बुध्दगया कोणाच्या ताब्यात – हिंदूंच्या की ब्राम्हणांच्या ?

लेखक :- मनिष सुरवसे, सोलापूर.
9657725946
जागतिक स्तरावर सर्वात प्राचीन संस्कृती बाबतच्या इतिहासाचा धांडोळा घेतला तर, सर्वात जूनी संस्कृती ही इजिप्तची 3000 वर्षापूर्वीची मानली जाते. त्यानंतर इ.स.पूर्व 563 मध्ये म्हणजे 2500 वर्षापूर्वी सिध्दार्थ गौतम म्हणजेच भगवान बुध्दांच्या जन्माची नोंद आहे. परंतु धार्मिक अथवा अध्यात्मिक बाबतीत आपल्या देशात अथवा जागतिक स्तरावर बुध्दांच्या पूर्वी कुठलाही धर्म अथवा धम्म अस्तित्वात असल्याची कुठेही नोंद नाही. यावरुन हे सिध्द होते की, तथागत भगवान गौतम बुध्द हे केवळ भारताचेच नाही तर या विश्वातील पहिले धर्म संस्थापक आहेत. हे इथे आवर्जून सांगावसे वाटते की, आपल्या देशात वैदिक धर्म हा सर्वात प्राचीन म्हणजेच 5000 वर्षापासून असल्याचे सांगितले जाते. परंतु खरी वस्तुस्थिती वरीलप्रमाणे आहे. कारण लिपीचा शोधच बुध्दांच्या महानिर्वाणानंतर शंभरदिडशे वर्षानंतर लागला म्हणून त्यांचे वेद, पुराण वगैरे सर्व लिखाण इ.स.नंतर झाले हे अनेक संशोधनांनी सिध्द झाले आहे. त्यामुळे वैदिक लोक जो इतिहास सांगतात तो खोटा इतिहास सांगतात हे समजून घेतले पाहिजे.
आज जगामध्ये बौध्द धम्म मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतो आहे ते बौध्द धम्मातील मानवाच्या हितासाठी असलेल्या शाश्वत तत्वाज्ञानामुळेच. असे म्हटले जाते की, बुध्दाच्या तत्वज्ञानामुळे प्रभावीत झालेल्या पश्चिमेकडील अनेक देशातील लोक पूर्वेकडे पाय करुन झोपत नाहीत, कारण पूर्वेकडे भारत देश आहे आणि या भारत देशात तथागत भगवान बुध्दांचा जन्म झाला. म्हणजे जागतिक स्तरावर बुध्दांबद्दल एवढा पराकोटीचा आदर असलेला आपल्याला आढळून येतो.
परंतु आपल्या देशात तथागत भगवान बुध्दाला जातीय नजरेतून बधितले जाते कारण अडीच हजार वर्षानंतर म्हणजे 1956 साली डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी बौध्द धम्म स्विकारुन या देशात बुध्दाला आणि त्यांच्या धम्माला पुर्नजिवीत केले. आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी बौध्द धम्म स्विकारला म्हणून बुध्दही जातीय परिघात आले. म्हणून या देशातील जनता आजही केवळ जातीय द्वेषामुळे भगवान बुध्दांच्या मानवी कल्याणाचा महान अशा तत्वज्ञानापासून वंचित आहेत.
खरे तर, तथागत भगवान बुध्दांनी जे तत्वज्ञान सांगितले ते त्यांच्यापूर्वी आणि नंतरही कुणी सांगितले नाही. परंतु आज जे जे कुणी शांती, अहिंसा, सत्य, अध्यात्म अथवा मानवी जीवनाच्या सुखाचे, समाधानाचे तत्वज्ञान स्वत:च्या नावावर सांगतात ते ते सगळे बुध्दाचे तत्वज्ञान सांगतात हे आधी सर्वांनी लक्षात घ्यावे. कारण या विश्वात भगवान बुद्धांनीच प्रथमतः धम्म सांगितला आणि बुध्दाचे तत्वज्ञान हे विज्ञानाच्या कसोटीवर खरे उतरलेले व मानवी जीवनाच्या सर्व अंगाना स्पर्श करणारे असे सर्व आयामी आहे.
त्यामुळेच चक्रवर्ती सम्राट अशोकाने कलिंगच्या युध्दानंतर त्यांचे मनपरिवर्तन झाल्यामुळे त्यांनी बुध्द धम्माचा स्विकार केला. बुध्दाच्या तत्वज्ञानाचा त्यांच्यावर एवढा प्रभाव पडला की त्यांनी बुध्द धम्माच्या प्रचारासाठी आणि प्रसारासाठी संपूर्ण जीवन समर्पित केले. त्यांनी आपला मुलगा महिंद्र अणि मुलगी संघमित्रा यांना धम्माच्या प्रसारासाठी श्रीलंकेत पाठवले. इतकेच नाही तर बुध्दाने सांगितलेला उपदेश हा 84000 गाथांचा आहे म्हणून त्यांनी भारत या अखंड जंबुद्विपामध्ये 84000 विहारे, स्तुप, लेण्या बांधल्या ज्या आजही आपल्याला अफगाणिस्तान, बांग्लादेश, श्रीलंका व भारत देशात सगळीकडे, प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळतात.
भगवान बुध्दांचा ज्या ठिकाणी जन्म झाला, बुध्दत्व प्राप्त झाले, पहिले प्रवचन दिले तसेच ज्या ज्या ठिकाणी वास्तव्य केले आणि जिथे महापरिनिर्वाण झाले अशा सर्व ठिकाणी सम्राट अशोकांनी स्तूप आणि विहारे बांधली. त्यापैकीच एक बुध्दगया हे ठिकाण. ज्या ठिकाणी भगवान बुध्दाला ज्ञानप्राप्ती झाली, सम्यक संबुध्द झाले त्या ठिकाणी भव्य आणि दिव्य असे महाबोधी महाविहार बांधले जे आजही सिध्दार्थाच्या बुध्द होण्याची साक्ष देते.
हे सारे सांगण्याचे कारण म्हणजे, बुध्दगया येथील महाबोधी महाविहारावर या देशातील मनुवादी ब्राम्हणांनी कब्जा केला आहे. बुध्दगया येथील महाबोधी महाविहारावरील ब्राम्हणांचा कब्जा हटविण्यासाठी व ते बौध्दांच्या ताब्यात देण्यासाठी सध्या बुध्दगया येथे आणि संपूर्ण देशभर आंदोलन सुरु आहे. परंतु मनुवादी मिडिया हे महाबोधी महाविहार हे हिंदूंच्या ताब्यात आहे असा खोडसाळ प्रचार करत आहे.
तेव्हा या देशातील तमाम एस.सी./एस.टी./व्हीजेएनटी/ओबीसी/एसबीसी आणि मायनॉरिटी या सर्व संवर्गातील लोकांनी हे समजून घेतले पाहिजे की, तुमच्या सर्वांच्या शाळेच्या जात दाखल्यावर जातीच्या कॉलमपुढे अगोदर हिंदू असे लिहिलेले असते. म्हणजे तुम्ही सर्वजण हिंदू आहात. परंतु ब्राम्हणांच्या जात दाखल्यावर जात या कॉलमपुढे केवळ ब्राम्हण जात असते. याचा अर्थ असा होतो की, ब्राम्हण आणि हिंदू हे दोन्ही वेगवेगळे धर्म, पंथ आहेत.
हे आणखीन पटवून देण्यासाठी सर्वांचे लक्ष याकडे वेधतो की, आपल्या देशात जेवढी मंदिरे हिंदूंची आहेत तेवढ्या मंदिरात एकही पुजारी हिंदूंचा नाही. प्रत्येक मंदिराचा पुजारी हा ब्राम्हणच आहे आणि ब्राम्हणच असतो. आणि उलट वरील प्रवर्गातील कुठल्याही व्यक्तीने मंदिरात जाऊन पूजा करण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही शुद्र आहात म्हणून हाकलून दिले जाते, मारले जाते. याचे ज्वलंत उदाहरण जालना जिल्हयातील भोकरदन तालुक्यातील अन्वा येथील कैलास बोराडे यास मंदिरात का गेलास म्हणून तप्त लोखंडी सळईने पायाला चटके देत अमानूष मारहाण केली. कैलास बोराडे हा भटक्या जमाती (व्हीजेएनटी) प्रवर्गातील तरुण आहे. जर तो मंदिरात गेला तर असे काय झाले, काय बिघडले की त्याला मारहाण करुन पायाला चटके दिले गेले. अशी बरीच उदाहरणे घडलेली आहेत, घडत आहेत. याला एकच कारण आहे की, एस.सी./एस.टी./व्हीजेएनटी/ ओबीसी/एसबीसी आणि मायनॉरिटी या सर्व प्रवर्गातील हिंदू असलेले लोकं हे मनुस्मृतीच्या कायद्यानुसार ब्राम्हणांसाठी आजही शुद्र आणि असपृश्यच आहेत, हे सर्व प्रवर्गातील हिंदू लोकांनी आधी समजून घेतले पाहिजे. म्हणजे यावरुन ब्राम्हण आणि हिंदू एक नाहीत हे यावरुन परत एकदा सिध्द होते.
तेव्हा बुध्दगया येथे हिंदूंचे मंदिर नसून ते तथागत भगवान बुध्दांचे महाबोधी महाविहार म्हणूनच जगभर प्रसिध्द आहे. तिथे महाबोधी महाविहाराला भेट देण्यासाठी, बुध्दाचे दर्शन घेण्यासाठी, तिथे ध्यान करण्यासाठी जगभरातून लोकं येत असतात आणि जगभरातून आलेले लोक आणि जागतिक संस्था तिथे मोठ्या प्रमाणात दानधर्म करत असतात. त्या जागतिक स्तरावरुन मिळणाऱ्या आणि भारतातील लोकांकडून मिळणाऱ्या दानावर डल्ला मारण्यासाठी ब्राम्हण समाज हिंदू धर्माचे नांव पुढे करुन महाबोधी महाविहारावर कब्जा करून ठेवला आहे. म्हणजे हिंदूं आणि बौध्द या दोघांनाही वेड्यात काढत आला आहे हे आधी सर्व हिंदूंनी नीट समजून घेतले पाहिजे.
तेंव्हा बुध्दगया येथे सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सर्वात आधी महाबोधी महाविहार हे हिंदूंच्या ताब्यात नसून ब्राम्हणांच्या ताब्यात आहे हे लक्षात घ्यावे. एवढेच काय तर देशातील सर्व हिंदूंच्या मंदिरात पुजारी म्हणून एकही हिंदू पुजारी आढळणार नाही तर सर्व पुजारी हे ब्राम्हणांचे आहेत. आणि त्या सर्व हिंदू मंदिरामध्ये दानस्वरुपात मिळालेले करोडो रुपये, हिरे-सोन्याच्या दागदागिण्यावर तेथील ब्राम्हण पुजारी डल्ला मारतात. म्हणजे देवाच्या नावावर भक्तीभावाने दान करायचे हिंदूंनी आणि त्यावर डल्ला मारायचा ब्राम्हणांनी. ही अशी हिंदूंच्या भावनांची आर्थिक पिळवणूक पिढ्यानपिढ्या चालू आहे. याला कुणीतरी वाचा फोडणार की नाही ?
तेव्हा बुध्दगया येथील महाबोधी महाविहार बौध्दांच्या ताब्यात घेण्यासाठीच्या आंदोलनामध्ये या बाबी लक्षात घेतल्या पाहिजे.
त्याबरोबरच आता सर्व हिंदूंनी आणि बौद्धांनीसुद्धा केवळ बुद्धगया येथील महाबोधी महाविहार नाहीच तर देशभरात असलेल्या हिंदूंच्या सर्व मंदिरावरील ब्राम्हणांचा ताबा काढून त्या सर्व मंदिरांचा ताबा हिंदूंकडे देण्यात यावा अशी मागणी रेटून धरली पाहिजे. तरच या देशात खऱ्या अर्थाने बौध्दांना आणि हिंदूंनाही न्याय मिळणार आहे.
🙏
दिनांक :- 13/3/2025
मनिष ब. सुरवसे 9657725946
जिल्हाध्यक्ष,
कास्ट्राईब कर्मचारी महासंघ,
जिल्हा शाखा सोलापूर.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत