देशमहाराष्ट्रविचारपीठसामाजिक / सांस्कृतिक

कार्यकारणभावाचा सिद्धांत आणि ईश्वरी संकल्पना

कार्यकारणभाव चा सिद्धांत असे सांगतो की,” जिथे कार्य आहे तिथे कारण आहे,म्हणजेच कारणाशिवाय कार्य नाही.”
याचा अर्थ असा की,माणसाचे व्यक्तिगत जीवनात,सार्वजनिक जीवनात जे जे काही घडते,कार्य होते,ते कारण असल्याशिवाय घडत नाही.ज्या घटना घडतात,त्यालाही कारण असते.असे मानवी जीवनातील प्रत्येक.अंगात ( विभागात ) कार्य घडते.उदा.माणसाचा जन्म होतो ,आणि मृत्यू होतो,हे झाले कार्य,परंतु हे कार्य कारणाशिवाय घडत नाही,म्हणजेच जन्माला पण कारण आहे,आणि मृत्यूला पण कारण आहे.माणूस उगीच असाच सहज मरत नाही,तर त्यास काहीतरी कारण घडते म्हणून तो मरतो.देवाच्या इच्छेने किंवा नाराजीमुळे माणूस मरत नाही.किंवा त्याला तो आवडला म्हणून वर स्वर्गात बोलून घेतले,असे नाही.हे कारण नव्हे.तसे कुणी अंदाज केला तरी ते खोटेच असते.कारण असे म्हणण्याला काही पुरावा नसतो,किंवा सिद्ध पण करून दाखविता येत नाही.सजीव सृष्टीचे पण असेच आहे.प्राणी वनस्पती,झाडे झुडपे,पक्षी ,जीवजंतू यांचा जन्म का आणि कसा झाला ? याचे पण कारण आहे.कारणाशिवाय इथे पृथ्वीवर काहीच घडत नाही.
माणसात दोन विश्व आहेत,भावविश्व आणि विचार विश्व.माणसाकडे मन आणि बुद्धी आहे,त्याच्या मनातून भाव विश्व निर्माण होते,आणि बुद्धीतून विचार विश्व निर्माण होते. मनाचा स्वभाव हा चंचल आहे,ते भरकटत असते.स्वैर धावते.त्याला बुद्धी थांबवू शकते.परंतु हे थांबविणे हे कुणाची किती ताकद क्षमता आहे, यावर अवलंबून असते.अर्थात मनाची ताकद बुद्धीपेक्षा प्रबळ असेल तर भावविश्वाचे साम्राज्य असते,आणि मनापेक्षा बुद्धीची ताकद क्षमता जास्त किंवा प्रबळ असेल तर विचारविश्वाचे साम्राज्य ( सत्ता ) असते.अर्थात त्या त्या व्यक्तीवर हे अवलंबून असते.असे जरी असले,तरी संस्काराने कुणाची ताकद किती कमी जास्त ठेवायची ? हे प्रत्येक माणूस ठरवू शकतो,यासाठी हवा दृढनिश्चय संकल्प,जिद्द,धैर्य,आत्मविश्वास.
माणसाच्या खाजगी जीवनातील कार्यकारणभाव या सिद्धांताबद्दलची ही झाली चर्चा.असेच माणसाचे जे सार्वजनिक जीवन आहे,त्यात जे कार्य घडते,ज्या घडामोडी घडतात,ज्या घटना घडतात.उदा.सामाजिक,राजकीय,धार्मिक,आर्थिक इत्यादी प्रत्येक क्षेत्रात जे कार्य होते,त्यालाही कारण असते,कारणाशिवाय कार्य होतच नाही.कार्याला हेतू आणि कारण असते.
काही भौगोलिक घटना घडतात,उदा.ढग येणे, गडगडाणे, इजा चमकन, पडणे, पाऊस पडणे, न पडणे,ओला किंवा कोरडा दुष्काळ पडणे,दिवस रात्र होणे,सकाळ दुपार संध्याकाळ होणे,ऋतूत बदल होणे हे कार्य का घडते ? तर ईश्वर घडवितो म्हणून नव्हे,तर याला कारणे असतात.त्यामुळेच अशा भौगोलिक घडामोडी घडतात.भूकंप पण होतो.आकाशातील ताऱ्यांच्या पण घडामोडी घडतात,त्याचेही कारण असते.हे विज्ञानाने सिद्ध केले आहे.या जगात चमत्कार नावाची गोष्ट नाही.देवही चमत्कार करू शकत नाही.कोणतीही जादू भानामती चमत्कार सिद्ध करून दाखविणाऱ्या व्यक्तीला अंधश्रद्धा निर्मूलन समितीने दहा लाखाचे बक्षीस जाहीर केले आहे.परंतु हे चेलेंज अजूनही कुणीच स्वीकारले नाही.याचा अर्थ चमत्कार ही गोष्ट एक तर हातचलाखीची जादू आहे,किंवा ती अंधश्रद्धाच आहे.हे यातून सिद्ध होते.
ईश्वर, अल्ला, गॉड याचेही असेच आहे.ही एक संकल्पना आहे,सत्य नव्हे.ईश्वर म्हणजे एक घटना किंवा कार्य नव्हे.किंवा ती डोळ्याला दिसणारी,किंवा स्पर्श होणारी किंवा जिभेला चव जाणवणारी गोष्ट नव्हे,ईश्वर म्हणजे भौतिक गोष्ट किंवा विचार नव्हेत.किंवा एखादा घन द्रव्य वायू पदार्थ नव्हे,ज्यास वजन आकार आहे.शिवाय ईश्वर म्हणजे सिद्ध ज्ञान नव्हे,म्हणून ईश्वर म्हणजे अज्ञान होय. कारण ईश्वर या संकल्पनेस सत्याचा जो सिद्धांत आहे, तो म्हणजे ‘ कार्यकारण भावाचा सिद्धांत ‘ लागू होत नाही.केवळ कल्पनेच्या जगात वावरणे म्हणजे वेडेपणाचेच लक्षण होय,आत्मा जो नाही,त्यास आहे म्हणणे म्हणजे सुद्धा खोटे बोलणे होय.नाही त्याला आहे म्हणणे खोटे बोलणे होय.
आहे आणि नाही या दोन शब्दाला अर्थ आहे.हे दोन शब्द निरर्थक बेकार नव्हेत,आहे जेंव्हा आपण म्हणतो,तेंव्हा त्याचे अस्तित्व मान्य करणे होय.अस्तित्व आणि मान्यता यात फार फार फरक आहे.अस्तित्व म्हणजे असणे.अस्तित्वाला मान्यता देणे, मानणे आणि जे अस्तित्वात नाही ,म्हणजे जे सत्य नाही,त्यास आहे म्हणून मान्यता देणे,म्हणजे मानणे यात जमीन अस्मानाचा फरक आहे.जसे खरे आणि खोट्यात भरपूर अंतर आहे,तसेच हे ईश्वराबद्दलच्या विचार आणि भावना बद्दल आहे.ईश्वराबद्दलच्या आपल्या भावना आणि विचार कितपत सत्य असत्य याची चिकित्सा निरीक्षण होण्याची गरज आहे.केवळ घरातील लोकांनी सांगितले किंवा बाबा बुवा बापूचे किंवा महाराज मौलवी फादर सांगतो म्हणून,त्याचे बोलणे खरे की खोटे हे तपासून पहिल्या शिवाय ईश्वर आणि त्याचे कार्यास मान्यता देणे, हे चुकीचे आहे. मानस हा चुकीचा पुतळा आहे म्हणून कितीही आणि कशाही आणि सतत चुकाच करीत जाणे बरोबर नाही. माणूस दशक चुका करू शकतो तसे तो त्या सुधारू पण शकतो. माणसाचे मन आणि बुद्धी ही ताठर नाही, तर लवचिक आहे म्हणजेच परिवर्तनशील आहे, याची जाणीव माणसाला असणे अत्यंत जरुरीची आहे, ही एकदा का जाणीव झाली की मग माणूस आपले मन आणि बुद्धी या साधनाद्वारे स्वतःची प्रगती करून घेऊ शकतो. प्रगती म्हणजे केवळ भौतिक प्रगती नव्हे, तर मानसिक प्रगती होय. भौतिक प्रगती पेक्षा मानसिक प्रगती महत्त्वाची आहे.
सत्य न्याय नीती, दया क्षमा शांती, स्वातंत्र्य समता बंधुभाव आणि न्याय, प्रेम कृतज्ञता सद्भाव सहकार्य सलोखा निरपेक्षता याचे अस्तित्व आणि विकास म्हणजेच नैतिकतेचा विकास होय, म्हणजेच मानसिक विकास होय, भौतिक विकास माणसाला बिघडवू शकतो परंतु मानसिक विकास हा बिघडलेल्या माणसाला घडवू शकतो. हे काम ईश्वराचे नसून माणसाचेच आहे. ईश्वर असता तर माणूस हा मनाने आणि बुद्धीने समृद्ध राहिला असता किंवा झाला असता, ईश्वरानेच माणूस निर्माण केला असेल किंवा घडविला असेल तर मग तो असा अधूरा का घडविला ? असा प्रश्न पण शहाण्या माणसाला पडतो. असा प्रश्न विचारवंत आणि चिंतक आणि माणसाची देशाची जगाची चिंता वाहणाऱ्या विद्वानांना हा प्रश्न पडतो. संशोधन करून पाहिले असता या प्रश्नाचे उत्तर सापडत नाही. कारण देवाला अस्तित्वच नाही. देव ही संकल्पना निराधार आहे. त्याला काही आधारच नाही. ईश्वराला कार्यकारण भावाचा सिद्धांत लावून पाहिले तर तो लागत नाही, म्हणून ईश्वर ही संकल्पना सत्याच्या कसोटीवर टिकत नाही. याकरिता विचार एक माणसाने आपल्या विचाराचा केंद्रबिंदू हा ईश्वर न ठेवता माणूस ठेवला पाहिजे. ईश्वराला गृहीत धरून माणसाचा विचार न करता, माणसालाच गृहीत धरून माणसाचा विचार केला पाहिजे. त्याची भौतिक आणि मानसिक किती सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यासाठी परिवर्तन बदल क्रांती या संकल्पना वर विश्वास ठेवावा लागतो, तरच माणूस बदलतो आणि घडतो. सत्य पाहिले असता माणसाच्या प्रगतीचा आणि ईश्वराचा काही संबंध नाही, तरी ईश्वराशिवाय माणसाचे पानच हालत नाही, म्हणूनच माणूस पण जागचा हलत नाही, त्यात काय बदल होत नाही, अनंत काळापासून त्याच्या बुद्धीत आणि मनात फरकच पडला नाही.
शुद्धता, पावित्र्य, नैतिकता , सद्गुण आणि दुर्गुण, पाप पुण्य या गोष्टीचा ईश्वराशी काहीच संबंध नाही, या गोष्टींचा संबंध आहे तो माणसाशीच. म्हणूनच माणसानेच शुद्ध काय अशुद्ध काय ? पवित्र काय आणि अपवित्र काय ? दुर्गुण आणि सद्गुण म्हणजे काय? नीती आणि ती म्हणजे काय? याचा अभ्यास माणसालाच पाहिजे. हे विषय माणसाचेच आहेत आणि माणसासाठीच आहेत म्हणून.
स्वातंत्र्य आणि पारतंत्र्य किंवा गुलामी, समता आणि विषमता, बंधुभाव आणि द्वेष भाव, न्याय अन्याय हे विषय देवाचे किंवा धर्माचे नसून हे विषय माणसाचेच आहेत. माणसानेच निर्माण केलेले आहेत, म्हणून या विषयातील अंतर माणूसच मिटवू शकतो. अन्यथा माणूस सुखी समाधानी सुरत सुरक्षित शांततामय जीवन जगू शकणार नाही. यात देव आणि धर्म कुठेच आडवे येत नाहीत, एवढे जरी माणसाला कळले, आणि कार्यकारण भावाचा सिद्धांत समजून घेतला तरी माणूस शहाणा झाला असे समजावे, अन्यथा एरवी तो अडाणी आणि अज्ञान आहेच.
लेखक : दत्ता तुमवाड, सत्यशोधक समाज नांदेड, दिनांक: 18 जून 2026, फोन: 94 20 91 22 झिरो नऊ.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!