महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसामाजिक / सांस्कृतिक

पहिले आर्यसत्य: दु:ख भाग १०

ह्यापूर्वीच्या लेखात पहिले लक्षण, अनित्यता आणि दुसरे लक्षण, अनात्मतता ह्याबाबत विवेचन केले. आता तिसरे लक्षण, दु:ख याबाबत माहिती घेऊ या.
नव्या प्रकाशाच्या प्राप्तीासाठी सिध्दार्थ गौतम जेव्हा चिंतनास बसला, तेव्हा त्यांच्या मनावर महर्षी कपिलांच्या सांख्य तत्वज्ञानाची पकड होती. महर्षी कपिलांनी दु:खाचे अस्तित्व मान्य केले होते. जगातील व्यथा आणि दु:ख ही एक निर्विवाद वस्तुस्थिती आहे, असे त्यांनी मान्य केले. परंतू दु:ख कसे नाहीसे करावे, ह्या प्रश्नााचा विचार सांख्य तत्वज्ञानाने केला नाही. म्हणून या प्रश्नावर सिध्दार्थ गौतमांनी आपले चित्त केंद्रित केले. त्यांनी स्वत:ला पहिला प्रश्न विचारला की, “व्यक्तिमात्राला भोगाव्या लागणाऱ्या दु:खाची व कष्टाची कारणे कोणती?” त्यांचा दुसरा प्रश्न असा होता की, “दु:ख नाहीसे कसे करता येईल?” या दोन्हिही प्रश्नांचे उत्तरे त्यांनी शोधले. दु:खाचे उगम कसे होते आणि त्यातून मुक्त कसे व्हायचे याचा शोध फक्त बुध्दांनी लावला. दु:ख, दु:ख समुदय, दु:ख निरोध व दु:ख निरोधगामिनी प्रतिपदा ह्या चार आर्यसत्याचा शोध भगवान बुध्दांनी लावला.
भगवान बुध्दांच्या काळात अनेक मतप्रणाली अस्तित्वात होत्या. ह्या मतप्रणाली साधारणत: दोन भागात विभागल्या जातात. एक उच्छेदवादी व दुसरे शाश्वतवादी. सर्व काही संपणारे आहे म्हणून खा, प्या आणि मजा करा अशी उच्छेदवादी विचारसरणी होती. आत्मा शाश्वत आहे म्हणून हे माझे, ते माझे असे शाश्वतवादी विचारसरणी होती. भगवान बुध्दांनी या दोन्हिही विचारसरणीला नाकारले.
भगवान बुध्दाने प्रथमत: पाच परीव्राजक म्हणजे कौण्डिण्य, अश्वजित, कश्यप, महानाम आणि भद्रिक यांना सारनाथ येथे धम्माचा उपदेश केला व त्यानंतर त्यांचा धम्म संपूर्ण जगात पसरला.
भगवान बुध्द या प्रथम धम्मचक्र प्रवर्तन सुत्तात म्हणतात की, “जीवनाच्या आत्यंतिक असे दोन टोके म्हणजे खा, प्या आणि मजा करा, आणि सर्व वासना मारुन टाका. कारण ते पुनर्जन्माचे मुळ आहेत.” या दोन्हिंही टोकांना नाकारुन जो उपभोगाचा नाही आणि आत्मक्लेशाचाही नाही असा मध्यम मार्ग त्यांनी स्विकारला. याच मध्यम मार्गाची शिकवण भगवान बुध्दांनी दिली. तेव्हा हे मध्यम मार्ग दुसरे-तिसरे काही नसून चार आर्यसत्यच आहेत. हाच मार्ग मानव मुक्तीचा आहे. ईश्वर, आत्मा वगैरे काल्पनिक गोष्टीला स्थान न देता त्यांनी ‘माणूस आणि माणसाचे या जगातील नाते’ याला प्राध्यान्य देऊन आपला धम्म सांगितला. म्हणूनच त्यांच्या धम्माला ‘एहि पस्सिको’ म्हणजे ‘या आणि प्रत्यक्ष पाहा‘ असे म्हटले आहे.
याच सुत्तात ते पुढे म्हणतात की, “माझ्या धम्माचा ईश्वर, आत्मा, कर्मकांड व मरनोत्तर जीवनाशी कसलाही संबंध नाही. माणूस आणि माणसाचे, माणसाशी या जगातील नाते हा माझ्या धम्माचा केंद्रबिंदू आहे. मनूष्यप्राणी दु:ख, दैन्य आणि दारिद्रयात राहात आहेत. हे सर्व जग दु:खाने भरले आहे. म्हणून हे दु:ख नाहीसे करणे हा माझ्या धम्माचा उद्देश आहे. दु:खाचे अस्तित्व मान्य करणे आणि ते नष्ट करण्याचा मार्ग दाखविणे हा माझ्या धम्माचा पाया आहे.
जगातील सर्व प्राणी दु:खाने पिडलेले आहेत. कोणत्या ना कोणत्या तरी कारणाने ते दु:खी झालेले असतात. मनाच्या विरुध्द कुठली गोष्ट घडली की झाला दु:खी ! सर्व संसार दु:खाच्या समुद्रात गटांगळ्या खात आहेत. जेथे जेथे जीवन आहे तेथे तेथे दु:खही दु:ख भरलेले आहे.
केवळ मनुष्यप्राण्याच्या बाबतीत जरी विचार केला तरी माणसा-माणसात झगडा, कलह, भांडण, वाद-विवाद अशा गोष्टींचा जिकडे तिकडे बोलबोला दिसून येईल. जिकडे तिकडे आतंकवाद, फुटिरतावाद, वर्णवाद, वर्गवाद, जातीवाद, धर्म-पंथवाद, भाषावाद, प्रांतवाद, राष्ट्रवाद अशा गोष्टी बोकाळलेल्या दिसतील. जिकडे तिकडे चोरी, लुटमार, फसवणुक, हिंसाचार, भ्रष्टाचार, खोटेपणा याच गोष्टींचा भरमार दिसून येईल.
लोक कोणत्या ना कोणत्या तरी भीतीने ग्रस्त झालेले असतात. थंडी वाढली तरी भीती … गरमी वाढली तरी भीती … खूप पाऊस पडला तरी भीती … कमी पाऊस पडला तरी भीती … कुणाला भुकेची-तहानेची भीती … कुणाला रोगराई, बिमारी, मरणाची भीती … कुणाला म्हातारपणाची भीती … कोणी तलवार, चाकू बंदुका काढल्या की भीती … कोणी चोरी, लुटमार करेल का म्हणून भीती … कुणाला लढाईची भीती … बॉंबस्फोटात मरण्याची, जखमी होण्याची भीती … आगिची, अपघाताची भीती …. दहशतवादी, नक्षलवादी लोकांची भीती … भीतीच भीती … जो तो भीतीने पछाडलेला असतो. याचे पर्यवसान त्याला दु:ख निर्माण करण्यात होत असते.
कोणी भुकेने तडपतो आहे. कोणी तहानेने व्याकुळ होतो. कुणाकडे शरीर झाकण्याकरीता पुरेसे वस्त्र नाहीत. कुणाला ऊन, वारा, पावसापासून वाचण्यासाठी आच्छादन नाही. कोणाकडे दवाई-पाणी घेण्याकरीता पुरेसे पैसे नहीत. कोणी आपल्या मुला-बाळांना शिकवू शकत नाही. कोणी गरिबीपूढे हात टेकले आहेत. कोणाकडे पैसा असुनही मानसीक समाधान नाही. म्हणजेच दु:खाला पारावार नाही !
कुठे पती व पत्नी मध्ये भांडण, कुठे वडील व मुलांमध्ये भांडण, कुठे आई व मुलामध्ये भांडण, कुठे मुलां-मुलांमध्ये भांडण, कुठे सासु व सुनांमध्ये भांडण, कुठे शेजाऱ्यां-पाजाऱ्यांशी भाडण, कुठे मोहल्या-मोहल्यात, गावा-गावात भांडण. कुठे जाती-जातींमध्ये भांडण. कुठे धन-संपत्तीसाठी भांडण, कुठे जमिन-जुमल्यासाठी, कुठे मानसन्मानासाठी भांडण, कुठे हुंड्यासाठी भांडण. भांडणाला काही अंत नाही ! पुढे हे भांडण विकोपाला जावून मारामारी, खून, जाळपोळ, हिंसाचार इत्यादी प्रकार घडतात. मग हे प्रकरण पोलीसांपर्यंत, कोर्टापर्यंत जाते. त्याची परिणीती म्हणजे मानहानी व पैश्याची नासाडी… कोर्टाच्या निकालानंतर तुरुंगवास अथवा फाशीची शिक्षा… म्हणजेच भांडणाचा शेवट हा दु;खांमध्येच परिवर्तीत होते.
कोणी आपल्याला हिंदु म्हणोत, बौध्द म्हणोत, ख्रिचन म्हणोत, शिख म्हणोत, जैन म्हणोत अथवा कोणी मुसलमान म्हणोत. कोणीही या दु:खापासून मुक्त नाही. कोणताही मनुष्य मग तो गरिब असो की श्रीमंत, गृहस्थी असो की गृहत्यागी-सन्यासी, अशिक्षित असो की सुशिक्षित, राजा असो की रंक अशा सर्वांनाच दु:खापासून सुटका नाही.
हे दु:ख काय आहे? या दु:खामागील कारणे काय आहेत? या दु:खाला लोकं वारंवार बळी का पडतात. या दु:खाचे निवारण करणे शक्य आहे काय? जर असेल तर त्याचे उपाय काय आहेत? दु:ख निर्माण होण्यापूर्विच त्या मागिल कारणाला रोखणे शक्य आहे काय? इत्यादी अनेक प्रश्न सर्वांनाच पडते. कित्येकांनी त्याचा शोध घेऊन पाहिला असेलही ! कित्येकांनी याच्या मागे देव, ईश्वर, परमात्मा यासारखे शक्ती असल्याचे कारणे सांगून स्वत:ची जबाबदारी झटकून टाकली आहे. त्यासाठी त्यांनी देवपूजा, देवभक्ती, आहुती देणे, नैवद्य देणे, बळी देणे, लाच देणे, इत्यादी दु:खमुक्तीचे अगदी सोपे उपाय सांगितले आहेत. जीवनात केलेल्या दुष्कृत्याच्या पापाची डागे गंगा, गोदावरी सारख्या तथाकथीत पवित्र नदीमध्ये व कुंभमेळ्यामधे स्नान करुन धुवून काढता येते अशी शिकवण धर्मभोळे लोकांना सांगितले आहे. परंतु भगवान बुध्दाने मात्र याचा शोध शास्त्रीय व वैज्ञानीक दृष्टिकोनातून घेतला आहे. दु:ख, दु:ख निर्मिती, त्याची कारणे, त्यावर उपाय इत्यादी सर्व बाबींचा सखोलपणे अभ्यास करुन त्यांनी सविस्तर अशी मांडणी केली आहे.
क्रमशः
आर.के.जुमळे
दि.२३.१२.२०२३
टीप- ‘भगवान बुद्धांची शिकवण’ हे माझं पुस्तक Amazon Kindle वर असून त्यावर आधारित ही लेखमाला सादर करीत आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!