दिन विशेषदेशमहाराष्ट्रमुख्यपान

धन्य ती रमाई !

रमाई’ म्‍हणजे आमचे बाबा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची रामू! आम्हा सर्व कुटूंबाची कुटूंबवत्‍सल माता. सर्व आंबेडकरी लेकरे आणि लेकींची माता. अगदी अशिक्षित असलेली रमाई विद्याविभूषित व प्रकांड पंडित असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सोबत संसाराचा गाडा ओढत होती. ही गोष्ट खरं तर अत्यंत कमालीची आणि नवलाईची वाटते.

विश्वभूषण, भारतीय घटनेचे शिल्पकार आणि बहुजन समाजाचे मुक्तिदाते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची स्फूर्ती, चेतना, प्रेरणा म्हणजे रमाई !

लहानपणीच भीमरावाशी तिचा विवाह झाला. साऱ्या संसाराचा भार ती पेलीत होती. कुटुंबातील सासरे रामजीबाबा, मीरा आत्या, दीर आनंदराव, जाऊ लक्ष्मीबाई. पुतण्या मुकुंद, मुलगा यशवंत, भाऊ शंकर, बहिण गौरा आणि स्वत: रमाई एवढा मोठा परिवार सांभाळताना रमाईला किती कसरत करावी लागत असेल ! एवढेच नव्हे तर बाबासाहेबांच्या कार्यातील सहकारी कार्यकर्त्यांची सरबराई करणे आलेच ! ती सर्वांसाठी कणाकणाने झिजत होती. त्‍यासाठी ती कधीही कुरकुरली नाही की तक्रारही केली नाही. ती राबराब राबली. तिच्यावर शेणगोळा करून गोवऱ्या थापून संसाराचा खर्च चालविण्याचा दुर्धर प्रसंग आला; तरी डगमगली नाही. कष्‍टाचा धडा तर लहानपणी असतांनाच ती शिकली होती. आईवडिलांच्‍या निधनानंतर तर काका-मामांच्‍या घरी कष्‍टाचा धडा तिला मिळाला.

अस्पृश्यतेच्या अग्निदिव्यातून होरपळून निघालेले भिमराव आता समाजाला अस्पृश्यतेच्या रोगातून मुक्त करण्यासाठी व त्यासाठी निष्णात डॉक्‍टर होण्‍यासाठी अपार कष्‍ट घेऊ लागला. अर्धपोटी उपाशी राहून १८-१८ तास अभ्‍यास करु लागला. त्‍याच वेळी रमाईने आपल्‍या निष्‍ठेने, त्‍यागाने आणि कष्‍टाने स्‍वतःच्‍या संसाराचा गाडा हाकलून बाबासाहेबांना ध्येय गाठण्यासाठी मदत केली. स्‍वतःची रमेश, गंगाधर, इंदू आणि राजरत्‍न ही अपत्‍ये औषधावाचून हे जग सोडून गेले. बाबासाहेबांच्या शिक्षणात व्यत्यय येऊ नये म्हणून त्यांना कळविले नाही. त्यावेळी त्या माउलीचे ह्र्दय दु:खाने किती फाटले असेल ! तिला किती शारीरिक आणि मानसिक वेदना झाल्या असतील ! पण परदेशात जाऊन ज्ञानसाधना करणाऱ्या साहेबांना मात्र रामूने कधी आपल्या दु:खाची झळ पोहचू दिली नाही.

डॉ. बाबासाहेबांना शिक्षणासाठी संपूर्ण वेळ मिळावा म्‍हणून घरातील गरीबीची परिस्थिती त्‍यांना कधीही कळू दिली नाही. बाबासाहेब एका पत्रात लिहितात, ‘रामू, मी वणव्यातून धावण्याची प्रतिज्ञा घेतली आहे.’ त्यामुळे बाबासाहेब आपल्या ध्येयाप्रती किती ठाम आणि निष्ठुर होते ते कळते. डॉ. बाबासाहेबांनी रमाईला लिहायला-वाचायला शिकविल्यामुळे रमाई बाबासाहेबांना पत्र लिहून पाठवित होती. डॉ. बाबासाहेबही त्‍यांना पत्रातून रमाईच्‍या त्‍यागाबद्दल लिहित असत. रमाईमुळेच ते अधिक शिकू शकले, असे कृतज्ञतापूर्वक पत्रातून लिहू लागले. त्‍याचा रमाईला अपार आनंद होई.

धारवाडला हवापालट करण्‍यासाठी यशवंताला घेऊन रमाई गेल्‍या असता, त्‍यांनी तेथील वसतिगृहाला भेट दिली. जेवण नसल्‍यामुळे मुले उपाशीच होती. रमाईने हे ओळखले आणि स्वतःचे दागिने अधिक्षकाकडे देऊन मुलांना जेवण बनविण्‍यासाठी सामान आणले व स्‍वतःच्‍या हाताने मुलांना जेवण वाढले. जेव्‍हा ही घटना डॉ. बाबासाहेबांना कळाली, तेव्‍हा त्‍यांनी रमाईचे कौतुकच केले.

डॉ. बाबासाहेब परदेशातून शिक्षण घेऊन मुंबईला आले असता, त्‍यांच्‍या स्‍वागताला सर्व आंबेडकरी समाज मुंबई बंदरात आला. रमाईला नेसण्यासाठी चांगले लुगडे नव्हते म्हणून तिने छत्रपती शाहू महाराजांनी बाबासाहेबांच्या सत्कारप्रसंगी दिलेला भरजरी फेटा नेसून बाबासाहेबांच्या स्वागतासाठी आल्या. ते बोटीतून उतरताच त्‍यांच्‍या जयजयकाराने बंदर दुमदुमून गेले. अनेकजण त्‍यांना भेटत होते, हस्‍तांदोलन करीत होते. पण रमाई मात्र लांब कोपऱ्यात उभी होती. डॉ. बाबासाहेबांची नजर त्‍यांच्‍या रामूवर गेली. ते जवळ गेले. त्‍यांनी विचारले, रामू तू लांब का उभी राहीलीस? रमाई म्‍हणाली, तुम्‍हाला भेटण्‍यासाठी सारा समाज आतूर झाला असताना मी तुम्‍हाला अगोदर भेटणे योग्‍य नाही. मी तर तूमची पत्‍नीच आहे. मी तुम्‍हाला कधीही भेटू शकते. रमाईंचे इतके मोठे मन होते. म्‍हणूनच डॉ. बाबासाहेब आपले अंगीकृत काम करु लागले.

महाडच्‍या सत्‍याग्रहाच्‍या वेळी रमाईनेही सत्‍याग्रहास येण्‍याचा हट्ट धरला. कारण डॉ. बाबासाहेबांना खूनाच्‍या धमक्‍या येत होत्‍या. रमाईचे मन आतल्‍या आत कुरतडत होते. परंतु डॉ. बाबासाहेबांनी रमाईला महाडला येण्‍यास मनाई केली. डॉ. बाबासाहेबांना काही दगाफटका होऊ नये म्‍हणून रमाई उपास-तापास, व्रतवैकल्‍या करु लागली. परंतु डॉ. बाबासाहेबांच्‍या काळजीमूळे आणि उपासातापासांमुळे रमाई खंगली, आजारी पडली. त्‍यातच २७ मे १९३५ रोजी त्या सर्वांना सोडून निघून गेल्या. बाबासाहेबांसारख्या धीरोदात्त हिमालयाची सावली निघून गेली. रामजीबाबांनी केलेली रमाईची निवड ही किती सार्थ होती, हे तिच्‍या एकूण चारित्र्यावरून दिसून येते.

एकदा रमाईने पंढरपूरला जाण्‍याचा हट्ट धरला. डॉ. बाबासाहेब रमाईला म्‍हणाले, ‘रामू, मी तुझ्यासाठी नवीन पंढरपूर निर्माण करीन.’ बाबासाहेबांनी त्यानंतर निर्माण केलेले पंढरपूर पाहण्यासाठी रमाई मात्र राहिल्या नव्हत्या.

बाबासाहेबांनी ‘थॉट्स ऑन पाकिस्तान’ हा ग्रंथ रमाईच्या प्रिय स्मृतीला समर्पित केला. त्यांनी अगदी मनमोकळेपणाने कबूल केले होते की. ‘रामू’मुळेच ते घडले आहेत. रामूने जर त्याग केला नसता आणि स्त्री हट्ट धरला असता, तर कदाचित ते फक्त भिवा किंवा भीमा म्हणून राहिले असते. ते सर्वांचे बाबासाहेब झाले नसते आणि विद्येचे डॉक्टरही झाले नसते.

भारतात ज्या महनीय स्त्रिया होवून गेल्यात त्या म्हणजे तथागत गौतम बुध्द यांच्या सहचारिणी माता यशोधरा, दुसऱ्या राष्ट्रपिता ज्योतीराव फुले यांच्या सहचारिणी क्रांतीज्योती सावित्रीमाता फुले व तिसऱ्या म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहचारिणी रमाई माता यांचा उल्लेख केल्याशिवाय इतिहास पूर्ण होणार नाही.

महिलांनी त्यागमूर्ती माता रमाईचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाटचाल केली पाहिजे. त्यामुळे समाजासाठी आपण काहीतरी त्याग केला पाहिजे अशी प्रेरणा मिळेल. तरच आपल्या जीवनाचं सार्थक होईल. रमाईच्या कर्तव्याचा, सहनशक्तीचा, निष्ठेचा आदर्श घेवून आपले जीवन व्यतीत करायला पाहिजे. त्यांच्यामुळेच बाबासाहेब आपले कार्य पार पाडू शकले. त्यांच्यामुळेच आपल्या जीवनात सुख आणि समृध्दीचा प्रवाह निर्माण झाला. रमाई स्वत: झिजल्या पण सुगंध मात्र समाजाला देवून गेल्यात. रमाईमाता आणि बाबासाहेबांनी आपल्या संसाराची राखरांगोळी करून समाजाचं जीवन मात्र फुलविलं, याची आपण सतत जाण ठेवली पाहिजे.

अशा मायाळू, दयाळू, कनवाळू, ममताळू, कष्‍टाळू रमाईला विनम्र अभिवादन, कोटी कोटी प्रणाम !

आर.के.जुमळे, अकोला. बुध्द धम्म अनुसरण संघ ®

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!