भारतीय संविधानाच्या तत्त्वज्ञानाची मूल्यमयता

प्रजावाणी…
लेख क्र.७
डॉ. अनंत दा. राऊत
संविधानाचे तत्त्वज्ञान मानवकल्याणकारी अशा नैतिक मूल्यांचा पुरस्कार करणारे आहे. नैतिक मूल्ये मानवी आचरणाला नियंत्रित करून त्याला विधायक, परोपकारक असे कृतिशील रूप देत असतात. मानवी वर्तनातील जे जे सर्वांसाठी हानिकारक, ते ते अनैतिक व
जे जे उपकारक, सुखकारक, नवनिर्माणक्षम; ते ते नैतिक असे म्हणता येईल. उपकारक नैतिक मूल्यांनीयुक्त अशा वर्तनाची अपेक्षा संविधान देशाच्या सर्वच नागरिकांकडून करते. ही सांविधानिक नैतिकता उद्देशिका, मूलभूत हक्क, राज्यधोरणाची नीतिनिर्देशक तत्त्वे, मूलभूत कर्तव्ये, विवक्षित वर्गासंबंधीचे विशेष उपबंध, संविधानाची शपथ आदी भागांमध्ये समाविष्ट असलेली दिसते. संविधानाने न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, अहिंसा, शांती, सत्य, निःस्पृहता, सहकार, सहिष्णुता, सेवा, त्याग, कर्तव्यनिष्ठा, राष्ट्रनिष्ठा, भारतीयत्व, बुद्धिवाद, विज्ञानवाद, प्रज्ञा, शील, करुणा, स्वाभिमान, वैश्विकता, निसर्गनिष्ठा आदी नैतिक मूल्यांचा पुरस्कार केलेला आहे. ही मूल्ये कमीअधिक प्रमाणात सर्वच धर्मपरंपरांनी मांडलेली असली, तरी त्यांचा आग्रही पुरस्कार आपल्या देशाच्या इतिहास कालखंडातील समृद्ध अशा बुद्ध संस्कृतीने केलेला दिसतो. त्याचेच ठळक प्रतिबिंब सांविधानिक नैतिकतेवर पडलेले दिसते. ही सांविधानिक नैतिकता अल्पजन कल्याणकारी नाही, तर बहुजन कल्याणकारी आहे. ही सांविधानिक नैतिकता स्वीकारून जर शासनकर्ते व सामान्य नागरीक वागले, तर या देशातील भ्रष्टाचार, दुराचार, शोषण, हिंसाचार, जातीयवाद, धर्मांधता, अंधश्रद्धा, दारिद्रय, कुपोषण, बेकारी आदी गोष्टी फार लवकर नष्ट होतील. या गोष्टी नष्ट झाल्या तरच देशात शांती नांदेल व देशाच्या विकासाची प्रक्रिया अधिक गतिमान होईल.
संविधानाने स्वीकारलेल्या तात्त्विक भूमिकेतील काही नैतिक मूल्यांचे संक्षिप्त स्पष्टीकरण करणेही आवश्यक आहे. प्रत्येकाला आनंदाने जगू देणे, कुणीही कुणावर आक्रमण न करणे, कुणीही कुणाचे काहीही न लुबाडणे, प्रत्येक गोष्टीतील ज्याचा त्याचा योग्य तो वाटा ज्याला त्याला मिळू देणे म्हणजे न्याय. असा न्याय प्रस्थापित करण्यासाठीची सर्व यंत्रणा संविधानाने उभी केली आहे. संविधानाने स्वीकारलेले स्वातंत्र्य स्वैराचारी स्वरूपाचे नाही, तर नैतिक निर्बंधांनी युक्त आहे. धर्म, श्रद्धा, उपासना, विश्वास, बोलणे, अभिव्यक्ती आदी स्वातंत्र्यांवरही संविधानाने सदाचार व सामाजिक शांतता अबाधित राहील, असे निर्बंध घातलेले आहेत. समता या मूल्याचा पुरस्कार करताना संविधान अनुच्छेद १५मध्ये म्हणते, ‘राज्य कोणत्याही नागरिकाला प्रतिकूल होईल अशाप्रकारे धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान यांपैकी कोणत्याही कारणावरून भेदभाव करणार नाही.’ समता प्रस्थापित करण्यासाठी इतिहासकाळात ज्यांना संधी दिली गेली नाही, त्यांच्यासाठी विशेष संधी म्हणून आरक्षणाचे तत्त्व मात्र संविधान स्वीकारते. संविधानातील बंधुतेचे तत्त्व समग्र भारतीय नागरिकांच्या मनामध्ये प्रेमाचे सिंचन करणारे आहे. हे तत्त्व सर्व भारतीयांना जात, धर्म, वर्ग, भाषा, प्रांत, लिंग अशा सर्व संकुचिततेमधून बाहेर येण्यास व सर्वांना आपापसात भ्रातृभावाने वागण्यास सांगते. संविधानातील धर्मनिरपेक्षतेचे तत्त्व इहवादी जीवनदृष्टीचा पुरस्कार करणारे आहे. पारलौकिकासंदर्भातील उपासना पद्धतीचे सर्वांना समान स्वातंत्र्य देणारे, स्वतः तटस्थ राहणारे व प्रत्येकाला आपला व्यक्तिगत धर्म सार्वजनिक शांतता सुव्यवस्था बाधित होणार नाही अशा पद्धतीने पाळण्यास व प्रदर्शिण्यास सांगणारे आहे. सामाजिक नीतिमत्ता व शांततेच्या अटीवर सर्वांनाच स्वधर्मप्रसाराचे स्वातंत्र्यही संविधानातील हे तत्त्व देते. अहिंसा के मानवी जीविताच्या अस्तित्वासाठीचे महत्त्वाचे तत्त्व आहे. संविधानाने सर्वांना जिवंत राहण्याचा हक्क दिलेला आहे. या हक्काला बाधक ठरणाऱ्या सर्व घटकांचा बंदोबस्त करून संविधान अहिंसा तत्त्वाचे रक्षण करते. जिथे अहिंसा असते, तिथेच शांती असते व जिथे शांती असते तिथेच सुख व विकास असतो. देशांतर्गत शांतता व सुरक्षिततेचे सर्वतोपरी रक्षण करण्याची जबाबदारी संविधानाने शासनावर टाकलेली आहे. सत्यमेव जयते हे आपले राष्ट्रीय घोषवाक्यस आहे. सत्याचा पुरस्कार व असत्याला नकार ही भूमिका वास्तवाधिष्ठित व नैतिक स्वरुपाची आहे. प्रत्येक ठिकाणी सत्याची प्रस्थापना झाली पाहिजे, ही संविधानाची भूमिका आहे. लोकप्रतिनिधींना घ्यावयाच्या शपथेमध्ये निःस्पृहता या मूल्याचा संविधानाने समावेश केलेला आहे. कोणताही स्वार्थ मनामध्ये न ठेवता, निःस्पृह वृत्तीने जनतेची सेवा करणे, हे प्रत्येक लोकप्रतिनिधीचे मूलभूत कर्तव्य असल्याचे संविधान सांगते. ‘एकमेका साहाय्य करू, अवघे धरू सुपंथ’, हे संत तुकारामांचे वचन संविधान शिरोधार्य मानते. जीवन जगत असताना, सर्व नागरिकांनी सर्व क्षेत्रात परस्परांना सहकार्य करत वाटचाल केली, तर सर्वांचाच सर्वांगीण विकास होण्यास वेळ लागणार नाही, ही संविधानाची भूमिका आहे. या भूमिकेतूनच राज्य विविध क्षेत्रांतील सहकारी संस्थांच्या निर्मितीला प्रेरणा देते. परमत सहिष्णुता ही फार महत्त्वाची असते. मला माझे मत बाळगण्याचा व व्यक्त करण्याचा जसा अधिकार आहे, तसा दुसऱ्यालाही त्याचे मत बाळगण्याचा व व्यक्त करण्याचा अधिकार आहे असे मानून वागणे, दुसऱ्याच्या मताचा आदर करणे, ते समजून घेण्याचा प्रयत्न करणे म्हणजेच सहिष्णुता. लोकशाही व्यवस्थेला आवश्यक असलेल्या या तत्त्वाचा पुरस्कार संविधानाने सर्वत्रच केलेला आहे. समाजजीवनामध्ये सेवा हे मूल्य अत्यंत आवश्यक आहे. राज्यकर्ते व प्रशासक हे लोकसेवक असतात. ते केवळ हुकूम देणारे अनभिषिक्त सम्राट नसतात, ही संविधानाची भूमिका आहे. देशातील सामान्य लोकांचे दुःख व कष्ट नष्ट करून त्यांचे जीवन आनंदमय बनवण्यासाठी सातत्याने सेवारत राहणे ही प्रत्येक लोकप्रतिनिधी, कर्मचारी व व्यक्तीची जबाबदारी असल्याचे सूचन संविधानाने केलेली आहे. संविधान ५१ (क) या अनुच्छेदात भारतीय नागरिकांना राष्ट्र संकटात येईल तेव्हा प्राणाचाही त्याग करण्यास सिद्ध राहिले पाहिजे, असे सूचन करते. राष्ट्राला पुढे नेण्यासाठी कुणीतरी त्याग केल्याशिवाय राष्ट्र पुढे जात नसते. देशातील प्रत्येक व्यक्तीने आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ असले पाहिजे. कर्तव्यनिष्ठा नसली की, अनेक अनर्थ निर्माण होतात. स्वनिष्ठा, कुटुंबनिष्ठा, जातधर्मनिष्ठा, प्रांतनिष्ठा आदींमध्ये राष्ट्रनिष्ठा ही सर्वोच्च निष्ठा आहे. राष्ट्रनिष्ठेला अग्रक्रम देऊन जगणारी माणसे अजूनही आपल्या देशात फारच कमी आहेत. म्हणून आपले राष्ट्र क्षमता असूनही अनेक गोष्टींमध्ये मागे राहिलेले आहे. हिंदुत्व, मुस्लिमत्व, ख्रिश्चनत्व, शीखत्व,बौद्धत्व, पारशीत्व आदी धर्मनिष्ठाच प्रभावी असतात तेव्हा ‘भारतीयत्व’ या सांविधानिक राष्ट्रनिष्ठेला त्या बाधक ठरतात व भारतीय नागरिकांच्या मनाला काही एका संकुचित कक्षेत बंदिस्त करतात. जन्मघारित स्वधर्मनिष्ठेची कक्षा ओलांडून सर्व भारतीयांनी भारतीयत्व मूल्याला अंगीकारणे आवश्यक आहे. सांविधानिक नवमूल्यांना अंगीकारून वागणे म्हणज भारतीयत्व या मूल्याचे पालन करणे असते. बुद्धिवाद व विज्ञानवाद ही संविधानाने पुरस्कारिलेली फार महत्त्वाची मूल्ये आहेत. तर्काच्या कसोटीवर टिकणाऱ्या गोष्टींचा स्वीकार करणे व अंधश्रद्ध स्वरूपाच्या भाकडकथांना नाकारणे म्हणजे बुद्धिवाद आणि पुराव्याच्या व प्रयोगाच्या कसोटीवर टिकणाऱ्या गोष्टींचा स्वीकार करणे व शोधक वृत्ती बाळगून सत्याला भिडण्याचा प्रयत्न करणे म्हणजे विज्ञानवाद. या दोन्हीही मूल्यांचा भारतात फार मोठा अभाव आहे. उलट, या दोन्ही मूल्यांना छेद देणारी धर्म, रुढींच्या नावावर चालणारी अंधश्रद्धा मात्र या देशात प्रचंड प्रमाणावर आहे. या अंधश्रद्धेपोटी आजही भारतीय नागरीक कोट्यवधी रुपयांची व प्रचंड वेळेची अक्षरशः नासाडी करतात. देशातील नागरिकांचा पैसा व वेळ निर्मितिशून्य गोष्टींमध्ये खर्च न होता, नवनिर्माणक्षम उपक्रमांमध्ये खर्च झाला पाहिजे, ही संविधानाची भूमिका आहे. प्रज्ञा, शील, करुणा ही आपल्या देशाच्या इतिहासातील समृद्ध अशा बौद्ध संस्कृतीने पुरस्कारिलेली मूल्ये संविधानानेही स्वीकारलेली आहेत. प्रज्ञा म्हणजे शहाणपण, बुद्धिमत्ता, ज्ञानवंत असणे. संविधान देशातील प्रज्ञा मोठ्या प्रमाणात विकसित करू पाहते. शील म्हणजेच चारित्र्य, वर्तनातील शुद्धता व पवित्रता. शील या मूल्यार्थामध्ये अनेक प्रकारची नैतिक मूल्ये एकवटलेली आहेत. भारतीय माणसांच्या शीलाचे संवर्धन करण्याचे संस्कार संविधानाची शपथ व मूलभूत कर्तव्ये सातत्याने करत आहेत. भारताचे संविधान मानवामानवांत कुठलाही भेद न करता, सर्वांशी प्रेमाने वागण्याचा संदेश तर देतेच; पण एकूणच सजीव सृष्टीबद्दल दयाबुद्धी बाळगण्यास सांगते. यातून करुणा या मूल्याचाच पुरस्कार केलेला दिसतो. करुणा ही प्रेमयुक्त असते. ती पीडितांबद्दल कृतिशील सहानुभूती बाळगते. पीडितांची पीडा नाहीशी करण्यासाठी कर्तव्यरत राहणे म्हणजेच करुणा या मूल्याचे पालन करणे. संविधान भारतीय नागरिकांना अशीच करुणा बाळगण्यास सांगते. स्वाभिमान हे मूल्य मानवी स्वत्वाची प्रतिष्ठा राखणारे आहे. प्रत्येकाने स्वतःचा सन्मान जपण्याबरोबरच दुसऱ्याचाही सन्मान राखला पाहिजे, याची जाणीव हे मूल्य देते. स्वाभिमानाचे अहंकारामध्ये कधी परिवर्तन होईल, हे सांगता येत नाही. म्हणून माणसाने आपोआप मिळालेल्या नव्हे, तर स्वकष्टाने मिळवलेल्या गोष्टींचा विनम्र असा स्वाभिमान बाळगला पाहिजे, याची जाणीव संविधान देते. भारतीय संविधानाची भूमिका केवळ भारतीयांचेच कल्याण झाले पाहिजे, अशी नाही, तर विश्वमानवाचे कल्याण झाले पाहिजे, अशी संविधानकर्त्यांची मानसिकता होती. ‘हे विश्वचि माझे घर’, ही भारतीय संस्कृतीतील व्यापक भूमिका संविधानाने स्वीकारलेली आहे. माणूस जसजसा मूल्यात्म बनत जाईल, तसतसा तो विश्वकुटुंबवादाकडेच जाईल. माणसाला त्या दिशेने घेऊन जाणे हा संविधानाचा ध्येयवाद आहे. म्हणूनच संविधान
राज्याला आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षेचे संवर्धन करण्याचे निर्देश देते. राष्ट्राराष्ट्रांमध्ये न्याय्य व सन्मान्य संबंध राखण्यासाठी, आंतरराष्ट्रीय कायदा व तहाची आबंधने याबद्दल आदरभाव जोपासण्यासाठी व आंतरराष्ट्रीय तंटे लवादाद्वारे मिटवण्यास प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्नशील राहण्यास सांगते. माणूस हा निसर्गाचाच एक घटक आहे. निसर्गाचे संतुलन व्यवस्थित राहिले, तरच मानवी जीवन सुखी व सुरक्षित राहू शकते. म्हणूनच संविधान ५१ (छ) या अनुच्छेदाद्वारे सांगते की, अरण्ये, सरोवरे, नद्या व वन्यजीवसृष्टी यांसुद्धा नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करून, त्यात सुधारणा करणे आणि सजीव प्राण्यांबद्दल दयाबुद्धी बाळगणे हे भारतीय नागरिकांचे मूलभूत कर्तव्य आहे. याद्वारे संविधानाने निसर्गनिष्ठा या मूल्याचाच पुरस्कार केला आहे. नैतिक मूल्यांनी युक्त असे हे संविधानाचे तत्त्वज्ञान समग्र मानवी जीवनालाच समृद्ध बनवणारे आहे.
भ्रमणध्वनी ९८६०५२५५८८
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत