
🌻रणजित मेश्राम लेखक प्रख्यात विचारवंत अभ्यासक साहित्यिक समीक्षक आहेत
२३० विधानसभा सदस्य असलेला मध्यप्रदेश हिंदुत्वाची प्रयोगशाळा होतेय याचे आश्चर्य वाटू नये. या राज्यात अधिक काळ कांग्रेसचे राज्य असतांना हे घडतेय.
गुजरात कट्टरपंथी आहे. गुजरातला गांधी , पटेल यांची पार्श्वभूमी असली तरी ते तसे झाले. तिथे अलीकडील दीर्घकाळ भाजप , नरेंद्र मोदी यांची सत्ता होती. सत्तेत भाजपचे सातत्य आहे. तिथे आधीपासून संघ सक्रिय आहे. तसे काही मध्यप्रदेशात घडले नाही. या राज्यातून कांग्रेसचे बडे नेते झाले. आजघडीला दिग्विजयसिंह (दिग्गिराजा) , कमलनाथ हे हयात आहेत. तरीही हे घडत आहे.
मुंबईकडच्यांना मध्यप्रदेश दूर असेल. नागपुरकरांना घरआंगण आहे. गाव ओलांडले की मध्यप्रदेश अशी स्थिती आहे. आधी नागपूर हे मध्यप्रदेशचे राजधानीचे शहर होते. विधानभवन , मुख्यमंत्र्यांचे सचिवालय , रवीभवन दिसतातच. रवीभवन हे मध्यप्रदेशचे पहिले मुख्यमंत्री रवीशंकर शुक्ला यांचे नावावर आहे. १९५६ चे ऐतिहासिक धर्मांतर मध्यप्रदेश राज्य असतांना झालेय.
म्हणून मध्यप्रदेशच्या घडामोडींकडे एकदम दुर्लक्ष करून चालणारे नाही.
तसे पाहता २०२३ च्या विधानसभा निवडणुकीत जागांत फार अंतर असले तरी मतदानाच्या टक्केवारीत दोन दलांत फार अंतर नाही. इथे मध्यप्रदेशात बहुधा भाजपा विरुद्ध कांग्रेस अशीच सरळ लढत होत असते. २०२३ ला भाजपला ४८.५५ व कांग्रेसला ४०.४० टक्के मते मिळाली. पण जागा भाजपला १६३ व कांग्रेसला केवळ ६६ मिळाल्या. २०१८ च्या निवडणूक तुलनेत भाजपच्या ५४ जागा वाढल्या. त्याचवेळी कांग्रेसच्या ४८ जागा कमी झाल्या.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत लोकसभेच्या सर्व जागा भाजपने जिंकल्या. असे कां ? असे कां घडले असेल ?
याला अनेक कारणे असतील. किंबहुना आहेत. पण एक कारण ठळक आहे. ते कारण म्हणजे संघ ! हे कारण , कारक (factor) आहे. ते कदाचित महत्त्वाचे ठरावे. गेल्या काही वर्षांत संघाने इथल्या आदिवासीत काम वाढविले. त्याचे परिणाम आता दिसत आहेत. संघाचे काम म्हणजे शेवटी हिंदुकरण ! ते मोठ्या प्रमाणावर यशस्वी झाले. हिंदुकरण म्हणजे संघीकरण. एकदा ते झाले की तो कायम भाजपचा होतोय. तेच नेमके मध्यप्रदेशात घडलेय.
हिंदुकरण झाले की गणेशोत्सव , नवरात्र हे आलेच. मध्यप्रदेश मध्ये या धार्मिक उत्सवांनी जोर धरलाय. सारे नवे असल्याने उत्साह अधिक आहे. जनप्रतिनिधी सोबत असल्याने उत्साह अधिक वाढलाय. मध्यप्रदेशमधून आदिवासीतील मंत्री केंद्रात आहेत.
इतर धर्मियांनी आदिवासीत धर्मपरिवर्तन केले की राष्ट्रद्रोह ठरतो. हिंदूद्वारे घडले की राष्ट्रकार्य .. घरवापसी !
भारतात झारखंड , छत्तीसगड ही आदिवासीबहुल राज्ये आहेत. पण सर्वात अधिक आरक्षित (एस टी) जागा असलेले राज्य मध्यप्रदेश आहे. या राज्यात २३० पैकी ४७ जागा आदिवासींसाठी सुरक्षित आहेत. बहुतेक यासर्व भाजपकडे आहेत. महाराष्ट्रात एकूण २८८ पैकी २५ जागा आदिवासींसाठी आहेत. यावरून हे प्रमाण लक्षात यावे. मध्यप्रदेश मध्ये जनगणनेनुसार २१ टक्के आदिवासी आहेत. झाबुआ , मंडला , सरपौन , धार , बडवानी , बैतुल , होशंगाबाद , उमरिया , अनापूर , ग्वाल्हेर , सीधी , शहडोल , हरदा , श्योपूर या जिल्ह्यात आदिवासींचा प्रभाव आहे.
भारतात एकूण लोकसंख्येच्या ८.६ टक्के आदिवासी आहेत.
कांग्रेसने आता इथे कात टाकली. ज्येष्ठांना बाजूला केले. जीतू पटवारी या तरुणाकडे राज्याचे नेतृत्व दिले. जीतू एलएल बी आहेत. उमंग सिंगार हे दुसरे तरुण विधानसभेत पक्षनेते आहेत. नुकतेच काळे कपडे घालून कांग्रेसी आमदारांनी विनानभवनापूढे निदर्शने केली. आदिवासी मंत्री कुंवर विजय शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
पण कांग्रेस भाजपच्या धार्मिक उन्मादावर ब्र काढत नाही हेही तितकेच खरे आहे.
यासर्व घडामोडीवरुन एक लक्षात येतेय , केवळ संघाचा वा भाजपचा विरोध हा उपाय नाही. लोकांची मानसिकता दैनंदिन जगणे या मुद्यावर आणणे हा सशक्त उपाय होऊ शकेल. प्रतिकात्मक स्मरणे अल्पजीवी ठरतात. केवळ प्रतिक्रिया ही प्रतिक्रियावादी ताकद (reactionary force) सारखी प्रतिगामी ठरते. आर्थिक प्रश्नांवर लोकसहभागातून लढे हा तुर्तास उपाय दिसतो. तिथे सातत्याबाबत संघाचा पाठ पूढे ठेवावा म्हटले तरी चुकणार नाही.
० रणजित मेश्राम
👤
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत