देशमहाराष्ट्रमुख्यपानराजकीयविचारपीठ

भारतीय गुलामांचा पक्ष

प्रमोद मून

भारतात अनेक राजकीय पक्ष आहेत, त्यापैकी भारतीय जनता पक्ष हा एक पक्ष आहे. माझ्या मते भारतीय जनता पक्ष हा भारतातल्या स्वतंत्र जनतेचा पक्ष नसून हा स्वतंत्र भारतातील गुलाम मानसिकता असलेल्या भारतीयांचा पक्ष आहे.
जसे स्वातंत्र्य सैनिकाचा पक्ष म्हटले की काँग्रेस पक्ष डोळ्यासमोर येतो. कामगारांचा पक्ष म्हटले की डोळ्यासमोर कम्युनिस्ट पक्ष येतो. शेतकऱ्यांचा पक्ष म्हटले की डोळ्यासमोर शेतकरी कामगार पक्ष येतो. तसेच गुलामांचा व अंधभक्ताचा पक्ष म्हटले की डोळ्यासमोर भारतीय जनता पक्ष येतो.

दुनियाच्या नकाशावर भारत स्वतंत्रदेश झाल्यानंतर भारताची स्वतंत्र राज्यघटना अस्तित्वात आली. भारतीय राज्यघटनेने आपल्याला विविध प्रकारचे मूलभूत अधिकार दिलेले आहेत. घटनेने सामाजिक संघटना आणि राजकीय पक्ष स्थापन करायचा मूलभूत अधिकार जनतेला दिलेला आहे. आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेले आहे. कोणत्याही विषयावर जाहीरपणे व्यक्त होण्याचा अधिकार दिलेला आहे या अधिकारामुळेच आपण प्रत्येक क्षेत्रात न्यायासाठी संघटना स्थापन करीत असतो याच कायद्याखाली भारतीय जनता पक्षाची आणि सर्व राजकीय पक्षांची स्थापना झालेली आहे. आज भाजप भारतातला सर्वात मोठा राजकीय पक्ष आहे. या पक्षाची स्थापना 1951 साली भारतीय जनसंघ नावाने झाली नंतर त्याचे विसर्जन होऊन 1980 साली भारतीय जनता पक्षाची निर्मिती झाली. या पक्षाची आतापर्यंत केंद्रात चार वेळा सत्ता आली १) 1999 २)2014. ३) 2019 आणि ४) 2024

या पक्षाचे वैशिष्ट्य असे की आतापर्यंततरी हा पक्ष फुटला नाही.
भारतीय जनता पक्ष का फुटत नाही ?
याचा विचार केला तर असे लक्षात येते की हा स्वतंत्र राजकीय पक्ष नाही तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नावाच्या अराजकीय संघटनेची ती एक दुय्यम राजकीय शाखा आहे. म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारे विरुद्ध आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नेमलेल्या केंद्रीय नेतृत्वा विरुद्ध जर कोणी पदाधिकारी गेले तर त्यांना संपवण्यात येते एवढेच नाही तर एखाद्या वेळी भाजपचे केंद्रीय नेतृत्व सुद्धा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेविरुद्ध गेले तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला सुद्धा संपवण्यात येते , नाहीतर त्यांची पूरती वाट लावण्यात येते.

पंडित दीनदयाल उपाध्याय हे भारतीय जनसंघ पक्षाचे अध्यक्ष होते काही मुद्द्यावर त्यांचे अटल बिहारी वाजपेयी व नानाजी देशमुख सोबत टोकाचे मतभेद झाले. 11 फरवरी 1968 ला ते जनसंघाच्या अध्यक्षपदावर असताना त्यांचा खून करून त्यांना संपवण्यात आले. जनसंघाचे अध्यक्ष बनून त्यांना केवळ 43 दिवस झाले होते, 43 दिवसातच त्यांचा निकाल लावण्यात आला . म्हणजे संघात किती क्रूरता आहे हे तुम्ही समजू शकता त्यावेळी पंडित दीनदयाल उपाध्याय यांचे भारतीय जनसंघामध्ये कितीतरी नेते व कार्यकर्ते कट्टर समर्थक होते पण कोणीही या घटनेविरुद्ध विद्रोह केला नाही मोर्चे बांधणी केली नाही किंवा केंद्रीय नेतृत्वाला जाब विचारला नाही कारण काय तर हा गुलामांचा पक्ष आहे.

लालकृष्ण अडवाणी हे 1998 ते 2004 मध्ये भारताचे गृहमंत्री होते त्यांना हे लोक मोठ्या अभिमानाने लोहपुरुष म्हणत होते 2002 ते 2004 या काळात ते भारताचे उपप्रधानमंत्री राहिले लोकसभेत नेता प्रतिपक्ष राहिले ते भारतीय जनता पक्षाचे तीन वेळा अध्यक्ष होते पण जेव्हा ते पाकिस्तानला गेले आणि बॅरिस्टर जीनाच्या कबरीवर चादर चढवली व जिन्नाच्या सन्मानार्थ भाषण दिले, त्यांची ही कृती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारे विरुद्ध होती.त्यांच्या कृतीमुळे संघाच्या आतील गोटात खळबळ झाली संघांनी लगेच त्यांना भारतीय जनता पक्षातून शून्य करून घरी बसवले. एवढा अन्याय होऊनही हा गुलाम लोहपुरुष आणि याचे गुलाम समर्थक चूप राहिले यांनी ना दुसरा पक्ष काढला ना पक्षांतर्गत विद्रोह केला म्हणून भारतीय जनता पक्ष हा गुलामांचा पक्ष आहे

गोपीनाथ मुंडे हे ओबीसी समाजातून येत होते, ओबीसींच्या आरक्षणावर व जनगणने वरती हिरीहिरीने बोलत होते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका ही ओबीसी आरक्षण विरोधी भूमिका आहे. गोपीनाथ मुंडे ची त्यांच्या अचाट कार्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणावर जबरदस्त पकड होती . त्यांच्यामुळेच महाराष्ट्रात भाजप पक्ष वाढला ते जर जिवंत असते तर आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नक्कीच असते. त्यांच्या भूमिकेमुळे महाराष्ट्राच्या दोन ब्राह्मण असलेल्या भाजप नेत्यांची फार अडचण होत होती किंबहुना गोपीनाथ मुंडे मुळे महाराष्ट्राच्या या दोन नेत्यांना पुढे सरकायला जागा मिळत नव्हती त्यांना 3 जून 2014 रोजी कार अपघातात संपवण्यात आले.
पक्षाच्या सर्व लोकांना व ओबीसी नेत्यांना हे माहीत होतं की मुंडेचा अपघात करून त्यांना संपवण्यात आलं पण कोणत्याही ओबीसी नेत्यांनी यावर जास्त आंदोलन केलं नाही किंवा इन्क्वारी बसवण्यासाठी पक्षावरती प्रेशर आणले नाही सगळे चूप राहिले कारण हा गुलामांचा पक्ष आहे.

एकनाथ खडसे हे महाराष्ट्राच्या राजकारणातले जबरदस्त व्यक्तिमत्व त्यांच्या प्रयत्नामुळेच पश्चिम महाराष्ट्रात भाजपचे जम बसवला भाजपमध्ये मुख्यमंत्री पदाचे खरे दावेदार एकनाथ खडसे हे होते पण देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाला ते अडचण होते म्हणून त्यांना पद्धतशीरपणे एका जमिनीच्या केस मध्ये फसवून त्यांचे राजनैतिक करिअर संपवण्यात आले कारण संघाला त्यांच्या विश्वासातला संघाचा प्रचारक असलेला व्यक्तीच प्रधानमंत्री व मुख्यमंत्री पदावर पाहिजे असते. ह्या घटनेवर खडसेंनी आपल्या तर्फे होईल तेवढा विरोध केला पण माननीय खडसे साहेबांना त्यांच्या पक्षातील कोणत्याही लोकांनी साथ दिलेला नाही कारण हा गुलामांचा पक्ष आहे.

भारत हा सार्वभौम देश आहे. सार्वभौम म्हणजे एखाद्या प्रदेशावर त्या देशाच्या सरकारचा सर्वोच्च आणि स्वतंत्र अधिकार असने होय त्या सरकारला त्याच्या देशा संदर्भात सर्वोच्च निर्णयशक्ती असणे अशा या सरकारच्या निर्णय शक्तीवर कोणत्याही बाह्य शक्तीचा प्रभाव नसणे म्हणजे सार्वभौम होय.

राजकीय पक्षाचे प्रतिनिधी हे सामान्य जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी असतात ज्या राजकीय पक्षाचे सरकार बनते त्या सरकारकडे असीमित अधिकार येतात त्यांच्याकडे कायद्याने असमित शक्ती येते कायद्याने या शक्तीच्या वर कोणतीही शक्ती राहत नाही त्यांच्यावरती राज्यघटनेचे मर्यादित नैतिक दिशादर्शक नियंत्रण असते राज्यघटनेच्या अधीन राहून सरकारला कामे करावी लागतात. पण भारतीय जनता पक्षामध्ये राज्यघटनेने घालून दिलेली मर्यादा पाळण्याची नैतिकताही नाही कारण भाजपा चे संचालन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ करीत असतो.

जनतेने निवडून दिलेले सरकार हे स्वतंत्र व सार्वभौम असते कारण अंतिमत: देशाची जनता हीच सुप्रीम असते सुप्रीम जनतेने निवडून दिलेले सरकार स्वतंत्र काम करू शकते जर सरकारवरती कोणतीही दुसरी बाह्यशक्ती नियंत्रण करीत नसेल तर.
सरकार चालवणाऱ्यांवर कायद्याशिवाय बाहेरच्या कोणत्याही राजकीय,अराजकीय संघटनेचे दिशानिर्देशन आणि नियंत्रण असुच नये. कायद्याशिवाय
कुणाच्याही वर्चस्वाखाली , नियंत्रणाखाली किंवा दबावाखाली नसलेले सरकार तेव्हाच योग्य काम करतात जेव्हा ते मनाने स्वतंत्र असतात तेव्हाच ते देशाला प्राधान्य देतात न्याय देतात,देश हितासाठी ते पक्ष नेत्याला सुद्धा पक्षाच्या अंतर्गत बैठकीत सुनवायला आणि पदच्युत करायला मागेपुढे पाहत नाही वेळ पडली तर देशासाठी ते पक्षातून राजीनामा देऊन वेगळा पक्ष काढतात, असे काँग्रेसमध्ये घडले आहे, कम्युनिस्ट पक्षामध्ये घडले आहे डी एम के पक्षात घडलेले आहे जनता दल पक्षात आणि इतर सर्व पक्षांमध्ये असे घडलेले आहे. कारण इतर राजकीय पक्षांना बाहेरून नियंत्रण करणारी कोणतीही अराजकीय संघटना नाही. भारतीय जनता पक्षाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नावाची अराजकीय संघटना ही बाहेरून नियंत्रित करीत असते. म्हणून भारतीय जनता पक्ष हा गुलामांचा पक्ष आहे.

पण भारतीय जनता पक्ष देशहीत साधणारा पक्ष नाही कारण इथे देश महत्वाचा नाही. देशाची जनता महत्त्वाची नाही , तर आरएसएसला त्याचे वैयक्तिक उद्दिष्ट म्हणजेच ब्राह्मणधर्माचे हितसाध्य करावयाचे आहे. याकरिताच संघाने भारतीय जनता पक्षाची निर्मिती केलेली आहे.भारतीय जनता पक्ष हा आरएसएस ची एक राजकीय शाखा आहे म्हणून तो स्वतंत्र नाही भारतीय जनता पक्षाला आरएसएस चे ध्येय राबवावे लागते म्हणून भाजप हा स्वतंत्र पक्ष नाही तर आरएसएस साठी राबणारा राजकीय पक्ष आहे. आणि आरएसएस ही फक्त ब्राह्मण जातीच्या लोकांचे हित साधण्याकरता निर्माण झालेली संघटना आहे.

घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जेव्हा धर्माचा आणि देशाचा प्रश्न येईल तेव्हा मी म्हणेल की
” धर्मापेक्षा देश जास्त महत्त्वाचा आहे. देश हा आधी आहे आणि नंतरही देशच आहे.” पण
आरएसएसला देशापेक्षा ब्राम्हणधर्म जास्त महत्त्वाचा वाटतो. म्हणून तोच विचार भारतीय जनता पक्ष पुढे नेत आहे या विचारांविरुद्ध एखादा आमदार, खासदार बोलला तर त्याला बाहेरचा रस्ता दाखवल्या जातो म्हणून भारतीय जनता पक्षात कोणीही संघाविरुद्ध बोलत नाही म्हणून भारतीय जनता पक्ष हा गुलामांचा पक्ष आहे

उपरोक्त उदाहरणे हे वानगी दाखल उदाहरणे झालीत भारतीय जनता पक्ष गुलामांचा पक्ष आहे याकरिता म्हणावे लागेल की दीनदयाल उपाध्याय याचा खून झाला पण पार्टीने त्यांना शेवटपर्यंत न्याय दिलेला नाही. पक्ष सत्तेवर नसतांना तर न्याय मिळालाच नाही पण पक्ष जेंव्हा सत्तेवर आला तेंव्हाही न्याय मिळालेला नाही. जिथे पक्षांच्या अध्यक्षाची ही स्थिती असेल तिथे सामान्य कार्यकर्त्याची काय दयनीय अवस्था असेल हे आपण समजू शकतो. मुख्य मुद्दा म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये पूर्ण हुकूमशाही आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघात हुकुमशाही आहे म्हणून तीच हुकूमशाही भारतीय जनता पक्षात आली आहे. कोणतेही हुकूमशाही संघठन मग ते सैनिकी संघठन असो, पोलीस संघठन असो की राजकीय पक्षाचे संघटन असो त्यांच्यामध्ये फूट पडत नाही . दुसऱ्या महायुद्धात हुकूमशहा हिटलर संपला , जर्मनी संपली पण त्यांच्या नाझी पक्षात फूट पडली नाही. कारण यांच्यामध्ये फक्त “ओबे -द-ऑर्डर ” चालते.

भारत हा लोकशाही देश असला तरी इथे भारतीय जनता पक्ष हा पूर्णतः हुकूमशाही असलेला पक्ष आहे यांच्या अंतर्गत हुकुमशाही एवढी आहे की या पक्षाच्या आमदारांना त्यांचा मुद्दा कितीही खरा असला किती न्यायपूर्ण असला जनतेचा हिताचा असला जनतेला न्याय देणार असला तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीच्या विरोधात यांना बोलता येत नाही. नेतृत्वाच्या व संघाच्या विरोधात आमदार , खासदार बोलला की त्यांना पक्षातून काढण्यात येते आणि ते एवढ्यावरच थांबत नाही तर ईडी , सीबीआय लावून विरोध करणाऱ्याला संपूर्ण जीवनातून उठवण्यात येते आणि तेही करुन त्यांचे मन भरले नाही तर नाही तर त्यांचे व्यक्तिगत प्रकरण उकरुन काढून त्यांना संपवण्यात येते नाहीतर मग त्यांचा दीनदयाल उपाध्याय तरी करण्यात येतो .

यांच्या पक्षाच्या आमदारांना ,खासदारांना सत्तेत गेले की भ्रष्टाचार करण्याची, वाटेल तसा पैसा कमावण्याची हा पक्ष पूर्ण मोकळी देतो, राजकीय सत्तेत राहून वाटेल ती अय्याशी करायची मोकळीक देतो विरोधकांवर वाटेल तसे स्टेटमेंट करायची मोकळीत देतो पण लोकशाही पद्धतीने पक्षात आपले वैयक्तिक मत मांडण्याची मुभा मात्र देत नाही. लोकांच्या हितासाठी काम करण्याची मुभा देत नाही, प्रेस मध्ये जाण्याची मुभा देत नाही. कोणतेही पत्रक काढायची मुभा देत नाही. त्यांच्यावर पक्षात अन्याय झाला तर त्यांना सभा घेण्याची मुभा देत नाही जाहीर बोलण्याची मुभा देत नाही एक प्रकारे जे स्वातंत्र्य इतर राजकीय पक्ष आपल्या आमदारांना, खासदारांना पदाधिकाऱ्यांना देतात ते स्वातंत्र्य भाजप आपल्या आमदारांना, खासदारांना पदाधिकाऱ्यांना देत नाही त्यामुळे भाजपच्या आमदारांनी,खासदारांनी पदाधिकाऱ्यांनी जीवतोडून पार्टीचे काम केले आणि पक्षाने त्यांना तिकीट दिले नाही तरी ते चूप राहतात , मंत्री पद मिळाले नाही तरी ते चूप राहतात ,मन मारून चूप बसतात अन्याय ,अपमान सहन करून चूप राहतात बोलत नाही लोकशाहीत त्यांना मत व्यक्त करण्याचा अधिकार मिळूनही ते चूप राहतात म्हणून ते गुलाम आहेत आणि म्हणूनच भारतीय जनता पक्ष हा गुलामांचा पक्ष आहे.

भारतीय जनता पक्षाला भाजप नेतृत्व नियंत्रित करीत नाही तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नियंत्रित करीत असतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जे म्हणेल ते भारतीय जनता पक्षाला करावे लागते. एक प्रकारे भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा गुलाम आहे जगातल्या कोणत्याही लोकशाही देशात त्या देशातील राजकीय पक्ष हे सार्वभौम आणि सर्वोच्च असतात त्या पक्षाबाबत ध्येय धोरण तेच ठरवतात पण जगात भारतीय जनता पक्ष हा असा पक्ष आहे की त्याची ध्येयधोरणे , नेता, पदाधिकारी ,मंत्री व पक्ष नेतृत्व ठरवत नसून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ठरवतो म्हणून भारतीय जनता पक्ष हा भारतीय गुलामांचा पक्ष आहे

या पक्षात कार्यकर्त्याला, आमदाराला ,खासदाराला ,पदाधिकाऱ्याला ,कोणत्याही बाबतीत निर्णय घ्यायची, सार्वजनिक मत मतप्रदर्शन करायची मुभा नाही यांच्या पदाधिकाऱ्यांवर, आमदारांवर खासदारांवर एवढे दडपण असते की पक्षात कितीही अन्याय झाला तरी धाकाने ते बोलत नाही या उलट काँग्रेस पक्षाचे ,कम्युनिस्ट पक्षाचे, डी एम के पक्षाचे, समाजवादी पक्षाचे, राष्ट्रीय जनता दलाचे व इतर सर्व राजकीय पक्षाचे धोरण आहे. इतर सर्व पक्ष लोकशाही मार्गाने वाटचाल करतात इतर पक्षात जनतेच्या प्रश्नावर व पक्ष नेतृत्वावर खुलेआम चर्चा होते नेतृत्व पटलं नाही तर बदलण्यात येते नेतृत्वाचे चुकले तर टीका होते टोकाचा वाद विवाद होतो आणि वेळ आली तर पक्ष फुटतातही कारण त्या पक्षात लोकशाही आहे , व्यक्ती स्वातंत्र्य आहे बोलण्याचे स्वातंत्र्य आहे म्हणून हे पक्ष स्वतंत्र आहेत आणि ते स्वतंत्र आहेत म्हणून त्यांच्यात वेळोवेळी फूट पण होते पण भारतीय जनता पक्षात बोलण्याचे स्वातंत्र्य नसल्यामुळे इथे पक्षांतर्गत वाद निर्माणच होतच नाही व वाद निर्माण होत नसल्यामुळे पक्ष फुटत नाही भाजपात बहुसंख्य खासदारांना मोदीचे नेतृत्व पटत नसले तरी मन मारून स्वीकारावे लागते नाहीतर पक्षाच्या बाहेर जावे लागते. सार्वजनिक जीवनातून शून्य व्हावे लागते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भाजपच्या आमदारांवर, खासदारांवर ,पदाधिकाऱ्यांवर असलेल्या धाकामूळे भारतीय जनता पक्ष फुटत नाही भारतीय जनता पक्षात लोकशाहीची मूल्ये राबवल्या गेली असती पदाधिकाऱ्यांना खुलेपणाने मत मांडायचे अधिकार दिले असते तर आतापर्यंत या पक्षाची शंभर शकले झाली असती .

प्रमोद मून
9423063127
5-2-2025

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!