चित्रपटदेशभारतमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

महात्मा फुले चित्रपटाच्या निमित्ताने- अशोक सवाई

(ऐतिहासिक)

येत्या ११ एप्रिलला महात्मा फुले चित्रपट येवू घातला आहे. त्यावर ब्राह्मण महासंघाने आक्षेप घेतला. त्यासाठी महासंघाने सोनल भोसेकर नावाच्या बाईसाहिबांना पढवून पुढे केले असावे असे वाटते. त्यालाही कारण आहे. ते कारण असे की, ब्राह्मण समाजाला चांगल्या प्रकारे माहिती आहे की बहुजन समाज स्त्री चा अपमान न करता सुद्धा त्या स्त्री चे म्हणणे खोडून काढू शकतात. पण त्याच स्त्री च्या माध्यमातून ब्राह्मण महासंघाने महात्मा फुले चित्रपटावर आक्षेप नोंदवून नेहमीप्रमाणे समाजमन ढवळून काढण्याचा प्रयत्न केला. व आपला अंतर्मनीचा डाव साधला. सोनल भोसेकर बाईसाहिबा समोरच्या पत्रकारांना आपली ओळख करून देतांना सांगतात की त्या अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या उपाध्यक्षा आहेत. पुढे त्या म्हणतात आम्हा स्त्रियांना महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचा अधिकार दिला त्यामुळे मी तुमच्या समोर बोलू शकते. बरोबर आहे तुमचं म्हणणं बाईसाहिबा, पण चातुर्वर्ण्य व्यवस्थेतील सर्वात खालचा वर्ण म्हणजे शुद्र वर्ण. महात्मा फुलेंच्या काळात कर्मठ ब्राह्मणांच्या वैदिक धर्मशास्त्रानुसार शुद्रांना शिक्षणाचा अधिकार नाकारला होता. त्याच धर्मशास्त्राने तुम्हा सर्व ब्राह्मण स्त्रियांना सुद्धा शुद्र ठरवले होते. मग तुम्हाला शिक्षणाचा अधिकार कोणी नाकारला होता? हे नाही आपण सांगितले. तेव्हा अस्पृश्य समाज तर कर्मठ वैदिक धर्म मार्तंडांच्या खिजगिणतीतही नव्हता. जेव्हा भिडे वाड्यात फुले दांपत्यांनी मुलींची पहिली शाळा उघडली तेव्हा सुरवातीला त्या शाळेत पहिल्या सहा मुली या ब्राह्मण समाजाच्याच होत्या. हेही आपण नाही सांगितले बाईसाहिबा. पुढे त्या म्हणतात. चित्रपटाच्या टिझरमध्ये शेंडी आणि जानवे असलेला एक बटू मुलगा सावित्रीबाईंच्या अंगावर चिखल गोळे किंवा शेण गोळे फेकताना दाखवला. त्या शेंडी, जानव्यामुळे एका विशिष्ट समाजाच्या भावना/अस्मिता दुखावल्याचे म्हणतात. अच्छा! अहो बाईसाहिबा तोच खरा इतिहास आहे आणि इतिहासात तसेच घडले. तो खरा इतिहास दाखवल्याने विशिष्ट समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या म्हणता आहात. तर मग त्याच विशिष्ट समाजाने गेले तीन साडेतीन हजार वर्षापासून त्यांच्या द्वारे आमच्यावर म्हणजे बहुजन समाजावर खोटा इतिहास लादला. त्यातून आमचा व आमच्या महापुरुषांचा घोर अपमान केला गेला. (त्यांच्या मनुस्मृती नावाच्या धर्मशास्त्रानुसार छत्रपती शिवराय व राजाधिराज राजर्षी शाहू महाराज यांना सुद्धा शुद्र ठरवले होते) आम्हाला शिक्षणाचा, धन संचयाचा अधिकार नाकारला गेला. धर्मशास्त्राचा व देवदेवतांचा खोटा धाक दाखवून आम्हाला गुलाम बनवले. तेव्हाच्या अस्पृश्यांच्या गळ्यात गाडगे, कमरेला झाडू, कुल्ह्याला घंटी बांधली गेली. अस्पृश्यांची ओळख पटावी म्हणून त्यांच्या हातापायात जाड काळा धागा बांधला गेला अशा अमानुष प्रथा कोणी निर्माण केल्या? तुमच्या विशिष्ट समाजानेच ना? जी जगाच्या पाठीवर कुठेही नव्हती. तेव्हा आमच्या भावना/अस्मिता किती किती दुखावल्या गेल्या असतील याचा कधी विचार केला का आपण? खऱ्या इतिहासाने तुमच्या विशिष्ट समाजाच्या भावना दुखावल्या जातात. म्हणजे तुमच्या भावना, भावना आहेत मग आमच्या भावना, भावना नाहीत का? तुमच्या विशिष्ट समाजाला जसे मन आहे त्यात भावना आहेत तसेच आम्हालाही मन आहे, भावना आहेत. खरे सांगायचे म्हणजे तुमच्या विशिष्ट समाजाने त्यांच्या भावना लय लाडक्या करून ठेवल्या आहेत. केव्हाही, कुठेही, कशानेही आणि खऱ्या इतिहासाने सुद्धा त्यांच्या भावना दुखावल्या जातात. तुमचं दुखणं हे नाही की तुमच्या भावना दुखावल्या गेल्या. तुमचं खरं दुखणं हे आहे की चित्रपटासारख्या प्रभावी माध्यमातून फुले दांपत्यांच्या जीवन कार्याचा खरा इतिहास समोर आल्यावर बहुजनातील ओबीसी नावाचा एक मोठा वर्ग तुमच्या विशिष्ट समाजा पासून दूर जावू शकतो. हे खरं दुखणं आहे.

महात्मा फुलेंनी भिडे वाड्यात शिक्षणाचे एक छोटे रोपटे लावले होते. त्याचा आज डेरेदार वृक्ष होवून त्याच्या शाखा साऱ्या देशभर पसरल्या. त्यामुळे आज बहुजन वर्ग लिहू लागला, वाचू लागला, बोलू लागला तुम्ही लिहलेला खोटा इतिहास खोडून खरा इतिहास उजागर करू लागला. आपल्या विवेक बुद्धीने तर्कसंगत विचार करून तुमच्या विशिष्ट समाजाला त्यांच्या पाखंडावर खडे सवाल करू लागला. हे तुमचं दुखणं आहे. तुमच्या विशिष्ट समाजाने जे पेरले होते तेच आता उगवत आहे. आणि हा निसर्ग नियम आहे. बाभळीच्या झाडाला कधी आंबे लागत नाहीत साहिबा. हे आपण व आपल्या विशिष्ट समाजाने लक्षात घेतले पाहिजे. महात्मा फुले चित्रपट प्रदर्शित होवू नये म्हणूनच कारण नसताना अशा निरर्थक अडचणी विघ्नसंतोषी मार्फत किंवा महात्मा फुले म्हणत होते त्याप्रमाणे ‘घालमोड्या दादा’ मार्फत निर्माण केल्या जातात. तुमच्या विशिष्ट समाजानेच आत्ताच्या एससी/एसटी/ओबीसींच्या पुर्वजांवर त्यांच्या सहन शक्तीच्या मर्यादेपलीकडे भयंकर अमानुष अन्याय अत्याचार केले होते. या रोज रोजच्या टोकाच्या छळाला वैतागून त्यांनी धर्म परिवर्तन करून ते मुस्लिम/ख्रिस्ती धर्मात परिवर्तित झाले. व आपला होत असलेला छळ थांबवला. त्याचा बदला म्हणून की काय आज मुस्लिमांना/ख्रिश्चनांना काही हिंदू अंधभक्तांकडून विनाकारण टार्गेट केले जाते अशी शंका आल्यावाचून राहत नाही. तेव्हा जर तुमच्या विशिष्ट समाजाने बौद्ध धम्म लपवून ठेवला नसता तर वरील पूर्वजांनी निश्चितपणे परदेशी धर्म न स्विकारता भारतीय मातीतील बौद्ध धम्मचाच स्विकार केला असता.

पुढे भोसेकर साहिबा म्हणतात. महात्मा फुलेंच्या काळात महात्मा फुले व विशिष्ट समाजामध्ये छान कम्युनिकेशन होते. अच्छा! किती खोटं बोलता हो तुम्ही? अहो साहिबा, तुम्ही म्हणता तसे छान कम्युनिकेशन असते तर जेव्हा म्हणजे १८६९ साली महात्मा फुलेंनी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध घेवून ती स्वच्छ केली. त्यानंतर त्यांनी समाधीवर फुले वाहिली तेव्हा तिथल्या ग्रामभटाने ती वाहिलेली फुले आपल्या लाथेने उधळली असती का? जर छान कम्युनिकेशन असते तर फुले दांपत्यांनी जातीपातीचा पडदा न ठेवता सर्व मुलामुलींच्या शिक्षणासाठी जेव्हा शाळा उघडल्या त्याला तुमच्या विशिष्ट समाजाने टोकाचा विरोध केला असता का? छान कम्युनिकेशन असते तर तुमच्याच ब्राह्मणाच्या लग्न वरातीत येण्यासाठी महात्मा फुलेंना विरोध केला असता का? छान कम्युनिकेशन असते तर तुमच्या विशिष्ट समाजाकडून महात्मा फुलेंवर मारेकरी पाठवले असते का? छान कम्युनिकेशन असते तर तुमच्या विशिष्ट समाजाच्या अवगुणांवर महात्मा फुलेंनी ग्रंथ लिहिले असते का? छान कम्युनिकेशन असते तर तुमच्या विशिष्ट समाजाला महात्मा फुलेंनी ‘घालमोडे दादा’ म्हटले असते का? छान कम्युनिकेशन असते तर महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली असती का? छान कम्युनिकेशन असते तर महात्मा फुलेंनी छत्रपती शिवरायांच्या समाधीचा शोध घेवून नंतर त्यांनी १८७० ला पहिली शिवजयंती साजरी केली होती. पुढे दरवर्षी ती साजरा करत होते. पुढे सत्यशोधक समाजाची स्थापना झाल्यानंतर दर शिवजयंतीला सत्यशोधक समाजाच्या कार्यकर्त्यांनी ‘आला आला छत्रपतींचा मेळा भटा ब्राह्मणांनो पळा पळा’ अशा घोषणा दिल्या असत्या का? छान कम्युनिकेशन असते तर तुमच्या विशिष्ट समाजाचा विरोध पत्करून महात्मा फुलेंनी आपल्या स्वतःच्या मालकीची विहीर किंवा पाण्याचा हौद तेव्हाच्या अस्पृश्यांसाठी खुले करून दिले असते का? असे खूप उदाहरणे आहेत. हा त्या काळचा खरा इतिहास आहे साहिबा. अन् तुम्ही म्हणता आहात छान कम्युनिकेशन होते? बाईसाहिबा, आपल्याला माहीती नसेल तर माहिती करून बोलावे. पण बहजनांमध्य संभ्रम पसरवून त्यांची दिशाभूल करू नये व खऱ्या इतिहासाची मोडतोड हीं करू नये साहिबा. कारण आमच्या बहुजनातील काही भटाळलेले भैताड तुमच्या सारख्यांच्या बोलण्यातील धागा पकडून पुढे चुकीच्या इतिहासाचा प्रचार प्रसार करतात.

भोसेकर बाईसाहिबा म्हणतात चित्रपटात शेंडी जानव्यातील बटू मुलगा दाखवला त्यामुळे आमच्या लहान मुलांवर वाईट परिणाम होवू शकतात. अहो बाईसाहिबा तुमच्या सात-आठ वर्षाच्या मुलावर जेव्हा यज्ञोपवीत संस्कार केले जातात म्हणजेच मुंज केली जाते तेव्हा त्या मुलाला तुमच्या जेष्ठ मंडळीकडून शिकवण दिली जाते की तू ब्राह्मण आहेस, आणि ब्राह्मण हा वर्णव्यवस्थे नुसार सर्वश्रेष्ठ असतो. अगदी साठ वर्षाच्या जेष्ठ शुद्र माणसापेक्षा सुद्धा तू श्रेष्ठ आहेस हे तू नेहमीसाठी लक्षात ठेव. अशीच शिकवण दिली जाते ना? मग त्या मुलावर शुद्रांविषयी किंवा आजच्या बहुजनांविषयी काय परिणाम होत असेल याचा कधी विचार केला आहे का? बरं अनेक चित्रपटातून, अनेक पुस्तकातून अनेक चित्रातून, अनेक फोटो मधून, आताच्या सोशल मीडियाच्या अनेक प्लेटफॉर्म वरून शेंडी जानवे दाखवले गेले/दाखवले जाते. साने गुरुजींच्या ‘श्यामची आई’ या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर देखील श्यामला शेंडी दाखवण्यात आली. म्हणजेच त्याची मुंज केली. मुंज केली म्हणजेच त्याला जानवे घातले. तर तेव्हा आपल्या विशिष्ट समाजाच्या भावना का नाही दुखावल्या गेल्या? शेंडी जानव्याचा प्रचार, प्रसार प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे तुमच्याच विशिष्ट समाजाने केला होता ना? आणि आता नेमके महात्मा फुलेंचा चित्रपट प्रदर्शित व्हायच्या वेळीच का भावना दुखावल्या गेल्या तुमच्या विशिष्ट समाजाच्या? याचाच अर्थ असा आहे की महात्मा फुलेंच्या चित्रपटाविषयी तुमच्या विशिष्ट समाजाची नियत ठीक वाटत नाही. असो!

तेव्हाच्या काळात ब्राह्मण स्त्री चा पती म्हातारपणामुळे किंवा दुर्धर आजारामुळे गचकला तर ती स्त्री विधवा झाल्यावर तिचे त्या काळात केशवपन केले जात असे. हा अमानवीय प्रकार फक्त तुमच्याच विशिष्ट समाजात होता. म्हणजे स्त्री ला निसर्गाने दिलेले सौंदर्य विद्रूप केले जात होते. हे होवू नये म्हणून महात्मा फुलेंनी नाभीकांचा संप घडवून आणला. हे खरे आहे. परंतु ते नरक यातनांचे जीवन तुम्हा ब्राह्मण स्त्रियांवर कोणी लादले? हे नाही आपण सांगितले बाईसाहिबा. फुले दांपत्यांनी ब्राह्मण गरोदर स्त्रियांसाठी महिला आश्रम उघडले होते. विधवा ब्राह्मण स्त्रियांना जबरदस्तीने गरोदरपणात अवघड स्थितीत कोण आणत होते? हे नाही सांगितले आपण महोदया जी. ब्राह्मण महासभेच्या उपाध्यक्षा बाईसाहिबा. एका विशिष्ट समाजाच्या वैदिक धर्मशास्त्राप्रमाणे आपण ब्राह्मण नाही शुद्र आहात. ब्राह्मण असत्या तर आपलाही यज्ञोपवीत संस्कार होवून आपल्या गळ्यात जानवे असते. शेवटी भोसेकर बाईसाहिबा परशुरामाचा जयकारा करतात. अहो बाईसाहिबा परशुराम नावाचे पात्र काल्पनिक आहे हो. त्याला वास्तविकता नाही. परशुराम नावाचे पात्र अस्तित्वात असते तर त्याच्या अस्तित्वाचे पुरातत्त्व विभागाला पुरावे सापडले असते. जसे चक्रवर्ती सम्राट अशोकाचे बौद्ध शिलालेख, बौद्ध विहारे, बुद्ध मुर्त्या, बौद्ध प्रतीके, बौद्ध स्तूप सापडले आहेत, आणि आजही जमीनीचे उत्खनन केल्यावर सापडतात. जसे देहू गावात मोरे नावाची संत तुकोबारायांची वंशावळ आहे, त्यांनी रचलेल्या गाथा आहेत. अभंग आहेत. छत्रपती शिवरायांची वंशावळ आहे. त्यांचे गडकिल्ले आजही साक्षीदारांच्या रूपात भक्कमपणे उभे आहेत. तसेच परशुरामाच्या अस्तित्वाच्या काही खाणाखुणा सापडायला नको का? पण नाही सापडत. जर परशुरामच काल्पनिक आहे तर त्याच्या संबंधित इतर कथा कहाण्या ही काल्पनिक आहेत हे सांगणे न लगे. तेव्हा काल्पनिक गोष्टी सोडून वास्तव्याशी जोडून घ्या. आणि महत्त्वाचे म्हणजे संविधानाशी बांधीलकी ठेवा. असो…

येणाऱ्या महात्मा फुले जयंती साठी एकोणिसाव्या शतकातील एका महान क्रांती सुर्याला, क्रांती कारकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या गुरूवर्याला म्हणजेच महात्मा जोतिबा फुलेंना आमचे नतमस्तक होवून अभिवादन!
🙏🙏🙏

अशोक सवाई.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!