आंतरराष्ट्रीय विचारवंत डॉ. आंबेडकर

डॉ. सुरेश वाघमारे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशिष्ट जाती धर्माचे प्रतिनिधित्व करणारे किंवा कुण्या जाती धर्मांनी मोठे केलेले नेते नव्हते तर त्यांनी आपल्या अफाट बुद्धिमत्तेच्या जोरावर भारत देशालाच नव्हे तर जगाला आपल्या विचारांनी जिंकलं होतं.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 1907 मध्ये मॅट्रिकची परीक्षा त्यांचा परीक्षा क्रमांक 872 होता देऊन पास झाले त्यानंतर त्यांनी 3 जानेवारी 1908 रोजी एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.
महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यांना सयाजीराव गायकवाड महाराजांनी 25 रुपये शिष्यवृत्ती मंजूर केली होती. 1913 मध्ये या महाविद्यालयातून बी.ए. पदवी मिळवल्यानंतर पुढील उच्च शिक्षण घेण्यासाठी देखील महाराजांनी साडेअकरा पाउंड (दरमहा) शिष्यवृत्ती दिली. यासाठी डॉ. आंबेडकर यांना आठ आण्याचा बौंड द्यावा लागला त्यानंतर 15 जून 1913 ते 14 जून 1916 या दरम्यान ही शिष्यवृत्ती देण्यात आली. त्यानंतर उच्च शिक्षण घेण्यासाठी डॉ. बाबासाहेब अकोना बोटीने निघाले व सोमवार 20 जुलै 1913 रोजी न्यूयॉर्क ला पोहोचले. तेथील कॉस्मोपॉलिटीन क्लब वस्तीगृहात राहून शिक्षण पूर्ण केले. एम. ए., एम. एस्सी., पीएच.डी., डी. एस्सी.,बार ऍट लॉ अशा एकूण 32 पदव्या संपादन केल्या.
परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या विद्यार्थी दशेपासूनच आपल्या विचारांनी जगाला प्रभावित केले. ते विद्यार्थी असतानाच केवळ वयाच्या 25 वर्षी त्यांनी ए. ए. गोल्डन वायझर या मानववंश शास्त्रीय परिषदेत 9 मे 1916 रोजी भारतातील ‘जाती: जडणघडण, उत्पत्ती विकास’ या विषयावर निबंध वाचला व नवा सिद्धांत मांडला. त्याचे तरुण अभ्यासकांनी प्रचंड स्वागत केले. त्यानंतर हा निबंध अमेरिकेतील ‘अमेरिकन जर्नल ऑफ सोशालॉजी’ या जागतिक कीर्तीच्या मासिकात छापला गेला. या वर्षीचे सर्वोत्कृष्ट साहित्य असा उल्लेख या मासिकाने या निबंधाचा केला. त्यानंतर हाच निबंध ‘इंडिया एंटाक्वेरी’ या जागतिक कीर्तीच्या मासिकातही छापून आला. त्यानंतर हा लेख ग्रंथरूपाने प्रकाशित झाला. ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पहिली ग्रंथ निर्मिती आहे.
यावरून हे स्पष्ट होते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वैचारिक प्रवास पाश्चिमात्य भूमीतूनच झाला.
उच्च शिक्षण घेतल्यानंतर डॉ. आंबेडकर भारतात आले आणि 1950 मध्ये दोन महत्त्वपूर्ण घटना घडल्या. त्यातील एक म्हणजे डॉ. आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली तयार झालेले संविधान अस्तित्वात आले व भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून त्यांची जगाला ओळख झाली. या संविधानाचे डॉ. आंबेडकरांचे कौतुक जगांनी केले आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे 1950 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ‘बुद्ध आणि त्यांचे भवितव्य’ हा लेख ‘महाबोधी’ या जागतिक कीर्तीच्या मासिकात दोन भागात छापून आला. या दोन घटनामुळे जागतिक विचारवंत म्हणून त्यांना मान्यता मिळाली. डॉ. आंबेडकरांच्या संविधान विषयक कार्याबद्दल त्यांना अमेरिकेने एल.एल.डी. ही पदवी दिली आणि महाबोधी मधील लेखामुळे ते बौद्ध राष्ट्राचे आकर्षण बनले. बुद्धाचा विचार हा जगाची पुनर्रचना करू शकतो.
या विचार मांडणीमुळे बौद्ध राष्ट्राला बुद्ध विचाराचं न व दालन पाहायला मिळालं. या विचारला प्रभावित होऊनच ब्रिटिश बौद्ध शिक्षक संघरक्षित यांनी डॉ. आंबेडकर यांची तीन वेळा भेट घेतली. एवढेच नव्हे तर संघरक्षित यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपला गुरु मानले. डॉ. आंबेडकर अँड बुद्धिझम या ग्रंथाची निर्मिती करून डॉक्टर आंबेडकरांचा बुद्ध विषयक विचार जगभरात घेऊन जाण्याचे काम केले. हा ग्रंथ विविध भाषेत प्रकाशित झाला. एवढेच नव्हे तर डॉ. आंबेडकरांचा बुद्ध विषय विचार समजून घेण्यासाठी हा ग्रंथ अरबी भाषेत प्रकाशित झाला. (संघरक्षित त्यावेळी आजारी होते) त्याचप्रमाणे आज ‘डॉ. आंबेडकर अँड बुद्धिझम’ हा ग्रंथ कोलंबिया विद्यापीठात शिकविला जातो. त्याचप्रमाणे डॉ. आंबेडकर यांचा ‘वेटिंग फॉर व्हिजा’ हा ग्रंथ ही या विद्यापीठात शिकविला जातो. ‘क्लारी डोस्तो’ या विद्यार्थ्याने या विद्यापीठातच यावर संशोधन केले आहे. आज अमेरिकन विद्यार्थ्यांना डॉ. आंबेडकरांच्या विचारांचे मोठं आकर्षण आहे असं तिने एका मुलाखतीत सांगितलं. कोलंबिया विद्यापीठातच डॉ. आंबेडकर यांनी कमी वेळात डिगऱ्या घेतल्या, मग ते किती तास अभ्यास करत होते याचा आराखडा आज या विद्यापीठाच्या अग्रभागी लावलेला दिसून येतो.
1950 नंतर म्हणजे 1956 रोजी ‘व्हॉइस ऑफ अमेरिका’ या अमेरिकन केंद्रावर डॉ. आंबेडकर यांचे लोकशाही विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. त्या भाषणाची जगभर चर्चा झाल्याचा उल्लेख अमेरिकेने केला.
त्याचप्रमाणे आज देखील भारतीय संविधानाची चर्चा होत असल्याचे दिसते. दुबई येथे मध्यपूर्व एशिया खंडातील सर्वात मोठे ग्रंथालय म्हणून ‘मोहम्मद बिन रशीद’ या ग्रंथालयाची ओळख आहे. या ग्रंथालयात 11 लाख ग्रंथ, 60 लाख शोधनिबंध 73000 म्युझिक नोट्स आहेत. या ग्रंथात भारतीय संविधान अग्रभागी ठेवण्यात आला आहे, हे या ग्रंथाचे आकर्षण मानलं जात आहे. जगातील आदर्श संविधान म्हणून याकडे पाहिलं जातं आणि यानिमित्ताने तेथे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची चर्चा होताना दिसते.
अमेरिका ब्रिटन या देशातच नव्हे तर हंगेरी यासारख्या देशातही डॉ. आंबेडकरांचा विचार गेला आहे. श्वेत हंगेरी यातील सुधारक ‘डेरडाक टिबोर’ डॉ. आंबेडकरांच्या विचारामुळे येथे क्रांती झाली. ते म्हणतात मी 2004 मध्ये फ्रान्समध्ये गेलो व पॅरिसमधील एका पुस्तकाच्या दुकानातून मी ख्रिस्तोफ जेफर लोट यांचे पुस्तक आणले. त्या त्या पुस्तकाचा माझ्यावर परिणाम झाला वशवेत हंगेरी यात मी सुधारणा घडवून आणू शकलो, क्रांती करू शकलो. तो ग्रंथ म्हणजे ‘डॉ. आंबेडकर अँड अनटचेबिलिटी’. ‘डेरडाक टिबोर’ यांच्या चळवळीचा परिणाम म्हणून या ठिकाणी जय भीम नावाचे नेटवर्क आहे. लिटल टायगर स्कूल (डॉ. बाबासाहेब म्हणत शिक्षण वाघिणीचे दूध आहे) त्याला अनुसरून सुरू आहेत. त्याचप्रमाणे घाणा नावाचा अतिशय लहान देश आहे. या देशात काही काळ गांधी विचाराचा प्रभाव होता पण आज येथील तरुण आंबेडकर विचारांनी भारावलेले दिसून येतात. घाणा या देशात घाणा नावाचे विद्यापीठ आहे. या घाणा विद्यापीठात समोर 2016 मध्ये प्रणव मुखर्जींच्या हस्ते महात्मा गांधींचा पुतळा बसविण्यात आला त्यावेळी तेथील विद्यार्थी प्राध्यापक तरुणांनी प्रचंड विरोध केला. आम्हाला गांधी नको आंबेडकर हवेत अशा घोषणा दिल्या. हा पुतळा बसवल्यानंतर डिसेंबर 2018 मध्ये गांधींचा पुतळा काढून त्या ठिकाणी डॉ. आंबेडकर यांचा पुतळा बसविण्यात आला आहे. थायलंडमध्ये तायायाम या भिक्खू ने डॉ. आंबेडकरांचा ‘बुद्ध अँड हिज धम्मा’ हा ग्रंथ थाई भाषेत अनुवादित करून तोच वाचला जातो. थायलंडचे टी.व्ही. पत्रकार रंगदीप चाटना यांनी एका मुलाखतीत असे म्हटले आहे की, बुद्ध, आंबेडकर आमच्या देशात जन्माला आले नाहीत याचा आम्हाला दुःख आहे पण त्यांचे विचार आमच्या देशात आहेत. आम्ही त्याचे आचरण करतो याचा मला अभिमान आहे.
एवढेच नव्हे तर पाकिस्तान बांगलादेशातही डॉ. आंबेडकरांच्या विचाराचा शिरकाव झाला आहे. पाकिस्तानातील कराची विद्यापीठात समाजशास्त्र विभागात डॉ. आंबेडकरांच्या अनुषंगाने व्याख्यानमाला गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे.
इस्लामपूर युनिव्हर्सिटी ऑफ सिंधी येथील प्रा. घनश्याम नारवाणी यांनी येथे आंबेडकरांच्या विचार रुजू होत असल्याचे सांगितले. हे सांगताना त्यांनी सांगितले की “डॉ. आंबेडकर हयात और कारनामे” या अॅड. एस. एस. गाझीयोद्दीन यांच्या “डॉ. आंबेडकर हयात और कारनामे” या उर्दू ग्रंथाचे वाचन व चर्चा मोठ्या प्रमाणात होते. विशेष म्हणजे अॅड. एस. एस. गाझीयोद्दीन हे महाराष्ट्रातील सोलापूरचे होते, सध्या ते हयात नाहीत.
डॉ. आंबेडकरांच्या विचारांचा जगभर होणारा प्रसार या अनुषंगाने त त्यांचा बुद्धी सम्राट असा उल्लेख केला जातो.
अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठाने 250 व्या वर्धापन दिनानिमित्त विद्यापीठात शिक्षण घेतलेल्या 100 माजी विद्यार्थ्यांची यादी प्रसिद्धी केली. त्यामध्ये अमेरिकेचे तीन राष्ट्राध्यक्ष व अन्य राष्ट्रांचे सहा राष्ट्राध्यक्ष होते तसेच त्यात काही नोबल पारितोषिक विजेत्यांचाही समावेश होता. या सर्व विद्वानांमधून प्रथम क्रमांकासाठी निवड समितीने डॉ. आंबेडकरांची निवड केली. त्या अनुषंगाने कोलंबिया विद्यापीठात त्यांचा पुतळा आहे त्या पुतळ्याखाली ‘सिम्बॉल ऑफ नॉलेज’ लिहिले आहे.
या सर्व विवेचनावरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय कीर्तीचे विचारवंत ठरतात. या अनुषंगाने न्यूयॉर्क टाईम्स या वृत्तपत्राने असे नमूद केले होते की डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही एक जगातील महान व्यक्ती होती जागतिक कीर्तीचे ते विचारवंत होते त्यांनी भारत देशासाठी महान कार्य केले आहेत त्यांच्या कार्याचा व त्यांचा बहुमान राखण्यातच भारताचे शहाणपण आहे.
डॉ. सुरेश वाघमारे
ज्येष्ठ विचारवंत, लातूर
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत