स्त्रीने संन्यास घ्यावा का,हा प्रश्न त्याकाळी उत्पन्न झाला. तेव्हा ब्राह्मणी धर्माने स्त्रीवर्गावर दुसरा एक मोठा अन्याय केला.ब्राह्मण वेदाची पुजा करीत असत.त्यांना संन्यास हा आदर्शमय वाटत नव्हता.उपनिषदे हे पवित्र धार्मिक ग्रंथ होत,असे पुष्कळ काळापर्यंत मान्य केले नव्हते.ही एतिहासिक घटना आहे, तर्कट नव्हे.उपनिषदे संन्यासाला आदर्श समजत होती.आत्मा हा ब्रम्ह होय,ही उपनिषदातील प्रमुख शिकवण होय.ती शिकवण आत्मसात करणे, हे संन्यास व्रुत्तीचे ध्येय होते.पण ब्राह्मण लोक संन्यासी जीवनाचे कट्टर विरोधक होते.संन्यासी व्रुत्तीबद्दल जे कडाक्याचे वादविवाद झाले त्यात शेवटी ब्राम्हणांनी संन्यासव्रुत्तीला मान्यता दिली. ती मान्यता काही अटींवर होती.त्यापैकी एक अट अशी होती की स्त्रिया आणि शूद्र यांना संन्यासव्रुत्तीचा अधिकार नसावा.
बुध्दा नंतर झालेल्या मनूंनी,जी काही आपली मत व्यक्त केलेली आहेत ती,पुर्वी अस्तित्वात असलेल्या ब्राह्मणी धर्मग्रंथांतील विचारसरणीला धरून केलेली आहेत हे उघड करताना डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात,”स्त्रियांना वेद शिकण्याचा अधिकार नाही. म्हणून त्यांचे संस्कार वैदिक मंत्रांशिवाय करावयाचे असतात. स्त्रियांना धर्माचे ज्ञान नसे,कारण त्यांना वेद शिकण्याचा अधिकार नव्हता.वैदिक मंत्र उच्चारले तर पाप नष्ट होते.ज्या अर्थी स्त्रिया वैदिक मंत्र उच्चारु शकत नाहीत त्याअर्थी त्या असत्य (पापमय)स्थितीत राहणऱ्या होत.”
प्राचीन भारताचा इतिहास ज्यांनी थोडाफार वाचला आहे त्यांना हे विधान कबुल करावे लागेल की,बुध्दकाळ सोडला तर गेल्या आडीच ते तीन हजार वर्षात स्त्रियांना आजच्या सारखा श्वास घेता येत नव्हता. असे असताना जगातले सर्व धर्मसंस्थापक पुरुषच आहेत. त्यामुळे त्यांनी मांडलेले तत्वज्ञान देखील पुरूषसत्ताक वादाकडे झूकलेले आहे.
जगात बुध्दानंतर विश्वधर्म होण्याचा मान प्रथम ख्रिश्चन धर्माला आणि नंतर इस्लाम धर्माला मिळाला त्या ख्रिस्ती आणि महंमद पैगंबर यांची स्त्री विषयक मते काय होती हे थोडक्यात तपासून घेतली पाहिजेत. तथागत बुध्दानंतर प्रभू येशूचा जन्म पाचशे वर्षाने झाला तर येशूनंतर महंमद पैगंबराचा जन्म सहाशे वर्षांनी झाला. असे असताना, ख्रिस्त आणि इस्लाम या दोन धर्मात समानता दिसून येते, यहुदी धर्मातील मोझेस आणि येसू ख्रिस्त हे अल्लाहचे प्रेषित म्हणून कुरणात आदरणीय मानले.एक लाख चोवीस हजार प्रेषित प्रुथ्वीवर पाठविल्याचा पैगंबर साहेबांनी केलेला उल्लेख कुराणात दिसून येतो तसा उल्लेख बायबल व ज्यू धर्मग्रंथांतही सापडतो.वरीलप्रमाणे दोन धर्मातील साम्य लक्षात घेता स्त्री संबंधाने त्यांचे धोरणही जवळपास सारखेच असले पाहिजे. बायबल मध्येल स्त्री उत्पत्तीचा सिध्दांत मांडलेला आहे इश्वराने प्रुथ्वी निर्माण केल्यानंतर एडम (पुरूष)निर्माण केला.आणि त्याला प्रुथ्वीवर पाठवला.तो एडम एकटाच प्रुथ्वीवर वणवण भटकताना पाहून इश्वराला त्याची दया आली आणि इश्वराने या एडमला एक जोडीदार देण्याचे ठरवले.त्याप्रमाणे एडम झोपलेला असताना इश्वराने त्याची एक फसली काढून ईव्ह(स्त्री)बनवली इश्वराने त्याच्या अनेक फसल्यांपैकी केवळ एक फसली काढून ईव्ह तयार केली यावरून स्त्री ही जन्मजात पुरूषांपेक्षा दुर्बल सिद्ध होते.
कुराण ए शरीफ मध्ये स्पष्ट म्हटले आहे की, एक लाख चोविस हजार प्रेषितांना (नबींना)अल्लाहने प्रुथ्वीवर पाठवले मात्र त्यात एकही स्त्री प्रेषित अथवा नबी नाही. कारण स्त्रिया त्या लायकीच्या नाहीत, पुरूषांपेक्षा कमी दर्जाच्या आहेत आणि म्हणून स्त्रियांना या धार्मिक कार्यासाठी निवडले नाही.कुरण स्पष्ट म्हणते.मी स्त्रीला कधीच असा आदेश दिला नाही की, तिने पुरूषाला शिक्षा द्यावी,ती पुरूषाला शिक्षा देऊच शकत नाही. कुराण सांगते की,तूमच्या पत्नी तूमच्यासाठी शेती (तूक्षचा वंशवृद्धी करणाऱ्या जननी)आहेत. जेंव्हा तूमची इच्छा होईल तेव्हा तिच्याकडे जा.म्हणजे स्त्रियांच्या इच्छेचा प्रश्नच येत नाही. बायबलच्या जुन्या करारात आद्य पापाचे खापर एकट्या ईव्ह (स्त्रीवर) फोडण्यात आलेले आहे. तर कुरणात दोघांनाही दोषी ठरविले गेले आहे.(संदर्भ:-स्त्रियांचा महान उध्दारक बुद्ध ले प्रा.डॉ दिनेश मोरे प्रुष्ठ क्र.२५,२४)
पुरूषप्रधान वर्चस्ववादी विचार प्रणाली प्रस्थापित होण्याअगोदर,केरळातील मात्रूसत्ताक नायर,आसामचे खसी यांसारखे काही अपवाद वगळता आज सारा भारत पित्रुसत्ताक असला तरी,कॉ.शरद पाटील यांच्या “दास शुद्रांची गुलामगिरी”या ग्रंथात एक पुरावा सापडतो की,”खसी व केरळीय समाजाने भारतात मात्रूसत्ताक कुटुंबपद्धती होती हे सिद्ध केले आहे. प्रारंभीची मानवाची देवकल्पना ही मात्रूस्वरुपातच होती.पौरोहित्यकार्य देखील मुळात स्त्रियाच्याच हाती होते.आजही काही देवस्थानात पुरूष पुरोहित स्त्रीवेश धारण करूनच पुजा करतात.
पत्नीला पतीपासून विभक्त राहण्यास मनाई करणारा कायदा मनूने केला,एवढेच नाही तर मनूने विवाह हा पवित्र विधी मानला याबद्दल बरेच हिंदू लोक मनूची मनसोक्त स्तूती करतात आणि असा कायदा इतर देशात नाही म्हणून ते अभिमानने सांगतात. शिवाय मनूने घटस्फोटाला मान्यता दिली नाही. मनूने घटस्फोटाचा जो कायदा केला त्यात त्याचा हेतू अगदी वेगळा होता.स्त्रीला पुरुषाबरोबर जखडून ठेवणे आणि पुरुषाला हवे तसे वागण्याचे स्वातंत्र्य देण हा मनूचा विचार होता. ही विचारसरणी सत्याला धरून नाही असे डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात.
संघ-भाजपची स्त्रियांबद्दलची भूमिका आज विचारात घेण्यासारखी आहे.आरएसएसला स्त्रियांचे स्वतंत्र अस्तित्व मान्य नाही. भाजपचे अनेक नेते स्त्रियांबद्दल अतिशय खालच्या पातळीवर जाऊन बोलतात,हल्ली तर हे प्रमाण अधिकच वाढताना दिसते,त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या वक्तव्यात सुध्दा संघ संस्कारांचा प्रभाव दिसून येतो.
संघाची महिलांसाठी “राष्ट्र सेविका समिती” म्हणून पोटसंस्था आहे. या राष्ट्र सेविका समिती मार्फत महिलांना शारीरिक शिक्षणाचे प्रशिक्षण दिले जाते. हिंदू सुदृढ व दणकट महिलांनी सुदृढ व दणकट मुले जन्मास घातली तर भविष्यकाळात त्यांची मुले सुदृढ व दणकट बनतील असे या राष्ट्र सेविका समितीच्या कार्याचे तात्विक समर्थन आहे. तसेच या समितीकडून केशरचना आणि पाकशास्र यांचेही शिक्षण दिले जाते.ही समिती हुंडा पध्दती आणि सतीची चाल यांचे समर्थन करते,तसेच ही समिती घटस्फोटालासुध्दा मान्यता देत नाही.हिंदू कुटुंबातील महिलांनी त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायासाठी किंवा त्यांच्या हक्कासाठी कसल्याही प्रकारे समुपदेश करुन घेऊ नये,असे या समितीचे मत आहे. अशा रीतीने संघपरीवाराने महिलांबाबत नेहमीच पुरुष प्रधानतेचा पुरस्कार करणारा द्रुष्टीकोन स्वीकारून महिलांना त्यांच्या चूल,मूल आणि पतीसेवा या भूमिकेभोवतीच जखडून ठेवले आहे. संघपरिवाराच्या मते,स्रि-पुरूष समानतेचे तत्व त्यांच्या पारंपरिक कर्तव्याच्या मर्यादेतच विचारात घेतले जाते,त्यात महिलांच्या कमी महत्वाच्या व पतीसेवा,चूल व मूल या मर्यादित भूमिकेबाबत संघ कुठेही तडजोड करायला तयार नाही. याबाबत ते कोणताही बदल स्वीकारायला तयार नाहीत.(संदर्भ:स्वयघोषित देशभक्तांचे वास्तव लेखक चंद्रकांत झटाले प्रुष्ठ क्र.१६२,१६३)
तथागत बुध्दाने जगाच्या इतिहासामध्ये सर्वप्रथम स्त्रियांना धम्म संघात प्रवेश देऊन “धर्माधिकारी” बनविले,ही कृती त्यावेळी नवलपुर्णच नव्हे,धाङसाची होती. वैदिक आर्य ब्रम्हणांनी नाकारलेला शिक्षणाचा अधिकार स्त्रियांना बहाल करण्यत आला.स्त्रियांच्या बुध्दिमत्तेला चमक येताच त्या जनसमुहाला प्रवचने देऊ लागल्या.धम्माचे ज्ञान सांगू लागल्या.पुरूषांसोबत चर्चा करू लागल्या.
ज्ञानप्राप्तीनंतर तथागत बुध्दाचे कार्य क्रांतिकारी म्हटले पाहिजे ते म्हणजे,भिक्खूणी संघ स्थापन करून त्यांना धम्माचा प्रचार आणि प्रसाराचे अधिकार देऊन तीला ग्रुहसंसारातून बाहेर काढले. समाजाच्या पारंपरिक जाचातून सूटका केली.
बुध्दानंतर जोतिबा फुले यांचेही स्त्रियांविषयी कार्य समजून घेतले पाहिजेत.जोतिबांनी तर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाऊन ब्राम्हणांना सहकार्य केलेले दिसेल. उदा.मुलींची शाळा सूरु करून स्त्री शिक्षणाची सूरवात केली,त्या शाळेत प्रथम शिकणऱ्या मुली ह्या ब्राम्हण होत्या.इतर कोणत्याही प्रचलीत म्हणजे तेली तांबोळी माळी या जाती सोडल्या तर विधवांचे केशवपन करण्याची प्रथा केवळ कोकणस्त ब्राम्हणात होती. त्या कोकणस्त विधवा स्त्रियांचे केशवपण करण्यात येऊ नये म्हणून न्हाव्यांचा रोजगार बुडवून संप घडवून आणला.भ्रुनहत्या टाळण्यासाठी स्त्रियांच्या सूतिकाग्रुहात ज्या सुखरूप प्रसूत झाल्या त्या बेचाळीस महिला ब्राह्मण होत्या.जोतिबा सावित्रीबाईंनी ज्या मुलाला दत्तक घेतले ते मुलही एका ब्राह्मण स्त्रीचेच होते.जोतिबांच्या या कार्याकडे पाहताना आपल्या निश्चित लक्षात येईल की, त्यांनी ब्राह्मणी प्रव्रुत्तीवर टीका केली, ब्राह्मणी धर्मावर टीका करताना त्यांनी केवळ ब्राह्मण,क्षत्रिय व वैश्य यांना आपल्या टीकेचे लक्ष्य केले,परंतु त्यांचा द्वेष केला नाही कारण काय तर,त्यांच्या कार्याचा केंद्रबिंदू हा माणूस होता.हे उघड सत्य कोणाला नाकारता येणार नाही.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदु धर्म सोडण्याचे जाहीर केले होते. तरीही हिंदु महिलांसाठी ते अखेरण्या श्वासापर्यंत लढले.महिलांना मानवी अधिकार मिळावेत या मुख्य कारणासाठी बाबासाहेबांनी आपल्या केंद्रातल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला.
२४ फेब्रुवारी १९४९ रोजी “हिंदू कोड बील” हिंदू संहिता विधेयक म्हणजे भारतातील कायद्याचा मसूदा संसदेत मांडला गेला.डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी चार वर्षे एक महिना,संव्वीसदिवस एवढा काळ यावर काम करून हे हिंदू कोड बील तयार केले.ते मंजूर होऊ शकले नाही. त्याला पंतप्रधान म्हणजे नेहरू जबाबदार होते.
“हिंदू कोड बील” मंजूर होऊ नये, यासाठी हिंदू महासभा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांनी संसदेत येऊन गोंधळ घातला. एवढेच नाही,संसदेबाहेर निदर्शने केली. या विधेयकाने अनैतिकता वाढेल,संसार संपतील,घटस्फोट वाढतील असे या लोकांनी जाहीर केले,परंतू ते आज खोटे ठरलेले दिसते.बाबासाहेबांचे कष्ट वाया गेले नाहीत.
नेहरूंना आधी शक्य झाले नाही आणि त्यामुळे बाबासाहेबांनी राजीनामा दिला; हे खरे,पण पुढे नेहरूंनीच हिंदू कोड बीलाचे चार वेगवेगळे भाग केले १)हिंदू विवाह कायदा २)हिंदू वारसा हक्क कायदा ३)हिंदू पालकत्व कायदा ४)हिंदू दत्तक आणि पोटगी कायदा. हे १९५५-१९५६ मध्ये कायदे मंजूर करून घेतले.(संदर्भ:-बाप पळवणारी टोळी आलीय!या पुस्तकातील गांधी+नेहरू+आंबेडकर=भारत!लेखक संजय आवटे संपादक डॉ श्रीरंग गायकवाड प्रुष्ठ क्र.५५/५६)
डॉ बाबासाहेब आंबेडकर आईसाहेब म्हणजे रमाबाई आंबेडकर यांना पत्रात लिहितात,” मी स्त्री मुक्तीसाठी व स्त्री उन्नतीसाठी लढणारा एक योध्दा आहे. स्त्रियांची प्रतिष्ठा वाढविण्यासाठी आवश्यक जो संघर्ष केला त्याचा मला सार्थ अभिमान आहे.”
यावरून ङाॅ. बाबासाहेबांची स्त्रीविषयक भूमिका स्पष्ट होते तसेच भारतीय संविधानासंबंधी दिलेल्या अखेरच्या भाषणात बाबासाहेब आयरिश देशभक्त ङॅनियल ओ काॅनल यांचे एक प्रसिध्द वाक्य उद्धृत करतात,
” कोणताही माणूस स्वाभिमानाचा बळी देऊन कृतज्ञता व्यक्त करू शकत नाही.कोणतीही स्त्री स्वतःच्या शीलाचा बळी देऊन कृतज्ञता व्यक्त करू शकत नाही.आणि कोणताही देश स्वतःच्या स्वातंत्र्याचा बळी देऊन कृतज्ञता व्यक्त कूरू शकत नाही.”
जगाच्या पाठीवर पहिल्यांदा स्त्रीवर्गाचा कणवळा कोणाला आला असेल तर तो महाप्रज्ञावंत तथागत बुध्दच होते.बुध्दाचे स्पष्ट मत होते की,”स्त्रीयाही माणूस आहेत, म्हणून त्यांना ही माणूस म्हणून वागविले पाहिजे” म्हणजे बुध्दाने स्त्रीवर्गाची बाजू दया येऊन भूतदयेतून घेतलेली नव्हती तर नैसर्गिक माणूसकीच्या अधिकारास पुरूषांप्रमाणे त्याही पात्र आहेत,या न्यायभूमिकेतून बुध्द स्त्री समस्येकङे पहात होते.तत्कालिन जगात बुध्दाचे अनुयायित्व पुरूषांपेक्षा स्त्रियांनी मोठ्या प्रमाणात स्वीकारल्याचे दिसते.स्त्रीशक्तीचा हा पुनरपी अविष्कारच होता.वेदशास्त्राने जे जे नाकारले ते ते बुध्दाने स्त्रीयांना प्रदान केले.वेदामध्ये मुलगी जन्माला येणे हे दुःख मानले जात असे पण बुध्दाने ती मानसिकता देखील बदलून टाकली. मुलगी झाली म्हणून दुःखी झालेल्या प्रत्यक्ष प्रसेनजित राजाला उपदेश करताना,स्त्री जन्म दुःखकारक नसून सुखकारक आहे,कारण की त्या स्त्रीच्याच उदरातून ऋषी-मुणी आणि चक्रवर्ती राजे देखील जन्म घेतात असे निक्षून सांगितले.
बुध्दधम्म आत्मसात करण्याची शाक्य स्त्रियांची लालसा किती तीव्र होती हे महाप्रजापती गौतमीच्या उदाहरणावरून लक्षात येते.शाक्य स्त्रियांसह "भिक्खूंणी" बनण्याची अनुमती मिळावी म्हणून भगवंताकङे विनंती करण्यास गेली असता भगवान बुध्द म्हणाले,"गौतमी! तू भिक्खुणी बनण्याचा विचार सोङून दे!"
परंतू माता महाप्रजापती आपल्या निश्चयावर अढळ पाहताच,स्थविर आनंद ह्यांनी बुध्दांना विणवणी केली.त्यावेळी स्थविर आनंदाने भगवान बुध्दांना प्रश्न विचारला की,”तथागतनी सांगितलेला धम्म आणि विनय याचा स्वीकार करून निब्बाण प्राप्त करून घेण्यास स्त्रिया समर्थ नाहीत,असे तथागतांना वाटते काय?”
तथागतानी उत्तर दिले,”आनंदा,गैरसमज करून घेऊ नकोस.निब्बाणाप्रत पोहोचण्यस पुरूषांइतक्याच स्त्रियही समर्थ आहेत,असे माझे मत आहे.आनंदा,माझ्याविषयी गैरसमज करून घेऊ नकोस.स्त्री-पुरूषातील विषमतेच्या तत्वांचा मी पुरस्कर्ता नाही.महाप्रजापतीच्या विनंतीला मी दिलेला नकार हा स्त्री- पुरूषातील विषमतेवर आधारलेला नाही.तो व्यावहारीक कारणांवर आधारलेला आहे.”
शेवटी भगवंतानी सर्वांग विचार करून,भिक्खूंपेक्षा अधिक आठ नियमांचे पालन करण्याची जबाबदारी स्वीकारल्यानंतरच महाप्रजापती गौतमी व इतर शाक्य त्यात यशोधरादेखील होती.बौध्दसंघामध्ये प्रवेश मिळण्याचे महाव्दार उघङले गेले.
“संस्कृतीकोशकार” लिहितात,गावोगावी आपल्या धम्माचा प्रचार करीत असता बुध्द एका शहरापाशी आले.ब्राम्हणांनी त्याला घाबरून शहराच्या वेशी बंद केल्या.पण पारतंत्र्याला (व्यवस्थेला ) कंटाळलेल्या हजारो स्त्रिया धार्मिक व व्यावहारिक बंधने झूगारून,वेशीचे दरवाजे तोङून बाहेर पङल्या व बुध्दाला शरण जाऊन त्यांच्या शिष्या बनल्या.यामागचे कारण उत्तर वैदिक काळात स्त्रियांचे स्थान भेटवस्तू म्हणून देण्यात येणाऱ्या बाहुली सारखे होते. वैदिक धर्माने स्त्रियांना मोक्ष नाकारण्याच्या पार्श्वभूमीवर,बुध्द स्त्रियांना पुरूषांएवढेच समान लेखून त्यांना निर्वाणाचा हक्क असल्याचे सांगत होते.
ब्राम्हणधुरीनांना भेडसावत असणारी मोठी समस्या म्हणजे बुध्दधम्माकडे दिवसेंदिवस वाढत असलेला स्त्रियांचा ओढा थांबवावा कसा?भिक्खूणी संघात अनेक कुमारीका प्रवेश करीत असत.स्त्रियांमधील कुमारीकांचे हे प्रचंड धर्मांतर थोपविण्यासाठी हिंदू मुलींचे बालविवाह करण्याचा नियम करण्यात आला.हिंदू कूमारीका,विशेषतःब्राम्हण कुमारीका,बुध्दधम्म संघात जाऊ नयेत म्हणून बालपणीच त्यांची लग्ने लावून त्यांना अडकवून ठेवले जात होते.
बुध्दधम्मात सन्मान मिळविण्यासाठी “जात” हा निकष नव्हता. “अंबठ्ठ सूत्त” जातीची व वंशाच्या खुळचट अहंकाराची चिकित्सा करणारे आहे.क्षत्रियांचा उल्लेख अनेक ठिकाणी प्रथम क्रमांकात आलेला आहे.हे खरे असले तरी प्रज्ञा,शील व करूणा यांचे स्थान भ.बुध्दांनी धम्माठायी मानले आहे. भ.बुध्दांच्या काळी,निरनिराळ्या देशात,आहार,आदिंबाबत मानवा मानवात नियंत्रणे होती,परंतू त्यांना जन्मावर आधारीत असे स्वरूप नव्हते;ते स्वरूप भारतात ब्राम्हणी धर्माने दिलेले होते.जन्मावर व सामाजिक स्थानावर आधारलेल्या विषमतेला झुगारून देणारे भ.बुध्दच जगातील महापुरूष म्हणावयास हरकत नाही.म्हणूनच,त्यांनी आपल्या धम्माच्या भिक्खू संघात न्हावी समाजातील उपालीस मुख्य शिष्याचे स्थान दिले.त्याचप्रमाणे कोळी जातीतील सती,गवळी समाजातील नंदा,पुन्ना व पुन्निका नावाच्या गुलामाच्या मुली;कापा नावाच्या शिकाऱ्याची मुलगी;लोहाराची कन्या शुभा,सोपाक व सुप्पीय या अस्पृश्यांना हीन समजल्या जाणाऱ्या समाजातील सुमंगल इत्यादींना बौध्द धम्मात आदरणीय स्थान प्राप्त झाले.
भ.बुध्दांचे शिष्य ही जात-लिंगभेद विरहीत वर्तन करीत असत,भदंत आनंद यांना तहान लागली असता,एका विहीसीवर एक तरूणी पाणी भरीत होती.आनंदाने तीला पाणी मागितले ती तरूणी प्रकृती नावाची चांडाळ जातीची होती ती म्हणाली,श्रमणा मी खालच्या जातीची आहे.तूम्हाल पाणी कसे देऊ? आनंदान धर्मयुक्त उत्तर दिले, भगिनी!मी पाणी मागितले आहे.तूझी जात विचारलेली नाही.पुढे ती स्त्री प्रकृती बौध्द बनली.
बौध्दधम्म संघाशी स्त्रियांचा संबंध केवळ भिक्खूणी म्हणूनच आला असे नाही.उपासिका म्हणूनही आला आहे.त्यांच्याकडून आलेल्या सुचना,अडचणी लक्षात घेऊन वेळोवेळी बुध्दानी भिक्खू व भिक्खूणी संघासाठी नियम केले.आणि म्हणून *डाॅ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात,विनयपिटक हे दुसरे तिसरे काही नसून उपासकांनी केलेल्या तक्रारींचा योग्य न्याय देण्याचे साधन आहे.
अशाप्रकारे बुध्दधम्माने स्त्रियांना प्रतीष्ठित केले,विद्देच्या आणि समतेच्या तत्वाद्वारे त्यांना पुरूषांच्या बरोबरीने समान दर्जा दिला.डाॅ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात," स्त्रियांना प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यासाठी आणि त्यांचा दर्जा पुरूषांच्या बरोबरीने आणण्यासाठी,बूध्द झटले."
प्रज्ञावंत तथागत बुद्ध हेच खरे स्त्रियांचे उध्दारक होते,हे साऱ्या जगाला माहिती असताना वर्तमान काळात ते नव्याने सांगण्याची गरज का भासते तर दिवसेंदिवस देशभर स्त्रियांवर अत्याचाराने परिसिमा गाठली आहे.
भारतीय संविधानाने पुरषी वर्चस्वाला नियंत्रणात आणले.परंतु स्त्रियांना अंध:श्रध्दा आणि दैववादी विचारांनी आजही जखडून ठेवले आहे.सदा सर्वदा-सर्वकाळ,सर्वांना मुर्ख बनविता येत नाही. परंतू वर्चस्वखोर लोकांनी की ज्यांच्या हातात लेखनी होती त्यांनी हा अक्षम्य प्रमाद केला.पुराणे,महाकाव्य,कथा,पोथ्या वगैरे लीहून भारतामध्ये भयानक ‘मिथके’ निर्माण केली.ऐतिहासिक घटनात मिथके मिश्रित करून सभ्रम निर्माण केले.सत्य-असत्याच्या मिश्रणातून भारताचा इतिहास उभा करण्यात आला.
माणसाला किंवा समुहाला जिवंत राहण्याचीच समस्या जेव्हा भेडसावत असते तेव्हा इतर समस्या दुय्यम ठरतात,म्हणून प्राधान्यक्रमानुसार कोणत्या समस्येवर संघर्ष करायचा हे ठरवावे लागते. आणि म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकरांना प्रथम
आपल्या माणसांच्या मेंदूत बुद्ध आणि त्यांचा धम्म घालने गरजेचे वाटल्यावरून त्यांनी कदाचित बुध्दाचे ऐतिहासिकतेचे सापेक्ष विश्लेषण ऐतिहासिक भौतिवादी पध्दतीने केले नसेल, त्यांना तेवढा वेळ ही मिळाला नाही तरीही, एखाद्या विषयाची चिकित्सा कशी करावी यासाठी त्यांनी भ.बुध्द आणि त्यांचा धम्म या ग्रंथात काही कसोट्या निश्चित केलेल्या आहेत.
दि बुध्दिष्ट सोसायटी ऑफ इंडिया च्या घटनेत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आवश्यकता भासल्यास धम्मप्रचारकाची नवीन धम्मशासन व्यवस्था निर्माण करण्याचे सूचित केले होते. त्यानुसार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या निधनानंतर त्यांचे सुपुत्र आदरणीय सुर्यपुत्र भैय्यासाहेब तथा यशवंतराव भीमराव आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली पहिले राष्ट्रीय अधिवेशन पुरंदरे स्टेडियम, मुंबई येथे दि.२७/२८ऑक्टोबर १९६८ रोजी “बौद्ध जीवन संस्कार पाठ”या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. त्याच अधिवेशनात बौध्दाचार्याची घोषणा केल्या प्रमाणे,दहा ते पंधरा जणांचा समावेश असलेली १९७६-७७ साली बौध्दाचार्य नामाभिधानाने नवी धम्मप्रचारकाची पहिली तुकडी तयार करण्यात आली.सन १९७७ मध्ये भैय्यासाहेबांचे निर्वाण झाले. त्यानंतर संस्थेच्या नेतृत्वाची जबाबदारी आदरणीय महाउपासिका मिराताई आंबेडकर यांचेकडे सोपविण्यात आली. आणि तेव्हापासून त्यांच्या नेतृत्वाखाली कमकाज चालत आहे. आता त्यांच्या नेतृत्वाखाली इथवर झालेली संस्थेची वाटचाल योग्य की अयोग्य,तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या संकल्पनेतील प्रचारक कसा असावा याबाबत जे नमुद करून ठेवले आहे त्या कसोटीवर आजचा बौध्दाचार्य खरा उतरतो की नाही हा ही संशोधनाचा विषय आहे. तेव्हा या उहापोहात न आडकता आदरणीय भैय्यासाहेब यांनी बौध्दाचार्य नामाभिधान असलेला धम्मप्रचारक म्हणून लावलेले रोप आणि त्यांच्यानंतर महाउपासिका मिराताई आंबेडकर यांच्या कारकिर्दीत त्या रोपटाचा झालेला भलामोठाव्रुक्ष आणि तो माणसाला मणूष्यत्व प्रदान करणाऱ्या २४/२५ संस्कार शीबीरांच्या फाद्यांचा विस्तार घेऊन दिमाखात उभा आहे या कार्याला आजच्या घडीला महत्व दिले पाहिजे.
आजची स्थिती आणि गती पाहता बुद्ध धम्मात माणूस हा केंद्रबिंदू आहे. तशीच जोतिबा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्यही मानविमुल्यांसाठीच होते.तसेच दि बुध्दिष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा यांचे धार्मिक काम हेसुद्धा माणसाला केंद्रस्थानी ठेवूनच आहे.माणसाला माणूस म्हणून घडवण्यासाठी जे काही २४-२५ शीबीरांतून प्रशिक्षण दिले जाते हे कार्य मानविमुल्या संबंधित नाही असे म्हणता येईल काय?
आज मात्र एक गोष्ट अवर्जून नमूद करावी लागेल की, द बुध्दिष्ट सोसायटी ऑफ इंङिया तथा भारतीय बौध्द महासभा या संस्थेने,शहरातील तसेच खेड्यापाड्यातील महिला वर्गाला “धम्म शिक्षिका”(केंद्रिय शिक्षिका) बनविलेले दिसते. ही कृती सूध्दा धाडसाची म्हणावी लागेल.समाजाच्या पारंपारीक रूढीं प्रमाणे चूल आणि मूल यालाच आपले कर्तव्य समजणाऱ्या स्त्रियांच्या व्यथांची दखल घेऊन त्यांना यातून बाहेर काढण्याचा “केंद्रिय शिक्षिका” हा मार्ग शोधला.” केंद्रिय शिक्षिका” म्हणून धम्मप्रचार आणि प्रसाराचे अधिकार देऊन त्यांना गृहसंसार आणि धार्मिक कार्य ही दोरीवरची कसरत करण्याचे
बळ देऊन समाजात उभे केले. समाजाला आता ती प्रबोधनपर प्रवचने देऊ लागली आहे. पुरूषांनी आपली मक्तेदारी ठरविलेल्या धार्मिक कार्यात ती हिरीरीने भाग घेऊ लागली आहे, धम्माचा प्रचार आणि प्रसार करीत आहे.संस्थेचे हे कार्य तथागतांच्या आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार व कार्याशी सुसंगतच आहे.
हे निर्विवाद सत्य नाकारता येणार नाही.
बुध्दाने स्त्रियांना भिक्खूंनी होण्याचा हक्क दिला.त्यामुळे स्त्रियांच्या स्वातंत्र्याचा मार्ग खुला झाला. एवढेच नव्हे तर पुरुषांच्या दर्जाबरोबर स्त्रियांचा दर्जा समान होण्याचा मार्ग मोकळा झाला.
हीच पुनरावृत्ती भारतीय बौद्ध महाभा यांच्या इतिहासातील सुवर्ण पान लिहिले जाणार आहे.ते म्हणजे,बुध्दिष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा यांच्यावतीने दि.२ फेब्रुवारी ते ११ फेब्रुवारी २०२४ असे दहादिवसांचे सुभेदार रामजी बाबा यांच्या स्मृती व माता रमाई जयंती निमित्त, पहिले महिला श्रामणेरी व बौध्दाचार्य धम्म प्रशिक्षण शिबीर चैत्यभूमी मुंबई येथे संपन्न झाले.
या शिबिरात मुंबई, नवी मुंबई, ठणे,पालघर,पुणे,सांगली,सोलापूर, अकोला, यवतमाळ, गोंदिया, भंडारा आणि नांदेड या जिल्ह्यातून ४९ केंद्रीय शिक्षिकांनी या शिबिरात सहभाग घेतला होता.
तसे शितावरून भाताची परीक्षा करणारे बुध्दिवंत भरपूर आहेत.याकार्यपध्दतीवर टिका केली जाते मात्र दुजोरा देणाऱ्या बुध्दिवंतांचे योगदान कमी असते.तरीही संस्था आपल्या कुवतीनुसर धम्मप्रचार आणि प्रसाराचे कार्य करीत आहे हे सत्य नाकारता येत नाही.
प्रबोधनाची लाट निर्माण होऊन स्त्रीवर्गात जाणिवा निर्माण झाल्या त्यातून स्त्रियांची श्रामणेरी होण्याची इच्छाशक्ती प्रबळ झाली या पुढे त्या काय कार्य करतील हे पुढचे पुढे पाहता येईल. प्रथम रूढी,प्रथा,परंपरांचा गळ्याभोवती आवळलेला फास या स्त्रियांनी तोडला, महत्त्वाचे म्हणजे स्त्री च्या सौदर्याशी संबंधित असलेली अभुषणे तसेच जन्मापासून आजपर्यंत वाढवलेले केस त्यागून स्वतः ला विद्रुप करून घेणे या धाडसाला क्रांतिकारी धाडस म्हटले पाहिजे. कारण गुलामाला मुक्त करता येते,पण त्याची स्वतः ची मुक्त होण्याची इच्छा नसेल तर जगातला कोणताही मालक अथवा कोणतीही विचारसरणी त्याला स्वातंत्र्य बहाल करू शकत नाही.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानंतर सत्तासंघर्षात ही संस्था गटा तटात विभागली गली.हे जरी खरे असले तरी आजची संस्थेची स्थिती आणि गती पाहता,ज्या समाजाला स्त्री उत्थानाची सतत काळजी असते,तो समाज भावी काळात प्रगतीपथावर असतो आणि दुसरे असे की,ज्या समाजात स्त्रियांचा दर्जा पुरूषांच्या बरोबरीचा असतो तोच समाज प्रबुद्ध,समतेचा भोक्ता आणि सर्वोत्कृष्ट विचारसरणीचा मानला पाहिजे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत