महाराष्ट्रमुख्यपानराजकीयविचारपीठ

वंचितांचे राजकारण पत्रकार संपवू पाहताय !

मंदार माने

आज वंचित चे डॉ. धैर्यवर्धन फुंडकरांची प्रेस पाहिली. फुंडकरांनी ज्या प्रतिक्रिया दिल्या त्यानंतर ठरल्याप्रमाणे कॉंग्रेसच्या पाळीव पत्रकारांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
हा सगळा प्रकार पूर्णपणे सापळा लावल्याप्रमाणे होता. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आदरणिय आहेत असे मविआचे नेते उघड म्हणत असतात आणि त्यांच्याबद्दलची गरळ ओकण्यासाठी त्यांनी पत्रकार नेमलेले आहेत. पत्रकाराचे राजकीय नुकसान काहीच होत नाही. पण एक पत्रकार प्रसिद्धी देऊ शकतो त्याच प्रमाणे कुप्रसिद्धीही देऊ शकतो, ही पत्रकाराची ताकद अनेक वर्षे सत्तेत असल्याने मविआच्या तीनही पक्षांना चांगलीच ठाऊक आहे.

कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या पक्षांनी कधीही राजकीय साधनशुचिता पाळलेली नाही. इन फॅक्ट शिवसेनेने वागळेंवर हल्ला केल्यानंतर वागळेंनी त्यांना पुरोगामी असल्याचं प्रमाणपत्र देणं अनाकलनीय आहे. हे तेव्हांच घडू शकतं जेव्हां हा हल्ला दोन्ही बाजूंनी प्लान्ड असेल. दोन्हीही बाजूंची मिलीभगत असू शकते. अशी मिलीभगत करणार्या मंडळींना इतरांबद्दल संशय असणे साहजिक आहे. जो बदमाष असतो त्यालाच बदमाषीचा संशय येतो. साध्या भोळ्या माणसाला बदमाषीचा संशय येत नाही. बदमाष मनुष्य हा पोलिसांच्याही दोन पावले पुढे असतो. कायदा बनवणार्यापेक्षा कायदा मोडणारे जास्त हुषार असतात.

आपल्या लोकशाहीची हीच विटंबना आहे कि आजवर कायदा मोडणारेच कायदा बनवण्याच्या पवित्र मंदिरात जाऊन बसलेले आहेत. त्यामुळेच वंचित घटकांना न्याय मिळत नाही. याच कायदा मोडणार्यांच्या बाजूने निखिल वागळे बोलत आहेत.

या मंडळींनी राजकीय कंपल्शन बनवलेय. काय बनवलेय ?
आम्हाला मत दिले नाही तर भाजपा येईल. शोले मधे गब्बर म्हणतो कि “पचास कोस दूर बच्चा रोता है तो मां कहती है कि बेटे सो जा वर्ना गब्बर आ जायेगा. गब्बर के इस खौफ से तुम्हे सिर्फ गब्बर ही बचा सकता है”

इथे हेच झालेले आहे. भाजपाच्या भीतीपासून तुम्हाला फक्त आम्हीच वाचवू शकतो असे गब्बरच सांगतोय. हा गब्बर सलीम जावेदच्या गब्बर सारखा अडाणी नाही. हा धूर्त आहे. गावातले गवगुंड जसे असतात तीच गावगुंडी आहे. या गावगुंडीने शहरात कसे वागायचे हे गेल्या सत्तर वर्षात शिकून घेतलेले आहे. काहीही करा आणि इमेज धुतल्या तांदळासारखी ठेवा.

या कामासाठी गब्बरने शुभ्र इमेज असलेले विचारवंत कामाला लावलेले आहेत. काही पत्रकार पाळलेले आहेत. काहींना कंपन्यांचे शेअर्स दिलेले आहेत. काहींना प्लॉट्स दिलेले आहेत. काहींना १०% कोट्यातले फ्लॅट दिलेले आहेत. या पत्रकारांची मागणी खूप नाही. म्हणून यांना अर्णब गोस्वामी चाय बिस्कुटवाले पत्रकार म्हणतो. कारण दिल्लीतले जे पत्रकार आहेत त्यांच्या मागण्या प्रचंड आहेत. अर्णब गोस्वामीला आख्खं टिव्ही चॅनेलच पाहीजे होतं.

सुधीर चौधरी ५०० कोटींची लाच मागताना कॅमेर्यात पकडला गेला. तिहार मधे जाऊन आला तरीही तो आज उजळ माथ्याने पत्रकार आहे. एका जिंदालकडे त्यानी ५०० कोटींची लाच मागितली याचाच अर्थ अशी लाच दिली जात असेल. लाच देण्याचे कारण काय असेल ? म्हणजेच उद्योगपतींचे काळे धंदे राजरोसपणे पैसे घेऊन माफ केले जात असतील. हा सुधीर चौधरी तेव्हां तर हिंदुत्ववादी नव्हता.२०१४ नंतर तो अधिकृत हिंदुत्ववादी झाला. असे म्हणण्याचे कारण कि झी टिव्ही वर मनोज रघुवंशी नावाचा एक पत्रकार बहरात असताना विविध विश्लेषणात्मक कार्यक्रम करायचा. त्यात एकदा त्याने सांगितले होते कि कांशीराम आणि अन्य काही लोक मीडीया हाऊस वर आरोप करतात कि यात १००% ब्राह्मण असल्याने खासगी वाहीन्यांचे सरकारीकरण करून त्यात आरक्षण ठेवले पाहीजे.

मनोज रघुवंशी हे स्वत: संघी आहेत , होते. पण त्या वेळी ते थोडे बिचकून असत. दाखवायला का होईना तटस्थ राहण्याचा प्रयत्न करत. पण येऊ घतलेला उन्माद काय आहे याची झलक मनोज रघुवंशी यांनी सांगितली. त्यांनी सांगितले की मास मीडीयाचे जे कोर्सेस आहेत त्यात १००% ब्राह्मण मुलंच आहेत. बहुजनांची मुलं त्यात का नाहीत ? याचाच अर्थ पुढच्या काही वर्षात जे पत्रकार येतील त्यात १००% ब्राह्मणच असतील. बहुजन मुलं या कोर्सेस कडे का वळत नाहीत ? पुढे ते असेही सांगायला विसरले नाहीत कि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने तरूण मुलांना पत्रकारितेचे कोर्सेस करायचे शिक्षण घ्यायला सांगितलेले आहे.

ही गोष्ट अगदीच सत्य असण्याची शक्यता आहे. कारण लहानपणापासून ब्राह्मणांमधे संघाचे संस्कार असतात. एखादा चुणचुणीत मुलगा हा शाळेत संघाची शाखा घेत असतो. काही शाळा या संघाच्या लोकांकडूनच चालवल्या जातात. या शाळेत बहुजनांच्या मुलांनाही शाखेत जावे लागते. या शाखेचा मुख्य हा एक मुलगाच असतो. या शाखेत बहुजनांची मुलं गेल्यावर ब्राह्मण मुलांची बैठक भरायची. त्यात भविष्यात कोणकोणत्या संधी आहेत याची माहिती हा मुलगा द्यायचा हे ब्राह्मणांचं नेटवर्क आहे. म्हणून संघाच्या प्लानिंगनुसार ब्राह्मण पत्रकार त्या बॅचमधून बाहेर आले. ते आज सीनियर आहेत. आता ते ब्राह्मण त्यातही संघी विद्यार्थ्यांनाच चॅनेलमधे घेतात. बहुजन पत्रकारांना खेडेगावात कमी पगारावर नेमले जाते. ते तिथेच राहतात. त्यांची करीयर कधीच बहरत नाही. त्यातला एखादा मग चमचेगिरी सुरू करतो. अशा एखाद्या बहुजनाची ब्राह्मणांना सर्वसमावेशक चित्र उभे करण्यासाठी गरज असतेच. त्यातून मग भोईर, सुतार, आवटे अशा आडनावाच्या लोकांना वरती आणले जाते. अर्थातच स्थानिक भाषेत. फारतर एखादा जाधव घेतला जातो. यांना ब्राह्मण पत्रकाराने तपासून घेतलेले असते. ते एका चौकटीबाहेर जाणार नाहीत ही खात्री त्यांना असते.

आता लोकशाहीला हाच धोका आहे. आता ब्राह्मण पत्रकारच सर्वत्र आहेत. ते पत्रकारिता हे मिशन ब्राह्मणी धर्मासाठीच समजतात. पण ते करताना ते तीन पातळ्यांवर आभास निर्माण करतात.

पहिला पुरोगामी विरूद्ध हिंदुत्ववादी
दुसरा पत्रकारिता हा धंदा असल्याचा आणि
तिसरा निष्पक्ष पत्रकारितेचा.

हे तीनही दावे फोल आहेत.
जे पत्रकार धंदा असल्याचा आणि प्रॅक्टीकल असल्याचा आव आणतात ते ही शेवटी ब्राह्मणवादाचेच संरक्षण करतात. पत्रकारिता हा धंदा आहे असे एक्दा सांगितले की प्रश्न विचारण्याचा पर्यायच बंद होतो. कारण मग तुम्ही काढा पेपर,तुम्ही काढा चॅनेल असा पवित्रा हे घेतात.

लोकशाहीची हीच विटंबना आहे कि जे कायदे मोडतात ते आज कायदे बवनण्याच्या मंदिरात गेले आहेत. त्यांच्याकडून पत्रकारांना पैसे मिळतात. ते पत्रकार स्वत:ला पुरोगामी म्हणवतात.दुसर्या प्रकारचे कायदे मोडणारे लोक हिंदुत्ववादी म्हणवून घेतात. त्यांच्या बाजूने असणार्या पत्रकाराना गोदी मिडीया म्हणतात.

हे जे सिंडीकेट आहे यात वंचित घटकांना स्थानच नाही.
मग हे दोन्हीही मिळून वंचित घटकांचे राजकारण उभे राहू देत नाहीत.

यासाठी वंचितने त्यांच्या खेळाचे नियम धुडकावून आपले राजकारण स्वतंत्र आहे हे ठामपणे सांगण्याची गरज आहे. नाहीतर आधीच लावलेल्या सापळ्यात अडकत जाणार आणि बुडत्याचा पाय खोलात तशी स्थिती होणार.

आजच्या बैठकीनंतर वंचितचा पाय खोलात गेला आहे. त्यांची बाजू ऐकण्यात ना लोकशाही चॅनेलला रस आहे, ना मॅक्स महाराष्ट्रला रस आहे. वागळेंना तर नाहीच नाही. आज जे यांच्या बाजूने आहेत उद्या ते ऐन वेळी दगा फटका करणारच आहेत.

त्यामुळे एकदाच लाईव्ह पत्रकार परीषद घेऊन ठामपणे यांच्या वेळकाढू धोरणाप्रमाणे आम्ही सापळ्यात अडकलेल्या उंदरासारखे बनणार नाही हे सांगण्याची गरज आहे. नाहीतर हे खेळवत खेळवत शिकार करतील.

गेल्या लोकसभेला वंचितला ४४ लाख मतं मिळाली.
यात मीमची मतं फक्त औरंगाबादेत होती. ती साधारण ५०,००० ते ७०,००० इतकी होती.उरलेले मुस्लीम मतदान कॉंग्रेस आघाडीला सुद्धा झाले आहे. इतर ठिकाणी मुस्लीम मतदान वंचितला झाले नाही.म्हणजे मीमचा वाटा ७०,००० मतांचा असेल.

उरलेल्या ४३.३ लाखात गोपीनाथ पडळकरांचे मतदान तीन ते साडेतीन लाख होते. पडळकर गेल्याने ते मायनस झाले. तरीही ४० लाख मतं वंचितने घेतली. ती विधानसभेला २४ लाखापर्यंत कमी झाली.

ही उरलेली १६ लाख मतं बी टीमच्या प्रचाराने गमावली.
हे लक्षात घेऊन ठाम भूमिका घ्या. २ तारखेच्या बैठकीला काय करायचे याचे प्लानिंग झालेले असणार. आधीच वागळेंसारखे वगळे काव काव करणार आहेत.तुम्हाला तिथे अपमानित करतील , दोन जागा घ्या म्हणतील आणि तुम्ही निघून आला की हे भाजपचा फायदा करतात म्हणून कोल्हेकुई केली जाईल.

काहीही करा, बदनामी केली जाईल आणि तुमच्या बद्दल मतदारांच्या मनात संभ्रम निर्माण केला जाईल.
आज फुंडकरांची प्रेस पहिल्यावर थोडा वेळ माझ्याही मनात संभ्रम निर्माण झाला होता. पण चिकाटीने सत्य शोधून काढल्यावर तो दूर झाला.
सर्वसामान्य मतदारांकडे एव्हढा संयम आणि वेळ नसतो.

वंचितांचे राजकारण पत्रकार संपवतात का ?

  • मंदार माने

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!