दिन विशेषदेशमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

छत्रपतींची तरूणाईतील प्रेरणा आजच्या प्रश्नांशी कशी जोडायची…? (हेरंब कुलकर्णी )

छत्रपती संभाजी महाराजांवरील चित्रपट बघून तरुणाई हलली आहे. डोळ्यात अश्रू आणि अंगावर शहारे घेत थिएटरबाहेर पडणारी तरुणाई बघुन असे वाटते की विस्तवावरची राख झटकली जाते आहे. त्याचवेळी शिवजयंती आली. हीच तरुणाई पुन्हा चैतन्याने सळसळताना बघितली.पुन्हा एकदा समाधान वाटले. त्यांच्या अंगातील चैतन्य उफाळून येते आहे. डोळ्यातील शिवाजी आणि संभाजी महाराजांवरील श्रद्धा सच्ची आहे…

एक कार्यकर्ता म्हणून माझी भावना ही आहे की छत्रपती शिवाजी व छत्रपती संभाजी यांच्यावरील ही धगधगती भक्ती आज क्रियाशील कशी करायची…?

त्या चैतन्याचा प्रवाह आजचे अंधार युग प्रकाशमान करण्यासाठी कसे प्रवाहित करायचे….?

शिवशाही ने भारावून जाण्याचा काळ आणि बलात्कार झालेल्या बसचे नाव शिवशाही असावे हे किती वेदनादायक आहे….दोन राजवटीतील फरक किंवा आपण कुठून कुठवर पोहोचलो आहोत हे सांगायला पुरेसे आहे.

या तरुणाईला दोन्ही महाराजांच्या प्रेरणेने आज कृतिशील कसे करावे ?

महाराजांचे स्वराज्य आज आणण्यासाठी तरुणांना संघटित करावे लागेल. केवळ इतिहासात न रमता आज महाराज असते तर
त्यांनी काय केले असते ? असा प्रत्येक प्रश्नावर विचार करायला हवा…

त्यामुळे तरुण मुला मुलींचे ते स्वराज्य आणि आजचे प्रश्न अशी शिबिरे व्हायला हवीत…राजकारणातील भ्रष्टाचार, अनैतिक वर्तन ,अमाप पैसा याविरुद्ध या तरुणाईला उभे करायला हवे. त्याकाळात जिल्हा जिल्ह्यातील सुभेदार जनतेला जसे लुटायचे तसे आज पुढारी आणि नोकरशाही जनतेला लुटत आहे. त्या युती विरुद्ध तरुणाई लोकशाही मार्गाने काय करू शकते ? याबाबत कृती कार्यक्रम द्यायला हवा…स्वराज्यात शेतकरी हा प्राधान्यक्रम होता. आज शेती आणि गावखेडे सुधारण्यासाठी ही ऊर्जा विधायक रितीने सक्रीय करणे गरजेचे आहे.

स्वराज्याचे सुराज्य होण्यात आजचे शत्रू या तरुणाईचे लक्षात आणून देणे गरजेचे आहे. शासन अधिकारी भ्रष्ट नेते यांचे एकत्रित येऊन जनतेचे होणारे शोषण या तरुणाईला लक्षात आणून देणे हेच आव्हान आहे. त्यासाठी महाराजांच्या नावाने शिबिरांची
आवश्यकता आहे..

तरुणाई निष्ठावंत मावळे होण्यासाठी ही पिढी शक्तिवान असली पाहिजे. त्यासाठी निर्व्यसनी तरुणाई ही मोहीम राजांच्या प्रेरणेने व्हायला हवी पण आज ‘ उडता महाराष्ट्र ‘झाला आहे. तरुणाई दारू गांजा ड्रग ने पोखरली आहे..
त्यासाठी ड्रग माफिया स्वराज्याचे शत्रू ठरवायला हवेत. तरुणाई ने अवैध धंदे उखडून टाकण्यासाठी सतत दबाव ठेवणे आपल्या मित्रांना महाराजांची शपथ घालून निर्व्यसनी ठेवणे असे करायला हवे.

महिलांचे रक्षण हा महाराजांचा धर्म होता. तोच धागा घेऊन स्त्रिया सुरक्षित राहण्यासाठी प्रयत्न हवेतच पण त्यासोबत स्त्रिया चांगले जगण्यासाठी ही महाराजांच्या प्रेरणेने काम करणे आवश्यक आहे. गर्भात मारल्या जाणाऱ्या मुली, बालविवाह होऊन बाल्य हरवलेल्या मुली, वेश्या व्यवसायात विकल्या जाणाऱ्या बिचाऱ्या हतबल मुली, दरिद्र्यामुळे शिक्षण घेता न येणाऱ्या मुली, एकल महिला या सर्वांच्या पाठीशी भाऊ म्हणून उभे राहणे हे तरुणाईने महाराजांच्या प्रेरणेने करायला हवे…

आज संताप होतोय..छत्रपती संभाजी महाराजांचा एकाकी क्रूर वेदनादायी मृत्यू बघुन…पण वाईट हे ही वाटते की आजचा हा बकाल महाराष्ट्र निर्माण होण्यासाठी त्यांनी बलिदान दिले का ? असा कर्जबाजारी, दारिद्र्या ने पिचलेला,बेकारांचे तांडे निर्माण करणारा, राज्यकर्ते अधिकारी ठेकेदार नवे सुभेदार निर्माण करण्यासाठी महाराजांनी बलिदान दिले का ??? इतक्या वेदना त्यांनी आपल्या माणसांसाठी सहन केल्या ना ?

आजूबाजूचा हा अंधार दूर करायला महाराजांच्या प्रेरणेची ज्योत तरुणांच्या हातात द्यायला हवी….

त्यासाठी तरुणाईला आजचा बिघडलेला महाराष्ट्र असा का झाला ? ही कारणमीमांसा सांगायला हवी. त्यासाठी शिबिरे घ्यायला हवी. कृती कार्यक्रम द्यायला हवा…

हीच तरुणाई नक्कीच महाराष्ट्रात पुन्हा शिवशाही आणू शकतील…त्यासाठी शिवभक्तांनी पुढाकार घेऊन शिबिरांचे आयोजन करायला हवे आणि तरुण मुलांनी स्वराज्यासाठी माझा एक उपक्रम अशी प्रतिज्ञा करायला हवी.. व एक एक क्षेत्रातील शुद्धीकरणासाठी मोहीम सुरू करायला हवी..

जर या शक्तीला ऊर्जेला आपण वळण देऊ शकलो नाही तर राजकीय शक्ती केवळ यांना धार्मिक ध्रुवीकरणासाठी वापरतील..केवळ इतिहासात गुंतवून वर्तमानकाळ लपवून ठेवतील..त्यामुळे शिवप्रेमी संघटनांनी अभ्यास शिबिरे आयोजन सुरू करायला हवे…

हेरंब कुलकर्णी

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!