भारतावर आर्थिक संकट आले आहे

डॉ. प्रदीप पाटील
भारतावर आर्थिक संकट आले आहे. देशभक्तीचे नाव घेणाऱ्या मोदीजी आणि त्यांचा पक्ष भाजपा यांना हिंदुत्वाचे रक्षण करायची व हिंदूंचे उत्थान करण्याची सुवर्णसंधी आता साधून आली आहे!
देशामध्ये आर्थिक संकट आले आहे यासाठी मी काही उपाय सुचवतो…
पहिला उपाय
सर्वात जास्त पैसे आज भारतीय जनता पक्षाकडे आहेत. ४८४७ करोड रुपये (४८,४७,००,००,००० ₹) सध्या या पक्षाकडे इलेक्टोरल बाॅंडचे आहेत. हे धरून व बाकीची मालमत्ता वगैरे बेरीज केली तर ६० हजार करोड रुपये पडून आहेत. (एडीआर रिपोर्ट). हे पैसे देशभक्त भारतीय जनता पार्टीने तात्काळ देशाच्या तिजोरीत जमा करावे आणि देश वाचवावा.
लालबहादूर शास्त्रींचा हाच आदर्श आहे.
दुसरा उपाय
३०११ करोड रुपये नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी मंजूर केले गेले आहेत. ते सर्व पैसे तात्काळ भारतीय हिंदू समाजासाठी वापरण्यात यावेत आणि त्यांच्यावर आलेले आर्थिक संकट दूर करावे. यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भारतीय जनता पार्टी आणि सर्व हिंदुत्ववादी संघटना यांनी देशभक्तीचे आणि हिंदूंच्या रक्षणाचे उत्तम उदाहरण मदत करून घालून द्यावे. आध्यात्मिक दृष्टीने स्वार्थ आणि परमार्थ साधता येईल!
तिसरा उपाय
भारतीय जनता पार्टीने आपल्या पक्षात ज्या भ्रष्टाचारी नेत्यांना प्रवेश दिला व मुख्यमंत्री, मंत्री आणि नेते म्हणून सुंदर आणि छान जागा दिली त्या सर्व भ्रष्टाचारी नेत्यांचे आर्थिक व्यवहार तपासून त्यांचा सर्व पैसा तात्काळ आपल्या भारतीय रिझर्व बँकेत जमा करावा व सध्या आलेल्या आर्थिक संकटात त्यांचे नाव उज्वल करावे. जुलै २०२१ मध्ये, भारताच्या केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) माहितीच्या अधिकाराच्या (RTI) विनंत्यांना उत्तर देताना सांगितले की, जून २०२१ पर्यंत केलेल्या तपासानंतर त्यांनी भारत आणि परदेशात २०,०७८ कोटी रुपयांची अघोषित मालमत्ता ओळखली आहे.
वॉशिंग मशीन वापरून त्यांचे काळे धन पांढरे करून जनतेलाच प्रदान केले तर तेही शुद्ध होतील!
चौथा उपाय
खालील बुवांनी त्यांचे भरलेले खजाने भारतावर आलेल्या संकटासाठी सामान्य भक्त माणसांसाठी ओतावेत अशी मी सामान्य माणूस म्हणून विनंती करतो.
१. महर्षी महेश योगी: ६०००० (साठ हजार) करोड
२. स्वामी नित्यानंद: दहा हजार करोड
३. आसाराम बापू: पाच ते दहा हजार करोड
४. बाबा रामदेव त्रेचाळीस हजार करोड
५. इतर सर्व बाबा मिळून पन्नास हजार करोड च्या वर असलेली संपत्ती
या सर्व बाबा-बुवांची संपत्ती त्यांनी भक्तांच्या दानातून उभी केलेली आहे. म्हणजेच आता भक्त अडचणीत आल्यावर तात्काळ त्यांनी भक्तांना मदत करावी! मोदीजींनी आता बाबा-बुवा यांना धर्म प्रेरित व्हा असे सांगण्याची वेळ आली आहे.
पाचवा उपाय
भारतातील सर्व सत्ताधारी मंत्री, खासदार, आमदार यांच्या मालमत्ता ज्या इलेक्शन कमिशन कडे नोंदविल्या गेल्या आहेत त्याच्या आधारे त्यांच्या सर्व रकमा व मालमत्ता या भारतीय जनतेसाठी देशभक्ती म्हणून तात्काळ पंतप्रधानांच्या आवाहनानुसार भारतीय अर्थ खात्यामध्ये जमा कराव्यात!
सहावा उपाय
भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरे (२०२६ अंदाज).
*तिरुमला वेंकटेश्वर मंदिर (आंध्र प्रदेश): अंदाजे निव्वळ संपत्ती ₹ 2.5-3 लाख कोटी पेक्षा जास्त आहे, अंदाजे
अब्जावधी बँक ठेवी आणि मोठ्या प्रमाणात सोन्याच्या ठेवी.
*श्री पद्मनाभस्वामी मंदिर (केरळ): सोने, पाचू, हिऱ्यांसह त्याच्या तिजोरीत सापडलेल्या खजिन्यामुळे १.२ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्य आहे.
- गुरुवायर मंदिर (केरळ): येथे १,७३७ कोटी रुपयांच्या बँक ठेवी, २७१ एकर जमीन आणि सोन्याचे / मौल्यवान साठे आहेत.
*शिर्डी साईबाबा मंदिर (महाराष्ट्र) : लक्षणीय वार्षिक देणग्यांसह ₹ १८०० कोटी पेक्षा जास्त संपत्ती नोंदविली जाते.
*वैष्णोदेवी (जम्मू): गेल्या दोन दशकांत १८०० किलो सोने, ४७०० किलो चांदी आणि २००० कोटी रुपयांहून अधिक रोख देणग्या आहेत.
*सुवर्ण मंदिर (पंजाब): वर्षाकाठी सुमारे ५०० कोटी रुपये उत्पन्न मिळते.
*सिद्धिविनायक मंदिर (मुंबई) : १८० कोटी रुपयांहून अधिक संपत्तीसह भरीव देणग्या मिळाल्या आहेत.
*जगन्नाथ मंदिर (ओडिशा): येथे ₹ १५० करोड ची मालमत्ता.
वरील सर्व माहिती इकॉनॉमिक्स टाईम्स नुसार आहे. अघोषित माहिती नाही.
इतर सर्व धर्मातील दर्गे, चर्चेस, इत्यादी देखील संपत्ती बाळगून आहेत.
पण हिंदू समाजाचे उत्थान करण्यासाठी आणि देवांचा आशीर्वाद मिळण्यासाठी जमा झालेला पैसा जनतेला आशीर्वाद रूपाने दान करावा आणि यासाठी मोदीजींनी पुढाकार घ्यावा.
सातवा उपाय
सर्वात मोठे आर्थिक रक्षण या देशाचे कोणी करेल तर ते म्हणजे अदानी व अंबानी हेच होत.
आज जगात श्रीमंतांच्या यादीत ११व्या स्थानावर असलेले अंबानी आम जनतेच्या पैशातून आणि मोदीजींच्या कृपेने
85,85,27,55,00,000.00रुपयांचे म्हणजे ९० बिलीयन डॉलर्सचे मालक आहेत. हे
फोर्ब्स व इकॉनॉमिक्स टाईम्सने जाहीर केले आहे.
अदानी तर जगात १९ व्या स्थानावर तर अशियात पहिल्या स्थानावर राहून 88,42,83,37,65,000.00 रुपयांचे म्हणजे ९२.६ बिलीयन डॉलर्सचे मालक आहेत. असे इकॉनॉमिक्स टाईम्स म्हणते.
मोदींजीच्या हिंदुत्वाच्या प्रेमापोटी त्यांनीही देशाची साथ देत स्वतःचा विकास केला आहे. त्यामुळे मोदीजींनी त्यांना आवाहन करून सारी गंगाजळी सरकार खात्यात जमा करून सामान्य जनतेची आर्थिक संकटातून मुक्तता करावी व जनतेचे आशीर्वाद व मते घ्यावीत.
एवढे सारे पैसे शिल्लक असताना टॅक्स भरणाऱ्या सामान्य हिंदू जनतेला का बरे सांगावे ?
वरील जमा झालेल्या रकमा या सर्व कागदोपत्री आहेत घोषित आहेत पण अघोषित अशा अनेक संपत्ती आणि पैसे किती असतील हे मोदीजी आणि भारतीय जनता पार्टी खणून काढू शकते. त्यांनी अघोषित रकमा देखील तात्काळ जप्त करण्याच्या उपाययोजनांच्या मागे लागावे
कारभार नीट करावा व देशाची आर्थिक घडी मजबूत करावी यासाठी लोकांनी पंतप्रधान, गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांना निवडून दिलेले आहे. ते जर हे सर्व करण्यात फेल झालेले असतील, नापास झालेले असतील तर त्यांनी भारतीय जनतेचा विश्वासघात केलेला आहे. म्हणूनच आता त्यांनीच केलेल्या कारभाराकरिता वरील ७ उपाय तात्काळ अमलात आणावेत आणि जनतेला बचत करण्याचा वायफळ सल्ला देऊ नये.
जनतेने बचत करण्यासाठी कोणत्याही भारतीय जनता पक्षाच्या नेत्याला निवडून दिलेले नाही. आणि म्हणूनच नैतिक जबाबदारी घेऊन तात्काळ वरील गोष्टींची कार्यवाही केली तर जनता, भारतीय जनता पार्टीला धन्यवाद देईल.
दिवसेंदिवस गरीब होत चाललेल्या ‘सामान्य हिंदू’ जनतेला मोदीजींनी आवाहन करू नये.
अब्दुलचा तर प्रश्नच उद्भवत नाही कारण त्यांना या देशात स्थानच द्यायचे नाही.
हिंदुत्वाच्या प्रेमातून त्यांनी हिंदू राष्ट्राचे रक्षण करण्यासाठी वरील सर्व ठोस उपाययोजना कराव्यात.
चला तर आपण सर्वजण राष्ट्रभक्तीचे कंत्राट घेतलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व त्यांचे भारावलेले भक्त स्वयंसेवक, भारतीय जनता पार्टी व त्यांचे भक्त व मोदीजी आणि मोदीजींच्या प्रेमात पडलेले सर्व स्त्री पुरुष यांना वरील उपाय करण्यास दक्ष होण्यास सांगूया
आणि देश वाचूया…
विशेष म्हणजे वाढत चाललेल्या महागाईत आम्ही दिवसेंदिवस गरीब होत चाललेलो आहोत तर आणखी गरीब होण्यापासून आपण स्वतःलाच वाचवूया..!
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत



