फातिमा – या वादाचं कारण काय?

श्लद्धा कुंभोजकर
महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती महामंडळानं प्रकाशित केलेल्या सावित्रीबाई फुले समग्र वाङ्मयात सावित्रीबाईंनी जोतीरावांना १८५६ मध्ये लिहिलेलं पत्र उद्धृत केलेलं आहे. त्यात ‘ फातीमास त्रास पडत असेल. परंतु ती कुरकूर करणार नाही.’ असं वाक्य आहे. या वाक्यापलीकडे फातिमा यांच्या अस्तित्वाविषयी विश्वासार्ह ऐतिहासिक पुरावा मिळत नाही.
तरीही, वरच्या वाक्यामुळे आपल्याला हे समजतं की सावित्रीबाईंची फातिमा नावाची कुणी विश्वासू सहकारी असावी, की जिच्या खांद्यावर सावित्रीबाई आपल्या अनुपस्थितीत बरीच जबाबदारी देऊ शकत होत्या. अर्थातच फातिमा ही सावित्रीबाईंना लाभलेली एक सक्षम सहकारी होती हे स्पष्टच आहे.
फातिमाबी शेख या नावाची व्यक्तिरेखा आपल्याच मनाने निर्माण करण्यावरून उठलेल्या वादंगात दोन दावे आहेत. पहिला दावा असा की फातिमाबी शेख या कपोलकल्पित व्यक्तिरेखेमुळे सावित्रीबाईंच्या स्त्रीशिक्षणविषयक कर्तृत्वाला झाकोळलं जात आहे. अर्थातच हा पोकळ दावा आहे. कारण असं कुणीही म्हटलेलं नाही, किंवा सूचित केलेलं नाही. याखेरीज असल्या दाव्यामुळे महानता हे जणू काही एका वेळी एकाच माणसाला मिळणारं सुवर्णपदक असल्याप्रमाणे सावित्रीबाई आणि फातिमाबी यांच्यात एक तितकीच कपोलकल्पित शर्यत लावली जाते. अशी शर्यत मुळात नसतेच. एका वेळी अनेक माणसं महान असतात, असू शकतात.
फातिमाबी शेख या व्यक्तिरेखेबाबत ओरड करणाऱ्यांचा दुसरा आक्षेप सहसा बोलून दाखवला जात नाही. पण त्याचा इत्यर्थ असा असतो, की मुस्लिमांचं सत्यशोधक चळवळीत काहीही योगदान नव्हतं. किंबहुना ती चळवळ एक जातीपुरती मर्यादित होती. हा दावाही खोटा आहे. सावित्रीबाई फुले आणि जोतिरावांच्या अंगीकृत कार्यात अनेक मुस्लिम व्यक्तींनी सक्रिय सहभाग घेतल्याचे सबळ पुरावे आहेत. जोतिरावांचं शिक्षण वडिलांनी थांबवलं, तेव्हा मुन्शी गफ्फार बेग यांनी वडिलांची समजूत काढून त्यांचं शिक्षण पुन्हा सुरू केलं.
१८७४ साली जेव्हा फुले दांपत्यानं एका आंतरजातीय विवाहासाठी पुढाकार घेतला, तेव्हा त्यांना अनेकांनी विरोध केला. पण मीठ गंज पेठेतल्या मोमीन मंडळींनी इतर सत्यशोधकांच्या बरोबरीनं हा आंतरजातीय विवाह निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी खूप मदत केली हे सत्यशोधक समाजाच्या रिपोर्टात कृतज्ञतेनं नोंदवलेलं आहे.
हे असं असेल तरीही सत्यशोधक समाज ही नेहमीच एक बहुसांस्कृतिक चळवळ होती ही गोष्ट लक्षात ठेवायला हवी. या चळवळीत अनेक जाती आणि धर्मांच्या माणसांची महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे. मुस्लिमांना सत्यशोधक चळवळीतून नजरेआड करण्याच्या या प्रयत्नांमागे कोणत्याही चळवळीला जातीच्या साच्यात कोंबण्याच्या प्रयत्नांची दुर्गंधी येते. असल्या साच्यात सत्यशोधक चळवळ कोंबली जाणं शक्य नाही. कारण अनेक जातधर्मातल्या माणसांच्या सहभागामुळे ती नेहमीच एक बहुसांस्कृतिक चळवळ होती.
मग फातिमा शेख यांच्या अस्तित्वाबाबत वादंग का उठतो? तर या बाबतीत ऐतिहासिक स्मृतीची मोडतोड केली गेली आहे हे कारण स्पष्टच आहे. आधी एकतर काही माणसांच्या त्या त्या वेळच्या व्यक्तिगत महत्त्वाकांक्षेला सोयिस्कर ठरेल अशा पद्धतीनं एक मिथक घडवलं गेलं. आणि आतादेखील व्यक्तींच्या सध्याच्या महत्त्वाकांक्षेला सोयीचं पडेल अशा पद्धतीनं ते मिथक मोडण्याची तारांबळ केली जात आहे. या वैयक्तिक लाभालाभांच्या पलीकडे जाऊन पाहिलं, तर काळजीपूर्वक इतिहास वाचणाऱ्या कुणाच्याही लक्षात येईल की हे सरळसरळ स्मृतींवरून केलं जाणारं राजकारण आहे. वैचारिक भूमिकांच्या दोनही टोकांवरच्या श्रद्धाळू भक्तजनांनी जरासं थांबून विचार केल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीची थोरवी मान्य करणं हे धोकादायक असतं हा धडा यानिमित्तानं घेता येईल.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत