दिन विशेषमहाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

आंबेडकरवादी कार्यकर्त्यांचे वाढदिवस

॥आंबेडकरवादी कार्यकर्त्यांचे वाढदिवस॥

   एका विद्यार्थी मार्गदर्शनपर शिबीरासाठी मुंबईतील एका सुप्रसिद्ध आंबेडकरवादी वस्तीत गेलो होतो. अगदी प्रवेशद्वाराजवळच कोणाच्या तरी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारे ‘बॅनर’ लागले होते. चेहरा ओळखीचा वाटला म्हणून जरा निरखून पाहिले. काही वर्षांपूर्वी याच वस्तीत आम्ही इंग्रजीचा अभ्यासवर्ग चालवायचो. त्यासाठी मदत करणाऱ्या एका कार्यकर्त्याचा तो मुलगा होता. घरी गेल्यावर आदराने ‘जयभीम’ करायचा, आईने केलेला चहानाश्ता प्रेमाने आणून द्यायचा. परंतु वडिलांनी लाख प्रयत्न करूनही तो शिकू शकला नाही. पुढे वडिलांचा विरोध पत्करून तो कुठल्याशा राजकीय पक्षात गेला. तिथे बस्तान बसेना म्हणून आता पार्टी बदलून वस्तीचा अध्यक्ष झाला होता. बॅनरवर त्याच्याच वाढदिवसाचा फोटो झळकत होता ! खाली शुभेच्छा देणाऱ्यांचे हसरे फोटो होते. त्यांनी विशेषणांचा भडिमार करून आपल्या नेत्याचे वर्णन केले होते. ती विशेषणे वाचून मला त्या मुलाची नव्याने ओळख झाली ! 
    हा “संसर्ग” आंबेडकरी वस्त्यांत कुठून आला ? मंत्री- नेते व राजकीय पुढाऱ्यांचे भर शहरात मोक्याच्या जागी लागलेले वाढदिवसाचे बॅनर्स आपण बघतो. त्यांचेच अनुकरण “आपल्या” नेत्यांनी केले आणि आता नेत्यांचे अनुकरण त्यांचे कार्यकर्ते करीत आहेत. थोडक्यात, हा संसर्ग आंबेडकरी वस्त्यांत “बाहेरून” आला आहे. तो एवढा विकोपाला गेला आहे कि, ‘बॅनर लागल्याशिवाय मी नेता - कार्यकर्ता आहे’ असे कोणालाच वाटेनासे झाले आहे ! 

    आंबेडकरी समाज हा फार जागृत समजला जातो. तसा तो आहे देखील ! जागरूकता एवढी कि , ‘कोणता नेता मोठा ?’ यांवरून समाजात वादविवाद होतातच , परंतु ‘कोणता कार्यकर्ता मोठा ?’ यांवरून देखील वादावादी - भांडणे होतात ! एवढ्या मोठ्या मुंबई शहरांत रोज कोणाचा ना कोणाचा वाढदिवस असतोच ! त्यामुळे प्रत्येक वस्तीत निदान आठ - पंधरा दिवसांत तरी असे नवीन बॅनर्स लावले जातात. त्यासाठी कार्यकर्ते हौसेने पैसे जमा करतात व छानपैकी पोस्टर - बॅनर बनवून घेतात. वस्तीत थोडी सामसूम झाल्यावर हेच कार्यकर्ते एखाद्या ठिकाणी जमतात व बॅनर लावतात. सकाळी उठल्यावर समाजाला आपल्या वस्तीत नवीन नेता जन्माला आल्याचा साक्षात्कार होतो. मग बॅनरवरील नेत्याचा व त्याच्यासोबत फोटो लावलेल्या कार्यकर्त्यांचा भाव आपोआप वाढतो ! 
    बॅनरवरील नेत्यांसाठी वापरली गेलेली विशेषणे वाचून तर सर्वसामान्य भीमसैनिक गपगार होतात. एवढे ‘भीमपराक्रमी’ नेते व कार्यकर्ते आपल्या समाजात असूनही भाजपा , कॉंग्रेस , राष्ट्रवादी, शिवसेना हे सगळे मनुवादी पक्ष आपल्या बोकांडी का बसले आहेत ? असा प्रश्न त्यांना पडतो ! सौजन्याचा भाग म्हणून तो कोणी विचारीत नाही. अशा मनुवादी पक्षांच्या कार्यालयात भिजलेली मांजरे होऊन बसलेले हे कार्यकर्ते अनेकदा आपल्याच वस्तीत ट्यांव ट्यांव करतात. परंतु ते प्रामाणिक भीमसैनिकांच्या वाटेला जात नाहीत ! न जाणो या सामान्य भीमसैनिकाने चारचौघात आपल्यासह आपल्या नेत्याचाही उद्धार केला तर काय घ्या ? असा व्यावहारिक विचार त्यामागे असतो. परंतु , या सामान्य भीमसैनिकांच्या मनात एक वेगळाच विचार घोळत असतो. तो असा कि , या बॅनरबाज कार्यकर्त्यांनी जाहीरपणे आपले वाढदिवस साजरे करण्याइतपत काय कर्तृत्व गाजवले आहे ? हे सगळे भीमसैनिक म्हणजे आपापले घरसंसार नोकरी उद्योग सांभाळून ‘सोसल तितकं सोशल’ काम करणारे तुमच्या- आमच्यासारखे सामान्य जण ! त्यांच्या या प्रश्नाचे उत्तर कुठे भेटत नाही. 
     याचा अर्थ असा नाही कि , वाढदिवस साजरा करूच नये ! एखाद्याची वा मित्रमंडळींची इच्छा असेल तर आपला वाढदिवस कौटुंबिक स्तरावर जरूर साजरा करा. मित्रभाव म्हणून अथवा सामाजिक जीवनाचा भाग म्हणून कोणासाठी वाढदिवसानिमित्त मंगल कामना व्यक्त करायच्या असतील तर त्या वैयक्तिक स्तरावर अवश्य कराव्यात ! या निमित्ताने भेटायला जाणे , काही भेटवस्तू देणे , तिथे काही सामाजिक चर्चा करणे , हे सगळे होऊ देत ! परंतु समाजात दृश्यमान होईल असे परिवर्तन घडवण्याची कुवत अंगी नसलेल्या , सामाजिक कर्तृत्व शून्यवत असलेल्या  माणसांना आपल्या वाढदिवसाचे सार्वजनिक प्रदर्शन करायला का आवडते ? 
     अशा प्रदर्शनीय वाढदिवसांत समाजाची किती ‘एनर्जी’ खर्च होते ? हीच ‘एनर्जी’ मनुवादाचा निःपात करण्यासाठी , अर्थसंकल्प समजून घेण्यासाठी- सांगण्यासाठी, देशाचे व समाजाचे शैक्षणिक - आरोग्यविषयक प्रश्न समजून घेण्यासाठी - सोडवण्यासाठी वापरली गेली तर आपल्या बऱ्याच समस्या मार्गी लागू शकतील ! जिथे शक्ती लावून खरेखुरे समाजपरिवर्तन करायचे आहे तिथे हे चमकेश कार्यकर्ते काही करीत नाही , कारण ते काम कठीण आहे. वाढदिवस साजरा करणे हे त्यामानाने फारच सोपे ! सोशल मिडियावर शुभेच्छा दिल्या , नेत्याच्या नजरेत येण्यासाठी फ्लेक्स लावले कि झाले ! म्हणून आपल्या कोणत्याही वस्तीत जा, तिथे दर आठवडा- महिन्याला असे वाढदिवसाचे फ्लेक्स दिसत असतात ! त्यातील विशेषणांचा पाऊस व कार्यकर्त्यांचे हसरेगोजरे फोटो बघून आपणांस जुन्या परिचित चेहऱ्यांच्या नवीन नेत्यांची नव्यानेच ओळख होते ! एवढी महान विशेषणे सांभाळणारे एवढे कार्यकर्ते एवढ्या मोठ्या संख्येने प्रत्येक वस्तीत असूनही आपला सामाजिक न्याय खात्याचा शेकडो कोटींचा निधी लाडक्या बहिणीकडे वळवला जातो. तरीही आमचे फ्लेक्समधील कार्यकर्ते हसतमुख असतात ! जणू हा निधी पळवल्याचा त्यांना फार आनंद झाला आहे ! 
    एक उदाहरण सांगावेसे वाटते. जगभरातील आंबेडकरी समाज दरवर्षी 6 डिसेंबर रोजी दादर येथील चैत्यभूमीवर जातो. बाजूलाच शिवाजी पार्क म्हणून वस्ती आहे. तिथे बहुसंख्य ब्राह्मण राहतात. ब्राह्मण समाजातील अगदी नामवंत सार्वजनिक व्यक्तिमत्वे तिथे राहतात. परंतु तिथे कोणीही आपले फोटो छापलेले बॅनर्स लावून आपल्या वाढदिवसाचे प्रदर्शन करीत नाहीत. पुण्याच्या सदाशिव पेठेत देखील असे चित्र दिसत नाही. आपली वस्ती सुंदर नीटनेटकी दिसावी , अशा बॅनर्सने तिची शोभा घालवू नये , अशी येथील नागरिकांची भूमिका असते. तेथील सगळी मोठी माणसे ही भूमिका मान्य करतात !
      याचा अर्थ या मंडळींचे वाढदिवस साजरे होत नाहीत , असा नाही. गैरब्राह्मणांच्या अनेक वस्त्यांमध्ये अथवा सार्वजनिक ठिकाणी ब्राह्मण समाजातील व्यक्तींचे फ्लेक्स लावलेले दिसतात, ते देखील गैर ब्राह्मण समाजाकडून ! ‘इतरांनी त्यांच्या वस्त्यांत अथवा सार्वजनिक ठिकाणी आमचे बॅनर्स लावावेत , आम्ही आमच्या वस्त्यांत आमचेच बॅनर्स लावत नाही तर इतरांचे कुठून लावणार ?’ ही त्या समाजाची प्रगल्भता आहे आणि ती दखलपात्र आहे. 

     आता आंबेडकरवाद आणि ब्राह्मण्यवादाचे जुने भांडण आहे , हे खरे आहे. आपण योग्य त्या पातळीवर योग्य त्या पद्धतीने ते पुढे देखील नेऊ या ! तथापि, ब्राह्मण्यवादाचा प्रमुख आधार असलेला मनुवादी ब्राह्मण समाज हा स्वतःला ‘शासनकर्ता’ समजतो आणि इतरांशी देखील याच नात्याने वागतो , हे आपण लक्षात घ्यायला हवे. त्यासाठी काही नवीन गोष्टी त्याने मुद्दाम इंग्रजांकडून —- जुन्या शासनकर्त्यांकडून —— शिकून घेतल्या आहेत , अर्जित केल्या आहेत , हे सुद्धा लक्षात घेण्याजोगे आहे ! ‘मंडल’ विरोधात ‘कमंडल’ आणणे, खाजगीकरण आणून राखीव जागा नष्ट करणे , ‘इंडियन बिझनेस कम्युनिटी’चे समर्थन करणे , जातीसंस्थेचे बळी असलेल्या कनिष्ठ जातीयांवरील अन्याय- अत्याचारांबाबत उदासीन भूमिका घेणे , शेतकऱ्यांच्या समस्यांवर तात्पुरती मलमपट्टी लावून त्या सोडवण्याचा आव आणणे , धार्मिक वातावरण निर्माण करणे , जातीजातींत भांडणे लावणे , संस्कृतीच्या नावाखाली स्त्रियांच्या शोषणाला मान्यता देणे , अनुसूचित जातींवर अशास्त्रीय उपवर्गीकरण लादणे, स्वतःचे जातीय हितसंबंध कायम ठेवण्यासाठी मुस्लीमद्वेष पसरवणे ही सगळी लक्षणे शासनकर्त्याची  आहेत. तथापि , ती लक्षणे जबाबदार शासनकर्त्याची नसून क्रूर - कपटी - निर्दयी शासनकर्त्यांची आहेत. 
      अशाच काही कारणांमुळे ब्राह्मण्यवादाचे व आंबेडकरवादाचे तात्विक भांडण येणाऱ्या काळात तरी लवकर मिटणारे नाही. स्पष्टपणे सांगायचे तर आंबेडकरवादाला जबाबदार शासनकर्ते हवे आहेत. संविधानाचे पालन करणारे, लोकशाही मूल्यांची बूज राखणारे, मानवतावादी आचार-विचार राबवणारे हेच खरे जबाबदार शासनकर्ते म्हणता येतील. या दृष्टीने पाहता , आंबेडकरवाद हा उद्याच्या काळातील शासनकर्ता आहे ! पण मग येणाऱ्या काळातील शासनकर्ते होण्यासाठी आपण काय गुणवत्ता अर्जित करायला हवी, याचा आंबेडकरी समाजाने विचार करायला नको काय ? आपले मुक्तीदाते असणाऱ्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी दारू पिऊन धिंगाणा घालणे , दुःखद महापरिनिर्वाण दिनी डीजे लावून कर्कश आवाजात गाणी केकाटणे आणि अशिक्षित, असंस्कृत , रानटी , वचावचा बोलणाऱ्या अशा ‘बाहेरच्या’ नेत्यांचे आदर्श डोळ्यांसमोर ठेवून बॅनरबाजीचा गावंढळपणा आपण आपल्या आंबेडकरी वस्त्यांत आणणे, ही लक्षणे उद्याच्या जबाबदार शासनकर्त्यांची आहेत काय ? आपल्या आंबेडकरी कार्यकर्त्यांच्या वाढदिवसांचे बॅनर्स इतर समाजाने अभिमानाने लावावेत एवढे कर्तृत्व आपण कधी गाजवणार आहोत ? भावी काळातील जबाबदार शासनकर्त्यांप्रमाणे प्रगल्भतेचे असे उच्च मापदंड आपण कधी स्वीकारणार आहोत ? 

   आंबेडकरी समाजात खूप ‘एनर्जी’ आहे. ही एनर्जी चुकीच्या ठिकाणी वापरली जावी , असा आजच्या शासनकर्त्यांचा प्रयत्न असतो. उद्याचे शासनकर्ते म्हणून आपणांस आपली ‘एनर्जी’ चांगल्या पद्धतीने आणि चांगल्या ठिकाणी वापरायची आहे ! 

      आंबेडकरी समाजातील कार्यकर्त्यांच्या वाढदिवसांच्या बॅनर्सनिमित्त एवढेच सांगावेसे वाटते ! 

मंगल मैत्री !
——- शुद्धोदन आहेर
(तारीख : 14 जून , 2026)

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!