राज्यात ३० ऑगस्टच्या दरम्यान विजेची मागणी २६ हजार मेगावाॅटवर गेल्यावर विजेचा तुटवडा.

राज्यात ३० ऑगस्टच्या दरम्यान विजेची मागणी २६ हजार मेगावाॅटवर गेल्यावर विजेचा तुटवडा निर्माण झाल्याने एफ गटातील फिडरवर महावितरणला भारनियमन करावे लागले. त्यानंतर पावसामुळे ही मागणी घसरून २१ हजार २३८ मेगावाॅटवर आली होती. परंतु, आताही राज्यातील काही भागात पाऊस असताना विजेची मागणी पुन्हा २६ हजार मेगावाॅटवर गेल्याने वीज कंपन्यांची चिंता वाढली आहे.
पावसाने दडी मारल्याने राज्यात ३० ऑगस्टच्या दरम्यान विजेची मागणी थेट २६ हजार मेगावाॅटवर गेली होती. त्यापैकी २३ हजार ते २४ हजार मेगावॉटची मागणी महावितरणची होती. महावितरणकडे मागणीच्या तुलनेत ९०० ते १,२०० मेगावॉट विजेचा तुटवडा असल्याने त्यांना एफ गटातील फिडरवर भारनियमन करावे लागले. राज्यातील बऱ्याच भागात पाऊस सुरू झाल्यावर कृषी पंपासह पंखे व इतरही विद्युत यंत्राचा वापर कमी झाल्यावर ९ सप्टेंबरच्या दरम्यान मागणी घसरून २१ हजार २३८ मेगावॉटवर आली आहे.
गुरुवारी (१४ सप्टेंबर) राज्यात काही भागात पाऊस असतानाही दुपारी ३.३० वाजता विजेची मागणी २५ हजार ९७६ मेगावॉट नोंदवली गेली. त्यापैकी २१ हजार ३७४ मेगावॉटची मागणी महावितरणची होती. गुरुवारी मागणीनुसार पुरवठा सुरू असला तरी मागणी वाढण्याची प्रक्रिया कायम असल्यास पुन्हा वीज कंपन्यांची अडचण वाढून नागरिकांना भरनियमनाला समोर जाण्याचा धोका आहे. विजेची मागणी वाढल्याच्या वृत्ताला महावितरणच्या एका अधिकाऱ्याने नाव न टाकण्याच्या अटीवर दुजोरा दिला
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत