नवी लिपी : कृतज्ञ काळजाची भावगर्भ कविता– डॉ. अनंत दा. राऊत

डॉ.राजेंद्र गोणारकर यांचा ‘नवी लिपी’ हा कविता संग्रह नुकताच प्रसिद्ध झाला आहे. या संग्रहाचे मी स्वागत करतो. डॉ. गोणारकर यांची प्रकृती भावगर्भ कवीची आहे. भावगर्भता म्हणजे खोल काळजातली, खोल खोलच्या अंतर्मनातील उत्कट,तीव्र, तुडुंब, रसरसती, अनावर, निखळ, नितळ, निर्मळ, विशुद्ध अशी भावस्थिती. खोल काळजातील अनावर भाव स्थितीचा सहज आविष्कार करणे हीच कविता या वाङ्मय प्रकाराची गाभाभूत जबाबदारी असते. ही जबाबदारी नेमकेपणाने पार पाडणे सर्वच कवींना जमत नाही. अनेक कवींच्या कवितेत उत्कट भावनेपेक्षा इतर अनेक गोष्टीच अधिक असतात. डॉ. गोणारकरांना मात्र ही जबाबदारी चोखपणे पार पडता येते.त्यांच्या या आधीच्या ‘अनारंभ’ या कवितासंग्रहामधूनही भावगर्भ कविताच समोर आलेली आहे. त्यांच्या कवितेतील भावगर्भता व्यक्तिगत पातळीवरची असली तरी निव्वळ व्यक्तिगत पातळीवरची नाही. या भावगर्भतेला व्यापक असे सामाजिक आयाम लाभलेले आहे. ‘नवीन लिपी’ या कवितासंग्रहात कृतज्ञता भाव केंद्रस्थानी आहे. कृतज्ञता भाव म्हणजे आदर भाव उपकाराची जाणीव. या भावनेत श्रद्धा, निष्ठा या गोष्टीही सामावलेल्या असतात. जी महान व्यक्ती आपल्यासाठी
मदतगार झाली. आपल्यावर आलेल्या संकट समई धावून आली. आपणाला संकटातून, दुःखातून मुक्त केले, अशा व्यक्तीबद्दल आपल्या मनात खूप मोठा कृतज्ञता भाव असतोच. हा कृतज्ञता भाव आपण आपल्या काळजात कायम जपून ठेवत असतो तसाच तो आवश्यक त्या ठिकाणी व्यक्तही करत असतो. असे करणे हा माणसाच्या प्रगल्भ अशा सुसंस्कृत स्वभावाचा भाग असतो.
अस्पृश्यता, शोषण, गुलामी, अज्ञान, अंधश्रद्धा,भेदाभेद,उच्चनीचता,दारिद्र्य इत्यादीच्या काळ्याकभिन्न अंधाराला चिरत जाणारा, गुलामीत जगणाऱ्या कोट्यावधी माणसांच्या जीवनात नवा प्रकाश ओतणारा आधुनिक भारतातील क्रांतिकारी महामानव म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेब हा महामानव भारतातील कोट्यावधी लोकांच्या परम आदराचा आणि श्रद्धेचा विषय बनलेला आहे. कारण तो त्यांच्यासाठी मुक्तिदाता ठरलेला आहे. या मुक्तिदात्याने भारतातील कोट्यावधी लोकांना अस्पृश्यता, शोषण, विषमतावादी व्यवस्थेतील उच्च जातवर्णीयांकडून होणारे अन्याय अत्याचार व दुःख दारिद्र्यातून मुक्ती दिली. त्यामुळेच बाबासाहेब हा यांच्या मनातील अत्यंत श्रद्धेचा विषय बनला. १९६० नंतर उदयाला आलेल्या दलित साहित्य प्रवाहातील जवळजवळ सर्वच साहित्यिकांनी बाबासाहेबांच्या बद्दलचा कृतज्ञता भाव कोणत्या ना कोणत्या पद्धतीने व्यक्त केलेला आहे.
कवितेमध्ये मनात दाटून आलेल्या अनावर भावना प्रकट करणं महत्त्वाचं असतं. त्या भावनांमध्ये प्रेम, द्वेष, तिरस्कार,दुःख, वेदना,तिरस्कार, संताप, श्रद्धा आदर अशा कुठल्याही भावनेचा समावेश असू शकतो. अशा वेगवेगळ्या भावनांचेही अनेकविध पदर असतात. मनात दाटून आलेल्या सगळ्याच प्रकारच्या भावना जशास तशा नेमकेपणाने प्रकट करण्यासाठी कवीला प्रचलित भाषेत शब्द सापडत नसतात. म्हणून कवी अपरिहार्यपणे आपल्या अनावर भावनांच्या आविष्कारासाठी प्रतिमांची भाषा वापरत असतो. भावनाविष्कार हा कविता या
वाङ्मय प्रकारच्या केंद्रस्थानी असल्यामुळे कवितेतील भाषा ही पूर्णपणे निराळी होत असते. या भाषेमध्ये स्पष्टीकरणाला कुठलेही स्थान नसते. तिच्यात सूचकता महत्त्वाची असते. ती अतिशयोक्ती अलंकाराचा वापरही मोठ्या प्रमाणात करत असते.कवितेतील अनेकविध भावना व चिंतनाच्या सूचनाला समजून घेण्यासाठी कविता या वाङ्मय प्रकाराची काही एक जाण वाचकाला असणे आवश्यक असते. ती जाण जर वाचकाला नसेल तर कविता समजणे त्याला काहीसे कठीण जाऊ शकते. अर्थात सगळ्याच कविता समजण्यासाठी कठीण असतात असे नाही. अगदी उत्कट भावनांचा आविष्कार करणाऱ्या कविताही सुलभ पद्धतीने, प्रासादिक रीतीने प्रकट होऊ शकतात.
कवी राजेंद्र गोणारकर यांची कविता भावाविष्कार करणारीच आहे पण ती नुसताच भावाविष्कार करणारी कविता नाही तर त्या भावाविष्काराच्या मुळाशी एक सखोल असं सामाजिक चिंतन आहे.बाबासाहेबांच्या बद्दलचा प्रगाढ, खोल काळजातला अतोनात आदरभाव, कृतज्ञताभाव व्यक्त करताना कवी लिहितो 'तुम्ही दुःखाच्या काळ्या कभिन्न तमातील दीप्तिमान झोत आहात. जातिअंताच्या लढ्याचं ऊर्जा केंद्र आहात. स्त्री मुक्तीचं निळंभोर आभाळ आहात. 'अजिंठा' या कवितेत कवी लिहितो की,
तुम्ही आलात असे की
अग्नीचे लक्ष समुद्रच आले
तीव्र उधाणून
उठल्या लाटा अशा की
दऱ्या काळोखाच्या
गेल्या झळाळून
लेखणीच्या प्रहारानं तुमच्या
ठिकऱ्या झाली कुंठा
बाबासाहेब,
जन्माच्या या पाषाणाचा
तुम्हीच केला अजिंठा
या अविष्कारामध्ये नुसत्याच भावना नाहीत तर सूचक पातळीवरचं खूप मोठे चिंतन आहे. ते चिंतन इथल्या माणूसपणाला कुंठीत करणाऱ्या व्यवस्थेला बाबासाहेब आंबेडकरांनी कसं नमवलं आणि ज्यांचं जीवनच अवरुद्ध केलं होतं त्यांच्या जीवनाचा कसा सुंदर अजिंठा बनवला याची मांडणी करणारं आहे. बाबासाहेबांच्या बद्दल काही असेही लिहितो की, आग लाव्या भूतकाळाचा तुम्ही केला चक्काचूर. बाबासाहेब विषयाचे वन जाळणारी मनामनातील जाग आहेत, नक्षत्र उधळणारी ओजस्वी वाणी आहेत. बाबासाहेब बुद्धाच्या विश्व डोळ्यातील तेजस्वी पाणी. बाबासाहेबांमुळेच चांदण्याची साय आभाळात अविभक्तपणे दाटून आलेली आहे. वारेमाप निळं आभाळ बाबासाहेबांनीच आमच्या अंगणात आणून ठेवलं आहे असा भावही कवी व्यक्त करतो.
आघात या कवितेतून एका अत्यंत संवेदशील मनाची व्याकुळता प्रकट होते. वर्तमानातील वेदनादायी वास्तवाबद्दल यामध्ये कवी बाबासाहेबांना उद्देशून प्रश्न उभे करतो.
भाकर आहे त्यावर तुमची सहीही आहे
वस्ती तरीही वंचना साहते आहे
हे असे कसे की रात्रीच्या रक्तातून
अजूनही का भूकच वाहते आहे?
माठ आहे, पाणी आहे, तहानेवर तरी पहारे
ही अशी समतेची हर घडी हार आहे
माणुसकीवर मस्ती परंपरेची
अजूनही का स्वार आहे?
पोलीस आहे, कोर्ट आहे, कचेरी आहे
कायद्याचा तरीही राजरोस घात आहे
कळत नाही अन्यायाचाच न्यायनीतीवर
अजूनही का आघात आहे?
‘तुमच्या चरणाशी माझा प्राण झालाय गोळा’
या कवितेत कवीने वर्तमानातील स्ववर्चस्ववादी संघी धर्मांधांच्या विषारी प्रवृत्तीवर अत्यंत जळजळीत भाष्य केले आहे. कवी लिहितो
हे चंद्राला डंख मारणारे
हे उगवतीचे पंख छाटणारे
हे सनातन अपरंपार वाह्यात लोक
यांच्या निश्वासातून नित्य ढळते विषाचे वारे
हे पुसून टाकतात आकाशातील लुकलुकणारे तारे
हे करू शकतात बदलांच्या सर्व शक्यतांचे अपहरण
वर्तमान धोकादायक वास्तवावर कवी असेही भाष्य करतो की,
दबा धरून बसलेत समतेचे मारेकरी दोस्तांच्या वेषात त्यांचे मुखवटे एकदा निग्रहाने फाडायला हवेत
हे कवीचे भाष्य देखील फार चिंतनगर्भ स्वरूपाचे आहे.
या संग्रहातील कवितांमध्ये काही संविधानाचे संदर्भही आलेले आहेत. कवी म्हणतो ‘निर्मनुष्य चौकातील तुमचा पुतळा चालण्याचं बळ नि जगण्याचं संविधान झालाय. पण अजून कुठे पुरता सुरू झालाय संविधानाचा ऋतू? जुलमाचं जीवघेणं अधिराज्य कुठे झालंय हद्दपार?’ भारतीय संविधान हा या कवीच्या आस्थेचा विषय आहेच परंतु तरीही तो अजून पुरता उत्कट भावविश्वाचा भाग बनलेला नाही. भावी काळात तो नक्कीच बनेल आणि त्यावर उत्कट भावगर्भ अशा कविता हा कवी लिहील अशी अपेक्षा करण्यास भरपूर जागा आहे.
या संग्रहातील कवितांचा मी नोंदवला तो अर्क आहे. बाकी बऱ्याच काव्यात्मक पण सर्वसामान्य ओळीही या संग्रहात आहेत.
नवी लिपी
डॉ. राजेंद्र गोणारकर
हस्ताक्षर प्रकाशन,बामणी ता. लोहा जि. नांदेड
पृष्ठसंख्या ४२
किंमत ६० रुपये
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत