देशदेश-विदेशमहाराष्ट्रमुख्यपानराजकीयविचारपीठ

डॉ. बाबासाहेब आंबेडकराच्या संघशाखेच्या भेटीचा राजकीय प्रपोगंडा !

राजेंद्र पातोडे

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेस भेट दिली होती, असा दावा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यावतीने केला जात आहे.सदर दावे पूर्णत: फोल, बनावट, अनैतिहासिक आणि राजकीय प्रपोगंडाचे भाग आहेत, इतिहासाचे विकृतीकरण आणि मोडतोड करीत काल्पनिक घटना इतिहास म्हणून रंगविण्यात हे संघी पटाईत आहेत.१३ ऑक्टोबर १९३५ रोजी नाशिकमधील येवला इथं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घोषणा केली होती की, ‘हिंदू म्हणून जन्माला आलो, परंतु हिंदू म्हणून मरणार नाही’.हि प्रतिज्ञा करून विज्ञानवादी धम्म स्विकार केला आहे.कारण आर.एस.एस.ही हिंदुत्ववादी संघटना आहे आणि भारतात हिंदूराष्ट्र स्थापन करण्याचे स्वप्न त्यांनी उरी बाळगले आहे.हिंदू राज्य हे स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेला धोका असे पाकिस्तान वरील ग्रंथात बाबासाहेबांनी म्हटले होते, ते बाबासाहेब संघ शाखेत भेट कशासाठी देणार होते ? थेट गांधी समोर त्यांचे माहात्म्य थोतांड आहे असे बजावतात ते बाबासाहेब संघ शाखेत गेले हा दावा बालीशपणाचा आहे.गांधी बाबत जसे बाबासाहेब राखून ठेवत नसत तसेच संघा बाबत राखून ठेवत नसत म्हणून ते ‘आर.एस.एस.ही हिंदुत्ववादी संघटना आहे आणि भारतात हिंदूराष्ट्र स्थापन करण्याचे स्वप्न हे स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेला धोका आहे,’ असे ठामपणे मांडतात.हि मांडणी करण्यामागे एक नरेटीव्ह सेट करण्याचा संघाकडून प्रयत्न सुरु आहे.त्यांची पोलखोल करण्यासाठी सदर लेख.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २ जानेवारी १९४० रोजी सातारा जिल्ह्यातील कराड येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेला भेट दिली होती असा दावा करत या ऐतिहासिक घटनेचे स्मरण म्हणून त्याच जागेवर बंधुता परिषद या वैचारिक कार्यक्रमाचे आयोजन कराड येथे लोककल्याण मंडळ ट्रस्टद्वारे करण्यात आले होते.“माणसा माणसांत वैचारिक मतभेद असले तरी एकमेकांच्या विचाराचा आदर करून सामाजिक सलोखा जपता येऊ शकतो आणि यातूनच बंधुता निर्माण होते.हा संदेश डॉ आंबेडकर यांनी कराड मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात दिला होता”. हे जाहीर केले ते संघाच्या विश्व संवाद केंद्राने ! त्यावर दोन्ही बाजूने दावे प्रतिदावे केले जात आहेत.काय आहे ह्याची वस्तुस्थिती ?

संघ शाखेला भेटीचा दावा हा नवीन नाही.भाजपने संघावर बंदी घालणारे सरदार पटेल ह्यांना हायजॅक करीत त्यांचा सर्वात मोठा पुतळा नर्मदा तीरावर उभा केला तोच प्रयत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्याचे बाबत केला जात आहे.अलीकडच्या काळात संघ शाखा भेटीचा पहिला दावा केला होता तो, १५ एप्रिल २०२० रोजी अरुण आनंद ह्या आर.एस.एस. संबंधित व्यक्तीने.‘१९३९ मध्ये आंबेडकरांनी संघाच्या कॅम्पला भेट दिली.कॅम्पात ५२५ पैकी १२५ स्वयंसेवक हे अस्पृश्य जातींमधील होते.त्यांच्यामध्ये अस्पृश्यता पाळली जात नव्हती. ते एकत्र राहत होते आणि एकत्र जेवत होते.ह्या गोष्टीने डॉ.आंबेडकर हे प्रभावित झाले.’असे त्याने आंबेडकर जयंती निमित्ताने ‘द प्रिंट’ ह्या वेबपोर्टलवर ‘Ambedkar’s links with RSS & how their ideologies were similar’ ह्या विषयावर साडेसहा मिनिटांचा व्हिडियोत केला होता.त्यामध्ये त्यांने अनेक बिनबुडाचे दावे केले आहेत.प्रत्येक दाव्याला ऐतिहासक पुरावें आहेत, असेही तो बरडला.मात्र त्याचे सर्व दावे निराधार आणि कपोल्काल्पित होते.तसाच दावा organiser मध्ये १४/०४/२०२३ प्रकाशित लेखात पंकज जयस्वाल ह्याने देखील केला होता.’१९३९ मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सकाळी संघ शिक्षा वर्गात आले आणि त्यांनी सर्व कार्यक्रम पाहिले आणि दुपारी डॉक्टर हेडगेवारजी आणि इतर स्वयंसेवकांसोबत भोजन केले.त्यांनी स्वयंसेवकांशी चर्चा करून शाखेत वेळ घालविला’.अर्थात हे कॉपी पेस्ट होते.असाच दावा २०१७ मध्ये आर.एस.एस.चे विचारक राकेश सिन्हा यांनी ‘Will Aiyar and the Congress come clean on Ambedkar’ ह्या शीर्षकाचा लेख लिहिला होता. त्यामध्ये ‘१९३८ मध्ये आंबेडकरांनी पुण्यात आर.एस.एस.च्या कॅम्पला भेट दिली होती, असे नमूद केले होते.मुळात अरुण आनंद, पंकज जयस्वाल आणि राकेश सिन्हा यांचे वर्ष जुळत नाही.तेच थोतांड २ जानेवारी १९४० रोजी सातारा जिल्ह्यातील कराड येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेला भेट दिल्या बाबतचे आहे.मुळात दोन्हींच्या माहितीचा आधार काय आहे? तर आर.एस.एस.च्या प्रचारकी पुस्तकांमध्ये असले उल्लेख आढळतात असे ठोकून दिले जाते किंवा भटमान्य टिळकांच्या केसरी वृत्तपत्रामधील माहितीचा आधार आहे असे सांगितले जाते.मात्र त्यांना काहीच ऐतिहासिक महत्त्व नाही, कारण, ती इतिहासाची मोडतोड आणि सांस्कृतिक राजकारणाचा घाणेरडा राजकीय डाव आहे.डॉ बाबसाहेब आंबेडकर ह्यांचे चरित्र आणि त्यांच्या लिखाणात कुठेच ह्या भेटी बाबत उल्लेख नाही.ज्या ९ जानेवारी १९४० च्या केसंरी वृत्तपत्राचा उल्लेख केला गेला आहे.मात्र डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी प्रकाशित केलेल्या २० जानेवारी १९४० च्या जनता पत्रकात तसेच महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेल्या बाबासाहेबांच्या लेखन आणि भाषणे खंड १८ भाग दोनमध्ये पान नंबर ३१२ वर क्रमांक १७० मध्ये बाबासाहेबांचे कराड येथील एका वेगळ्या कार्यक्रमातील भाषण आहे.त्यात संघ शाखा भेटीचा उल्लेख नाही.भटमान्य टिळकाच्या केसरी वृत्तपत्राला बाबासाहेबांचा आणि त्यांचे कार्याचा प्रचंड विटाळ होता.बाबासाहेबांनी आपल्या साप्ताहिकाची जाहिरात छापण्यासाठी मनीऑर्डर व जाहिरात मजकूर पाठवला होता.मात्र पैसे देवूनही केसरीने डॉ बाबासाहेबाची जाहिरात छापण्याचे नाकारले हा काळाकुट्ट इतिहास आहे.तोच केसरी बाबासाहेबांच्या भेटीचा वृत्तांत विनामूल्य छापणे शक्य आहे का? डॉ बाबासाहेब हे कराड नगरपरिषदेने देऊ केलेल्या मानपत्र समारंभात उपस्थित होते.अगदी रस्त्यात त्यांचा अपघातही झाला असतानाही त्यांनी कार्यक्रमात भाषण दिले.त्यानंतर स्वतंत्र मजूर पक्षाच्या प्रतिनिधी निवडीसाठी स्वतः बाबासाहेबांनी महारवाड्यातील एका सभेला संबोधित केले होते आणि ते आपल्या सहकाऱ्यांसह साताऱ्याला परत गेले.त्यामुळे संघाच्या शाखेला भेट दिल्याची तद्दन खोटी आणि बकवास माहिती रंगविण्यात आली आहे.

संघाच्या विश्व संवाद केंद्राने खोटी व दिशाभूल करणारी निराधार माहिती देत त्याआडून संघाच्या खाद्यावर बाबासाहेब वाहून नेण्याचा प्रयत्न का केला आहे? एकेकाळी भाजप सरकारमध्ये मंत्री असलेल्या अरुण शौरींनी ‘वरशिपिंग फॉल्स गॉड्स’ नावाचा ग्रंथ लिहून बाबासाहेबांवर कठोर टीका केली होती त्यावेळी भाजपने त्याच्यावर कुठलीही कारवाई केली नाही, हा इतिहास आहे.त्याच संघाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रात: स्मरणीय कसे बरे झाले असतील ? २ जानेवारी १९४० ते २ जानेवारी २०२५ संघावाल्याना ७५ वर्षांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांचे महान कार्याबाबत बाबत अनभिज्ञ असलेल्या संघाला अचानक जाग कशी आली? त्याचे उत्तर सापडते ते २ जानेवारी २०२५ कराड येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकमात.त्याचे नीट अवलोकन केले असता त्यामागे काय अजेन्डा आहे ते दिसून येते.

बंधुता परिषद नावाखाली आयोजित परिसंवादात कोण कोण निमंत्रित होते ? तर बौद्ध युवक संघटनेचे अध्यक्ष ॲड विजय गव्हाळे, दलित महासंघाचे अध्यक्ष प्रा. मच्छिंद्र सकटे, राज्यसभेचे माजी खासदार प्रा. अमर साबळे आणि ॲड क्षितिज टेक्सास गायकवाड.ह्यांची पार्श्वभूमी तपासली असता लक्षात येते की नेमका खेळ काय आहे.त्यातल्या त्यात परिषदेची सुरुवात बुद्ध वंदनेने करण्यात आली हा सर्वात मोठा विनोद आहे.कुठे बुद्ध तत्वज्ञान आणि कुठे विषमतावादी संघाचा अजेन्डा ? बरे वक्त्यांनी काय मांडणी केली असेल ? ती पहिली तर संघाला काय अजेंडा काय सेट करायचा होता? त्याचा उलगडा होतो.

“काँग्रेसच्या तत्कालीन नेत्यांनी डॉ.आंबेडकरांवर सर्वाधिक अन्याय केला.आज याच पक्षाचे लोक संविधान वाचवाचा नारा देत आहेत.”

“देशाच्या फाळणीच्या वेळीही बाबासाहेबांनी इस्लामचा धोका वारंवार सांगितला होता.फाळणीच्या विरोधात त्यांनी कठोर भूमिका घेतली होती. तत्कालीन काँग्रेस नेत्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे आज बांगलादेशात हिंदू आणि बौद्ध बांधवांवर अत्याचार होत आहेत.”

“डॉ.बाबासाहेबांनी भारतीय परंपरेचा बौद्ध धर्म का स्वीकारला याचा विचार आपण सर्वांनी केला पाहिजे. बंधुत्वासाठी हिंदू समाजाला डॉ.आंबेडकर समजून घ्यावे लागतील.” हे सर्व वाचले की लक्षात येते की, भाजपचा राजकीय अजेन्डा राबविण्यासाठी हि कथित बंधुता परिषद होती.कॉंग्रेस आणि मुसलमान ह्यांना ठोकून काढण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे अनुयायी ह्यांचा गैरवापर करण्यासाठी हि परिषद कराड मध्ये घेण्यात आली आहे.त्यात ‘घमडे बौद्ध’ निमंत्रित करून बौद्ध धर्म, बौद्ध अनुयायी हे हिंदू धर्माचा भाग आहेत.असा आभास उभा करण्याचे षड्यंत्र रचले गेले होते.तसेच बांग्ला देशातील हिंदू अत्याचार मुद्दा हायलाईट करणे हा उद्देश ठेवून हि परिषद घेण्यात आली.ज्यांना बुद्ध विचार चालत नाही त्यांनी बुद्ध वंदना घेवून कार्यक्रम सुरू केला ह्या पेक्षा अधिक नाटकी काय असू शकते ?
डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांचा छळ केवळ कॉंग्रेसने केला असे नाही तर हिंदू कोड बील प्रकरणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांची जिवंतपणी प्रेतयात्रा काढायला लावणारे आणि मुंबईत बाबासाहेबांना पराभूत करण्यासाठी हिंदू महासभेची मंडळी सर्वात पुढे होती.ती हिंदू महासभा आणि इतर नावाने बाबासाहेबाचा विरोध करीत होती.
