
हे असं आंबेडकरवादी अनुयायांच्या बाबतीत का होते? परभणी सारख्या ठिकाणी संविधानाची मोडतोड होत असेल, तर त्याचा विरोध करण्यामध्ये काय गुन्हा? मग घरात घुसून कोंबिग ऑपरेशन, तरुणांवर खोट्या केसेस करून त्यांचे आयुष्य का बरबाद केले जाते?
याउलट उच्च न्यायालयाचा न्यायाधीश संविधानिक तत्वाच्या विरोधी वक्तव्य करतो अथवा इतरही सर्रास संविधानिक मूल्यांची पायमल्ली होत असताना शासन यंत्रणा मूग गिळून का बसते?
याला जबाबदार कोण?
तर आंबेडकर अनुयायी ज्यावेळी संविधानाचा अथवा महापुरुषांचा अपमान होतो, त्यावेळी जागा होतो, बाकी वेळी झोपलेला असतो. ज्यांना या चळवळीमुळे स्थिरता आली, ते मुलाबाळांचे वाढदिवस, लग्नकार्य यामध्ये गुंग आहेत. निवडणुका आल्या कि नेत्यांना शिव्या देणे व बाकी जयंतीच्या दिवशी नाच -गाणे व 6 डिसेंबरला जेवण, पाण्याच्या बाटल्या वाटल्या कि आपले कार्य पूर्ण होते.
याउलट संविधानिक मूल्यांचा, संरक्षणामुळे मिळणाऱ्या लाभापासून मागासवर्गीय जनतेला वंचित ठेवण्यासाठी प्रतिक्रांती सतत दिवस रात्र कार्यरत असते. देशाच्या वेगवेगळ्या कोर्टामध्ये या तरतुदी खिळ-खिळ्या करण्यासाठी केसेस टाकल्या जातात.
अगदी आजच बातमी आहे. हिंदुत्वाची नशा जोरदार देण्यासाठी देशाभरातील न्यायालयांमध्ये 10 मशिदी किंवा दर्ग्याबाबत 18 याचिका दाखल आहेत.
दुसऱ्या बातमीमध्ये पुणे पोलिसांनी टिपू सुलतान, स्वातंत्रसैनिक मौलाना आझाद आणि संविधान दिनानिमित्त रॅली काढण्यासाठी AIMIM या संस्थेला मनाई केली, त्याची सुनावणी कोर्टात सुरु आहे.आज हिंदुत्वाची किल्ली राजकीय यशासाठी उपयुक्त आहे, म्हणून कोणी काय खावे, कोणते सण साजरे साजरे करावे, इतिहासाची मांडणी आपल्या सोयीनुसार करून अल्पसंख्यकांना आज टार्गेट केले जात असेल तर उदया आंबेडकरवादी अथवा हिंदुमधील पुरोगामी सुद्धा या कक्षेत येऊ शकतात. ही जास्त काळजीची बाब आहे.
अशा प्रकारच्या सततच्या वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरूनसुद्धा काही वेळा ते पराभूत होतात, परंतु त्यांचे प्रयत्न सतत सुरु असतात. कारण एखाद्या वेळी जरी पराभव झाला, तरी तॊ “चार पावले पुढे तर दोन पाऊले मागे “या प्रकारचा असतो.
तेव्हा ही परिस्थिती बदलण्यासाठी आपल्याला ग्राउंड लेव्हल वर कार्य करणे गरजेचे आहे. केवळ घरी बसून समाजमाध्यमावर ही चळवळ पुढे जाणार नाही.
आज विरोधी पक्ष कमजोर असल्याने राजकारण अथवा राजकीय नेत्यांवर केवळ अवलंबून न राहता शासन व सामान्य माणूस असा लढा सुरु ठेवण्याची गरज आहे.त्यासाठी बुद्धिवादी वर्गाने सामान्य जनतेला विश्वासात घेऊन आपल्याला आवडीप्रमाणे कोणत्याही सामाजिक, धार्मिक अथवा आर्थिक संस्थेमध्ये प्रत्येकाने झोकून काम करण्याची गरज आहे.
या वेगवेगळ्या संस्थानी एकमेकांना प्रतिस्पर्धी न मानता, एकमेकांवर टीका -टिपण्णी टाळून एकमेकांना पूरक कार्य करण्याची आवश्यकता आहे. गरज पडल्यास एकमेकांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून चळवळ, पुरोगामी विचार कसे पुढे जातील याची दक्षता घेणे आवश्यक आहे.
- शाम शिरसाठ
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत