देशमहाराष्ट्रमुख्यपानराजकीयविचारपीठ

सर्वांशी चांगले वागणे हाच आंबेडकरवाद

  • न्या. किशोर रोही यांचे प्रतिपादन
  • इ. झेड. खोब्रागडे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन

नागपूर –

 आपण कोणत्याही पदावर असो अगर नसो, सर्वांशी चांगले वागणे आणि त्यांना मदत करणे म्हणजेच आंबेडकरवाद आहे. हा विचार सर्व जाती, पंथ, संप्रदाय, वर्ग यांना लागू आहे, असे प्रतिपादन निवृत्त न्यायाधीश किशोर रोही यांनी केले. 'प्रशासनातील आंबेडकरवाद' या निवृत्त सनदी अधिकारी इ. झेड. खोब्रागडे यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. दीक्षाभूमी येथील डॉ. आंबेडकर कॉलेजच्या ना. ह. कुंभारे सभागृहात शनिवारी हा प्रकाशन सोहळा संपन्न झाला.

 प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते होते. विचारमंचावर 'महाराष्ट्र टाइम्स' नागपूर आवृत्तीचे निवासी संपादक श्रीपाद अपराजित, मुख्य वनसंरक्षक किशोर मानकर, 'सकाळ'चे संपादक प्रमोद काळबांडे, लेखक इ. झेड. खोब्रागडे, रेखा खोब्रागडे यांची उपस्थिती होती.

 न्यायालयात आणि दवाखान्यात येणारा माणूस हा सामान्यतः त्रस्त असतो. न्यायमूर्ती आणि कर्मचाऱ्यांनी अशा लोकांची मदत करण्याची भावना ठेवावी. काही न्यायाधीश वकिलांचे म्हणणे ऐकून घेण्याइतकाही संयम बाळगत नाही किंवा इतरांशी चांगले बोलत नाहीत. आपण लोकांशी चांगले वागलो तर लोकही आपल्याशी चांगले वागतात, असे न्या. रोही म्हणाले.

 'वागण्या बोलण्यात वात्सल्य असले पाहिजे असे ज्यांना वाटते, त्यांनी प्रशासनात आंबेडकरवाद  आणला पाहिजे. सध्या प्रशासनातील मानवतावाद भरकटला आहे आणि त्यामुळे जनता व प्रशासनात दुरावा निर्माण झाला आहे. हा दुरावा दूर करण्यासाठी प्रशासनात ममत्व हवे आणि हे ममत्व म्हणजेच आंबेडकरवाद आहे', असे श्रीपाद अपराजित यांनी आपल्या भाषणात सांगितले. प्रशासनात काम करणाऱ्यांनी लहान लहान गोष्टीत सजगता बाळगल्यास आंबेडकरवाद जपला जाईल, अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

लेखक इ. झेड. खोब्रागडे यांनी आपल्या पूर्ण पुस्तकात संविधान मांडले आहे, असे किशोर मानकर म्हणाले. 'समतेसाठी' बुद्धाने रचिला पाया, बाबासाहेब झाले कळस' असे म्हणावे लागेल. शोषित, वंचितांना सर्व प्रकारचा न्याय मिळत असेल तरच देश महासत्ता झाला असे म्हणता येईल. देशातील शंभर टक्के लोकांना आरक्षणाचा लाभ मिळाला असतानाही आरक्षणाच्या बाजूने बोलणारे मात्र अल्पसंख्य आहेत', असे ते म्हणाले. 'आंबेडकरवाद महाराष्ट्र वगळता इतर राज्यांमध्ये फारसा पोहोचला नाही,' असेही मानकर म्हणाले. प्रमोद काळबांडे यांनीदेखील शोषित-वंचिताच्या क्षेत्रात काम करताना आलेल्या स्वअनुभवांची मांडणी करत प्रशासनातील आंबेडकरवादाचे वास्तव अधोरेखित केले. 

 लेखक इ. झेड. खोब्रागडे यांनी या पुस्तकामागील भूमिका मांडताना, डॉ. आंबेडकरांच्या विचारांच्या बाजूचे कोण आणि त्यांच्या विचारांच्या विरोधातील कोण हे स्पष्ट झाले पाहिजे, असे मत मांडले. याशिवाय, पुस्तकातील लेखांबद्दलही विस्ताराने माहिती दिली. आंबेडकरवाद हा प्रगतीशील, बदल घडवून आणणारा सम्यक विचार आहे, असेही त्यांनी आंबेडकरवादाची व्याख्या विषद करताना सांगितले.

 अध्यक्षीय भाषणात प्रदीप दाते यांनी खोब्रागडे यांचे अभिनंदन केले आणि सर्वांनी आपल्या आचरणात आंबेडकरवाद आणला पाहिजे, असे मत व्यक्त केले.

 सूत्रसंचालन नेहा खोब्रागडे यांनी केले. कार्यक्रमाला आंबेडकरी चळवळीतील अनेक मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दीपक निरंजन, दिगंबर गोंडाने, शिरीष कांबळे, अलका निरंजन, कल्पना कांबळे, विजय बेले, अतुल खोब्रागडे, नमा खोब्रागडे, हरिदास बेलेकर यांनी अथक परिश्रम घेतले.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!