महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसामाजिक / सांस्कृतिक

निखाऱ्यावर भाजलेली मुले – आचार्य प्र.के.आत्रे.

दहा वर्षांपूर्वीची गोष्ट. आंबेडकरांच्या पंचावनाव्या वाढदिवशी नवयुगचा खास अंक काढावयाचा आम्ही ठरविले. म्हणून आम्ही त्यांच्याकडे संदेश मागावयास गेलो. बाबासाहेब हसून म्हणाले , ‘महाराचा कसला वाढदिवस साजरा करता ? ‘ त्यांच्या या प्रश्नाला उत्तर देण्याचे आम्हाला काय तोंड होते ? आम्ही खाली मान घातली आणि गप्प बसलो . तेव्हा बाबा एकदम गंभीर झाले . आमची भावना त्यांना कळली . ते म्हणाले , ‘खरे सांगू ? व्यक्तिश: माझा वाढदिवस साजरा व्हावा हे मला मुळीच आवडत नाही . या देशात अवतारी पुरुष आणि राजकीय पुरुष ह्या दोघांचेच जन्मदिवस पाळले जातात. फार दु:खाची गोष्ट आहे ही – मी लोकशाहीचा कट्टर पुरस्कर्ता आहे . मला विभूतीपूजा कशी आवडेल ? विभूतीपूजा हा लोकशाहीचा विपर्यास आहे . पुढारी लायक असेल तर त्याच्या बद्दल प्रेम बाळगा . आदर दाखवा . पण पुढाऱ्यांची देवाप्रमाणे पूजा कसली करता ? त्यामुळे पुढाऱ्यांबरोबळ भक्तांचाही अध:पात होतो .’ बाबा बोलत होते आणि आम्ही कागदावर त्यांचे शब्द टिपून घेत होतो . ‘हा झाला आमच्या स्पृश्यांना संदेश ? ‘ डोळे अर्धवट मिटून बाबासाहेब स्वतःशीच पुटपुटले , इतक्यात त्यांना कसली तरी आठवण झाली . ‘ग्रीक पुराणातील एक गोष्टच मी तुम्हाला सांगतो . होमरने आपल्या महाकाव्यात सांगितली आहे ती. डिमेटर नावाची एक देवता मनुष्यरुप धारण करुन पृथ्वीतलावर आली. तिला एका राणीने आपले तान्हे मूल सांभाळावयाला आपल्या राजवाड्यात नोकरीस ठेवले . त्या लहान मुलाला देव बनवावे अशी त्या देवतेला इच्छा झाली . म्हणून ती रोज रात्री सारी मंडळी झोपली की सारी दारे बंद करी . मुलाला पाळण्यातून बाहेर काढी आणि त्याचे कपडे उतरुन ती त्याला जळत्या निखाऱ्यांवर ठेवी . हळूहळू निखाऱ्यांची धग सहन करण्याचे सामर्थ्य त्या मुलामध्ये उत्पन्न झाले . त्याचे बळ वाढू लागले . त्याच्यामध्ये अत्यंत तेजस्वी असा दैवी अंश विकसित होऊ लागला ; पण एका रात्री त्याची आई एकाएकी त्या खोलीत शिरली . तिच्या दृष्टीस तो सारा प्रकार पडताच ती भयंकर संतापली . तिने आपले मूल चटकन निखाऱ्यांवरुन उचलून घेतले आणि त्या देवतेला हाकलून दिले . अर्थात राणीला तिचे मूल मिळाले ; पण त्याचा ‘देव’ जो होणार होता , त्या देवाला मात्र ती मुकली ! ही गोष्ट हाच अस्पृश्यांना माझा संदेश ! तो हा की , विस्तवातून गेल्यावाचून देवपण येत नाही . अग्नि हा माणसाला शुद्ध करतो आणि त्याचे बळ वाढवितो . म्हणून दलित माणसाला हालअपेष्टा आणि त्यागाच्या आगीमधून जावयालाच पाहिजे . तरच त्याचा उध्दार होईल . बायबलात सांगितले आहे की , आयुष्याच्या शर्यतीत भाग घेण्याचे आमंत्रण सर्वांना येते . पण फक्त मोठी माणसे ती शर्यंत जिंकू शकतात . ह्याचे कारण काय ? तर पुढच्या कल्याणासाठी आज मिळणाऱ्या गोष्टींचा त्याग करावयास लागणारे धैर्य दलितांच्या अंगी नसते ; म्हणून आयुष्याच्या शर्यतीत ते मागे राहतात . मला ठाऊक आहे , आम्ही अस्पृश्यांनी आजपर्यंत हजारो वर्षे हाल सोसले आहे . छळ सोसला आहे . झगडा केला आहे . पण इतके असूनही मी पुन्हा हाच संदेश देतो की , ‘ झगडा , आणखी झगडा . त्याग करा , आणखी त्याग करा . त्यागाची आणि हालांची पर्वा न करता एकसारखा झगडा चालू ठेवाल तरच तुम्हाला मुक्ती मिळेल .’ प्रतिकार करण्याची अस्पृश्यांची सामुदायिक इच्छाशक्ती वाढली पाहिजे . आपले कार्य पवित्र आहे यावर त्यांचा दृढविश्वास पाहिजे . आपल्यावर लादली गेलेली गुलामगिरी नष्ट करण्यासाठी त्यांनी आपले तन, मन, धन आणि तारुण्य कुर्बान केले पाहिजे . बऱ्याची , वाईटाची , सुखाची , दु:खाची , वादळाची , मानाची आणि अपमानाची पर्वा न करता अस्पृश्य एकसारखे झगडत राहतील तरच त्यांचा उध्दार होईल!

लोहार ऐरणीवर जसे घाव घालतो तशा त्वेषाने आणि आवेशाने बाबासाहेबांच्या तोंडातून एकेक शब्द निघत होता . इतकी वर्षे झाली तरी त्यांचे ते दिव्य शब्द आमच्या कानात अजून घुमत आहेत . बाबासाहेबांचा हा संदेश त्यांच्या लक्षावधी अनुयायांनी अक्षरशः पाळलेला आहे . म्हणून आज त्यांच्यात एवढे ऐक्य , सामर्थ्य आणि कडवेपणा निर्माण झालेला आहे . बाबासाहेबांचे अनुयायी म्हणजे बाजारबुणगे नव्हेत . ते एक लढाऊ सैन्य आहे . ते लढाऊ बळ आणि निर्धार बाबांनी त्यांच्यामध्ये कसा निर्माण केला ? तर डिमेटर देवीप्रमाणे त्यांनी ही आपली लाखो मुले रोजच्यारोज निखाऱ्यावर भाजून काढली . कढवली , परतली , उकळली , तेव्हा वाटेल त्या दु:खाला , संकटाला आणि आपत्तीला तोंड देण्याचे सामर्थ्य आज त्यांच्यामध्ये निर्माण झाले आहे . जगामध्ये आजपर्यंत रक्ताच्या नद्या वाहवल्यावाचून धर्मपचार झालेला नाही , आणि इथे हा महापुरुष भगवान बुध्दाला शरण जाताच त्याचे लाखो अनुयायी ‘बुध्दं सरणं गच्छामी’ अशा गर्जना करीत त्याच्यामागून शांतपणे चालू लागतात . असा चमत्कार जगाने कधी पाहिला आहे ? डिमेटर देवतेप्रमाणे आपल्या मुलांना निखाऱ्यावर भाजण्याचे काम पूर्ण होण्याच्या आधीच आंबेडकरांना येथून जावे लागले . ते उरलेले अग्निदिव्य आता स्वतःच्याच बळाने आणि धैर्याने त्यांनी संपवायला हवे.

साभार:दलितांचे बाबा डॉ. बाबासाहेब आंबेडकर

– आचार्य प्र.के.आत्रे

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!