आज छत्रपती संभाजी_महाराज यांची पुण्यतिथी.

आज ११ मार्च
स्वप्नजा घाटगे
कोल्हापूर ✍🏻
जन्म.१४ मे १६५७ किल्ले पुरंदर येथे.
शेर शिवा का छावा, स्वराज्य रक्षक, अनेक भाषांवर प्रभुत्व, संस्कृत पंडित, धर्माभिमानी, व्यासंगी, शूरवीर अशी अनेक बिरुदे देऊनही ज्यांची कीर्ती वर्णन करताना शब्द अपुरे पडतील, असे छत्रपती संभाजी महाराज.
शिवाजी महाराजांसारख्या युगपुरुषाचे सुपुत्र असल्याने रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले. संभाजीराजे अगदी लहान असतानाच आई सईबाईंचे निधन झाले. पुण्याजवळील कापूरहोळ गावची धाराऊ नावाची महिला त्यांची दूध आई बनली. जिजाऊंनी त्यांचा सांभाळ केला त्यांची सावत्र आई सोयराबाई यांनीही त्यांच्यावर खूप माया केली. अनेक ऐतिहासिक नोंदींप्रमाणे संभाजीराजे अत्यंत देखणे आणि शूर होते. राजकारणातील बारकावे त्यांनी भराभर आत्मसात केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना आग्रा भेटीवेळी सोबत नेले. त्यावेळी संभाजीराजे ९ वर्षांचे होते. शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदेतून निसटल्यानंतर स्वराज्यापर्यंतची धावपळ संभाजी राजांना सोसली नसती आणि त्यामुळे त्यांना काही काळ सुरक्षित ठिकाणी ठेवणे गरजेचे असल्याने शिवाजी महाराजांनी त्यांना मोरोपंत पेशव्यांच्या मेहुण्याच्या घरी मथुरेला ठेवले. मुघल सैन्याचा ससेमिरा थांबवण्याच्या उद्देशाने शिवाजी महाराजांनी संभाजीराजांचे निधन झाल्याची अफवा पसरवून दिली.
काही काळाने संभाजीराजे सुखरूपपणे स्वराज्यात येऊन पोहोचले.
शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होईपर्यंत संभाजीराजे राजकारणातील बारकावे आणि रणांगणातील डावपेचांमध्ये तरबेज झाले. त्यांच्या विनम्र स्वभावाने राज्याभिषेकासाठी रायगडावर आलेल्या प्रतिनिधींना जिंकून घेतले.
एका पोर्तुगीज प्रतिनिधी ने आपल्या डायरीत लिहिले आहे की,
‘छत्रपती शिवाजी महाराजांचा हे पुत्र अत्यंत नम्र आणि बुद्धीमान आहेत.रयतेशी मराठी, उत्तरेकडील लोकांशी हिंदी, इंग्रजी अधिकाऱ्यांबरोबर इंग्रजी, आमच्या बरोबर पोर्तुगाली, मुस्लिम लोकांबरोबर उर्दू बोलतात.
खरतर संभाजी महाराजांना अनेक भाषा बोलता येत होत्या.
जिजाबाईंचे निधन झाल्यानंतर संभाजीराजांकडे मायेने लक्ष देणारे कोणी राहिले नाही. शिवाजी महाराज स्वराज्याच्या राजकारणात आणि रणांगणावर गुंतले होते.
सळसळत्या रक्ताच्या तरुण संभाजीराजांचे शिवाजी महाराजांच्या दरबारातील अनुभवी मानकऱ्यांशी अनेकदा मतभेद होऊ लागले. संभाजीराजांचा अण्णाजी दत्तोंच्या भ्रष्ट कारभाराला सक्त विरोध होता. शिवाजी महाराजांनी अनेकदा अण्णाजी हे अनुभवी आणि कुशल प्रशासक असल्यामुळे त्यांच्या भ्रष्ट कारभाराकडे दुर्लक्ष केले. पण संभाजीराजांना ते मान्य करणे कठीण होते.
दरबारातील काही मानकरी संभाजीराजांना अपमानास्पद वागणूक देऊ लागल्यामुळे शिवाजी महाराजांबरोबर दक्षिण हिंदुस्थानच्या मोहिमेवर त्यांना जाता आले नाही. शिवाजी महाराजांच्या अनुपस्थितीत संभाजीराजांचे हुकूम पाळण्यास अष्टप्रधानमंडळाने नकार दिला. त्यामुळे शिवाजी महाराजांना कोकणातील शृंगारपूरचे सुभेदार म्हणून संभाजीराजांना पाठवावे लागले.
दरबारातील कांहीं मानकऱ्यां नी संभाजीराजे हे बेजबाबदार प्रशासक आहेत आणि राज्याचे वारस म्हणून योग्य नाहीत, असा प्रचार सुरू केला.
कारण संभाजी महाराज अत्यंत निस्पृह आणि सत्यवचनी होते.
सोयराबाईंची अपेक्षा होती की, शिवाजी महाराज राज्याचे वारस म्हणून राजारामांचे नाव जाहीर करतील.
१६ जानेवारी १६८१ मध्ये
संभाजीराजांचा राज्याभिषेक झाला
त्यांनी उदार अंतःकरणाने अण्णाजी दत्तो आणि मोरोपंत पेशव्यांना माफ केले आणि त्यांना अष्टप्रधान मंडळात पुन्हा स्थान दिले. मात्र, काही काळानंतर अण्णाजी दत्तो आणि काही लोकांनी पुन्हा संभाजीराजांविरुद्ध कट केला आणि त्यांना कैद करून राजारामांचा राज्याभिषेक करायचा घाट घातला.
तेव्हा संभाजीराजांनी अण्णाजी दत्तो आणि त्यांच्या सहकार्यांना हत्तीच्या पायी दिले. त्याचा सूड म्हणून अनाजीपंताचा नातू मल्हार चिटणीस याने संभाजी महाराजांचे विकृत आणि खोटे चित्र इतिहासात रंगवले.
इंग्रज वखारकार, औरंगजेबाच्या इतिहास कार खाफीखान,आणि पोर्तुगीज इतिहास कारांनी जे लिहिले आहे त्यातून आपल्याला खरी माहिती मिळते.
औरंगजेबाने १६८२ मध्ये स्वराज्यावर हल्ला केला. औरंगजेबाचे सामर्थ्य सर्वच बाबतीत संभाजीराजांपेक्षा जास्त होते. तरीही संभाजीराजांच्या नेतृत्त्वाखाली मराठ्यांनी हिमतीने लढा दिला.
मराठ्यांच्या प्रबळ इच्छाशक्ती आणि झुंझारपणाचे ठळक उदाहरण म्हणजे नाशिकजवळील रामशेज किल्ल्याचा लढा. संभाजीराजांनी गोव्याचे पोर्तुगीज, जंजिर्या्चा सिद्दी आणि म्हैसूरचा चिक्कदेवराय या शत्रूंना असा जोरदार धडा शिकवला की, त्यांची संभाजीविरुद्ध औरंगजेबाला मदत करायची हिंमत झाली नाही. संभाजीराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी सर्व शत्रूंशी एकहाती झुंज दिली. श्री शंभो: शिवजातस्य मुद्राद्यौरिव राजते | यदं कसेविनी लेखा वतर्ते कस्यनोपरि ||, अशी स्वतःची राजमुद्रा छत्रपती संभाजी महाराजांनी तयार केली होती.
छत्रपती संभाजी महाराज दिसायला राजबिंडे होते. त्यांच्या हजरजबाबी आणि रोखठोक बोलण्यामुळेच त्यांना स्वराज्यातही बरेच शत्रू निर्माण झाले होते. राजकारणात मुरब्बी असलेल्या संभाजी महाराजांची कीर्ती केवळ छत्रपती म्हणून नव्हती.
अफाट मोगली सैन्याशी धैर्याने आणि असामान्य शौर्याने लढा देणारे छत्रपती उत्तम साहित्यिक आणि संस्कृत भाषेचे उत्तम जाणकारही होते. छत्रपती संभाजी महाराज हळवे होते. मृदू मनाचे कवीही होते. संभाजी महाराजांनी वयाच्या १४ वर्षी बुधभूषण-राजनीती हा संस्कृत ग्रंथ लिहिला. याशिवाय नाईकाभेद, नखशिखा, सातसतक या ग्रथांची निर्मिती केली. तसेच गागाभट्टांनी समनयन हा ग्रंथ लिहून संभाजीराजांना अर्पण केला.
एवढेच नव्हे तर संभाजी महाराजांच्या धार्मिक धोरणांवरही छत्रपती शिवाजी महाराज यांचा ठसा कोरलेला आढळतो.
संभाजी महाराजांनी
समर्थ रामदास स्वामींना मिळालेल्या राममूर्तीची चाफळ येथे स्थापना करून मंदिर उभारले.
संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे पुत्र महादोबा गोसावी, मोरया गोसावी, समर्थ रामदास, सदानंद गोसावी यांना शिवाजी महाराजांनंतरही सर्वतोपरी मदत केली.
चारशे वर्षांपूर्वी पत्नीला , महाराणी येसूबाईंना श्री सखी राज्ञी जयते हा किताब देऊन, राज्य कारभारात न्यायाचे समतेची सुरुवात करणारे छत्रपती संभाजी महाराज….!!!
१६८९ च्या सुरवातीला संभाजीराजांनी त्यांच्या महत्त्वाच्या सरदारांना बैठकीसाठी कोकणातील संगमेश्वर येथे बोलावले. ती बैठक संपवून संभाजीराजे रायगडाकडे रवाना होत असतानाच औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान यांनी संगमेश्वरवर हल्ला केला
. या कारवाईसाठी त्यांच्या स्वराज्यातील लोकांनी आणि सर्व कारवाईची आखणी खूपच काळजीपूर्वक केली. मराठ्यांत आणि शत्रूचे सैन्यात चकमक झाली. मराठ्यांचे संख्याबळ कमी होते. प्रयत्नां ची शर्थ करूनही मराठे शत्रूचा हल्ला परतवून लावू शकले नाहीत. परिणामी शत्रूने संभाजीराजांना जिवंत पकडले. संभाजीराजे आणि त्यांचे सल्लागार कवी कलश यांना औरंगजेबापुढे बहादुरगड येथे आणण्यात आले. औरंगजेबाने संभाजीराजांना सर्व किल्ले त्याच्या स्वाधीन करून खजिना त्याच्या हाती दिल्यास जीवदान देण्याचे मान्य केले. पण संभाजीराजांनी त्याला स्पष्टपणे नकार दिला.
औरंगजेबाने संभाजीराजे आणि कवी कलश यांच्यावर अनन्वित अत्याचार केले. तरीही संभाजीराजांनी शरणागती पत्करण्यास नकार दिला. तेव्हा औरंगजेबाने त्यांना क्रूरपणे अत्यंत हालहाल करून ठार मारायचा आदेश दिला. सुमारे ४० दिवसांपर्यंत असह्य यातना सहन करूनही संभाजीराजांनी स्वराज्यनिष्ठा आणि धर्मनिष्ठा सोडली नाही. म्हणून त्यांना अखंड भारतवर्षाने स्वराज्य रक्षक हे पदवी बहाल केली.
क्रूर अत्याचाराने परिसीमा गाठली, तरी संभाजी महाराजांच्या मुखातून आक्रोशाची लकेरही उमटली नाही. स्वराज्यभिमानी, लढवय्या, शेर का छावा, असामान्य शौर्य गाजवणाऱ्या संभाजी महाराजांची फाल्गुन अमावास्या म्हणजेच, ११ मार्च १६८९ रोजी प्राणज्योत मालवली.
या वीर स्वराज्य रक्षकांस विनम्र अभिवादन 🙏🙏
स्वप्नजा घाटगे
कोल्हापूर ✍🏻
इतिहासात सर्वात जास्त अन्याय झालेले शंभूराजे..
चित्रपटकार, नाटककार यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा फायदा घेऊन खोटा इतिहास रंगवला… आणि एका पराक्रमी सम्राटावर अन्याय केला.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत