देशमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

बोकड बळी व अंधश्रद्धा निर्मूलन

बोकडबळीसाठी प्रसिद्ध असलेल्या अनेक यात्रा – जत्रा महाराष्ट्रात मोठा गाजावाजा करून साज-या केल्या जातात. खंडोबा, भैरोबा, म्हसोबा, ज्योतिबा, म्हाळोबा इ. देवतांच्या नावाने या यात्रा भरवल्या जातात. काही यात्रेत गूळ, खोबरे, शेरणीचा नैवेद्य दाखवला जातो, तर काही यात्रेत मटणाचा खारा नैवेद्य दाखवला जातो.
आपल्या देशात उपासना स्वातंत्र्य व धार्मिक स्वातंत्र्य आहे आणि ते संविधानाला मान्य आहे.
यात्रेची वार्षिक परंपरा पाळतांना देवाला – देवतेला खारा नैवेद्य दाखवण्यासाठी व नवस फेडण्यासाठी बोकडबळी दिले जातात आणि हे बोकडबळी यात्रास्थानाजवळच उघड्यावर दिले जातात.
बोकडबळी देतांना ब-याच दूरवरून लोटांगण घातले जाते, बोकडाची मिरवणूक वा पूजा केली जाते आणि यात्रा स्थानाच्या आसपास, मंदिराच्या जवळपास आडोसा करुन वा एकदम उघड्यावरच बोकड कापले जातात, त्यांच्या मांसाच्या खांडांचा वा मुंडीचा नैवेद्य ठेवलेले ताट देवाच्या मूर्तीसमोर वा थोडेसे दूर अंतरावर नारळ फोडण्याच्या ठराविक ठिकाणी मोठ्या भक्तिभावाने ठेवले जाते.
आणि मग मटण खाण्यासाठी जेवणाच्या पंगती बसतात.
अशा प्रकारे नवसाचे बोकडबळी देऊन आपापली श्रध्दा जोपासली जाते.
मात्र या बोकडबळीची पूर्वतयारी करतांना भाविकांना, यात्रेकरूंना अनेकदा बोकडासाठी, पंगतीच्या स्वयंपाकासाठी, प्रवासासाठी कर्ज काढावे लागते. बरेच लोक कर्जबाजारी होऊन यात्रेत बोकडबळी देत असतात. यात्रेच्या दोनतीन दिवसांत आपल्या गावापासून, घरापासून दूर जाऊन बैलगाडीची, खर्चिक लक्झरी बसची सोय करुन प्रवास करतात. मुलाबाळांना यात्रेत आणतांना त्यांची शाळा, अभ्यास बुडविला जातो.
सिन्नर तालुक्यातील वडांगळी गावी बंजारा समाजाचे मूळपुरुष सतीमाता व सामत दादा यांचे स्थान आहे, सतीमाता व सामतदादा यांची यात्रा दरवर्षी माघी पौर्णिमेला असते आणि त्यांचे भक्त, बंजारा समाजाचे लाखभर लोक यवतमाळ जिल्ह्यातून, विदर्भातून व महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणांहून या यात्रेसाठी मोठ्या भक्तिभावाने येऊन या देवतांना बोकडबळी देत असतात.
दूरवरून येतांना हे लोक लक्झरी बस भाड्याने घेऊन येतात. या प्रवासासाठी बहुधा त्यांना कर्ज घ्यावे लागते. बोकड, मसाले यासाठी कर्जरुपाने पैसे उभारावे लागतात. या समाजातील लोक भटक्या जनसमूहातील असल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती बेताचीच व गरिबीची असते.
यात्रेसाठी येणाऱ्या या भाविकांना राहण्यासाठी गावाच्या जवळपास छोट्या छोट्या राहुट्या, तंबू उभारावे लागतात. तेथेच ते उघड्यावर बोकडबळी देऊन आपली वार्षिक नवसपूर्ती करतात.
त्यांच्यासाठी पाण्याची, सार्वजनिक लाईटची व पाण्याची सोय स्थानिक प्रशासनाला, ग्रामपंचायतीला करावी लागते. राज्यात विखुरलेल्या वेगवेगळ्या तांड्यातील हे लोक उघड्यावर राहतांना व तेथेच बोकडबळी देतांना तो परिसर बोकडांच्या रक्ताने, हाडामांसाच्या अवशेषाने घाण करतात. शाळेच्या परिसरात त्यांचे पाल असले तर शाळेचा परिसर सात आठ दिवस दुर्गंधमय असतो व विद्यार्थ्यांचे हाल होऊन सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न उभा राहतो.
या सर्वांवर नियंत्रण करतांना आता उघड्यावर बोकडबळी देण्यासंबंधी जादूटोणाविरोधी कायदापालन म्हणून स्लाॅटरहाऊस म्हणजेच एक प्रकारचे कत्तलखाने बांधलेले आहेत. तेथे मुलाणी, खाटिक बोकडबळी देतात, बकरांच्या कातड्याचा लिलाव तेथेच केला जातो.
उघड्यावर बोकडबळी देणे, नवसाला बोकडबळी देणे या अंधश्रद्धेवर संतांनी व समाजसुधारकांनी आपल्या उपदेशातून प्रहार केले आहेत.
‘नवसे – सायासे कन्या पुत्र होती,
तर का करणे लागे पती?’
असे खुद्द संत तुकोबाराय म्हणतात.
यात्रेतील भाविकांना प्रबोधन करण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते सातत्याने प्रयत्नशील असतात.

‘बोकडबळी बंद करा,
मुलाबाळांचे शिक्षण करा,

‘नवसाला देव पावत नाही,
बोकडबळी मागत नाही.’

अशा घोषणा देऊन, अंधश्रद्धा निर्मूलनाची गाणी गाऊन यात्रेतील भाविकांचे प्रबोधन केले जाते.
उघड्यावर बोकडबळी दिसले तर कायदा पालन व्हावे यासाठी कार्यकर्ते पाठपुरावा करतात, पोलिसांना यासाठी हस्तक्षेप करायला विनंती करतात.
दोडी, ता. सिन्नर येथील म्हाळोबाच्या स्थानिक यात्रेतसुध्दा भाविकांचे, यात्रेकरूंचे असेच प्रबोधन केले जाते.
म्हाळोबा हे धनगर समाजाचे दैवत असल्याने त्या समाजातील भाविकांचे व यात्रेत येणा-या सर्वसामान्य लोकांचेही प्रबोधन अनिसचे कार्यकर्ते, समविचारी संघटनांचे कार्यकर्ते दरवर्षी करीत असतात. अंनिसचे कार्यकर्ते ठकसेन गोराणे व गोराणे कुटुंबीय तर दोडीच्या यात्रेत बैठा सत्याग्रह दरवर्षी करीत असतात. यात्रेतील उघड्यावरील पशुहत्या रोखण्यासाठी प्रबोधन हेच एकमेव साधन असल्याने व जादूटोणाविरोधी कायदा त्यासाठी प्रतिबंधक व मार्गदर्शक असल्याने सातत्याने हे कार्य करणे क्रमप्राप्त ठरते. गेल्या २५ – ३० वर्षांपासून होणा-या अंनिसच्या प्रबोधनाला ब-याच अंशी यश येत आहे. अनिस ची सिन्नर तालुका शाखा, नाशिकरोड, नाशिक शहर व नाशिक जिल्हाशाखा वडांगळी व दोडी यात्रेतील बोकडबळी विषयक प्रबोधनात सक्रीय व अग्रेसर आहेत. भाविकांनी अंधश्रद्धामुक्त व्हावे, आपल्या श्रध्दांचे यथायोग्य व कायदेशीर उपयोजन व्हावे, यासाठी सर्वांनीच जागरूक व प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे.
:- अरुण घोडेराव, कार्याध्यक्ष, अनिस नाशिकरोड शाखा, 9822689886.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!