महाराष्ट्रमुख्यपानराजकीयविचारपीठ

पुढार्‍यांनी दादाला नासवलं

भाग २

शामरावदादा दुसर्‍या वर्गापर्यंतच शिकला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची दलितांच्या सर्वांगीन उत्कर्षाची चळवळ खेड्यापाड्यात सर्वदूर पोहोचली होती. त्यावेळी गावागावात समाज जागृती होत होती. दादा खेड्यातील लोकांना समजेल अशा खेडूत भाषेत भाषणं देत होता. पंचशील झेंड्याजवळ हात जोडलेल्या लोकांसमोर त्रिशरण-पंचशील प्रार्थना म्हणत होता. आंबेडकरी चळवळीत तो सदा अग्रेसर राहत होता. शिवाय रिपब्लिकन पार्टी या पक्षात काम करायचा. एवढंच नव्हे, तर तो भजनं-कव्वाली म्हणायचा. पेटी-हारमोनीयम अन् फिड्डल उत्कृष्टपणे वाजवायचा.
कोणतंही काम असलं की दादा धावून गेला नाही, असं कधीच घडत नसे. गावातल्या समारंभात गॅसबत्ती पेटवण्यासारखं साधं काम सुध्दा त्यालाच करावे लागे. दादाने गॅसबत्ती पेटवली की सारा परिसर प्रखर तेजाने उजळून निघत असे. दादाच्या कार्यामुळे त्याला मोठा मान मिळत होता. पंधरा वर्षे तो गावाचा सरपंच राहिला. त्याआधी ढिवरु सरपंच असताना तो उपसरपंच होता. त्याच्या सरपंचपणाचं काम दादाच पाहत होता. दादाच्या कामाची खरंच कुणाला सर येत नव्हती.
ढिवरु हा व्यक्ती अत्यंत सालस, मनमिळावू व साधा-सरळ स्वभावाचा होता. अंगात सदरा, धोतर आणि डोक्याला पटका हा त्याचा पेहराव… त्याकाळी शहरात जाऊन शिकणारा गावातला मी एकटाच होतो. त्यामुळे तो माझं मोठं कौतुक करायचा. मी कुठे भेटलो की माझी जिव्हाळ्याने विचारपूस करायचा. त्याचा मोठा मुलगा रामधन कलावंत होता. तो भजन मंडळात उत्कृष्ट तबला व तमाशात ढोलक वाजवत होता.
ढिवरु सरपंच- दोनतीन वर्ग शिकलेला असेल. गावातले माझे बाबा, दमडू, गोविंदा, दशरथ तेवढेच शिकले होते. त्यांच्या नंतरची पिढी म्हणजे दादा, रामधन, नामदेव, उध्दव, किसना, लक्ष्मण, तुळशिराम हे पण जास्त शिकलेले नव्हते. फक्त रामदास सातवीपर्यंत शिकला होता. त्याला मास्तरची नोकरी लागणार होती. परंतु त्याच्या आई-वडीलांनी घर सोडून जाण्यास त्याला मनाई केली, असे तो सांगत होता. खेड्यातील वातावरण असंच असतं. त्यांचं जीवन म्हणजे कोंबडीच्या पिल्लांसारखं. कोंबडीचं पिल्लू आईच्या मागेमागे राहतं. त्याने उडण्याचा प्रयत्‍न केला की आई त्याला टोचते. त्यामुळे त्याची उडण्याची उर्मी तेथेच जिरुन जाते. असाच काहिसा प्रकार खेड्यातील मुलांचा होतो. त्याने घरापासून दूर जायचे म्हटले की आई-बापाची माया जाऊ देत नव्हती. त्यामुळे उंच भरारी घेण्याची त्याची उर्मी तिथल्या तिथेच मरून जात होती.
गावातील नंतरची पिढी म्हणजे प्रल्हाददादा प्रि.आर्टस् पर्यंत पोहचला होता. मी बी.कॉम पर्यंत, बाबाराव एम.ए. बि.लिब, तर माझा लहानभाऊ अज्याप एम.बी.बी.एस. एम.एस. असे उच्च शिक्षीत मुलं निपजत होते.
‘बामणाघरी लेवणं अन् महाराघरी गाणं.’ असं म्हटल्या जात होतं. आता ‘महाराघरी लेवणं’ पण आलं. म्हणून ‘शेणाचे हात लावले लेखणीला’ असे भीमगितात म्हटल्या जायचे, ते खरंच होतं! जे हात नेहमी शेणाने भरलेले राहायचे, त्या हातात लेखणी आली. ही किमया डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घडवून आणली.
प्रामाणिकपणा, तळमळ, मनमिळाऊ स्वभावामुळे गावकरू दादालाच सरपंचपद बहाल करीत. त्याला हे काम अंगवळणी पडल्याने, तोही प्रत्येकवेळी तयार व्हायचा. सरपंचपदाच्या झुलीमुळे तो शेती-वाडीचे फारसे कामे करत नव्हता. म्हणून घरचे लोक दु:ख आणि कष्टात जगत होते. त्यामुळे आम्ही त्याला पुन:पुन्हा सरपंच बनायला विरोध करत होतो. त्याकाळात सरपंचांना मानधन पण मिळत नव्हतं. “दमडीची नाही मिळकत अन् घडीची नाही फुरसत” अशी दादाची तर्‍हा होती.
तो बॅंक, कर्ज, तहसील, पंचायत समिती, जिल्हा परिषद, कोर्ट-कचेर्‍या, पोलीसस्टेशन असे संबंधित दुसर्‍यांची कामे करायचा. त्याशिवाय ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामे पण करत होता. कुणाला दाखला दे, कुणाचे भांडण-तंटे सोडव. अशा कामात सतत मग्न राहायचा. लोकांच्या कामासाठी त्याला अधिकार्‍यांचे व पक्षाच्या पुढार्‍यांचे हात ओले करावे लागे, तर कधी दारु आणि कोंबडीच्या पार्टीची व्यवस्था करावी लागे. मग समाजसेवेच्या बदल्यात त्याला काय मिळालं? जळजळणारं विषारी दारुचं व्यसन…!
क्रमशः
आर.के.जुमळे
दि.२७.१.२०२५

टिप- सदर आठवणी ‘अशा तुडवल्या काटेरी वाटा’ या माझ्या स्वकथन पुस्तकात रेखाटले आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!