देशमहाराष्ट्रमुख्यपानमुंबई/कोंकणविचारपीठसामाजिक / सांस्कृतिक

नामदेव ढसाळ- गोलपीठा.

कंगालांच्या वेदनांच्या उघड्या नागड्या कविता.

जागतिक उंचीचा भारतीय कवी.

भारतीय भाषेत जागतिक उंचीचा कवी कोण असेल तर तो म्हणजे नामदेव ढसाळ. बाकीच्या कविनी कागदावर नुसते शब्द लिहिले तर ढसाळांनी सुसंकृत जगावर फेकून मारले जळजळीत शब्दांचे निखारे.

“रक्तात पेटलेल्या अगणित सुर्यानो” या ताकदीची कविता मराठी साहित्यात अजून कुठली झाली असेल असे मला वाटत नाही.

दिलीप चित्रे त्यांना जागतिक महत्वाचा, नोबेलच्या लायकीचा कवी म्हणतात तर मराठीचे वाल्मिकी गदिमा “अगोदर रसाळ नामदेव होते तर आता ढसाळ नामदेव आले” अशी कुत्सित हेटाळणी करतात. पण ढसाळांनी जे लिहिले आहे , त्याच्या आसपाससुद्धा मराठीतला कोणता कवी येऊ शकत नाही हे निर्विवाद सत्य आहे. ढसाळांचा एकेक शब्द हृदयाचे हजार तुकडे करत जातो आणि त्याबरोबर इतर कवींच्या खुजेपणाची जाणीव होत राहते.

गोलपीठा हे जग आहे रात्रीच्या दिवसाचे, भुकेल्या पोटांचे, मरणाच्या खस्तांचे, उद्याच्या चिंताचे, शरम आणि संवेदना जळून उरणाऱ्या मनुष्य देहांचे, असोशी वाहणाऱ्या गटारांचे, गटाराशेजारी मरणाची थंडी निवारीत पोटाशी पाय मुडपून झोपणाऱ्या तरुण रोगी देहांचे, बेकरांचे, भिकाऱ्यांचे, खिसेकापुचे, आपल्या मुलाला ‘ शरीफ’ बनवायची महत्त्वाकांक्षा बाळगीत जवळच्या कुंटणखाण्याची रखवाली करणाऱ्या क्षयरोगी बापाचे , हिजड्यांचे, हातभट्टीचे, स्मगलींगचे, नागव्या चाकूचे, अफूचे ( विजय तेंडुलकर ).

भेसूर, किळसवाण्या, शिसारी आणणाऱ्या शब्दांची जगजाळी कविता उच्चभ्रू वर्गाच्या नाजूक प्रकृतीला न पेलवणारी.

**
अंधाराने सूर्य पाहिला तेव्हा
शब्द हुंकारले
नरकाच्या कोंडवाड्यात
किती दिवस आम्ही राहायचे?
श्वास घुसमटत!
न…..नष्टचर्येच्या गटारात

गोलपीठ्यावर नागवणाऱ्यांनो
तुमचा ऱ्हास जवळ आला आहे
मुक्त छंदाच्या संजीवनीने
आम्ही जिवंत झालो आहोत..
तुमच्या पापाचे छिनाल घट फोडण्यासाठी!

**
आमच्या आळीतुन जाताना
त्या विझवूनच जा ( तुमच्या मशाली)
आज आम्हाला, या खोपटा खोपटातुन
पूर्ण सूर्य दिसतोय

**
आता अंधार यात्रिक होण्याचे नाकारलेच पाहिजे

हा आपला बाप अंधार वाहून वाहून अखेर पोक्या झाला
आता त्याच्या पाठीवरील बोजा खाली ठेवलाच पाहिजे

या वैभवनगरीत आपलाच खून सांडला
आणि दगडी खाण्याचा मक्ता मिळाला
आता आभाळमुका घेणाऱ्या हवेल्याना सुरुंग लावलाच पाहिजे

सूर्यफूल हाती ठेवणारा फकीर हजारो वर्षानंतर लाभला
आता सुर्यफुलासारखे सुर्योन्मुख झालेच पाहिजे

**
रक्तात पेटलेल्या अगणित सुर्यानो
तुमची आयबहीण
आजही विटंबली जाते हाटाहाटातून
मवाल्यासारखे माजलेले
उन्मत्त निरो
आजही मेणबत्तीसारखी जाळतात माणसे चौका चौकातून
कोरभर भाकरी, पसाभर पाणी यांचा अट्टाहास केलाच तर फिरवला जातो नांगर आजही घरदारावरून
चिंदकातील हात सळसळलेच तर
आजही छाटले जातात
आजही नगरानगरातून
रक्तात पेटलेल्या अगणित सुर्यानो
किती दिवस सोसायची ही घोर नाकाबंदी
मरेपर्यंत राहायचे का असेच युद्धकैदी?
ती पहा रे ती पहा,
मातीची अस्मिता आभाळभर झाली
माझ्याही आत्म्याने झिंदाबादची गर्जना केली
रक्तात पेटलेल्या अगणित सुर्यानो
आता या शहर शहराला आग लावीत चला

**
रांडवी पुनव साजरी करतात हिजड्यांचे अप्रूप उत्साह
कुठल्याही सोम्या गोम्याने यावे दार ठोठावून जावे
ही बीभत्स रात्र सतिसवित्री होऊन नाचतेय टिंगलमटोल होऊन
कबरी उकलून आलेत सांगाडे
हिजड्यांचे अजनबी अग्निदिव्य पायला

**
इथला प्रत्येक हंगाम बेदर्दीच असतो
इथला प्रत्येक महाकवी आखुडच असतो

**
अनाकार शांततेत मुडद्यांचा नंगानाच
बरकतीचे काळे तोंड पुन्हा पुन्हा लाजीम
नागकाठी पोचे कुरण कडे दाढीचे मण्याचे
सूत्र मलसूत्र
संध्याकाळी झाली असेल रोपट्यांची सुंता
चुकूनमाकून उरकले असेल किड्यांचे ऊर्ध्वपतन
नाहीतर कशाला वाया जाईल स्वच्छ पाण्याची दानत
पहाडी छक्के सारवतात ईश्वराचे बेंबी मुख
कुणालाच नावे ठेवायची नाहीत
कुणाच्याही पुढे नाक खाजवायची नाहीत
दुःख विसरली जातील आपल्याच हिमतीने

**
तडीपार टरफलांच्या रेताड सावल्या
लवंडून आल्यायत खाचात
स्मशानातल्या धर्मशाळेत कण्हतोय शेवटचा गजर
काळजाचा घड तोडणारा बिवल्या वाघ
जहर उतरवतोय आपल्यात
बगलांत शाडू झालेली झुंबरे
रडताहेत जर्द पाऊस
झाडावरील धूळ झडतेय
चणे भाजताना वाजतात तसे सरण वाजतेय
कवठी ठो झाल्यावर
स्मशानातील कनी कापताना प्रत्येकजण
कपाळाला माती लावतोय
ओठातल्या ओठात ओठग्रस्तून
वादळासारखा बदबडतोय
सूड: सूड:

ह्या साऱ्याच वाटा स्मशानातुन जातात काय?

**
मलाही दारिद्र्याचे स्वतंत्र शेत आहे
ज्याची वहिवाट करताना दिवस उगवतात
दिवस मोडतात…
अगोदरचे असतील बिचारे भु दास
नंतरच्या सरंजाम्यानशी हातमिळवणी मी टाळले
भौमितिक संसर्गाने वाढली माझी निसर्ग गात्रे
भिनले माझ्यातले साम्ब साव
मी उंद्राचे प्रच्छन्न धड वर पिरॅमिड

अनेक शब्द कळत नाहीत पण जाणवतात कंगालांच्या वेदना ज्या बुळ्या कविना कधी लिहाव्या वाटल्या नाहीत आणि बुळ्या वाचकांना वाचाव्यात असे वाटले नाही.

**
15 ऑगस्ट एक संशयास्पद महाकाय भगोष्ठ
स्वातंत्र्य कुठल्या गाढवीचे नाव आहे
रामराज्याच्या कितव्या घरात आपण ऱ्हातोय
कंचा मूलभूत अर्थ स्वातंत्र्याचा
कुठल्या औट घटकेत केली स्वातंत्र्याने पारायणे मोंटेसरीची
स्वप्नातल्या स्वप्नात चोरीला गेलीयत पाने फुले
कुठल्या षंढाच्या बैलाला झालाय रेडा

**
कविता ही गोष्ट माझ्या आयुष्यात आली नसती तर मी गॅंग लीडर नाहीतर कुंटणखान्याचा मालक, स्मगलर झालो असतो असे ढसाळ सांगतात.

बाईत सहन करायची मोठी ताकद आहे. ती जेव्हा काहीतरी लिहिते तेव्हा जबाबदारीने लिहून जाते असे ढसाळ म्हणतात.

मी विमुक्तपणे बेभानपणे जगलोय असे ते सांगतात.
अनोखे शब्द वापरून अदभुत शब्दलालित्य कंगाल, वंचित यांची वेदना सांगणारा खूपच मोठ्या उंचीचा काव्यसंग्रह. भळभळत्या जखमांवर मारलेले चरचरीत आयोडिंग!

लेखन – डॉ सतीश सदाशिव पवार
कणकवली
12 जाने 2023.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!