‘जिकडे सत्ता तिकडे आत्ता’ हि भूमीका आता उदगीरचे भाजपचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांनीही स्वीकारली

“जमली तर पक्षनिष्ठा नाहि तर पक्षापासून सूटका” या श्रेणीत अहमदपूरचे माजी आमदार विनायकराव पाटील यांच्याबरोबर आता उदगीरचे भाजपचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांचेही नावही चर्चेत आले आहे. कधी काँग्रेसमध्ये तर कधी अपक्ष अशी निवडणूक लढवून जिकडे सत्ता तिकडे विनायकराव हे गणित अहमदपूरच्या मतदारांना माहीत आहे. पण अनेक वर्षे भाजपशी एकनिष्ठ असणाऱ्या सुधाकर भालेराव यांच्याविषयी आता भाजपमध्ये नवनवीन चर्चा सुरू झाल्या आहेत.
सोयीचे गणित या राजकीय सूत्राला आता मान्यता मिळाली आहे. सत्तेत जाण्यासाठी वाट्टेल ते करणाऱ्या नेत्यांच्या रांगेत आता प्रत्येक विधानसभेत कार्यकर्तेही दिसू लागले आहेत. लातूर जिल्ह्यातील अहमदपूर व उदगीर या दोन मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाबासाहेब पाटील व संजय बनसोडे २०१९च्या विधानसभा निवडणुकीत निवडून आले. दोन्ही आमदारांनी अजितदादांसमवेत सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला. या दोन्ही मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकाची मते भाजपला मिळाली होती. नव्या तडजोडीमुळे विधानसभा निवडणुकीत विद्यामान आमदारांना संधी दिली जाईल की भाजप अजितदादांबरोबर तडजोड करेल असे प्रश्न उभे ठाकले आहेत. यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांत अस्वस्थता आहे. २०१७मध्ये अहमदपूरमधील अपक्ष आमदार विनायकराव पाटील यांनी तत्कालीन पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्याशी चर्चा करून भाजपत प्रवेश केला होता. २०१९ मध्ये भाजपने उमेदवारी द्यावी या अटीवरच तो पक्षप्रवेश होता.
अहमदपूर मतदारसंघात तेव्हा भाजपचे डझनापेक्षा अधिक कार्यकर्ते उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्नरत होते . २०१९ मध्ये विनायकराव पाटील वगळता कोणालाही उमेदवारी द्या आम्ही सगळे एकत्रित राहून काम करू, असे कार्यकर्त्यांनी सांगितले होते. मात्र, पक्षाने विनायकराव पाटील यांनाच उमेदवारी दिली. त्यामुळे भाजपतून दोघांनी बंडखोरी केली. परिणामी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाबासाहेब पाटील विजयी झाले. उदगीर विधानसभा मतदारसंघात २००९ मध्ये सुधाकर भालेराव हे भाजपचे आमदार म्हणून निवडून आले. त्यावेळी मराठवाड्यात पंकजा मुंडे व सुधाकर भालेराव हे दोनच आमदार निवडून आले होते. त्यानंतर २०१४ साली भालेराव निवडून आले. मात्र, २०१९ मध्ये भाजपमधील कुरघोडीतून त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली त्यामुळे भालेराव यांनी बंडखोरी करण्याचे ठरवले होते. मात्र, देवेंद्र फडणवीस यांच्या आग्रहामुळे त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. २०१९ च्या निवडणुकीत भाजप उमेदवाराचा पराभव करत राष्ट्रवादीचे आमदार संजय बनसोडे विजयी झाले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत