दिन विशेषदेश-विदेशभारतमहाराष्ट्रमुख्यपान

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

🌕🙏🌹 धम्म प्रभात 🌹🙏🌕

इच्छितं पत्थितं तुव्हं खिप्पमेव समिज्झतु
सब्बे पुरेन्तु चित्तसंकप्पा चन्दो पन्नरसो यथा ||

कामगार दिन आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर!

आज १ मे, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला ,त्यासाठी अनेक प्राणांतिक आंदोलने झाली,मोर्चे झाले, अनेकांनी रक्त सांडले,१०५ जणांनी प्राणांची आहुती देऊन ते हुतात्मे झाले.

सन १९६० साली तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची मुहूर्त मेढ रोवली गेली. अन् तिथपासून १ मे महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिवस आपण महाराष्ट्र भर साजरा करीत असतो.

परकीयांपासून भारत देश स्वतंत्र होण्याबरोबरच मुंबईसह महाराष्ट्र राज्याची स्वतंत्रपणे निर्मिती झाली पाहिजे त्यासाठी लोकनेते,विचारवंत,बुध्दीवादी,
लेखक,कवी ,गायक, नाटककार,कलाकार,
पत्रकार,आणि समाजसुधारक यांनी मराठी भाषिक-प्रदेश एकत्र येण्यासाठी मोठे प्रयत्न केले व तशी संकल्पना सुध्दा मांडली.
एस.एम.जोशी, आचार्य प्र.के.अत्रे
को.श्रीपाद अमृत डांगे, सेनापती बापट,प्रबोधकार ठाकरे ई. आणि अनेकजणांनानी स्वतंत्र नवमहाराष्ट्र साठी एकत्र येवून लढा दिला आणि महाराष्ट्राचे स्वप्न साकार झाले.
महाराष्ट्राच्या इतिहासात महाराष्ट्राला ऐतिहासिक, सांस्कृतिक व सामाजिक चळवळीचा वारसा लाभलेला आहे असे ठळकपणे बघायला मिळते. भारतस्वातंत्र्य मागणी पासून ते देश स्वातंत्र्य होईपर्यंत आणी त्यापलीकडे जाऊन सुध्दा देशाच्या विकासात्मक व विधायक कार्यक्रमांधुन महाराष्ट्राने पुढाकार घेतलेला आहे.
भारतीय प्राचीन संस्कृतीचा इतिहास सांभाळण्याबरोबर महाराष्ट्राचे देशाच्या विकासातही फार मोठे योगदान आहे, तद्वतच महाराष्ट्रातील धार्मिक आणि सामाजिक क्रांतीचा इतिहास स्फुर्तीदायी व प्रेरणादायी आहे.

संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर, संत मुक्ताबाई,संत नामदेव, संत तुकाराम
संत गोरा कुंभार, संत सावता माळी,
संत नरहरी सोनार,संत जनाबाई,
संत चोखामेळा,संतकान्होपात्रा,
संत एकनाथ,संतगाडगेबाबा,
संतुकडोजी महाराज,आदी संतांच्या मंदियाळीने महाराष्ट्राचे पोषण व संवर्धन करण्याचे प्रयत्न झाले आहेत.

सामाजिक क्रांतीचे विचार महाराष्ट्राच्या भुमीत रुजविणेचा यशस्वी प्रयत्न झाले आहेत,
त्यासाठी महात्मा फुले,सावीत्रीबाई फुले,छत्रपती शाहू महाराज,
भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर,
महर्षी कर्वे,कर्मवीर शिंदे,
कर्मवीर भाऊराव पाटील यांसारख्या समाजसेवेने झपाटलेल्या समाजसुधारकांनी समाजप्रबोधनासाठी प्रयत्नांचे पराकष्टे केले.

महाराष्ट्र ही संत-महंत,ऋषी-मुनींची जशी भुमी आहे,तशी ती शूरवीरांचीही आहे.
या भुमीला पराक्रमाची,त्यागाची,देशप्रेमाची परंपरा लाभली आहे.
छत्रपती शिवरायांनी सर्वधर्मसमभाव पालन करुन रयतेचे राज्य निर्मिले.
छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन महाराष्ट्रातील क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके,उमाजी नाईक, गोपाळ कृष्ण गोखले,
लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, राजगुरू,नाना पाटील,
क्रांतीवीर वस्ताद लहूजी साळवे इत्यादी देशभक्तांनी इंग्रजांविरुद्ध लढा दिला.त्यांनी अनेक यातना आणि कष्ट सहन केले, त्यासाठी त्यांनी स्वत:च्या प्राणांचीही पर्वा केली नाही.

म्हणूनच महात्मा गांधी यांनी महाराष्ट्र म्हणजे कार्यकर्त्यांचे ‘मोहोळ’ अशा उंची शब्दांत प्रशंसा केली, ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या महान कवयित्री महादेवी वर्मांनी महाराष्ट्र हा भारताच्या सिंहद्वाराचा प्रहरी आहे, अशा शब्दांत महाराष्ट्राचा गोरव केला आहे.

अशा प्रकारे महाराष्ट्राची ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतीक उंची समाजसुधारकांनी आपआपल्या परीने वाढवल्यामुळे महाराष्ट्राराच्या मातीचे, शूरविरांचे,समाजसुधारकांचे अनेक प्रतिभावंत व्यक्तींनी व इतिहासकारांनी वर्णन करून ठेवले आहे.
✍️ मंगल देशा!! पवित्र देशा!! महाराष्ट्र देशा!!
राकट देशा!! कणखर देशा!!दगडांच्या देशा!!
नाजुक देशा!!कोमल देशा!! फुलांच्याही देशा!!
अशा शैलीदार काव्यरचना श्री राम गणेश गडकरी उर्फ गोविंदाग्रज यांनी केली आहे.

✍️ बहु असोत, सुंदर संपन्न की महा,प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश हा!
हे श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी महाराष्ट्र गीत लिहुन महाराष्ट्राच्या व्यक्तिमत्त्वाचा वेध घेतला आहे.

✍️माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा!!
हिच्या संघाने, जागल्यादर्याखोर्यातील शिळा!!
अशा शब्दांत महाराष्ट्राचा स्वाभिमान वि.वि. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज या़नी जागवल्या आहे.

✍️भव्य हिमालय तुमचा आमुचा,केवळ माझा सह्यकडा!!
गौरी शंकर उभ्या जगाचा,मनांत पुजिन रायगडा!!
असे म्हणत वसंत बापटांनी महाराष्ट्रप्रती प्रेम व्यक्त केले आहे.

✍️माझा मर्हाटाचि बोल कवतुके!!
परि अमृतातेंही पैजा जिंके!!
ऐसा अक्षरे रसिके! मेळविण!!
अशा शब्दांत संतज्ञानेश्वरांनी मराठीचे माधुर्ये मांडले आहे.

✍️मराठी असे आमुची मायबोली म्हणत भाषेची मा.त्र्य.पटवर्धन उर्फ ज्युलियन यांनी थोरवी वर्णिली आहे.

✍️माता तशी स्वभाषा,सेवामा होय आपणा उचित!!
किंबहूना मातेहुनि अधिक,हिचा योग्यता असे खचित!!
असे गौरवून गं.रा.मोगरे यांनी मराठी भाषेचा गौरव केला आहे.

✍️भाषा आमुची छान!, मराठी! भाषा आमुची छान!!
भाषा भिन्ना देशदेशांच्या सर्वांची परिखान!!
असे मराठीचे श्रेष्ठत्व ना.के.बेहरे यांनी सांगितले आहे.

✍️ संस्कृत वाणी देव केली!!
प्राकृत काय चोरापासोनि झाली!!
असा परखड प्रश्न संत एकनाथांनी विचारला आहे.

✍️तैसी हरळां(खडा) माजिरत्नकळा!!
तैसी भाषा माजि चोखळा!!
भाषा मराठी!
या शब्दांत ख्रिस्तदास स्टीफन यांनी भाषेविषयी अभिमान व्यक्त केला आहे.

✍️माझी मराठी असे मायभाषा,हिच्या किर्तीचे तेज लोकी चढे!!,
गोडी न राहे, सुधे माजि आता,
पळाली सुधा स्वर्गलोकांकडे!!
अशा रसदार शब्दांत मराठीचा गोडवा ना.गो.नांदापूरकर यांनी गायीला आहे.

अशा प्रकारे महाराष्ट्राने साहित्य,कला,शिक्षण,क्रिडा, संस्कृती,नाट्य,चित्रपट,संगीत,सहकार,कृषी,उद्योग,संगणक, विज्ञान अशा विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली आहे,अशी प्रगती महाराष्ट्राची करण्यासाठी आपल्या पूर्वजांनी दिलेल्या योगदानाची जाणीव ठेऊन हा वैभवशाली इतिहास जपून प्रगतीची नवनवी शिखरे पादाक्रांत करूया!


डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि कामगार दिन!

डॉ.बाबासाहेबांचे जीवन कार्य,त्यांचे तत्त्वज्ञान आणि व्यक्तिमत्व जर आपण बारकाईने अभ्यासले तर आपल्या लक्षात येईल शोषित,पिडीत,समाजापैकी केवळ बहूजनदलित, सर्व मागासलेल्या समाजाला माणसांचे जिवन जगण्यासाठी त्यांनी उभारी दिली नसून,कामगार, साधा श्रमीक हाही तितकाच शोषीत पिडीत, गुलामगिरीत, दारिद्र्यात, भांडवलदारांच्या वेठबिगारीत खितपत पडलेला उपेक्षित, असंघटित,दर्लक्षित असाह्य समाज आहे, हे जाणून त्यांना भांडवलदारांच्या,मस्तवाल कारखानदारांच्या दास्यश्रृखंलेतून मुक्त करून त्यांचे जीवन सुसह्य आणि सुकर केले त्यामुळे भारतीय कामगार बाबासाहेबांना ‘मसिहा’ समजतो. दुर्बल,असंघटीत विखुरलेल्या बहुजन कामगारांवर त्यांच्या नोकरी काळात होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम त्यावेळच्या इंग्रज आणि भांडवलदार तसेच कामगार संघटनांनी पध्दतशीरपणे नाकारले‌ होते,याचीच चिड बाबासाहेबांना होती, म्हणून त्यांनी केवळ दुर्लक्षित बहुजन कामगारांनाही नव्हे तर सर्व समाजातील दुर्बल कामगारांच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी एक विशाल दृष्टिकोन घेऊन १९३६ घ्या ऑगस्ट महिन्यात स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली.
मजुर पक्षाचे बाबासाहेब अध्यक्ष झाल्यानंतर पक्षाचा उद्देश आणि धोरणे
१)कामगारांच्या मजुरीची किमान मर्यादा ठरवून देणे.
२) कामाचे तास कमी करणे
३) गिरण्या व कारखान्यांतील कामगारांच्या नोकरीची शाश्वती,बढती यासंबंधी थेट कायदेशीर तरतूद करणे.
३)कामाचे योग्य वेतन
५) भरपगारी रजा,आजारी रजा,वृध्दत्वाची पेन्शन,
अपघाती नुकसानभरपाई.
६)कामगारांसाठी स्वस्त घरे देणे
७)त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे.
८) कामगारांच्या बालकांसाठी शिक्षणाची सोय करणे.
अशा प्रकारची होती.

स्वतंत्र मजूर पक्षाचे धोरण व्यापक होते
त्यामुळे बाबासाहेबांनी खालील मागणी केली होती.
✍️शेतमजुरांची (ठलव्यांची) किमान मंजुरी देणे
✍️ औद्योगिक कामगारांना पुरेसा पगार,पगारी सुट्या
✍️ वर्षातून सतत २४० दिवस काम करणार्या हंगामी अगर अस्थायी कामगारांना कायम करणे.
✍️ त्यांना केवळ ८ तासांचे काम देणे
✍️नोकरीची व अपघाताची मालकाकडून नुकसान भरपाई मिळणे.

दि.७ एप्रिल १९४२
ला joint labour conference दिल्लीला भरली त्यावेळी
१)कामगार कायद्यांचे एकत्रीकरण,
२) औद्योगिक अधिनियमात समेट घडवून आणण्याची यंत्रणा निर्माण करणे.
३) देशाच्या महत्वाच्या बाबींवर कामगार आणि मालक यांच्याशी वाटाघाटी साठी तरतुद करणे
या मुद्यांवर निर्णय घेण्यात आले.

बाबासाहेबांच्या कामगार विषयक धोरणांमुळे त्रिपक्षीय स्थानिक समितीची स्थापना झाली त्यामध्ये शासनाचे,मालकांचे व कामगारांचे मिळून २० सदस्य होते.
तद्नंतर १९३८ सप्टे़बर महिन्यात मुंबईच्या विधिमंडळात औद्योगिक कलहांचे विधेयक मांडले त्या विधेयकामध्ये विशिष्ठ परिस्थितीत संप बेकायदेशीर ठरवावा अशी तरतूद होती. कामगारांच्या हक्कांवर गद्दार आणणारे ते विधेयक होते.शासनाच्या या मालकधार्जिण्या धोरणावर बाबासाहेबांनी कडाडून हल्ला केला ,
हा कायदा काळा आहे असे समजुन बाबासाहेब आणि जमनादास मेथा यांनी तीव्र वीरोध केला. हे विधेयक कामगारविरोधी , कामगारांना गुलाम बनविणारे आहे असे बाबासाहेबांचे ठाम मत होते
म्हणून बाबासाहेबांनी एक दिवसाचा रेल्वे कामगार संप घडवून आणला होता.
या संपाच्या वेळी संध्याकाळी कामगार मैदानवर कामगारांची मोठी सभा झाली त्या सभेत रणांगणावर जशी एखादी मुलुख मैदानी तोफ आग बरसते,शत्रुत्वावर तुटुन पडते तशी तुफानी तोफीची आग बाबासाहेबांनी शासनाच्या विरोधात डागली होती,त्या सभेत श्रीपाद डांगे,परूळेकर, मिरजकर इत्यादी मंडळींनी सुध्दा काळ्या कायद्याला कडाडून विरोध केला. या संपाच्या आंदोलनातून दोन गोष्टी स्पष्ट झाल्या की १)डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे प्रथम श्रैणीचे कामगार नेते जगभर प्रसिद्ध झाले,२) राजकीय सामाजिक नेतृत्वाएवढेच कामगारांच्या नेतृत्वात ही डॉ.बाबासाहेब लढवय्ये,समर्थ प्रभावी नेते म्हणून शासनावर, ईतर समाजावर प्रभाव पाडू शकले.
पुढे २० जुलै १९४२ ला म़जुरमंत्री झाल्यावर कामगारांच्या फायद्याचे कायदे करून आणले तसेच अस्तित्वात असणार्या कायद्यांमधून सुधारणा करवुन आणल्या. उदा.स्त्रीयांना कारखाना कायद्यान्वये रात्री काम करणेची बंदी घातली, स्त्रीयांच्या प्रसूती काळात त्यांना विशेष भरपगारी रजा मिळवून दिली.
कारखान्यांतील बारमाही कामगारांना भरपगारी रजा मिळवून दिली.
दुसरे महत्वाचे बाबासाहेबांनी केले ते म्हणजे सर्वांना एकाच ठिकाणाहून नोकर्या मिळणेकरीता सेवा योजना कार्यलयाची (Employment Exchange) स्थापना केली.

पुढे स्वतंत्र भारताचे पहीले कायदा मंत्री झाल्यानंतर
बहुजन समाजाला तसेच कामगार वर्गाचे अभिमानाचे भरते आले होते.देशातील सर्व वर्तमानपत्रांनी, विरोधकांनी,प्रतीगामी विचारसरणीच्या पुढार्यांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर जे कामगार कायदे अस्तित्वात आले उदा.औद्योगीक कलह कायदा१९४७, कारखाने अधिनियम १९४८, किमान वेतन कायदा १९४८ इत्यादी कायद्यात सुधारणा झाल्यात त्यामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा कायदा- विधी मंत्री म्हणून सिंहांचा वाटा आहे.

डॉ.बाबासाहेबांच्या या उत्तुंग (जगाच्या लक्षवेधी) कामगिरी मुळे देशाचे पहीले लोकप्रिय प़तप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरूंनी २९ऑगस्ट १९४७ रोजी घटना समीतीचा मसुदा तयार करणेसाठी जी मसुदा समीती गठीत केली होती त्या मसुदा समीतीचे अध्यक्ष पद डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना बहाल केले‌ होते.ही घटना भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदली गेली आहे. भारतीय राज्य घटनेत भारताच्या सर्व नागरिकांना मुलभूत हक्क प्रदान केले आहेत.
मागासवर्गीय व दुर्बल घटकांचे रक्षण करण्याची घटनेत तरतूद केली आहे,तसे राज्यधोरणांची निर्देशक तत्वे अंतर्भूत करून त्यात कामाचा, शिक्षणाचा आणि विवक्षित बाबतीत सरकारी सहाय्याचा अधिकार ,कामाबाबत ,न्याय व मानवोचित परिस्थिती,प्रसूतीसहाय्य
याची तरतूद,
कामगारांसाठी निर्वाह वेतन,
उद्योगधंद्याच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग,तसेच बालकांकरीता मोफत व सक्तीच्या शिक्षणाची तरतुद,स्त्री आणि पुरूषांना समान वेतन इत्यादी कामगार धोरणांचा भारतीय संविधानात डॉ बाबासाहेबांनी आवर्जून तरतुद केलेली आहे.

स्त्रीयांनी पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा काम करावे ,अनादी कालापासून स्त्री ही पुरुषाची गुलाम आहे,तिला दास्यशृखंलेतून मुक्त करावे म्हणुन बाबासाहेबांनी हिंदु कोड बिलाचा जो मसुदा तयार केला होता तो जसाच्या तसा पास व्हावा असा डॉ.बाबासाहेबांचा आग्रह होता, परंतु हे बिल जसेच्या तसे पास झाले तर ‘डॉ.आंबेडकर स्मृती’ म्हणून हा कायदा पुढे ओळखला जाईल असा दृष्ठ विचार काल्पनिकरित्या मनात ठेवून ह्या बिलाला प्रतिगाम्यांनी लोकसभेत कडाडून विरोध केला त्यावेळी बाबासाहेबांचे हृदय अतिशय दु:खाने विव्हळ झाले. डॉ.बाबासाहेबांनी प्रतिगामी शक्तींनी ओळखले नाही.(पुढे हेच बील बाबासाहेबांच्या नंतर तुकडे तुकडे करुन पास झाले)

आज कामाच्या ठीकाणी स्त्रींयांचे शोषण, लैंगिक आत्याचार होतांना आपण बघतो.त्याला निर्भयपणे स्त्री सामोरी जात नाही. स्त्रीयांच्या बाबतीत तिच्या बाजुंने एवढे कायदे असतांना सुध्दा ती संभ्रम अवस्थेत दिसते. परंतु एखादी अपवादात्मक स्त्री आन्यायाला सामोरै जात असेल तर समाज,संघठना शासनयंत्रना त्याकडे जानूबूजुन दुर्लक्ष करतांना दिसते.कायद्याच्या पळवाटा काढून आरोपीला मोकाट सोडलं जाते.
अलीकडे युनियनच्या व युनियन लिडरच्या धारा बोथट झाल्या आहेत, कामगारांच्या हिताचे कायदे सुध्दा मोडीत काढले जात आहेत.तसेच सतराशे साठ युनियन झाल्यामुळे कामगारांचे बाजारिकरण झाले आहे.

आज जे कामगारांच्या जिवनात वैभव प्राप्त झाले आहे तसेच कामगार संघटनांना जे अधिकार व हक्क प्राप्त झाले आहेत, त्याचे सर्व श्रेय हे कामगारांचे जगप्रसिद्ध लोकप्रिय नेते,भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जाते! म्हणून भारतातीलसर्व कर्मचारी कामगार,शेतकरी,कष्टकरी मजुर शोषीत, पीडीत खास करून महीला यांच्या जीवनात जी झळाली,हिम्मत, लढण्याची ताकद जी प्राप्त झाली आहे ती केवळ बाबासाहेबांमुळेच!
डॉ.बाबासाहेबांना विनम्र अभिवादन!🙏🙏

महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त इतिहासकारांना, क्रांतीविरांना लोकनेते,समाजसुधारकांना, कवी गायक,लेखक पत्रकांराना आणि कामगारांना तसेच ज्ञात अज्ञात हुतात्म्यांना विनम्र अभिवादन!

महाराष्ट्र आणि कामगार दिनाच्या सर्व महाराष्ट्रातील जनतेला मनःपूर्वक शुभेच्छा!🌹

✍️ रत्नकांत सावंत,मिळंदकर.
१ मे २०२२.

संदर्भ:
१)डॉ.बाबासाहेब आंबेडकर गौरव ग्रंथ.
२) राजेंद्र सारंग यांचा महाराष्ट्र दिनाचा लेख.

🙏🌹 भवतु सब्ब् मंगलम् 🌹🙏

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!