देशाच्या फाळणी बाबत जो धोका बाबासाहेबांनी व्यक्त केला तो त्यांचा प्रबंध आहे.त्यात हिंदू आणि मुस्लीम दोघा बाबत साधार आणि शास्त्रशुद्ध मांडणी आहे.ह्यात डॉ बाबासाहेब पाकीस्तानच्या निमित्ताने मुस्लीम प्रश्न, स्वयं-निर्णयाचा अधिकार आणि हिंदुत्वाची चर्चा करतांना लिहितात की, “हिंदु राज्याची संकल्पना जर प्रत्यक्षात उतरली तर या देशावर कोसळलेली ती महाभयानक आपत्ती असेल.समर्थक हिंदू त्याबद्दल काहीही म्हणोत, पण हिंदुत्व हे स्वातंत्र्य, समता व बंधुता यांचे शत्रू आहे.हिंदुत्व हे लोकशाहीविरोधी आहे. म्हणून कोणतीही किंमत द्यावी लागली तरी आपण हिंदुराज्य घडू देता कामा नये.” अशी रोखठोक भूमिका बाबासाहेबांनी संघा विरुद्ध आणि त्यांचे विचारधारे विरोधात घेतली होती.ह्यावर संघाची काय भूमिका आहे? बाबासाहेबाचा हा विचार संघ स्विकारणार आहे की केवळ हिंदू मुस्लीम तेढ निर्माण करण्यासाठी ते पाकीस्तानच्या निमित्ताने मुस्लीम आणि फाळणी बाबत दिलेले ठराविक दाखले वापरणार आहे? हिंदू राष्ट्र बाबत डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी मांडलेला धोका ह्या वर कधी बंधुता परिषद घेतली जाणार आहे? केवळ मुस्लीम द्वेष ह्यासाठी बौद्ध आणि मातंग ह्यांचा वापर करणार आहेत? १९३५ किंवा १९४० च्या सुमारास किंवा त्यानंतरही डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे आर.एस.एस.शी कोणत्याही प्रकारचे संबंध नव्हता.तसेच, पुढील काळात हिंदू राष्ट्राची चर्चा करणाऱ्या मंडळी सोबत त्यांचे वैचारिक साम्य आणि संबंध नव्हते.कारण संघ समरसता सांगते तर डॉ बाबासाहेब समता सांगतात.ह्या दोन्ही संकल्पना वेगळ्या आहेत.हिंदू धर्म त्याग करताना जन्माने आलेली विषमता (जात, धर्म इत्यादी), वारशातून आलेली विषमता (संपत्ती, ज्ञान इत्यादी) आणि कर्तृत्वामुळे आलेली विषमता अशा तीन भागात बाबासाहेब हिंदू धर्मातील विषमतेला पाहत होते.यातल्या कर्तृत्वामुळे आलेल्या विषमतेपेक्षा पहिल्या दोन म्हणजेच जन्माने आणि वारशाने आलेल्या विषमतेबाबत त्यांचं स्पष्ट मत होतं की, यांचा अंत व्हायला हवा. त्यासाठीच त्यांचे सर्व प्रयत्न झालेले दिसतात.त्याचवेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक राहिलेले माधव सदाशिव गोळवलकर हे या पहिल्या दोन्ही विषमतांना ‘नैसर्गिक’ म्हणतात.” अर्थात वर्णव्यवस्थेत आहे ते स्थान स्विकारून आमच्यात सहभागी व्हा, आहात तसे आमच्यात समरस हि आहे समरसता.या उलट बाबासाहेब माणूस म्हणून अधिकार आणि समानता प्रदान करणारी समता ह्याचा पुरस्कार करतात.हे दोन्ही दोन वेगवेगळे टोक आहेत.त्यामुळे बाबासाहेब संघा बाबत प्रभावित होण्याची शक्यताच नाही.
विशेष म्हणजे १९३५ हे वर्ष चळवळीच्या निमित्ताने आणि बाबासाहेबाच्या व्यक्तिगत आयुष्याच्या निमित्ताने अतिशय महत्वाचे असल्याने या सालाविषयी विपुल लेखन झालेले आहे.चांगदेव खैरमोडे यांनी एक स्वतंत्र खंडच १९३५ च्या घडामोडींवर काढलेला आहे.परतू त्यात कुठेच बाबासाहेब आणि आर. एस. एस. यांच्या संबंधाविषयी एक ओळही उपलब्ध नाही.डॉ बाबासाहेब आंबेडकराचा धर्मातल्या जातींबाबत त्यांचा मुख्य आक्षेप होता आणि त्यांचा अंतिम हेतू जातीअंताचा होता आणि तो हिंदू धर्मात साध्य होणार नाही म्हणून १९३५ मध्ये त्यांनी धर्मांतराची घोषणा केल्यामुळे संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रात खूप मोठी वैचारिक घुसळण झाली.शीख, मुस्लीम, बौद्ध, आर्य समाज आणि ख्रिस्ती अशा सगळ्या मंडळींनी बाबासाहेबांना आपापल्या धर्मात येण्याचे निमंत्रण दिली.हिंदुत्ववादी मंडळीनी कधी शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी तर कधी मसुरकर महाराज अशा वेगवेगळ्या लोकांच्या माध्यमातून आंबेडकरांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला पण बाबासाहेब बधले नाही, बाबासाहेबांना रोखणे शक्य झाले नाही.म्हणून बाबासाहेबांना एकटे पाडण्यासाठी डिसेंबर १९३५ मध्ये एम.सी.राजा यांच्या अध्यक्षतेखाली व इतर अस्पृश्य नेत्यांना सोबत घेवून ‘धर्मांतरविरोधी परिषद’ पुणे येथे हिंदू महासभेच्या अधिवेशनाच्या वेळी भरविण्याचे ठरविले गेले होते.परिषदेची तारीख राजा यांना सोईस्कर होत नसल्यामुळे परिषद भरविता आली नाही.धर्मांतर विरोधी परिषद झाली नसली तरी डिसेंबर १९३५ मध्ये हिंदू महासभेचे अखिल भारतीय अधिवेशन मात्र पार पडले. हे अधिवेशन देखील बाबासाहेबांच्या धर्मांतराच्या चळवळीला विरोध करण्यासाठीच होते.सबब त्या अधिवेशनात अस्पृश्यता निवारणावर विशेष चर्चा करण्यात आली. अधिवेशनात डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या राजकीय नेतृत्वाला शह देण्यासाठी धर्मांतर विरोधी भूमिका असलेल्या अखिल भारतीय अस्पृश्य नेत्यांना निमंत्रित करण्यात आले होते.त्यामध्ये जगजीवनराम, रसिकलाल बिस्वास, बंगालचे नामशुद्र नेते जे.एम.मंडल, यु.पीचे चर्मकार नेते डॉ.धर्मप्रकाश, पुण्याचे चर्मकार नेते पा.ना.राजभोज, मद्रासचे अस्पृश्य नेते एम.सी.राजा, बाळू पालवणकर (माजी क्रिकेटपटू) आणि चर्मकार नेते२, मध्य प्रांत आणि बेरार मधील अस्पृश्य नेते किसन फागुजी बनसोडे, पुण्याचे खांडेकर इत्यादींना अधिवेशनात सहभागी करून घेतले होते.दिल्लीचे लाला नारायण दत्त, स्वामी चिदानंद, पं.रामनाथ कालिया, कानपूरचे एल.जी.टंडन, बलवंतराय कपूर, म.गो.श्रीप्रसाद, अजमेरचे चांदकरण सारडा, लाहोरचे भाई परमानंद, प्रो.धर्मचंद, पं.नानकचंद, मोंगीरचे रा.ब.दिलीप नारायणसिंह, नागपूरचे मुंजे, श्री.माधव चिटनवीस, डॉ. केशव बळीराम हेडगेवार, कलकत्याचे बाबू पद्मराज जैन, प्रयागचे पं.कृष्णकांत मालवीय, पं.राधाकांत मालवीय, डॉ.राधाकुमूद मुखर्जी, श्री.सक्सेना, पाटण्याचे श्री.जगजीवनराम, काशीचे कन्हैयालाल मिश्र४, इत्यादी सवर्ण हिंदूंचा समावेश होता.आर.एस.एस.चे हेडगेवार ह्या अधिवेशनाला हिंदू महासभेचे नेते म्हणूनच उपस्थित होते.केवळ डॉ बाबासाहेब आंबेडकरांना विरोध करण्यासाठी हिंदू महासभेचे अधिवेशन पुण्यात भरते.त्यामध्ये डॉ आंबेडकर सोडून देशभरातील अस्पृश्य समाजाच्या नेत्यांना आमंत्रित केले जाते आणि हेगडेवार हिंदू महासभेचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित असतात असा टोकाचा विरोध करणा-या संघ शाखेत गेले होते हि मांडणीच शुद्ध बदमाशी आहे.

हेडगेवार आणि गोळवलकर ही दोन्ही संघाला घडवणारी, दिशा देणारी आणि मार्गदर्शन करणारी मंडळी होती.‘परमपूजनीय डॉ. हेडगेवार पत्ररूप व्यक्तिदर्शन’, ‘पत्ररूप श्रीगुरुजी’ आणि ‘समग्र गुरुजी – खंड ८ पत्रसंवाद’ ही महत्वाची पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांच्या पत्रसंग्रहात १९३९ च्या जवळपास एकही पत्र आंबेडकरांना उद्देशून लिहिलेले दिसत नाही.तसेच, कुठल्याही पत्रांमध्ये आंबेडकरांविषयी चर्चा नाही. दोन्हींच्या पत्रांमध्ये खूप वेगवेगळ्या बाबींची चर्चा झालेली दिसते.झालेल्या कॅम्पांची माहिती तसेच, येवू घातलेल्या कॅम्पांची माहिती हेडगेवार व गोलवळकरांच्या पत्रांमधून मिळते. त्यामुळेच असा प्रश्न उत्पन्न होतो की, १९३९ साली आंबेडकरांनी आर. एस. एस. कॅम्पला भेट दिली होती तर मग त्याची माहिती का उपलब्ध होत नाही? कारण अशी कुठलीही भेट झालेलीच नाही.त्यामुळे लिहणार कसे?
महाराष्ट्रातील हिंदुत्ववादी चळवळीचा इतिहास लिहिणारे शंकर रामचंद्र दातेंनी त्यांच्या ‘महाराष्ट्रातील हिंदू महासभेच्या कार्याचा इतिहास’ ह्या ग्रंथातदेखील डॉ आंबेडकरांच्या आर.एस.एस. कॅम्प भेटीविषयी काहीच लिहिलेले नाही.१९३९ मध्ये हेडगेवार जीवंत असल्यामुळे ते हिंदू महासभेचे नेते होते.त्यामुळे दातेंनी त्यांच्या पुस्तकात आर.एस.एस., हेडगेवार आणि त्यांची कार्यपद्धती याविषयी विपुल लेखन केले आहे.त्या सर्व लिखाणात कुठेच डॉ आंबेडकर आणि आर.एस.एस. असा उल्लेख नाही.महाराष्ट्र हिंदू महासभेचे केंद्र पुणे शहर होते.तसेच, शंकर दाते हे महाराष्ट्र हिंदू महासभेचे महत्त्वाचे नेते सुद्धा होते. ५२५ पैकी १२५ अस्पृश्य असलेला आर.एस.एस.चा कॅम्प झाला आणि त्यात आंबेडकरांची उपस्थिती, हि ऐतिहासिक घटना ठरते.एवढेच नव्हे तर त्यामुळे बाबासाहेब प्रभावित झाले असे म्हटले जाते.तर मग ह्या ऐतिहासिक घटनेविषयी दातेंनी त्यांच्या पुस्तकात का लिहिले नव्हते? विशेष म्हणजे हिंदू महासभेच्या कार्याचा इतिहास लिहितांना त्यांनी हिंदुत्व चळवळीतील वैगुण्याविषयी सुद्धा लिहिले आहे.त्यामुळे त्यात डॉ बाबसाहेब आंबेडकर भेट वगळणे शक्यच नव्हते.त्यामुळे हे सर्व कपोलकल्पित भेटीचे नाटक उभे करण्यात आले आहे.
अस्पृश्य समाजातील कृष्णराव गांगुर्डे हे सावरकरांच्या प्रेरणेतून हिंदू महासभेत दाखल झाले होते.पूर्वी त्यांनी काळाराम सत्याग्रहात सहभाग घेतला होता.विश्वास गांगुर्डे यांनी कृष्णराव गांगुर्डेची चरित्रात्मक कादंबरी लिहिली आहे.सदर पुस्तक ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचे आहे.कृष्णराव गांगुर्डे आंबेडकरांच्या धर्मांतराविरोधी भूमिका घेणारे हिंदुत्ववादी महार गृहस्थ होते.पुढील काळात ते हिंदू महासभेचे उपाध्यक्षही झाले.१९३९ साली पुण्यात हिंदू युवक परिषदेचे अधिवेशन भरले होते.त्याचे अध्यक्ष म्हणून डॉ.हेडगेवार यांची निवड झाली होती.या अधिवेशनात कृष्णरावही सामील झाले होते. तसेच, याच काळात कृष्णराव गांगुर्डे आर.एस.एस. मध्ये जावू लागले असेही उल्लेख कृष्णराव गांगुर्डेच्या चरित्रात्मक कादंबरीत आहेत.परंतु त्यातही कुठेच१९३९, १९४० मध्ये आर.एस.एस. कॅम्पात आंबेडकर आले होते.काहीही नमूद नाही.तसेच असाही दावा केला जातो की, बाबासाहेबांनी संघ बंदी उठविण्यासाठी पुढाकार घेतला होता मात्र हि देखील एक लोणकढी थाप आहे.
१९४८ मध्ये गांधीची हत्या नथुराम गोडसे नामक हिंदुत्ववाद्याने केली.त्यामुळे देशभरातील हिंदुत्ववादी संस्था आणि संघटनांच्या मंडळीना सरकारने ताब्यात घेत संघावर बंदी सुद्धा घातली.संघावर बंदी आल्याचे वृत्त समजताच गोळवलकरांनी संघ विसर्जित केल्याची घोषणा केली होती.१९४६ पासूनच संविधान सभेचे काम चालू होते.बाबासाहेब संविधान सभेत महत्त्वाची भूमिका निभावत होते.तत्कालीन सरसंघचालक गोळ्वलकर आणि आंबेडकर यांचा पत्रव्यवहार निश्चितपणे झाला असता.किंबहुना, डॉ. आंबेडकरांच्या साहित्यात त्याचा उल्लेख झाला असता परतू तसा संदर्भ आपणास कुठेच मिळत नाही.
डॉ बाबासाहेब आंबेडकर दिल्लीतील हिंदू महासभेच्या ना.भ.खरे यांना जावून भेटले होते अशी नोंद खरेंच्या चरित्रकारांनी आणि त्यांनी स्वत: त्यांच्या आत्मचरित्रात केली आहे.मात्र संघावरील बंदी उठवावी, अशी कोणतीही मागणी डॉ आंबेडकरांनी केलेली त्यात नमूद नाही.डॉ बाबासाहेब आंबेडकर चरित्र –खंड ९ मध्ये चांगदेव खैरमोडे यांनी डॉ आंबेडकर आणि खरे भेटीची नोंद घेतली आहे.त्यात देखील कुठेही डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संघावरील बंदी उठवावी अशी मागणी केली आहे असे नमूद नाही.कारण, खरे हे हिंदू महासभेचे नेते होते आणि डॉ आंबेडकर हे हिंदू महासभेचे कठोर टीकाकार होते.गांधी-आंबेडकरांमध्ये वैचारिक मतभेद होते.त्या मतभेदांचा फायदा घेत डॉ बाबासाहेब आंबेडकरांना संघ समर्थक ठरविण्याचा अश्लाघ्य प्रयत्न केला जातो आहे.आंबेडकरी चळवळीमध्ये गांधींची चिकित्सा केली जाते.त्यामुळे त्याचा गैरफायदा घ्यायचा आहे म्हणूनच ते अश्या कंड्या पिकवत आहेत.

हिंदू कोड बिलाला संसदेत आणि बाहेर मोठ्या प्रमाणावर विरोध झाला.राजकीय विरोध करणारे होते श्यामा प्रसाद मुखर्जी, राजेंद्र प्रसाद आणि आचार्य कृपलानी यांनी विधेयकावर टीका केली.तर सार्वजनिक विरोध हा हिंदू महासभा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS), आणि करपात्री महाराज यांच्या नेतृत्वाखाली करून मोठ्या प्रमाणावर निदर्शने झाली होती.बाबासाहेबांना विरोध करण्यासाठी एक भाग म्हणून ४ जानेवारी १९४९ मध्ये संविधान सभेच्या कामाजात गोंधळ आणि अडथळा निर्माण करण्यासाठी आर.एस.एस.ची मंडळी घटना सभेत घुसली होती.हा देखील इतिहास आहे.म्हणूनच जाणीवपूर्वक नवीन पीढीचा बुद्धीभेद करीत आहेत. तसेच इतिहासाची मोडतोड आणि विकृतीकरण करत आहे.डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आंतरजातीय विवाहांसोबत आंतरधर्मीय विवाहांचे सुद्धा समर्थन केले आहे.आंतरधर्मीय विवाहाच्या समर्थनार्थ बहिष्कृत भारतात आंबेडकरांनी १ जुलै १९२७ (हिंदु मुसलमानांच्या ऐक्याचा उपाय) आणि १२ ऑगस्ट १९२७ (ढोंगीपणा,माथेफिरूपणा व गैर मुत्सद्दीपणा) असे दोन अग्रलेख लिहिले आहेत.या उलट डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा कथित उदोउदो करणारी हि ढोंगी संघी मंडळी आंतरधर्मीय विवाहांना ‘लव जिहाद’ चे नाव देऊन विरोध करतात.
सबब प्रश्न उरतो की, १९३७ आणि १९४० ह्या कालावधीत संघ शाखा भेटीची कुठलीच नोंद डॉ आंबेडकरांच्या वृत्तपत्रांमध्ये का नाहीये? किंवा त्यांचे समग्र साहित्यामध्ये कुठेही नोंद का नाहीये? तसेच, चांगदेव खैरमोडे आणि बी.सी.कांबळे यांनी लिहिलेल्या बहुखंडी लेखन प्रकल्पात हा उल्लेख का आढळत नाही? तरी देखील डॉ बाबासाहेब आंबेडकर आर.एस.एस. कॅम्पला भेटून प्रभावित झाले, हे म्हणणे कसे खरे असू शकते ? डॉ बाबासाहेब आंबेडकरांची वृत्तपत्र चाळली तर स्पष्टपणे दिसते की,त्यात डॉ आंबेडकरांच्या भेटींचे वर्णने, भाषणांचे वृत्तांकने सातत्याने छापून येत होती.बाबासाहेबांना, जर आर.एस.एस.च्या कॅम्पने प्रभावित केले असते, तर त्यांनी निश्चितच तसे लिहून ठेवले असते.एकीकडे बाबासाहेबांच्या धर्मांतरण ह्याला १९३५ मध्ये विरोध करायचा आणि २०२४ साली डॉ.बाबासाहेबांनी भारतीय परंपरेचा बौद्ध धर्म का स्वीकारला याचा विचार आपण सर्वांनी केला पाहिजे.बंधुत्वासाठी हिंदू समाजाला डॉ. आंबेडकर समजून घ्यावे लागतील.अशी मखलाशी करणे हा एक सुनियोजित डाव आहे.१९३५ धर्मांतर घोषणे नंतर एक मोठी घटना घडली होती ती म्हणजे मनुस्मृतीचे दहन. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, इ.स. १९३८ मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत मनुस्मृती दहनाच्या प्रतीकात्मक स्वरूपावरील विधान करताना बोलतात की, “ते (मनुस्मृती दहन) एक दक्षतेचे उचललेले आक्रमक पाऊल होते. परंतु ते सवर्ण हिंदुंचे लक्ष वेधून घेण्यासाठी उचलेले होते. अधूनमधून अशा प्रकारचे तीव्र उपाय योजावे लागतात. तुम्ही दार ठोठावलेच नाही, तर ते कोणी उघडणार नाही. मनुस्मृतीचे सर्व भाग टाकाऊ आहेत आणि त्यात चांगली तत्त्वे मुळीच नाहीत किंवा मनु स्वतः समाजशास्त्रज्ञ नव्हता, तर केवळ एक मूर्ख माणूस होता, असा त्याचा अर्थ नाही. आम्ही मनुस्मृतीचे दहन केले ते शतकानुशतके आम्ही ज्या अन्यायाखाली चिरडले गेलो त्याचे प्रतिक म्हणून..!” संघाला ह्या दहना विषयी काय वाटते ? संघ मनुस्मृती दहन ह्याचे समर्थन करते का? गेली अनेक वर्षे जे आपल्या मुख्यालयात राष्ट्रध्वज लावत नव्हते.ज्यांना देशाची घटना मान्य नाही.त्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर मान्य होतील ?
मुळात नुसत्या हिंदू धर्माचे बंधुत्व हि संकल्पना संविधान विरोधी आहे.आपल्या देशात कुठल्याही एका धर्माचे नव्हे तर संविधानाचे राज्य आहे.ह्या देशाला कुठलाही धर्म नाही.त्यामुळे हि मांडणीच धोक्याची आहे.संघ आणि भाजपच्या मुस्लीम विरोधी अजेंड्या साठी बंधुता परिषद नावाचे थोतांड उभे केले गेले आहे.संघाच्या खाद्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांना वाहून नेण्याचा मनुवादी डाव आंबेडकरी अनुयायी कधीही यशस्वी होवू देणार नाहीत. किंबहुना त्यांच्या ह्या लोणकढी थाप कुणीही गांभीर्याने घेतली नाही, एवढे मात्र खरे..

राजेंद्र पातोडे
प्रदेश महासचिव
वंचित बहुजन युवा आघाडी
महाराष्ट्र प्रदेश
९४२२१६०१०१.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!