महामानवांच्या विचारांवर आधारित, सद्धम्म चर्चा भाग-३८ (१५ जुलै २०२४)

संकलन व संपादन: प्रकाश डबरासे,
(अस्पृश्यतेच्या उत्पत्तीचा सिद्धांत – क्रमशः दिनांक १३ जुलै २०२४च्या भाग ३६ पासून पुढे… )
हिंदू आणि अस्पृश्य लोकांमधील भेदभाव का? या विषयीचे स्पष्टीकरण देतांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, या स्पष्टीकरणाचा मेळ अर्थातच सुरवातीच्या स्थितीशी म्हणजे, जेव्हा अस्पृश्य लोकं अस्पृश्य नव्हते तर ते केवळ वाताहत झालेले लोकं होते, त्यावेळच्या स्थितीशी आहे. हे वाताहत झालेले लोकं बौद्ध धर्मीय असल्यामुळे ब्राम्हणांना पूज्य मानीत नव्हते. त्यांना पौरोहित्याचे काम देत नव्हते. दुसऱ्या बाजूने बघता ते बौद्ध धर्मीय असल्यामुळे ब्राम्हणही त्यांचा द्वेष करीत होते आणि त्यांच्याबद्दल द्वेष व तिरस्काराचा प्रसार आपल्या प्रवाचनातून करत होते. त्याचा परिणाम असा झाला की, या वाताहत झालेल्या अर्थात बौद्ध लोकांना अस्पृश्य मानण्यात आले. हे वाताहत झालेले लोकं बौद्ध धर्मीय असून जेव्हा ब्राम्हणी धर्माचा बुद्ध धर्मावर वरचस्मा झाला, तेव्हाही ब्राम्हण धर्मात इतरांप्रमाणे सहजगत्या परत येण्यास ते नाखुश होते. हे जर आपण मान्य केले, तर आपणास दोन्ही प्रकारचे स्पष्टीकरण मिळते. अस्पृश्य ब्राम्हणांना अशुभ का मानतात? त्यांना आपले उपाध्याय का मानत नाहीत? आणि, आपल्या वस्तीमध्ये शिरण्यास त्यांना मनाई का करतात? या वाताहत झालेल्या लोकांना अस्पृश्य का मानण्यात आले, यांचाही उलगडा यामुळे होतो. वाताहत झालेल्या या लोकांनी ब्राम्हणांचा तिरस्कार करण्याचे कारण म्हणजे ब्राम्हण हे बौद्ध धर्मियांचे शत्रू होते आणि ब्राम्हणांनी वाताहत झालेल्या लोकांवर अस्पृश्यता लादण्याचे कारण म्हणजे त्यांनी बौद्ध धर्म सोडला नाही, हे होय.
वरील विश्लेषणावरून बाबासाहेब असा निष्कर्ष काढतात की, जे बौद्ध धर्मीय होते त्यांच्याबद्दल ब्राम्हणांनी पसरविलेला द्वेष आणि तिरस्कार हे अस्पृश्यता उगमाच्या कारणांपैकी एक कारण आहे. वाताहत झालेले लोकं अस्पृश्य बनले याचे एकमेव कारण म्हणून बौद्ध व ब्राम्हण यांच्यामधील द्वेष आहे असे मानता येईल काय? असा प्रश्न उपस्थित करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, निश्चितच तसे करण्यासारखे नाही. कारण, ब्राम्हणांनी बौद्ध धर्मियांविरुद्ध केलेल्या तिरस्कारचा प्रचार सर्वच बौद्ध धर्मियांविरुद्ध असून तो केवळ वाताहत झालेल्या लोकांविरुद्ध नव्हता. यावरुन एक स्पष्ट होते की, ज्याअर्थी केवळ वाताहत झालेल्या लोकांनाच अस्पृश्यता चिकटली, त्याअर्थी अन्य परिस्थितीही याला कारणीभूत असली पाहिजे, हे उघड आहे.
आता पर्यंत आपण अस्पृश्यतेचे पहिले मूळ, बौद्ध धम्माचा तिरस्कार यावर चर्चा केली. आता आपण अस्पृश्यतेच्या दुसऱ्या मुळाबाबत चर्चा करूया.
अस्पृश्यतेचे दुसरे मूळ – गोमांस भक्षण: बौद्ध धर्मियांचा तिरस्कार हे अस्पृश्यता उत्पत्तीचे एक कारण आहे. त्याच बरोबर गोमांस भक्षण हे देखील अस्पृश्यतेची भावना अधिक तीव्र होण्याचे कारण आहे. ब्राम्हणांनी गाई संबंधीचा पूज्यभाव व प्रेम नव्यानेच सुरू केले होते. त्यात वाताहत झालेल्या लोकांनी गोमांस भक्षणाची आपली सवय सुरू ठेवली. परिणामतः ब्राम्हणांना आणखीच दुखण्यास ते कारणीभूत ठरले. त्यामुळे, गोमांस भक्षकांना त्यांनी अस्पृश्य मानणे तर्कसंगत ठरते, अशा प्रकारचे स्पष्टीकरण बाबासाहेब देतात.
(क्रमशः..बाबांसाहेबांचा सिद्धांत पुढील भागात).
संकलन व संपादन: प्रकाश डबरासे,
(मा. प्रदीप आगलावे यांच्या, समाजशास्त्रज्ञ डॅा. बाबासाहेब आंबेडकर या ग्रंथातून)
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत